Tuesday, March 31, 2009

समस्या आणि उत्तरे

सलोनी, आत्ता मी न्युअर्क (न्युयॉर्क जवळ) विमानतळावर विमानाची वाट बघतोय. अजून ४० एक मिनिटे आहेत. तेवढ्यात तुझ्याशी काही संवाद साधु!
काही कामानिमित्त इकडे मॉरिसटॉउनला येणे झाले. तसे आता मागच्या ५ वर्षात ५० वेळा तरी आलो असेन. आमच्या कंपनीचे मुख्यालय मॉरिसटाउनमध्ये आहे. त्यामुळे वरचेवर यावे लागते.
अमेरिका देश तसा प्रचंड अवाढव्य आहे. भारताच्या तिप्पट मोठा आणि १/३ लोकसंख्या! त्यामुळे दोन शहरांमध्ये अंतर बरेच असते. फिनिक्स ते न्युअर्क २३०० मैल म्हणजे ३७०० कि.मी. अंतर आहे. त्यामुळे विमानप्रवासाशिवाय पर्याय नाही. असा प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या देशाला एकत्र आणणे आणि एकत्र ठेवणे या लोकांनी कसे काय केले असेल? आता तरी दळणवळणाची साधने आहेत. परंतु आत्ता आत्ता पर्यन्त म्हणजे आयझेनहॉवरने १९५० च्या दशकात इथले दृतगती मार्ग अर्थात फ्रीवेज बांधण्यापूर्वी साधे रस्तेच होते.
मला वाटते प्रश्न अडचणींचा नाही. इच्छाशक्तीचा आहे.
रशिया सुद्धा अमेरिकेसारखाच मोठा आहे आणि रशियाकडे नैसर्गिक साधने जास्त आहेत परंतु तिथे इतका विमानप्रवास सर्रास दिसत नाही. अमेरिकेत फिनिक्सहुन न्युअर्कला विमानाने जाणे स्वस्तपण आहे आणि जलद तर आहेच आहे. आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे हे सहजशक्य आहे. इथले लोक हताश झाले नाहीत की केवढा मोठा देश... कसा सांभाळु! त्यांनी मोटारी आणि विमानांचा शोध लावला. आणि मग ते तन्त्रज्ञान सर्व लोकांच्या आवाक्यात येईल इतके स्वस्त केले.
प्रत्येक गोष्टीकडे त्यांनी आव्हान म्हणुन पाहिले आणि स्वीकारले. १९३० च्या दशकात जेव्हा इथे महामंदी (डिप्रेशन) होती तेव्हा इथल्या राज्यकर्त्यांनी दोन खूप मोठे प्रश्न सोडवले - दोन्ही पाण्याशी निगडीत. कॅलिफोर्निया हा दुष्काळी भाग होता तिकडे पाण्याचे दुर्भिक्ष होते. परंतु कोलराडो नदीला उन्हाळ्यात पूर येत असे. आणि जीवित आणि वित्तहानी होत असे. उन्हाळ्यात पूर यासाठी की कोलराडो राज्यातील बर्फ़ उन्हाळ्यात वितळत असे आणि तो कोलराडो नदीच्या रुपात कॅलिफोर्निया आणि अरिझोना राज्यातुन पूराच्या रुपात वाहुन हात असे. त्याउलट मिसिसिपी ही नदी पावसाळ्यात मध्य अमेरिकेत विशेषत: लुइझियाना आणि मिसिसिपी राज्यात हाहाकार माजवत असे. या दोन्ही नद्या हजारो किमी लांब आहेत. १९३० च्या दशकात अमेरिकेने हे आव्हान स्वीकारले आणि दोन्ही प्रश्न सोडवले. कोलरडो नदीला त्यांनी हुव्हर (आणि नंतर ग्लेन कॅनिअन) धरण बांधुन असे अडवले की त्या धरणांत २० वर्षे पाउस नाही पडला तरी पुरेल इतका पाणीसाठा आहे. ही दोन्ही धरणे अद्वितिय आहेत. आश्चर्य आहेत. त्याबद्दल कदाचीत वेगळा लेख लिहावा लागेल. असो .. त्याउलट मिसिसिपी नदीवर त्यानी बांध घातले ज्यामुळे सखोल प्रदेशातुन जाताना या नदीचे पाणी पसरणे बंद झाले. तेव्हापासुन या बांधांनी गेली ७५ वर्षे काम केले - कट्रिना वादळ होइपर्यंत.
हे दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेने जागतिक बॅंकेचा सल्ला घेतला नाही. स्वत:ची बुद्धी वापरली. भारताने १९६० च्या दशकात नद्याजोड प्रकल्प राबवायचे ठरवले. परंतु आपल्याकडच्या भ्रष्ट आणि कचखाउ राज्यकर्त्यांनी जागतिक बॅंकेचा अहितकारी सल्ला स्वीकारला. ती योजना पुढे बारगळली.
आपण आपले प्रश्न काय आहेत हे ओळखले पाहिजे आणि त्यावरची उत्तरे आपणच शोधली पाहिजेत. आणि असे करताना आपल्या लोकांचे कल्याण कसे होइल याचा विचार केला पाहिजे. कल्याण हा काही फार मोठा शब्द नाही. कल्याण म्हणजे काय तर सर्व लोकांना जीवित वित्त यांची सुरक्षा/शाश्वती आणि आपले आयुष्य घडवण्यासाठी समान संधी असणे.
असो .. आज इतके भाषण पुरे. परंतु अमेरिकेच्या धाडसी आणि कल्पक वृत्तितुन खुप काही शिकण्यासारखे आहे यात शंकाच नाही.

No comments: