Saturday, April 18, 2009

क्लीन बोल्ड, चारी मुंडया चीत, मार डाला

मार डाला !त्रिफळा उडाला !!चारी मुंड्या चीत !!!
सलोनीबाईंचे ३ आठवडे आधी आगमन झाले। सविस्तर कहाणी मागाहुन पोस्ट करेन... आत्ता हॉस्पिटलमधुनच हे फोटो ब्लॉगवर टाकतो आहे।


सलोनी ..












सिद्धोबा आणि सलोनी।









बाबा आणि सलोनी (वय वर्षे ४ मिनिटे!)









आई
आणि सलोनी (वय वर्षे २ मिनिटे !)




Friday, April 17, 2009

राशोमोन

प्रिय सलोनी

एमबीए करत असताना इंटर्नशिपसाठी मिशिगनहुन ३ महिने अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर स्टॅम्फर्ड नावाच्या एका शहरात राहण्याचा योग आला। २००१ मध्ये मे ते ऑगस्ट असे आम्ही तिथे राहिलो। स्टॅम्फर्ड न्युयॉर्कपासुन ३० मैलावर कनेटिकट राज्यात आहे. तिथेही सार्वजनिक वाचनालय होतेच. अर्थात आम्ही त्याचे सदस्य लगेच झालो. त्या वाचनालयातुन एकदा "राशोमोन" हा एक चित्रपट आणला त्याबद्दल आज तुला मला काही सांगायचे आहे. या चित्रपटाने माझ्या विचारांना एक नवीन चांगली दिशा दिली.

राशोमोन हा अकिरा कुरासावाचा चित्रपट। अकिरा कुरासावा एक महान जपानी चित्रपट दिग्दर्शक होता. जिवंत, खिळवुन ठेवणारे चित्रपट हे त्याचे वैशिष्ट्य. प्रकाश, नेपथ्य, आवाज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कॅमेर्याच्या हालचालीतुन प्रसंगाला उठाव आणण्याची त्याची हातोटी वाखाणण्यासारखी होती. राशोमोन हा चित्रपट या सर्व तांत्रिक बाबत सरस होताच. परंतु त्याहीपलिकडे या चित्रपटाने पाश्चात्य जगाला हादरवुन टाकले ते त्या चित्रपटाच्या आशयाने.

आपण आयुष्यात जे काही निर्णय घेतो ते सोपे असतील तर आपल्याला बरे वाटते। साधे सोपे नियम सगळ्यांनाच आवडतात. जास्त गुण चांगले, कमी गुण वाईट. जास्त पैसे असणे श्रेयस्कर, कमी असणे वाईट. निरोगी चांगले, रोगी वाईट इत्यादि. त्यामुळे आपल्याला कळते की आयुष्यात कशाचा पाठलाग करायचा! परंतु जग असे काळे पांढरे असे असते तर किती बरे झाले असते. गम्मत अशी आहे की पांढर्यापासुन काळ्यापर्यंतच्या वेगवेगळ्या छटा आहेत इथे. इतकेच नाही तर अनेक रंगांच्या छटा आहेत. त्यामुळे रोजच्या आयुष्यात काय खरे काय खोटे, काय श्रेयस्कर आणि काय त्याज्य याचा विचार सोपा नाही.

राशोमोन चित्रपटात साधारण हाच विषय हालाळला आहे। यात एकच घटना अनेक व्यक्तींच्या दृष्टीकोनातुन दाखवली गेली आहे. चित्रपटात अगदी मोजकी म्हणजे ५-६ पात्रे आहेत. घटनेचे वर्णन मी करत नाही कारण ते तितके महत्वाचे नाही. परंतु तीच घटना ज्यावेळी प्रत्येक पात्र कथन करते तेव्हा प्रत्येकवेळी वेगळाच दृष्टीकोन समोर येतो. चित्रपटाच्या शेवटी आपण विचार करत राहतो की कोणता दृष्टीकोन खरा आणि कोण नक्की खोटे बोलत आहे! आणि मग कळते ... की सत्य हे असेच आहे. काही तरी घटना घडली हे नक्की. परंतु नेमके काय घडले याचा आपण केवळ अंदाज बांधण्याचा प्रयत्न करु शकतो. सत्याचा शोध घेउ शकतो ... त्यापर्यंत पोहोचुच असे नाही.

१९५० साली जेव्हा हा चित्रपट व्हेनिसच्या महोत्सवात दाखवला तेव्हा प्रचंड गाजला। पाश्चात्य मनाला ही विचारसरणी अगदी क्रांतीकारक वाटली.

तशी पाश्चात्य जगाची धारणाच सरळसोट आहे। इथे नियमबद्धता खूप महत्वाची. आधुनिक शास्त्रे असो वा मानवी जीवन असो ... नियमांमुळे आचार विचार व्यवहार यांमध्ये सुसुत्रता आणि निश्चितता येते. निश्चिततेमधुन स्थैर्य आणि स्थैर्यातुन प्रगती होते. आधुनिक शास्त्र बव्हंशी नियमांवरच अवलंबुन आहे. पुन:प्रत्ययातुनच शास्त्राचे नियम सिद्ध होतात. सफरचंद खालीच पडते. आणि रोजच खालीच पडते. यामध्ये एक नियम आहे जो त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे मानवी मनाला आपल्या भोवतालच्या जगाचे आकलन करणे सोपे जाते. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला विज्ञानातही हीच क्रांती घडली की ज्याने विज्ञानाला शक्याशक्यतेच्या परिघात आणुन सोडले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हायजेनबर्ग वगैरे प्रभृतींनी क्वांटम फिजिक्सचा शोध लावला. या विज्ञानानुसार कोणत्याही वस्तुचे अस्तित्व हे अनेक शक्यतांचा केवळ एक परिपाक असते. कुठल्याही वस्तुचे अस्तित्व हे ठामपणे सिद्ध करणे अशक्य आहे अगदी ती वस्तु तुमच्या डोळ्यासमोर असेल तरीही. आइनस्टाईनसारख्या महान शास्त्रज्ञानेदेखिल त्यावर विश्वास ठेवला नाही सुरुवातीला. परंतु काळाच्या ओघात त्याने आणि सर्वच शास्त्रज्ञांनी क्वांटम फिजिक्स मधील तत्वे मान्य केली.

जर वस्तुंबाबत ही अवस्था तर मानवी मनाचे काय!! सत्य जाणुन घ्यायची मानवी मनाची तगमग स्तुत्य आहे, श्रेय आहे आणि आवश्यकही आहे. परंतु आपण केवळ सत्याकडे वाटचाल करु शकतो. अंतिम सत्य अमुकच आहे हे ठामपणे सिद्ध करणे मात्र अशक्य आहे. दोन दिवसांपूर्वी मी जे काही म्हणालो की "सत्याची कास धरण्याचे सामर्थ्य आणि सत्याचा ठाव घेण्याची पात्रता तुला लाभो" त्याजोडीला हीसुद्धा इच्छा की सत्याचा ध्यास असू देत ... परंतु पूर्ण अथवा अंतिम सत्यावर आपला अधिकार नाही हेदेखिल समजुन घे.

Wednesday, April 15, 2009

ग्रॅण्ड कॅनियन

सलोनी,

तुझी आमची डोळाभेट (!) जवळ येत चालली आहे. माहित नाही पुढे अजुन किती लिखाण
करण्याची संधी मिळेल. तसे काही विशेष रुपरेषा ठेवुन हे लिखाण केले नाही
त्यामुळे अमेरिकेतील आमच्या वास्तव्याचा अगदी सर्व आलेख मांडता आला नाही. आता
उरलेल्या थोड्या दिवसांमध्ये मात्र काही अगदी आवर्जुन उल्लेख कराव्या अश्या
गोष्टी मांडेन. आज तुला ज्याच्या उल्लेखाशिवाय आमचे अमेरिकन अनुभवविश्व आणि
भावविश्व अगदी अपूर्ण राहील अश्या ग्रॅण्ड कॅनियनबद्दल सांगणार आहे.

भारतात असल्यापासुनच ग्रॅण्ड कॅनियनबद्दल बरेच ऐकुन होतो. निसर्गाचा सर्वात
मोठा चमत्कार, करोडो वर्षांच्या पंचमहाभूतांच्या लीलांमधुन निर्माण झालेले एक
अद्भुत आश्चर्य इत्यादि इत्यादि. ग्रॅण्ड कॅनियन पाहण्याची इच्छा नक्कीच होती
परंतु कधी पाहण्याचा योग येइल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आणि योगायोगाने मला
एमबीएनंतर ऍरिझोनामध्ये नोकरी मिळाली आणि मागील ६ वर्षांत ग्रॅण्ड कॅनियन एकदा
दोनदा नाही तर कमीत कमी २० एक वेळा पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली.

खरोखरच ग्रॅण्ड कॅनियन ही नुसती पाहण्याची गोष्ट नाही. तर अनुभवण्याची गोष्ट
आहे.


फिनिक्सपासुन जेमतेम ३ १/२ तासांच्या अंतरावर म्हणजे २४० मैलावर असल्यामुळे
मागील ६ वर्षांच्या फिनिक्सच्या वास्तव्यात आम्ही ग्रॅण्ड कॅनियनला दर ३-४
महिन्यात किमान एकदा तरी गेलो आहोत. फिनिक्स समुद्रसपाटीपासुन १००० फुट उंचीवर
तर ग्रॅण्ड कॅनियन ६-७००० फुटांवर! त्यामुळे फिनिक्समधील वाळवंटी वातावरणाचा
ग्रॅण्ड कॅनियनच्या आसपास मागमूसही दिसत नाही. दिसतात ती सूचिपर्णी वृक्षांच्या
वातावरणासारखी झुडुपे. फिनिक्समध्ये जे काही तापमान असेल त्यापेक्षा २०-३० अंश
फॅरेनहाईट कमी तापमान असते ग्रॅण्ड कॅनियनला.

