Monday, February 15, 2010

बिहारकन्येचे बंड!

सलोनीराणी

काल वाचलेली एक अशीच बातमी ... त्याबद्दल थोडे काही.

गोष्ट आहे बिहारच्या एका मुलीची. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या मुलीचे लग्न ठरले ओळखीतील एका मुलाशी. ३-४ वर्षांची ओळख आणि पुढे लग्न म्हणजे सर्व तसे सुरळीत पार पाडायला हवे होते. परंतु घडले वेगळेच. लग्नाच्या धुंदीत नवरोबांनी मद्यप्राशन करुन मित्रांबरोबर असा काही नाच केला की या नववधुचे धाबे दणाणले. मला कल्पनाही करवत नाही नक्की कसा काय डॅन्स केला की त्या मुलीने त्या नवरदेवाबरोबर जायला नकार दिला. वारंवार विनवण्या करुनही ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. खरे खोटे कुणाला ठाऊक. परंतु बिहार मध्ये असे घडु शकते यावर माझा विश्वासच बसत नाही आहे.

इतिहासात पाहिले तर बिहार भारताची सुवर्णभूमी होता. सर्व मोठमोठी साम्राज्ये - नंद, गुप्त, अशोक, मौर्य - बिहारमध्येच उदयास आली. अर्थात त्याचे मुख्य कारण म्हणजे सुपीक जमीन आणि लोखंड धातुची उपलब्धता. परंतु आज पाहिले तर बिहारपेक्षा मागास राज्य शोधावे लागेल. जमिनदारी अस्तित्वात असलेले एकमेव राज्य असा लौकीक असलेले राज्य. अर्थातच बिहार मध्ये स्त्रीयांची अवस्था काही फार चांगली नाही. मी १० वीत असताना कुठेतरी वाचले होते की भारतात १/३ स्त्रीया त्यांच्या आयुष्यात एकदातरी घरातील किंवा ओळखीच्या लोकांच्या अतिप्रसंगाला बळी पडतात. आपण अलिकडे वर्तमानपत्रे वाचतो आणि म्हणतो काय घडते आहे. मला वाटते विशेष वेगळे काही घडत नाही आहे आज .. फक्त वर्तमानपत्रे बातम्या मोकळेपणाने देत आहेत. अन्यथा आपण कुठल्यातरी "आम्ही त्यातले नाहीच" या खोट्या भ्रमात वावरत होतो. असो .. परंतु त्या पार्श्वभूमीवर मला बिहारच्या या मुलीचा हा नकार खूप धाडसाचा आणि स्तुत्य वाटला.

एकंदरीतच लोकसंख्येने ५०% असलेल्या समाजघटकाला म्हणजे स्त्रीयांना स्वत:च्या अस्तित्वाची पुरेशी जाणीव नाही. अगदी अजूनही. आणि भारतातच नाही तर अमेरिकेतही. अमेरिकेत ५०-६० च्या दशकांमध्ये स्त्रीया नोकऱ्या करू लागल्या आणि बंधने झुगारुन स्वत:च्या अस्तित्वासाठी लढु लागल्या. गंमत म्हणजे धर्म, वय आणि वंश यावर आधारित भेदभाव करता येऊ नये म्हणुन ६० च्या दशकात अमेरिकेत जे विधेयक आणले त्यामध्ये लिंगाचा समावेश नव्हता. थोडक्यात काय तर तुम्ही स्त्री आहात म्हणुन कोणी तुम्हाला नोकरी नाकारली तर त्याविरुद्ध कोर्टात दाद मागता येत नव्हती. तसेच वय, धर्म आणि वंशाबद्दल सुद्धा तीच परिस्थिती होती. परंतु त्या विधेयका मध्ये स्त्रीयांचा समावेश कसा झाला हे खूप मजेशीर आहे. अमेरिकेतील दक्षीणेतील राज्यातील काही असहिष्णु आणि परंपरावादी मंडळींचा या विधेयकाला विरोध होता. त्यांना हे विधेयक हाणुन पाडायचे होते. त्यांना असे वाटले की लिंगाचा देखील समावेश केला तर उत्तर भागातील काही मंडळी त्यांच्या बाजुला वळतील आणि स्त्रींयांचा समावेश कशाला म्हणुन विरोधात मतदान करतील.

प्रत्यक्षात झाले उलटेच. उलट दक्षीणेतील काही मंडळी स्त्रीयांच्या समावेशामुळे त्या विधेयकाशी संमती दर्शवायला तयार झाली आणि ते विधेयक पुढे कायद्यात रुपांतरीत झाले. आणि त्यानंतर आज स्त्रीया बऱ्यापैकी स्वतंत्र आहेत. अत्याचारांपासुन मुक्त आहेत आणि अत्याचार झाले तर तोंड न लपवता परत स्वत:चे आयुष्य हिमतीने घडवतात.