ग्रॅण्ड कॅनियनचे पहिले दर्शन (होय दर्शनच) मला ४ जुलै २००३ ला झाले. मी
सोनाली सिद्धु गिरीष आणि सुचेता ग्रॅण्ड कॅनियनला गेलो होतो. ती आम्हा
सर्वांचीच पहिली वेळ होती. पहिल्यांदा काही कळत नाही नक्की आपण काय पहायला
चाललो आहोत. फक्त सर्व बाजुने मोकळ्या वातावरणाचा अंदाज जरूर येतो. अगदी
ग्रॅण्ड कॅनियनच्या काठापासुन २० फुटावर जसे पोहोचलो तसे एकदम परमेश्वराचे
दर्शन व्हावे तसे अजस्र पसरलेल्या एका खाईचे दर्शन झाले. ३०० मैल लांब, २० मैल
रुंद आणि १ मैल खोल अशी ही कॅनियन म्हणजे घळ आहे. कोलोराडो राज्यात हिवाळ्यात
पडणारे बर्फ उन्हाळ्यात वितळते आणि मग दक्षिणपश्चिमेकडे युटाह,
ऍरिझोना आणि कॅलिफोर्निया या राज्यांमधुन जाते। मागील करोडो वर्षांपासून वाहणार्या या पाण्याच्या प्रवाहांनी कोलोराडो नदीच्या रुपाने इथल्या संपूर्ण भूभागावर असा काही ठसा उमटवला आहे की
त्याला तोड नाही. त्याचे वर्णन करायला आपले शब्द बापुडे होतात त्यामुळे मी इथे
फक्त मी काढलेली काही छायाचित्रे मांडतो आहे.

ग्रॅण्ड कॅनियन हा सांगण्याचा विषयच नाही. तो अनुभवल्याशिवाय कळणे कठीण आहे.
इथे आले की आपण स्वत:च्या आणि परमेश्वराच्या एक पाऊल जवळ जातो असे मला मनोमन
वाटते. हिमालयाच्या सानिध्यात तेच अनुभवायाला मिळाले .. परंतु तेव्हा बराच लहान
होतो. शाळेतले दिवस होते ते. त्यानंतर राजगड, रायगड, ढाक भैरी, आणि अगदी
सिंहगडावरील "विंड पॉईंट" यांनीसुद्धा बरीच साथ दिली! चांगल्या गुरुबाबत जे
म्हटले जाते तेच निसर्गाच्या बाबतीत लागु आहे ... की मौन हेच त्याचे व्याख्यान
असते आणि तरिही आपल्या सर्व शंकाचे निराकरण आपोआप होत जाते. अमेरिकेतला असला
तरी निसर्ग तो निसर्गच. इथला निसर्ग भारतातल्या मानाने बराच रौद्र आहे. परंतु
तरिही त्याची भीती नाही वाटत. आदर वाटतो. मन अंतर्मुख होते.

अमेरिकेतील तश्या या एकाकी आणि रुक्ष जीवनात ग्रॅण्ड कॅनियनने नक्कीच वेगळाच
रंग भरला.


आता इथे येणे इतके नित्याचे झाले आहे की सिद्धुलाही इथे ३-४ महिन्यातुन एकदा
नाही आले तर चुकल्याचुकल्या सारखे वाटते. एक वेगळे नातेच निर्माण झाले आहे या
कॅनियनशी. अगदी स्नेहाचे नाते. संस्कृतमध्ये स्नेहाची व्याख्या कुणीतरी
सुभाषितकाराने अशी केली आहे "दर्शने स्पर्शने वापि श्रवणे भाषणेपि वा । यत्र
द्रवत्यंतरंग स स्नेह इति कथ्यते॥" ज्याच्या दर्शनाने, ज्याच्या स्पर्शाने,
ज्याबद्दल ऐकल्याने किंवा नुसत्या ज्याच्या उल्लेखाने अंतरंग हळवे होते तिथे
स्नेह आहे असे समजावे.

ग्रॅण्ड कॅनियन हॅज अ व्हेरी व्हेरी स्पेशल प्लेस इन माय हार्ट ऍण्ड अ व्हेरी
स्पेशल कनेक्शन विथ मी. तुझेसुद्धा असे नाते कुठेतरी कधीतरी निसर्गाशी जुळावे
अश्या शुभेच्छा!

Tuesday, April 14, 2009

बुध्दीस्तु मा गान्मम


प्रिय सलोनी

आज ऑफिसला येताना गाडीत नेहेमीप्रमाणे एन.पी.आर. म्हणजे नॅशनल पब्लिक रेडिओ लावला. त्यामध्ये राहुल गांधी आणि वरुण गांधी या गांधी घराण्याच्या वारसांबद्दल माहिती सांगत होते. अमेरिकेत किंवा पाश्चात्य जगातच एकंदरीत कुठलाही मुद्दा मांडण्याची शैली वाखाणण्यासारखी असते. दोन्ही बाजु आवर्जुन मांडल्या जातात. सभ्यतेची पातळी सहसा सोडली जात नाही. तसेच स्वैर आरोप केले जात नाहीत. प्रत्येक गोष्ट वस्तुनिष्ठ स्वरुपात पुढे ठेवली जाते.

या सर्वांचा ऐकणार्यावर अपेक्षीत तो परिणाम नाही झाला तरच नवल. बोलणार्याची माती खपते पण न बोलणार्याचे सोनेदेखील खपत नाही म्हणतात ना ... तसेच. फरक इतकाच की बोलण्याचेही एक विशिष्ट तंत्र आहे. दुकानात दुकानदार जसे वस्तुंना चांगल्या आवरणात घालुन जास्त किमतीला विकतात तसे कुठल्याही बातमीला आपल्याला हवे तसे सादर करणे कसे असते हे इथे पहावे. प्रचार प्रसार आणि अपप्रचार यांचे पण एक तंत्र पाश्चात्य देशात विकसित झालेले दिसते. माझ्या अनेक आदरणिय शिक्षकांपैकी एक - श्री. किशाभाऊ पटवर्धन म्हणत असत - "अमृत फुटक्या मडक्यात दिले तर कोणिही पिणार नाही." त्याऊलट सोन्याच्या भांड्यात विष दिले तरीही लोक पितील.....

राहुल आणि वरुण गांधींची ती बातमी ऐकुन कोणालाही राहुल गांधी एक संयमीत आणि प्रागतिक व्यक्तिमत्व वाटेल. इंग्रजीतुन संभाषण करणारा, जनतेच्या प्रश्नांची मांडणी करणारा, आवाजात कळकळ ... असा नेता ... त्याउलट वरुण गांधीचे १० सेकंदाचे भाषण चिथावणीखोर आणि अगदी असंस्कृत वाटावे यापद्धतीने मांडले गेले. आणि मग अर्थातच वरुण हा भा.ज.प. या हिन्दु राष्ट्रवादी पक्षाचा प्रतिनिधी आहे हे सांगायला देखील विसरत नाहीत.

खरे काय याची शहानिशा करणे अवघड आहे. इथे अमेरिकेत बसुन तर अधिकच अवघड. तसेच मुद्दा कोण अधिक चांगला नेता आहे असाही नाही. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व मान्यता मिळण्याआधी दोघांनीही जनतेसाठी थोडे काम करणे गरजेचे आहे. मुद्दा प्रसारमाध्यमांच्या विश्वासार्हतेचा आहे. ज्या पद्धतीने बुश-चेनी सरकारने इराक युद्ध आरंभले आणि धादांत खोटा अपप्रचार केला, इतकेच नाही तर इतक्या प्रगत देशात आणि प्रगत समाजात ज्या सहजतेने वृत्तपत्रांनी सरकारचीच री ओढली ते पाहुन माझा आता एकुणच प्रसार माध्यमांवरचा विश्वास आणि आदर फारच कमी झाला आहे. केवळ चलाखी वापरुन सादरीकरणाच्या जोरावर सत्याचे असत्य आणि असत्याचे सत्य केले जाऊ शकते हे सिद्ध झाले.

भारतीय समाज आणि शासन - आजचे काय किंवा इतिहासातीलही, आपल्याकडे पुराणे आणि कर्मकांडातील काही गोष्टी सोडल्या तर बुद्धीभेद कमी दिसतो. किंबहुना बुद्धिभेद करणे हा बर्यापैकी पाश्चात्य शोध आहे म्हणायला हरकत नाही. भारताचे ब्रीदवाक्य "सत्यमेव जयते" आहे ही गोष्ट आपल्या राष्ट्रीय चारित्र्याबद्दल खुप काही सांगुन जाते. त्याऊलट कुठल्याही पाश्चात्य देशाचे ब्रीदवाक्य सत्याचे महत्व सांगत नाही. कारण असत्याचा वापर हा यांच्या व्यवहाराचा एक भाग आहे. म्हणुनच चोरांना गौरवणारे चित्रपट तुफान चालतात. स्पॅनिश लोकांनी दक्षिण अमेरिकेतील केलेला वंशच्छेद, आणि युरोपियनांनी केलेला रेड इंडियन्सचा वंशच्छेद यावर मुलामा दिला जातो.

भले भले लोक या अपप्रचाराला बळी पडतात. पुण्यात एकदा एका ज्येष्ठ व्यक्तीचे भाषण मी ऐकत होतो. त्यानी पाश्चात्य न्यायव्यवस्थेतील एका तत्वाचा उल्लेख केला - "न्याय केवळ करुन भागत नाही तर तो केला गेला आहे हे दिसायला हवे.". तत्व तसे ऐकायला छानच वाटते. परंतु याचे विकृत स्वरुप असे होऊ शकते की "न्याय होवो न होवो ... तो केला गेला आहे असे सर्वाना वाटले तरीही पुरे." आणि याची प्रचिती आपण जागतिक स्तरावर पाश्चात्य राष्ट्रांच्या दुटप्पी वागण्यातुन पहात असतोच. विषय आर्थिक असो, सुरक्षिततेचा असो, पर्यावरणाचा असो ... प्रत्येक वेळी जागतिक संस्थांच्या घटनातत्वांचा अवलंब प्रगत राष्ट्रांसाठी सोयिस्कररीत्या केला जातो. न्यायाचा आभास निर्माण करीत सोयिस्कर नसलेल्या सत्ताधिशांना आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे आणले जाते आणि इतर हस्तकांना अभय दिले जाते. असो ... परंतु जाता जाता नमुद करावेसे वाटते की ऍन्ग्लो-सॅक्सन न्यायव्यवस्थेच्या वर नमूद केलेल्या मूलतत्वाचा जनक लॉर्ड ह्युअर्ट हा इंग्लिश इतिहासातील एक अतिशय कुप्रसिद्ध न्यायाधिश होता. त्याचा मूळ हेतु काहीही असो ... परंतु ह्युअर्टादपि सुभाषितम ग्राह्यम म्हणायच्या आधी त्या तत्वाची थोडी छाननी व्ह्यायला हरकत नाही.

असो .. प्रश्न पडतो की भारताबद्दल पूर्वी जे काही लिहिले गेले आहे आणि आजही जो काही प्रचार केला जातो त्यात तथ्य किती? अमेरिकेत मी बर्याचदा पाहतो की - योग ही अतिप्राचीन विद्या आहे असाच उल्लेख नेहेमी असतो. भारताचा उल्लेख गाळला जातो. बेंगॉल टायगर चा नेहेमी सुमात्रन टायगर असा उल्लेख असतो. भारताच्या उत्तम आणि उदात्त चित्रीकरणाचे तसे वावडे आहे आणि त्याऊलट स्लमडॉग अगदी चवीने पाहिला जातो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपला इंग्रजांनी किती बुद्धीभेद केला आहे! स्लमडॉगचे यश हे आपण भारताचे "यश" (!!) म्हणुन गौरवतो. त्याउलट खुद्द अमेरिकेत इंग्लंडशी निगडीत सर्व गोष्टींचा तिरस्कार केला जातो कारण एके काळी इंग्लंडने अमेरिकेचाही वसाहत म्हणुन वापर केला होता.

चिनी लोक मात्र भारतीयांसारखे भुलणारे नाहीत. त्यांना त्यांचा इतिहास माहित आहे आणि ते विसरत नाहीत. आपण त्यांच्याकडुन खुप काही शिकण्यासारखे आहे. भारतात दोन सुपुत्र मात्र असे होऊन गेले की जे इंग्रजांना पुरते ओळखुन होते आणि त्यांना ते पुरुन उरले. पहिले म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज. आणि दुसरे म्हणजे महात्मा गांधी. छत्रपतिंच्या काळात इंग्रजांचे बस्तान इतके बसले नव्हते आणि छत्रपतिंमुळे बसुही शकले नाही. महात्माजींच्या काळात इंग्रज भारताच्या उरावर बसले होते. अश्यावेळी "सत्य" आणि "अहिंसा" या दोन पूर्वापार तत्वांकडे गांधीजींनी भारतीयांना वळवले. अहिंसेबद्दल मी विचार करतो आहे काय रहस्य असावे या तत्वाचा अवलंब करण्यामागे. परंतु "सत्य" हे तत्व इंग्रजांच्या असत्य आणि अपप्रचाराला शह देण्यासाठी होते यात मला काही संशय नाही.

गांधीजींच्या एकाच गोष्टीचा उल्लेख करुन आजचा लेख संपवतो. कुण्या एका पाश्चात्य वृत्तपत्रकाराने गांधीजींना विचारले - "व्हॉट डू यू थिंक अबाऊट वेस्टर्न सिव्हिलायझेशन?". गांधीजी म्हणाले - "दॅट वुड बी अ गुड आयडिया". कोणत्याही भारतीय नेत्याने याहुन अधिक मार्मिक भाष्य केलेले माझ्या पाहण्यात आलेले नाही. पाश्चात्यांचा इतिहास रक्तरंजीत आणि कावेबाजपणाचा आहे. त्यांच्याकडुन शिकण्यासारखे भरपूर काही आहे ... परंतु त्याबदल्यात आपली बुद्धी गमावण्याची गरज नाही. मुद्राराक्षस नाटकात चाणक्य अतिशय हुशारिने राक्षसाचे सर्व सहाय्यक फोडुन आपल्या बाजुला वळवतो. त्यावेळी हतबल झालेला राक्षस म्हणतो भले सर्व जण मला सोडुन जावोत परंतु कमळाची मुळे जशी कमलपत्राला पाण्यावर स्थिर ठेवतात तशी माझी बुद्धीच एक मला या गदारोळात स्थिर ठेवु शकते ... तस्मात ..बुध्दीस्तु मा गान्मम ! गांधीजींजवळ अशी स्वत:ची बुद्धी होती की ती इंग्रजांच्या अपप्रचाराचा भेद करु शकत होती. त्यांच्यापासुन आपण काही शिकावे. बुद्धिभेद करणारी अनेक साधने जगात आहेत. त्यांच्या गर्दीत सत्याची कास धरण्याचे सामर्थ्य आणि सत्याचा ठाव घेण्याची पात्रता सलोनी तुला लाभो.

ग्राहको देवो भव!

प्रिय सलोनी
तुझी मामी येताना तुझ्यासाठी खूप काही कपडे, दुपटी, दागिने घेउन आली आहे. आम्ही इथे आधी बरीच खरेदी करुन ठेवली आहे. त्यात आता भारतातुन आलेल्या या वस्तुंची भर पडली. त्यामुळे आता काही काही वस्तु जास्त झाल्या आहेत. म्हणुन काही वस्तु परत करायला हव्यात. आई इकडे आली होती तेव्हा तिला हसु यायचे .... की इकडे खरेदी करायला म्हणुन; नाही तर खरेदी केलेल्या वस्तु परत करायला म्हणुन मॉलला जायचे! खरोखरच. फारच वस्तुवादी जीवनसरणी आहे इथे. पण काय करणार ? जीवाला गोड लागते त्यामुळे सर्वच जण या प्रवाहात पोहतात ...आणि तसेही हेही माहीत नाही की किती वस्तु म्हणजे खूप वस्तु आहेत. असो..... परंतु आजचा विषय वेगळाच आहे.
तर आज मी "बर्लिंग्टन कोट फॅक्टरी" नावच्या एका दुकानात स्लीप पोझिशनर परत करायला गेलो होतो. स्लीप पोझिशनर म्हणजे बाळाला सरळ झोपता यावे यासाठीची उशी आणि बाजुचे अन्थरुण. खरेतर आम्ही हे स्लीप पोझिशनर बरोबर ३० दिवसांपूर्वी विकत घेतले होते. उघडले नव्हते त्यामुळे वेष्टण तसेच होते. परंतु इथे व्यावसायिक स्पर्धा इतकी तीव्र असते की ग्राहकाने वस्तु परत केली तर बहुधा दुकाने परत घेतात. कालही तसेच घडले. दुकानदार अजिबात तक्रार करत नाहीत.
आपल्याकडे भारतात दुकानात पाटी लावलेली दिसते - "ग्राहको देवो भव।". परंतु दुकानदारांची त्या पद्धतीने वागणुक क्वचीतच दिसते. पु.लं.च्या भाषेत सांगायचे झाले तर पुण्याच्या दुकानदारांच्या दृष्टीने दुकानात सर्वात जास्त दुर्लक्ष करण्याजोगी गोष्ट म्हणजे ग्राहक!

प्रश्न पडतो.... असे का?

मला असे वाटते की अमेरिकेतील अर्थव्यवस्था विपुलतेवर आधारित आहे तर आपली अभावावर। थोडक्यात सांगायचे तर अमेरिकेत वस्तुंची रेलचेल जास्त आहे. माणशी जास्त वस्तु वापरायला मिळतात. तेच भारतात कमी वस्तु आपण वापरतो. उदाहरणच द्यायचे झाले तर अगदी खाद्यपदार्थांपासुन ते कपडे खेळणी इलेक्ट्रॉनिक्स सर्वांचेच देता येइल. ही रेलचेल अशी अमेरिकेत जास्त का आणि भारतात कमी का हा तसा मोठा विषय होइल परंतु मला थोडक्यात असे वाटते की पाश्चात्यांनी त्यांची सर्व शक्ती आपले आजचे जीवन सुखकर कसे होइल यात ओतली आहे. ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने अधिक उत्पादन कसे करता येइल, अधिक उत्पादकता कशी वाढेल याचा सतत विचार. ग्राहकाची उत्पादकता आणि क्रयशक्ती (अर्थात विकत घेण्याची क्षमता) या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. त्यामुळे ग्राह्क अधिक वस्तु घेउ शकतो. अमेरिकेतील बरीचशी श्रीमंती इथल्या लोकांच्या बुद्धीमत्तेतुन आणि कष्टांतुन आली आहे. काही जण याला आक्षेप घेतील ॥ आणि तेलासाठी (पेट्रोल) केलेले इराकयुद्ध याचा दाखला देतील. मला वाटते तेही सत्य आहे की अमेरिकेच्या या वस्तुंच्या हव्यासापोटी अमेरिकेने जगभर कच्च्या मालावर पकड करुन ठेवली आहे ... कारण तुमच्याकडे नुसते तंत्रज्ञान असुन भागत नाही. हातात कोंबडं नसेल तर उपयोग काय तुमच्या अत्याधुनिक ग्रिलचा! तसेच काही.

असो ... परंतु इथे वस्तुंची रेलचेल अशी असल्यामुळे दुकानदारांचे सगळे लक्ष खप वाढवण्यावर असते। वस्तु पडुन राहतील अशी त्यांना भीती वाटते. त्याउलट विकसनशील किंवा अविकसीत देशांमध्ये वस्तुंचा अभाव असल्यामुळे खपाची कधीच काळजी करण्याचे कारण नसते। वस्तु आज नाही तर उद्या खपणार याची दुकानदारांना खात्री असते. दुकानदारांची ग्राहकांप्रती सौजन्यशीलता (किंवा त्याचा अभाव) हे केवळ या फरकातुन आलेले लक्षण आहे।

भारतात जसजसे आपण आपली (म्हणजे सामान्य माणसाची) उत्पादकता वाढवु तसतशी त्याची खरेदी करण्याची क्षमताही वाढत जाईल आणि दुकानात मग सर्वात जास्त लक्ष देण्याजोगी वस्तु अशी त्याची ओळख होऊ लागेल!

Sunday, April 12, 2009

आस्वाद

प्रिय सलोनी
परवा संध्याकाळी सिद्धुबरोबर फुटबॉल खेळत होतो. इथे घराशेजारीच एक मैदान आहे। ३-४ एकर असावे. मैदान तसे खोलात आहे. ३ बाजुने रस्ते थोडेसे उंचावर आणि एकाबाजुला आमचे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स उंचावर. मध्ये अगदी सपाट असे मैदान. त्यामध्ये छोटी छोटी झाडे विखुरलेली.

लाथा मारण्याचा खेळ म्हणजे माझा हात(नव्हे पाय)खंडा! पुण्यात स।प.महाविद्यालयाच्या मैदानावर परशुरामियन्स म्हणुन फुटबॉल क्लब होता. तिथे जात असे॥ तेव्हापासुन फुटबॉलची चांगलीच आवड लागली. पुण्यात ऋतु कोणताही असो ... संध्याकाळी मैदानावर उतरण्यात चांगलीच मजा आहे. अगदी त्याचीच आठवण येईल अशी हवा पसरलेली होती इथे. उंच आकाशात दूरवर स्काय हार्बर विमानतळावर उतरण्याची परवानगी मिळेपर्यंत घिरट्या घालणारी विमाने ... संध्याकाळच्या तिरक्या सूर्यकिरणांमध्ये सोनेरी-चंदेरी धुरांचे लोट सोडवीत फिरत होती. अगदी आय. आय. टी. पवईच्या टेकडीवरुन दिसणार्या अगदी याच दृश्याची आठवण करुन देउन नकळत घायाळ करुन जात होती। मुंबई शहर खरे तर मूळ सौंदर्यात पुण्यापेक्षा सरस आहे ... परंतु त्यासाठी थोडे उंचावरुन न्याहाळावे लागते. आय.आय.टी.च्या ६ महिन्यांच्या आमच्या ९५ सालच्या थोड्याश्या वास्तव्यात शिक्षणाव्यतिरिक्त अजुन काय केले असेल तर मुंबईवर प्रेम करू लागलो. हो! आणि आमिर खाँसाहेबांचा कायमस्वरुपी ऋणी झालो तेही तिथेच. इंटर्नशीप वगैरे तर गोष्टी होतच राहतात. मजा नेहेमी यातच असते की आपण अजुन काय काय केले मुख्य गोष्टीव्यतिरिक्त!!

असो ॥ सिद्धु खरोखरच इतका छान फुटबॉल खेळतो कि काय सांगु? लहान मुलांचे असेच असते। त्यांना थोडी एखाद्या विषयात चालना देण्याचा अवकाश .. की त्यांची गाडी त्या मार्गावरुन छान मार्गक्रमण करू लागते. पवईच्या वास्तव्यातच वासंतीताईंशी झालेल्या एका पत्ररुपी संवादात त्यांनी उल्लेख केलेला की शाखेवर मुलांना शिकवण्यात काय मजा येते. मजा येते हे तर खरेच ... परंतु मी त्यांना त्यावेळी चुकुन एक चांगली गोष्ट लिहुन गेलो ... की मुले लहान आहेत म्हणुन अगदी त्यांच्याशी लहानच गोष्टी बोलल्या पाहिजेत असे नाही. तुम्हाला वाटेल त्या विषयावर संवाद साधा. काय सांगावे त्यांच्यामध्ये कोणी ज्ञानेश्वर समोर बसलेला असू शकतो! मला वाटते खरे आहे ते. कुणाच्या मनात कसले बीज कधी आणि कुठे रोवले जाईल सांगणे कठीण आहे. शिक्षक म्हणुन आपण सहजतेने जमेल तितके चांगले विचार-आचार जरूर पोचवावेत. मी स्वत: लहान असताना पंडित नेहेरुंचे एक वाक्य पाचवीत असताना एका मासिकात वाचलेले - द वर्क ऑफ अ नेशन गोज ऑन. शेठ हिरालाल सराफ प्रशालेत माझी बहिण होती. त्यांच्या मासिक अंकात एका नववीतल्या मुलाने लिहिलेल्या लेखात ते वाक्य होते. का कुणास ठाऊक, ते वाक्य मला अजूनही चांगले लक्षात आहे. तो लिहिणारा मुलगाही विसरला असेल ... परंतु चांगल्या विचारांची तीच ताकद आहे ... ते चिरंतन आहेत.

असो ... तर मैदानावरील त्या वातावरणाने मला या सर्वांची आठवण करुन दिली. वाऱ्याच्या मंद लहरी, सिद्धार्थच्या चेहेर्यावरचा उत्साह आणि आनंद, गवताच्या पात्यांचे डोलणे, शेजारच्या फ्रीवेवरुन जाणार्या गाड्यांचे आवाज, मधुनच उमटणारी एखाद्या पक्षाची शीळ ....... काय उद्देश असेल? काय उद्देश असायला हवा? काही उद्देश असायलाच हवा का? माहित नाही। खरोखरच माहित नाही। परंतु इतके तर नक्कीच की माझे मन प्रसन्न होते ... शांत होते। इट वॉज अल्मोस्ट लाइक आय कुड हिअर द नेचर व्हिस्पर. निसर्गाचे स्पंदन जाणवत होते आणि माझेही मन त्याबरोबर स्पंदत होते. इफ देअर इस एनिथिंग कॉल्ड ब्लिस देन धिस इज हाउ इट मस्ट बी लाइक.

मला आठवले की माझे वडिल आम्हाला एकदा लहानपणी म्हणाले होते की तुम्हाला मोठेपणी काय व्हायचे आहे। ताईने सांगीतले तिला डॉक्टर व्ह्यायचे आहे। तिला शाबासकी मिळाली। पुढे ती डॉक्टर झालीही. दादा म्हणाला मला इंजीनियर व्हायचे आहे. पुढे तो खरोखरच झालाही. त्यालाही अप्पांनी शाबासकी दिलेली. मी मात्र म्हणालो होतो मला असे काही विशेष व्ह्यायचे वगैरे नाही. एक साधी नोकरी एक साधे घर पुरे होईल. अप्पा रागावले. म्हणाले या पोराचे डोकेच विचित्र! मला वाटते मला अप्पांचा प्रश्न कळला नव्हता आणि त्यांना माझे उत्तर! अप्पांचा प्रश्न होता की पुढे मोठे होऊन तुम्हाला काय करायचे आहे. आणि मी उत्तर दिले होते की मोठे झाल्यावर मला काय हवे आहे! "काय करायचे आहे" या प्रश्नाचे उत्तर आभाळापेक्षा मोठे असू शकते ... परंतु "काय हवे आहे" याचे उत्तर टॉलस्टॉय म्हणतो त्याप्रमाणे खूपच छोटे असते. आपल्याला ते कधी जाणवते तर कधी त्याचा विसर पडतो इतकेच काय ते.

परवाच दिवस अश्या दिवसांपैकी होता की त्यादिवशी मला माझ्याच लहानपणीच्या उत्तराची अनुभुती आली। तशी ती तुलाही वेळोवेळी येवो तुझ्या आयुष्यात इतुकेच मागणे परमेश्वरापाशी।

तुझा
बाबा

Saturday, April 11, 2009

सलोनीची गुगली आणि आमची धावपळ

सलोनीबाई
दर काही दिवसांनी डॉक्टरांकडे पळवल्याशिवाय तुला काही चैनच पडत नाही. परवा तुझ्या आईने मला ऑफिसमध्ये फोन केला की प्लेटलेट ची चाचणी न करता आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्ह्यायला सांगीतले आहे. दुपारचा एक वाजला होता. तातडीने दुकान बंद करुन आमची स्वारी घरी निघाली. वाटेत मित्रमंडळींना फोनाफोनी झाली. सिद्धु शाळेतच होता त्याला घेउ का वगैरेची तशी काळजी नव्हती... घरी येता येता वाटेत थंड पेय म्हणुन एखादा ऑरेंज ज्युस आणायला सांगीतले तिने. साखरयुक्त थंड पेय पिले तर बाळ (अर्थात तुम्ही!) जागे होऊन लाथा मारायला सुरुवात करते म्हणे!
मागच्या काही रक्तचाचण्यांमध्ये तुझ्या आईचा प्लेटलेट काऊण्ट कमी येत असे. परंतु परवा ती चाचणीच काम करेनाशी झाली. सगळ्या प्लेटलेट्स एकमेकांमध्ये गुंतु लागल्या आहेत. त्यामुळे आम्हाला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
घरी जाऊन सोनालीला घेऊन ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोचलो. तिथे ट्रियाज (म्हणजे गरोदर स्त्रियांसाठीचा बाह्यरुग्ण विभाग) मध्ये पहिल्यांदा नॉन-स्ट्रेस टेस्ट झाली. ही आता नेहेमीचीच झाली आहे. यामध्ये त्यांनी तुझे हृदयाचे ठोके मोजले. १३० सरासरी होते. त्यामुळे एकंदरीत ठीक होते. नंतर प्लेटलेट्सच्या एक अद्ययावत चाचणी साठी रक्त काढुन घेतले आणि अल्ट्रासाऊण्ड साठी आम्हाला एका कक्षात पाठवले. अल्ट्रासाऊण्ड टेक्निशियन २ तासांनी आली तोपर्यंत मी तिथल्या छोट्याशा टीव्हीवर बातम्या इत्यादि पाहिले. तशी इथली रुग्णालये सुसज्ज असतात. वस्तुंचा भडिमार असतो. परंतु त्याहुनही महत्वाचे म्हणजे कधी काय करायचे हे अगदी लिहुन ठेवले असते. त्यामुळेच अमेरिकेत कंपन्या (किंवा कोणत्याही संघटना) अगदी सामान्य कर्मचार्यांकडुनही चांगल्या गुणवत्तेचे काम करुन घेउ शकतात! असो .... तर अल्ट्रासाऊण्ड तंत्रज्ञ आली ... भारतीय होती. दिल्लीची होती (माहेर डेहराडुन) ... २० वर्षांनंतरही डेहराडुन विसरलेली दिसत नव्हती! तिने कुठेही नेता येइल असे एक अल्ट्रासाऊण्ड यंत्र आपल्याबरोबर आणले त्याने वेगवेगळ्या चाचण्या केल्या. खरे सांगायचे तर तिला काही विशेष कळत होते असे वाटले नाही. तुझ्या आईच्या शब्दात सांगायचे तर बोलायला राघु आणि कामाला आग लागु! असो.. तर एकंदरीत तीही चाचणी योग्य झाली. एव्हाना प्लेटलेट्सचा निकाल आला ... ११२ प्लेटलेट्स... नॉट बॅड!
एकुण काय तर घरी जायला हरकत नाही.
असो .... आता पुढचे ३ आठवडे हॉस्पिटलमध्येच येउन प्लेटलेट्सची चाचणी करायची आहे.
मध्यंतरी सिद्धोबाला त्याच्या एका मित्राची आई (गुज्जु लोक आहेत) त्यांच्या घरी घेउन गेली .... तो तिकडेच दंग. या सर्व गोष्टींचा त्याला गंधही नव्हता ... तिकडेच तो जेवला .... कराटेच्या क्लासला ही गेला .... रात्री उशिरा जाऊन त्याला आम्ही घेउन आलो. इकडे अमेरिकेत असा हा आपला भारतीय समाज एकमेकांना धरुन राहतो. स्वाभाविक आहे परंतु तरिही हृद्य आहे. रक्ताची नसली तरी अतिशय मोलाची नाती इथे मिळुन जातात. हेच सगे हेच सोयरे.
ता.क. - तुझी मामी लंडनहुन विमानात बसली आहे. अजुन ६ तासात विमानतळावर जाऊ आम्ही आणायला. खास तुझ्यासाठी म्हणुन मामाला टाटा करुन ती इकडे येते आहे. यु बेटेर बेहव विथ हर ऑल युर लाईफ! अथर्वही अर्थात तिच्याबरोबर आहेच. सिद्धोबाचे काऊण्टडाऊन गेले १० दिवस चालु आहे हे सांगणे न लगे.

Friday, April 10, 2009

फॉरएव्हर यंग !!

प्रिय सलोनी
मागच्या महिन्यात टीव्हीवर एका शंभर वर्षांच्या आजोबांची बातमी पाहिली. आजोबा अगदी तरुण माणसाला लाजवतील असे उत्साही दिसत होते. अजुनही ते कुठेतरी एके ठिकाणी कार्यालयात काम करत होते. कदाचीत स्वयंसेवक असतील ... टीव्हीवरुन त्यांच्या मुलाखतीत ते सर्वांना एक संदेश देत होते की मंदीमुळे खचून जाऊ नका, उठा आणि नव्या जोमाने कामाला लागा. ही परिस्थिती कायम अशीच राहणार नाही. परिस्थितीसमोर हतबल होऊ नका.
कशामुळे बरे त्यांना हा अधिकार मिळाला असावा? मला वाटते या आजोबांनी १९०९ ते २००९ या शतकात अनेक बर्या वाईट गोष्टींचा अनुभव गाठीशी बांधला आहे. त्यांनी पहिले तसेच दुसरे महायुद्ध, १९३२ ची महामंदी, अनेक नैसर्गीक आपत्ती पाहिल्या तसेच वायुवेगाने बदलणारी तन्त्रज्ञानाची प्रगतीही पाहिली होती! अमेरिकीची समृद्धी अनुभवली तसेच माणसांची मुल्ये बदलतानाही पाहिली होती. एवढे सगळे अनुभवुनही किंवा पचवुनही त्यांच्या बोलण्यावागण्यात इतका उत्साह दिसत होता की मला आमच्या लहानपणीची दूरदर्शनवर झळकणारी डाबरच्यवनप्राशची जाहिरात आठवली ! "साठ सालके बूढे ? या साठ सालके जवान? इनकी रगरगमे जोश और तंदुरस्ती का राज ... डाबरच्यवनप्राश!!"
या आजोबांसारखे आणखी बरेच आजी आजोबा इथे शंभरी गाठताना दिसतात. सर्वच काही इतके निरोगी किंवा उत्साही नसतात. पण भारताच्या तुलनेत अश्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आपल्याकडे एकदा माणसे साठीकडे झुकु लागली की त्यांची मानसिकताच बदलते. शरीरापेक्षा ती मनानेच जास्त खंगतात. आता काय आमचे आयुष्य संपले असे म्हणत उरलेले दिवस कसेबसे ढकलतात. याउलट इकडे कित्येक साठीतील मंडळीदेखील आपल्या आईवडिल किंवा सासुसासर्यांना घेउन सहलीला जाताना दिसतात. बरेच वेळा काही आजारामुळे अपंगत्व आले तर आपल्या जोडीदाराबरोबर अगदी हसत हसत जबाबदार्या उचलत मजेत आयुष्य व्यतीत करतात. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत (म्हणजे अगदी ७५-८० पर्यंत!) स्वत:च गाडी चालवतात. गरजेच्या वस्तुंची खरेदी करतात, घरात नोकर चाकर नसल्यामुळे स्वत:ची कामे स्वत:च करतात, सिनेमाला किंवा फिरायलाही जातात, कुठल्याही सणासुदीला उत्साहाने घर सुशोभीत करतात, जमेल तशे नातवंडांसाठीही खरेदी करतात. दुर्दैवाने जर कुणाला जोडीदाराची साथ संपली असेल तर जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत स्वत:चे आयुष्य स्वत:च सावरत असतात. आणि जेव्हा अगदी अशक्य होते तेव्हा वृद्धाश्रमामध्ये जातात. अर्थातच अपवाद असतात. परंतु सहसा परिस्थिती अशी असते.
माझ्या एका मैत्रीणीचे ऍन्जेलाचे आईवडिल सत्तरी ओलांडलेले आहेत. वडिलांना डोळ्याने फारच कमी दिसते. तर आईला स्म्रृतिभ्रंश झाला आहे. तरिही ते दोघे जमेल तसे मजेत आणि उत्साहात जगत आहेत. सोबतीला त्यांचा एक प्रामाणिक कुत्रादेखील आहे. इथे प्राण्यांचीही काळजी घेतात, अगदी मुलांप्रमाणे. कायद्यानुसारही ते आवश्यक आहे म्हणा! ऍन्जेलाचे वडिल हे सर्व अगदी हसतमुखाने करतात.
ही आणि अशी बरीच उदाहरणे बघितली की प्रश्न पडतो ... काय बरे रहस्य असावे या माणसांच्या चिरतारुण्याचे? इथे स्वावलंबनाला बरेच महत्व आहे. तसेच माणसेही अभिमानी असल्यामुळे दुसर्यांची मदत घेणे त्यांना रुचत नाही. मेंदु तल्लख ठेवण्यासाठी ते भरपूर वाचन करतात अथवा निरनिराळे छंद जोपासतात किंवा विविध संस्थांसाठी स्वयंसेवक म्हणुन काम करतात. त्यामुळे त्यांचा वेळ तर चांगला जातोच, पण समाजाला मदतही होते तसेच रिकामेपण आणि एकटेपणाची तीव्रता कमी होते.
सर्वांना असे जगणे जमतेच असे नाही. कदाचीत येथील लोकांची "मी" भोवतालची संस्कृती असे आयुष्य जगणे भाग पाडत असेल. पर्याय नाही म्हणुन म्हणा किंवा दुसर्यांच्या नजरेत आपण अयशस्वी ठरु नये म्हणुन म्हणा ... परंतु स्वावलंबनाला येथे पर्याय नाही.
कारणे काहीही असोत ... दाद द्यावीशी वाटते ती इथल्या माणसांच्या सकारात्मक दृष्टीकोनाला आणि येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याच्या जिद्दीला!!
आई

Thursday, April 9, 2009

एक मित्र .. इरफान

प्रिय सलोनी
मागच्या १-२ दिवसात अनपेक्षीतपणे इरफ़ानशी परत संपर्क झाला.
इरफ़ान मुझफ्फर हा माझा मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये भेटलेला एक मित्र. मुळचा पाकिस्तानमधील लाहोर आणि रावळपिंडीचा. अतिशय बुद्धिमान आणि त्यामुळे अर्थाच बुद्धीजीवी या सदरात मोडणारा. कालच कळले की तो आता सोरोस फाउण्डेशन या एका संस्थेचे काम करतो. ही संस्था जागतिक पातळीवर होणार्या घडामोडींवर नजर ठेवते आणि जगातील सरकारे तिथल्या जनतेचे हित कसे जोपासतील यासाठी प्रयत्न करतात. सोरोस हा एक हंगेरियन अब्जाधीश आहे. तो ओबामाचा खुप मोठा समर्थक आहे. असो ... तर इरफ़ान हा मुळचा असा आहे. मला आठवते आहे आमची पहिली भेट दुसर्या एका मित्राच्या घरी जेवणाच्या निमित्ताने गेलो असता झाली. तिथे राजकारणाच्या गप्पा मारत असताना आमचे सुर जुळले.
पाकिस्तानी लोकांबद्दल असलेली एक अढी दुर व्ह्यायला लागली. इरफ़ान हा मुळचा पाकिस्तानी लष्करात कॅप्टन की मेजर होता. पाकिस्तानी मिलिटरी अकॅडेमी मध्ये पहिल्या की दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या इरफ़ानचे भवितव्य उज्ज्वल होते. पाकिस्तान लष्करात भरती होणे हा प्रगतीचा एकमेव मार्ग आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. लष्करातील लोकांना मान, सन्मान आणि पैसा कमावण्याच्या संधी (भल्या आणि बुर्या दोन्ही) जास्त असल्यामुळे गुणी आणि धडाडीच्या सर्व तरुणांसारखाच इरफ़ानसुद्धा लष्करात भरती झाला. परंतु त्याच्या जीपला एकदा झालेल्या एका अपघातात त्याचा एक पाय किंचीत अधु झाला. आणि इरफ़ानला लष्कराचा निरोप घ्यावा लागला. त्यानंतर त्याने अमेरिकेत येउन गणित कसे शिकवावे या विषयावर पीएचडी केली. परंतु बुद्धिमान असला तरीही संशोधन किंवा अध्यापन या दोन्हीपेक्षा इरफ़ानचे मन राजकारणात जास्त रमते त्यामुळे सोरोस फाउण्डेशनचे काम.
भारत आणि पाकिस्तान यांचे संबध तसे तणावाचे त्यामुळे पाकिस्तानी माणसे कशी असतील याचा एक साचा आपल्या मनात असतो. इरफ़ानने माझ्या मनातल्या त्या प्रतिमेच्या नक्किच पलिकडे गेला. त्याचे कुटुंब मुळचे लखनौचे. फाळणीनंतर पाकिस्तानला जावे लागल्याची वेदना बर्याचदा जाणवायची. भारताबद्दल बर्याचदा प्रेम, कधितरी टीका परंतु कडवटपणा कधीच जाणवला नाही. आम्ही खुलेपणाने एकमेकांच्या देशाचे गुणगौरव, समर्थन आणि टीकाही करत असताना एकमेकांबद्दल सद्भावनाच असे.
मागील काही दशकांमध्ये पाकिस्तानाची दहशतवादाकडे होणारी अधोगति पाहुन त्याला खुप दु:ख व्ह्यायचे. भारताच्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर तर तो विरोधाभास अधिकच गडद होत असे. पाकिस्तानात परतुन काही करण्याची इच्छा असली तरीही परतण्यासारखी परिस्थिती तिथे नक्किच नाही. इरफ़ान परत गेलाही काही प्रोजेक्टसच्या निमित्ताने. परंतु काही महिन्यातच परत आला.
माझे एमबीए पूर्ण झाल्यानंतर आम्ही फिनिक्सला आलो तरिहि संपर्क चालु होता. मध्यंतरी संसदेवर झालेल्या हल्ला आणि पाकिस्तानच्या इतर कुरापती यांचे प्रतिबिंब कुठेतरी आमच्या नात्यात उमटते. कधीतरी तात्पुरता दुरावा होतो परंतु तरीही स्नेह आणि सद्भावना कायम राहतात.
मैत्री ही अशीच असते. कधी दुरावा, कधी अबोला ... परंतु निष्कपट मन असेल तर प्रेम कायम राहते आणि कधितरी परत एकदा मित्र एकत्र यायला वेळ लागत नाही.

Monday, April 6, 2009

ऍण्ड्र्यु कार्नेगी

प्रिय सलोनी
आत्ताच सिद्धुबरोबर इथल्या सार्वजनिक वाचनालयात जाऊन आलो. सिद्धुला कसला तरी प्रोजेक्ट करायचा आहे शाळेत "लेपर्ड" अर्थात "चित्ता" या विषयावर. त्यामुळे वाचनालयातुन काही पुस्तके आणली त्याच्यासाठी. तशी सिद्धुची स्वारी लहानपणापासुनच पुस्तके म्हटली की खुश होते. अगदी सहा महिन्याचा असल्यापासुन त्याच्यासाठी एक गायीचे चित्र असलेले पुस्तक आणले होते तेव्हापासुन साहेबांना पुस्तके आवडतात असे कळले. अलिकडे व्हिडिओ गेम्सचे वेड लागले आहे ते वेगळे.
असो ... परंतु आज लिहावेसे असे वाटले की ... इथल्या वाचनालयात जातो त्या प्रत्येकवेळी माझ्या हृदयात एक वेदना उमटते. यासाठी की, भारतियांनी किंबहुना सर्वच जगाने हेवा करावा असे काय या अमेरिकेचे भाग्य की इथे प्रत्येक गावात किमान एक सार्वजनिक वाचनालय असते. आणि वाचनालय पण असे की अगदी सर्व सोयींनी सुसज्ज! सदस्यत्व नि:शुल्क असते. अगदी हवी तितकी पुस्तके घ्या. नवी, जुने सर्व पुस्तके सहसा उपलब्ध असतात. शैक्षणिक ध्वनी आणि चित्रफीतीदेखील उपलब्ध असतात. तसेच मागील ७-८ वर्षांत सर्व वाचनालयात नि:शुल्क इंटरनेटसुद्धा उपलब्ध झाले आहे.
या सर्वाचे श्रेय जर कुणाला द्यायचे झाले तर एकच नाव डोळ्यापुढे येते - ते म्हणजे ऍण्ड्र्यु कार्नेगी. कार्नेगी हा अमेरिकेतला एकेकाळचा सर्वात श्रीमंत माणुस होता. अमेरिकेच्या एकुण संपत्तीपैकी १% संपत्ती त्याच्या एकट्याकडे एकवटली होती एके काळी. कार्नेगी हा स्कॉटीश होता. तो लहान असताना अमेरिकेला आला आणि त्याने स्टील व्यवसायातात अमाप नाव आणि पैसा कमावले. परंतु नाव आणि पैसा कमावणारे जगात अनेकजण होऊन गेले आहेत. कार्नेगीचे वैशिष्ट्य असे की त्याने त्याची सर्व (हो सर्व!) संपत्ती त्याच्या हयातीतच समाजाच्या उद्धारासाठी वापरली. १८३५ मध्ये जन्म झालेला हा माणुस १९०१ साली निवृत्त झाला आणि त्याच्या मुत्युपर्यंत पुढील १८ वर्षे त्याने अनेक समाजोपयोगी कामे केली. सार्वजनिक वाचनालये हे त्यापैकी एक अतिशय प्रमुख काम होते. कार्नेगीने एकुन ३००० सार्वजनीक वाचनालये बांधली. त्यामागचा हेतु असा होता की सामान्य माणसाने शिकावे, वाचावे आणि विचारप्रवुत्त व्हावे. कोणाच्याही प्रगतीमागे चांगले विचार असतात ही त्याची धारणा होती. आणि शिक्षण आणि वाचनामुळे विचारांना चालना मिळते यासाठी ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवावे हा त्याचा आग्रह होता. याव्यतिरिक्त कार्नेगीने बर्याच शिक्षणसंस्था, कलासंस्था यांनादेखील मदत केली ... परंतु माझ्या मते त्याने बांधलेल्या सार्वजनीक वाचनालयांमुळे अमेरिकेतील सामान्यांपर्यंत ज्ञान पोचले आणि अमेरिकेची खरी शक्ती त्यातच आहे.
झाले बहु होतिलही बहु परंतु या सम हा! खरोखरच. रजनीशांची एक गोष्ट आहे की एक सम्राट मरण पावला .. आणि त्याने आयुष्यात बरेच पुण्य केले असल्यामुळे त्याला स्वर्गात प्रवेश मिळाला. सम्राटाला माहीत होते की स्वर्गात एक पर्वत आहे तिथे सर्व महान व्यक्तींना आपली नावे लिहिता येतात. त्यामुले त्याने चित्रगुप्ताला विचारले की मी सुद्धा या पर्वतावर नाव लिहु का? चित्रगुप्त म्हणाला - अर्थातच. जरुर लिहा. परंतु सम्राट जेव्हा त्या पर्वतापाशी पोचला तेव्हा त्या पर्वतावर नावे लिहायला जागाच शिल्लक राहिली नव्हती. तेव्हा तो परत चित्रगुप्ताकडे गेला हिरमुसला होऊन. तेव्हा चित्रगुप्त त्याला म्हणाला ... अरे वेड्या तुझ्यासारखे अगणित सम्राट होऊन गेले आहेत तुझ्याआधी. त्यांच्या नावांनेच तो पर्वत पूर्ण भरुन गेला आहे. काय करणार?
आपल्याकडे असे काही विद्यमान सम्राट आहेत जे स्वर्गात जायच्या आधीच इथे पृथ्वीतलावरच नाव लिहायला बघताहेत. परंतु त्यांना मुम्बईच्या समस्या दिसत नाहीत. जिथे रस्त्यावर गाडी चालवण्याची मारामार त्या देशात बायकोला बोईंग घेउन देतात आणि ३०% लोक जिथे दोन वेळचे जेवण जेउ शकत नाहीत तिथे २ अब्ज डॉलर्सचा महाल बांधतात. महाल कसला --- २ अब्ज डॉलर्सचे "आगे दुकान पिछे मकान आहे ते". वैशम्य वाटते. सध्या निवडणुकांचा काळ आहे आणि या सर्व समाजसेवकांच्या मालमत्तेचे शपथपत्रातले वर्णन ऐकुन घृणाच येते आहे कारण त्यामागचे त्यांचे कर्तृत्व आपण सर्वचजण जाणतो. म्हणुनच मला टाटांबद्दल अतीव आदर वाटतो. नॅनो हा केवळ एक व्यवसाय नाही आहे. त्यातुन टाटा वाहतुक सुरक्षीततेचा प्रश्न सोडवत आहेत. भारतीय कार उद्योगाच्या विश्वस्तरावर जाण्याचा पाया रचत आहेत.
असो ... परंतु कार्नेगीबद्दल सांगायचे झाले तर .. कार्नेगी सारखी माणसे जन्माला आली म्हणुनच या पृथ्वीला वसुंधरा म्हणतात. कार्नेगी, बिल गेट्स, वॉरेन बफेट, रॉक-अ-फेलर असे दानशूर उद्योगपती लाभले हे अमेरिकेचेही भाग्य. भारतात अगदीच दुष्काळ नाही परंतु देण्याची वृत्ती त्यामानाने कमी दिसते. आपणच ती वाढवायला हवी.
अश्या या कार्नेगीला माझे शतश: प्रणाम!

Saturday, April 4, 2009

व्यक्तिस्वातंत्र्य

चिकु
दादाची एक टीचर ऍन्जेला माझी जवळची मैत्रीण झाली. ऍन्जेला ही घटस्फोटीत आणि दोन मुलांची आई. एक-दीड वर्षापूर्वी आम्ही अश्याच गप्पा मारत होतो. मी गप्पा मारताना दर वेळी तिच्या कुटुंबाची चौकशी करत असे. यावेळी चौकशी करताना मला ती थोडीशी अस्वस्थ दिसली म्हणुन मी तिला विचारले तेव्हा ती मला सांगु लागली की ऍन म्हणजे तिची मुलगी शिक्षण सोडुन शिकागोला स्थाईक होण्याचे ठरवत आहे. ऍनला संगीताची खुप आवड म्हणुन ती युनिव्हर्सिटी ऑफ ऍरिझोनामध्ये संगीत क्षेत्रात पदवीचा अभ्यास करत होती. अमेरिकेत पदवी शिक्षण खुपच महाग असते त्यामुळे कमी लोक पदवीचे शिक्षण घेताना दिसतात. ऍन्जेलाची तर मुळीच ऐपत नव्हती परंतु ऍनने स्वबळावर शिष्यवृत्ती मिळवुन आणि छोट्यामोठ्या नोकर्या करत बरेचसे शिक्षण संपवत आणले होते. आत फक्त एकच सत्र बाकी होते. इथे बर्याच तरुण मुली/मुले रेस्टॉरंट्समध्ये वेटर/वेटरसेस च्या नोकर्या करतात. ऍन व तिच्या काही मैत्रीणी तेच करत होत्या. भरघोस मिळणार्या टिप्समुळे तिच्या मैत्रिणी शिक्षण सोडुन हीच नोकरी पुढे चालु ठेवण्यासाठी म्हणुन शिकागोसारख्या मोठ्या शहरात स्थलांतरीत झाल्या होत्या. आता ऍनचेही अभ्यासात लक्ष लागेनासे झाले होते. फारसे काही न करता पैसा कमवता येईल असे तिला वाटु लागले होते. म्हणुन तिने शिकागोला जाण्याचा निर्णय घेतला होता. कदाचीत महागडे पदवी शिक्षण व पैसा कमवण्याची घाई आणि चटक हीच मुख्य कारणे असावीत ऍनसारख्या कॉलेजड्रॉपआउट्समागे!
ऍन्जेलाला वाटत होते की ऍनने शिक्षण पूर्ण करावे कारण आता फक्त सहा महिन्यांचाच प्रश्न होता. पण ऍन मात्र तिच्याच विश्वात होती. तिला हे सर्व काही कळत नव्हते की कळवुन घ्यायचे नव्हते? असो ...
हे ऐकुन मी ऍन्जेलाला म्हणाले, " अगं तु सांग ना तिला समजावुन." तेव्हा ऍन्जेला मला म्हणाली, "आता ती बर्यापैकी मोठी झाली आहे. तिचे निर्णय तिनेच घ्यायला हवेत. त्यात मी काहीही बोलु शकत नाही. मी फक्त पर्याय समोर ठेवु शकते आणि परिणामांबद्दल सांगु शकते. बाकी सर्व तिनेच ठरवावे."
मी हे सगळे ऐकुन थक्कच झाले. कारण इथे फार कमीजण शिक्षण घेतात. त्यामुळे इथल्या पदवीधर लोकांना चांगल्या व भरभराटीच्या काळात तरी नोकरी मिळवण्यासाठी फारसे झगडावे लागत नाही. ऍनने शिक्षण पूर्ण केले असते तर फक्त तिच्याच क्षेत्रातच नव्हे तर कुठेही तिला पटकन नोकरी मिळाली असती. सध्या ऍन शिकागोमध्ये "स्टारबक्स" या कॉफीच्या दुकानात काम करते. पैसे पुरत नाहीत म्हणुन सतत आईकडे पैश्यांची मागणी करते. मध्यंतरी मला ऍन्जेला सांगत होती की ती ऍनला रोजच्या वापराला जे पैसे पाठवत होती त्यातुन ऍन चक्क दारु खरेदी करत होती! माझ्या डोक्यात विचार आला की ऍन्जेला हे सर्व वेळीच थांबवु शकली असती. परंतु आपल्या मुलीच्या निर्णयक्षमतेला आणि अहंकाराला धक्का लागु नये म्हणुन अथवा तिला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणुन वागु देउन तिच्या निर्णयात ढवळाढवळ नको म्हणुन तिने हे सगळे टाळले. हे कितपत योग्य आहे? अमेरिकन माणसांच्या दृष्टीकोनातुन विचार कराल तर १००% बरोबर. आणि भारतीयांच्या दृष्टीने विचार कराल तर ..... !! ??
हा फरक मुख्यत: दोन देशांमधील भिन्न संस्कृतींमुळे आहे. अमेरिकन माणसे कुठलाही निर्णय घेताना "मी" म्हणुनच विचार करतात. तर भारतीय माणसे स्वत:ला "आम्ही" म्हणुनच बघत असतात. कुठलाही निर्णय घेताना आपल्या निर्णयाचा भोवतालच्या माणसांवर काय परिणाम होईल? लोक काय म्हणतील? इत्यादि इत्यादि....
आपल्याकडे साध्या साध्या गोष्टींबाबतही निर्णय घेणे अवघड होऊन जाते. सहज सोप्या दिसणार्या गोष्टींमध्ये गुंता वाढत जातो. जर कुणीही स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायचे ठरवले तर त्या व्यक्तीला अगदीच स्वार्थी ठरवले जाते. मग त्या व्यक्तीशी इतरांचा वागण्याबोलण्याचा रोखच बदलतो. त्यामुळे असे निर्णय घेणार्या व्यक्तीलाही आपण फार मोठा काहीतरी अपराध केल्याची भावना निर्माण होते. एकुण काय तर निर्णय घेण्याची क्षमताच मारली जाते.
जर वरील गोष्टींचा सखोल विचार केला तर वाटते की स्वत:चा निर्णय स्वत: घेणे आणि येणार्या परिणामांना सामोरे जाणे असे करणे गरजेचे आहे. परंतु असे करताना आयुष्यात मोठी किंमत चुकवावी लागणे हे जसे चुकीचे आहे तसेच आपल्या संस्कृतीप्रमाणे मुलांना मुले झाली तरी मोठे होऊ न देणे हेही तितकेच चुकीचे आहे. बरेच वेळा डोक्यात विचार येतो की दोन्ही संस्कृतीतील चांगल्या गोष्टी घेऊन आपण जर त्यांचा मध्य साधला तर सगळ्यांचाच फायदा होणार नाही का? गरज आहे ती प्रत्येकाने थोडे बदलायची!

आई

दादाची शाळा

प्रिय सलोनी,
आज आपण जरा दादाच्या शाळेबद्दल गप्पा मारु. तुझी शाळेत जाण्याची वेळ येइल तेव्हा कदाचीत आपण कायमचे भारतात गेलो असू म्हणुन!
मागच्या शुक्रवारी मी दादाला शाळेत आणायला गेले तेव्हा त्याच्या टीचरने सांगीतले की, "He did a great job on his project! In fact everybody did a great job. Just in case if you are interested, you can see all projects on the wall outside his classroom." उत्सुकतेपोटी मी प्रोजेक्ट्स बघायला गेले तर काय .. पहिलीतल्या मुलांनी इतके सुंदर प्रोजेक्ट्स केले आहेत यावर विश्वासच बसला नाही. विषय होता - ’प्रसिद्ध व्यक्तींचे चरित्रटीपण’. प्रत्येक मुलाने एक प्रसिद्ध व्यक्ती निवडायची. त्यानंतर त्या व्यक्तीबद्दल पुस्तके शोधुन काढायची (इथे पालकांची मदत घेणे अपेक्षीत). अमेरिकेत सार्वजनिक ग्रंथालयात सर्व प्रकारची पुस्तके सहज उपलब्ध असतात त्यामुळे काही प्रश्नच नाही. नंतर मुलांनी ही पुस्तके वाचुन ही व्यक्ती कोण आहे, ती कशाबद्दल प्रसिद्ध आहे, ती दुसर्यांसाठी कशी प्रेरणादायी ठरली इत्यादि गोष्टींचा अभ्यास करायचा आणि त्यांचा जीवनपट हा छायाचित्रांच्या स्वरुपात एका मोठ्या कार्डबोर्डवर चिकटवायचा. शेवटी हे सगळे वर्गासमोर सादर करायचे. बापरे! पण सहा वर्षांच्या मुलांनी ही जबाबदारी उत्तमरीत्या पेलली होती. दादाने रोझा पार्क्सबद्दल अभ्यास करुन ती अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कांच्या चळवळीसाठी कशी प्रेरणादायी ठरली याबद्दल माहीती जमवली होती. काही मुलांनी लिंकन, थिओडोर रूझवेल्ट, हेलेन केलर, वॉल्ट डिजनी यांच्यापासुन ते बराक ओबामा पर्यंत वेगवेगळ्या व्यक्तींची निवड केली होती. हे सगळे बघताना या मुलांचे खुपच कौतुक वाटत होते.
घरी परत येताना नकळतच मी या शाळेची भारतातील शाळेशी तुलना करू लागले. आमच्या वेळी तरी शाळा अश्या नव्हत्या. पण आता माहित नाही. कदाचीत भारतातही आता अभ्यासक्रम आणि शिकवण्याची पद्धत बदलली असेल!
दादाला जेव्हा मला पहिल्यांदा शाळेत घालायचे होते तेव्हा तो दोन वर्षांचा होता. त्यावेळी बर्याच पाहणीनंतर माझ्या लक्षात आले की मुले पाच वर्षांची होई पर्यंत त्यांच्यासाठी मॉंटेसरी ही शिक्षणपद्धती जास्त योग्य असते. त्यामुळे आम्ही त्याला मॉंटेसरीमध्येच घातले.
मॉंटेसरीमध्ये प्रत्येक वयोगटाल साजतील असे खेळ, उपक्रम आणि कोडी असतात. मुलांना भाषा, गणित, सामाजिक, दृकश्राव्य अश्या वेगवेगळ्या गटांतुन एकेक खेळ निवडायला सांगीतला जातो. हे सर्व करताना कुठल्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. फक्त पर्याय समोर ठेवले जातात. मुलांना मिळणारे हे स्वातंत्रच त्यांना प्रेरणादायी ठरते. या गोष्टींशिवाय मुलांना स्वावलंबन, दुसर्यांना मदत करणे अश्या इतर अनेक गोष्टीही शिकवल्या जातात. या शिक्षणपद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे लहान मुलांचा कल ओळखणे सोपे जाते. तसेच मुलांच्या दृष्टीने विचार केला तर मुले बर्याच गोष्टी हसतखेळत सहज आत्मसात करतात. आपल्यालाही त्यांच्यातील हा बदल सहज जाणवु लागतो. असो ....
मला असे वाटते की मुले एकदा ५ वर्षांची झाली म्हणजे साचेबद्द / पारंपारिक पद्धतीला हरकत नाही कारण आता मुलांना थोडी जाण येउ लागली असते की जगात सर्वच गोष्टी आपल्या आवडीवर अवलंबुन नसतात. काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात कधी कधी. सुरुवातीला हा बदल स्वीकारणे मुलांना थोडे अवघड जाते. पण कालांतराने मुले या नविन अभ्यासपद्धतीतही तितकीच रुळतात. याचे सर्व श्रेय अर्थातच शाळा, शिक्षक आणि अभ्यासक्रम यांना जाते. प्रत्येक वर्गातील शालेय साहित्यही मुलांना आकर्षित करणारे असते. प्रत्येक गोष्टीत मुलांना स्वत:चे विचार मांडण्याची संधी दिली जाते. नविन किंवा वेगळ्या गोष्टींसाठी प्रेरित केले जाते. त्यामुळे मुलांना शाळा म्हणजे एक जादुची नगरीच वाटते. यातुनच पुढे कल्पकता जन्म घेते. म्हणुनच कदाचीत अमेरिका जगात महासत्ता म्हणुन स्थान टिकवुन आहे.
मला आठवते आहे की, २ वर्षांपूर्वी माझ्या एम. एस. च्या नव-उद्योजकतेच्या (enterpreneurship) वर्गामध्ये आम्हाला एका प्रकल्पासाठी एक नविन उत्पादन शोधुन काढायचे होते. मी बर्याच गोष्टींबद्दल विचार करुन त्या गोष्टी बाजारात नाही याची खात्री करायला इंटरनेटवर जायचे. तर आश्चर्य म्हणजे त्या त्या गोष्टी आधीच बाजारात आहेत हे लक्षात यायचे. याचे कारण म्हणजे प्रत्येक शोध काही फार मोठा असण्याची गरज नाही. तसेच एखादा शोध लावण्यासाठी तुम्ही स्वत:ही फार मोठे कुणी असण्याची गरज नाही. लहानपणापासुनच जर कल्पकतेला प्रोत्साहन मिळाले तर तुमचे जीवन सुखकर करतील असे शोध लागले नाही तरच नवल!
मला असे वाटते की आपणही परिक्षार्थी तयार करणे थांबवुन अश्याच धरतीवर आपल्याकडील गरजांचे निराकरण होइल अशी शिक्षणपद्धती राबवली पाहिजे. अमेरिकेतील माणसे भारतीय लोकांच्या बुद्धीमत्तेला दाद देदात. म्हणजेच आपल्याकडे आवश्यक ती बुद्धीमत्ता आहे. परंतु कल्पकतेला वाव मात्र अजिबात नाही.
अलिकडेच थॉट लिडर्स हे पुस्तक वाचताना मला हे कळले की डॉ. रघुनाथ माशेलकर आणि बायाकॉनच्या अध्यक्ष्या किरण मजूमदार यांनीही हीच खंत व्यक्त केली आहे. अमेरिकेने जेव्हा आपल्याला महासंगणक नाकारला तेव्हा आपण आपला महासंगणक तयार केला. जर्मनी, इंग्लंड, रशिया हे देशसुद्धा आवश्यक ती यंत्रसामग्री, मनुष्य आणि पैश्याचे बळ असतानाही करु शकले नाहीत ते भारताने करुन दाखवले. म्हणजेच आपण भारताला कमी लेखण्याऐवजी आवश्यकता आहे ती जुनाट निरुपयोगी शिक्षणपद्धती टाकुन कल्पकता आणि उद्योगाभिमुख शिक्षणपद्धती राबवण्याची!!

आई

Thursday, April 2, 2009

पुणेकर सुखावले !

प्रिय सलोनी
मागील एक महिना इथे हवा इतकी सुंदर आहे की काय सांगु! भारतात असताना हवा नेहेमीच चांगली असायची त्यामुळे किंमत नव्हती. मिशिगनला आल्यानंतर पुण्याच्या हवेची किंमत कळली. मिशिगनला वर्षातुन जेमतेम ४ महिने साधे कपडे घालता यायचे. बाकीचे महिने सगळीकडुन गुंडाळुन घेतल्याशिवाय बाहेर पडताच यायचे नाही. सप्टेम्बरच्या सुमारास झाडांच्या पानांचा रंग बदलायचा ... ऑक्टोबरमध्ये सगळी पाने गळुन जायची. आणि मग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या बर्फाचे हृदय एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापर्यंततरी द्रवत नसे! आणि मग मे मध्ये गवताची पाने दिसु लागली की काय आनंद! तो आनंद जेमतेम सप्टेंबरपर्यंत टिकायचा ... की परत थंडीची चाहुल. आणि थंडी पण अशी की नुसते पुणेकर गारठलेच नाही तर पुणेकर अगदी गोठले अशी. माझ्या ओळखीतला एक सोलापुरचा मित्र आमच्या पुण्यातल्या लोकांवर फार चिडायचा. त्याच्या मते पुण्याचे लोक स्वत:ला फार अवास्तव महत्व देतात. जरा पाउस पडला तर "पुणेकर भिजले", थंडी पडली तर "पुणेकर गारठले", आणि उन्हाळा आला तर "पुणेकर होरपळले". (अजयदादांना हे सांगीतले त्याच्या दुसर्याच दिवशी प्रभात रोडवर एका बंगल्यात खुन झाला ... तर ते मला म्हणाले - "पुणेकर घाबरले"!!) ... असो ... पण पुणेकर अश्या टीकेला घाबरत नाहीत.
सांगायचा मुद्दा काय तर मी पुण्यात वाढलेलो त्यामुळे चांगल्या हवामानाला चांगलाच सोकावलो होतो. मिशिगनचे माझ्यावर उपकार झाले की तिथे मी चांगल्या हवेबद्दल कृतज्ञ राह्यला शिकलो.
तीच गोष्ट फिनिक्सची. इथे जुन ते सप्टेंबरपर्यंत असा कडक उन्हाळा असतो की बस! ऍरिझोना हे वाळवंटच आहे. त्या ४ महिन्यात इथे दुपारी कारमधुन खाली उतरुन घरात शिरेपर्यंत भाजुन जायला होते. अगदी रात्रीसुद्धा चांगले गरम वाटते. त्यामुळे आम्ही फिनिक्स मध्ये ऑक्टोबरची आतुरतेने वाट पहात असतो. नंतर डिसेंबर ते फेब्रुअरी परत कडाक्याची थंडी इथे.
सांगायचे काय तर पुण्याच्या हवेला तोड नाही. परंतु त्या हवेचे महात्म्य इथे बसुन कळते.
तर सध्या तरी फिनिक्स मध्ये हवा छान आहे. आता वाळवंटात झाडे आहेत यावरच कोणाचा विश्वास बसणे कठिण आहे ... मग त्यांना वसंतात पालवी फुटु शकते म्हटले तर लोक वेड्यात काढतील. परंतु खरेच ... सकाळी सकाळी ऑफिसला जाताना पिवळ्या रंगांनी नटलेली वाळवंटी झाडे छानच दिसतात. फक्त त्या परागकणांनी ऍलर्जीमात्र भरपूर होतात. परंतु या हवेमुळे मला आज एकदम ग्रॅण्ड कॅनियनची आठवण आली. कित्येक दिवसात गेलो नाही आहोत. केवळ तुझ्यामुळेच चिंगे! जशी तुझी बातमी कळली तसे आमचे भटकणे बंद झाले आहे. जुलै-ऑगस्ट मध्ये नायाग्रा आणि माउंट सेंट हेलेन्सला गेलो तेच. त्यानंतर फिनिक्स एके फिनिक्सच चालु आहे. बघु ... तु आल्यानंतर आपण सप्टेंबरमध्ये यलोस्टोन पार्कला जाउ.
तसे या गोष्टीचे मला कधीकधी वाईट वाटते... की एव्हाना आम्ही अमेरिकेत इतके फिरलो आहोत की आम्ही त्यामानाने भारतच कमी पाहिला आहे. प्रत्येकवेळी विचार करतो... की या भेटीत गोव्याला जाउ. परंतु एकदा पुण्याला पाय टेकले की आम्ही पुणेकर सुखावले! गोवा राहिला बाजुला!!

Wednesday, April 1, 2009

अमेरिकेचे प्राणिप्रेम

प्रिय सलोनी
एक महिन्यापूर्वी कनेटिकट नावाच्या एका राज्यात एक विचित्र घटना घडली. एका स्त्रीने एका चिंपाझी माकड पाळले होते. त्या माकडाने त्याच्या मालकीणीच्या एका मैत्रीणीवर हल्ला केला. तिचे नाक, चेहेरा ओरबाडला, चावला .. इत्यादि. संपूर्ण वर्णन खूप भीषण आहे. आणि त्याची इथे जरुरी नाही. इतकेच पूरे आहे की ती स्त्री आज एक महिन्यानंतरही हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात आहे आणि अजूनही ती पूर्णपणे शुद्धीवर नाही.
अमेरिकेत या अश्या काही गोष्टी आहेत की कपाळाला हात लावायची पाळी येते. त्या माकडाला त्याच्या मालकीणीने असे पाळले होते की तो जणु काही तिचा मुलगाच होता. त्याला कपडे घालायची. आणि तो तिच्या घरात तिचा मुलगा म्हणुन राह्यचा (अशी तिची समजुत!). शेवटी त्याच्यातले श्वापद जागृत झाले आणि जे घडु नये ते घडले.
९११ कॉल नंतर अर्थात पोलिस आले आणि त्या माकडाला अखेरीस गोळ्या घालुन ठार केले.
अमेरिकेचे हे श्वापद-प्रेम/वेड इतर सर्व गोष्टींप्रमाणे अतिरेकी आहे. अमेरिकेत खाजगी पाळलेल्या वाघांचीच संख्या कित्येक हजारात आहे. वाघ, अजगर, चिंपाझी का पाळावेसे वाटतात कळत नाही. काही वर्षांपूर्वी रॉय नावाच्या एका जगप्रसिध्द प्राणिप्रेमी माणसाला त्याच्याच वाघाने हल्ला करुन असे काही जायबंदी केले की रॉय कायमचा अधु झाला आहे. हे सर्व हजारो प्रेक्षकांसमोर घडले लास व्हेगास मध्ये जिथे रॉयचा जगप्रसिद्ध खेळ मिराज नावाच्या कॅसिनोमध्ये होत असे. तरी त्या वाघाचा फक्त गैरसमजच झाल होता; त्याला रॉयला फक्त तोंडात पकडुन दूर न्यायचे होते. खरोखरच जर त्या वाघाला रॉयला मारायचे असते तर त्याला २-४ सेकंद पूरले असते कदाचीत.
इथे कुत्रे मांजराचे लाड तर खूपच असतात. त्यांना स्वेटर काय घालतील, गॉगल काय घालतील. सर्वच काही अजब वाटायचे आम्हाला सुरुवातीला. परंतु नंतर कळु लागले की अश्या रितीने प्राण्यांवर प्रेम करून इथले लोक त्यांच्या आयुष्यातील माणसांची उणीव भरुन काढतात. स्पर्धा, व्यक्तिस्वातंत्र्य, वस्तुवाद, आणि व्यक्तिवाद यांचा अतिरेक असल्यामुळे बर्याचदा नात्यांमध्ये कृत्रीमपणा असतो. घटस्फोटांचे प्रमाण भरपूर आहे. लग्न न करण्याचेही प्रमाण बर्यापैकी आहे. सामाजिक आणि आर्थिक जडणघडणच अशी आहे की एकाकीपणच वाढावे. भले मोठे रस्ते, घरे, गाड्या. प्रत्येकाला स्वत:ची स्पेस हवी! १ महिन्याच्या मुलाला देखिल आपली खोली असते त्यात झोपवतात. ज्याला त्याला स्वत:चीच कार. एकाच घरात अनेक टीव्ही जेणेकरुन ज्याला जे हवे ते त्याने बघावे. माणुस हा समाजप्रिय प्राणी आहे ही व्याख्या चुक आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती.
चिंपांझीला असे पाळणे जणु काही ते तुमचे मुल आहे, हे एकाकीपणातुन आलेल्या मानसिक रोगाचे लक्षण आहे हे मान्य होणार नाही अमेरिकन जनतेला.
सत्तेपुढे आणि पैश्यापुढे शहाणपण चालत नाही. त्यामुळे काही काळ तरी अमेरिकन लोकांना स्वत:च्या या उणीवा आणि त्यावरचे साधे उपाय समजणे कठिण आहे. भारतातील जीवन त्यामानाने संतुलित वाटते. भौतिकदृष्ट्या प्रगत नाही परंतु तरीही मने प्रसन्न आहेत. इथली गुन्हेगारी जशी कल्पनेपलिकडची असते तशी भारतात अजुनतरी दिसत नाही. कारण त्यामानाने आपण अजूनतरी इतके वस्तुवादी झालो नाही आहोत.
मला वाटते की भारताने भरपूर प्रगती करावी. परंतु अमेरिकेत सर्वच काही चांगले आहे असे नाही. सगळीकडेच अमेरिकेचा आदर्श घेण्याची गरज नाही. अमेरिकन लोकांची कल्पकता, धाडस, कष्टाळुवृत्ती, उदारपणा वाखाणण्यासारखे आहेत. परंतु कधी कधी काही गोष्टींचा अतिरेक केला जातो ते सांभाळले म्हणजे झाले.
काल म्हणालो तेच इथे पण लागू आहे. आपले नेमके प्रश्न काय आहेत ते सोडवताना आपल्या पद्धतीने सोडवले पाहिजेत. पाश्चात्यांच्या स्वैराचाराला अर्थ नाही. पैसा आणि सत्ता आहे म्हणुन विवेकाला सोडचिठ्ठी देण्याची गरज नाही. वस्तुंच्यामागे धावता धावता एकमेकांचा हात सोडण्याची गरज नाही.