भारतातील परिस्थिती पाहिली तर आपल्या संस्कृतित आपण स्त्रीयांना समान स्थान देतो. किंबहुना कांकणभर जास्तच मान देतो. परंतु व्यवहारात पाहिले तर स्त्रिया अजूनही तितक्या स्वतंत्र वाटत नाहीत. माझ्या मते आर्थिक स्वातंत्र्याशिवाय इतर काही स्वातंत्रविषयक चर्चेला काही अर्थ नाही. आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शिक्षण होय. आज बिहार मधली मुलगी जे काही करु शकली ते केवळ ती तिच्या शिक्षणामुळे. आज ती कदाचीत नोकरी करत असले किंवा डॉक्टर असल्यामुळे ती आर्थिक दृष्या परावलंबी नक्कीच नसणार आहे. अन्यथा हे धाडस करणे कठिण होते.

अर्थात असाही वाद घालता येईल की आर्थिक स्वातंत्र म्हणजेच स्वातंत्र्य का? तर नक्कीच नाही. परंतु आर्थिक स्वातंत्र्याशिवाय जे काही तुझ्याजवळ असेल ते स्वातंत्र नक्कीच नसेल यात संशय नाही. पुन्हा मग ... स्वातंत्र्य म्हणजेच सर्व काही का? मी म्हणेन ... तु स्वत:च विचार कर. मला वाटते त्याचे उत्तर ठामपणे हो असेल. परंतु तु स्वत: शोधले तर जास्त बरे!

ता. क. - काही गोष्टींचा खुलासा करावासा वाटतो. आर्थिक स्वातंत्र्य केवळ नोकरीतुनच येते असे नाही तर सामाजिक/न्यायिक आधारातुनही येते. इथे ऍरिझोनामध्ये नवरा बायको यांची संपत्ती समान असते. जरीही नवरा एकटाच कमवत असेल तरीही बायकोचाही संपत्तीवर समान हक्क समजला जातो. जर्मनीमध्ये माझ्या एका सहकर्मचाऱ्याशी परवा बोलत होतो तेव्हा त्याने सांगीतले की त्यांना जुळी मुले होणार आहेत एप्रिलमध्ये. आणि आता त्याच्या बायकोला ३ वर्षे पर्यंत बिनपगारी सुटी मिळेल. अर्थात ३ वर्षांनंतर ती पुन्हा त्याच कंपनीमध्ये रुजु होऊ शकते. मुलांच्या संगोपनामुळे तिला तिच्या करिअरचा पूर्ण त्याग करायची गरज नाही.


दुसरी एक गंमतीशीर पण करुण गोष्ट आठवली. काही दिवसांपूर्वी मी मेडलिन अल्ब्राईट बद्दल लिहिले होते. तिचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा तिचे वय अंदाजे ४५ असावे. घटस्फोटानंतरचे एकाकी आयुष्य तिच्यासारख्या बुद्धिमान आणि कर्तबगार स्त्रीलासुद्धा सोपे नव्हते. अगदी साध्या साध्या गोष्टी .. दुकानात वस्तु आणायला गेली तर काय घ्यावे सुचायचेच नाही कारण पूर्वी वस्तु आणायची ती नवऱ्याला काय आवडेल ते. त्यामुळे स्वत:ची आवड माहितच नाही. इतके प्रेम करता येणे हे भाग्यवानच करु जाणे. पुढे जाऊन मेडलिन अगदी अमेरिकेची सेक्रेटरी ऑफ स्टेट झाली. तात्पर्य काय तर प्रेम भक्ती एकरुपता असु शकते आणि तरिही माणुस स्वतंत्र असू शकतो ... स्वत:चा आणि स्वत्वाचा विकास करू शकतो.


कार्ल राबेडेरची कहाणी

सलोनीराणी

 

मिनयानव्हिल ही माझी अतिशय आवडती अशी एक आर्थिक विषयावर अतिशय प्रबोधक माहिती देणारी वेबसाईट आहे. आज तिथे एक वेगळीच बातमी वाचली. त्याबद्दल थोडे...

 

गोष्ट अगदी म्हणजे अगदी नवीन आहे. कार्ल राबेडेर हा एक ४७ वर्षांचा बर्यापैकी सधन माणुस. ऑस्ट्रीया या देशाचा रहिवाशी. मागच्या काही महिन्यात तो हवाई ला गेला आणि हवाईने त्याच्यावर काय जादू केली कोण जाणे ..परंतु त्याने आणि त्याच्या बायकोने ठरवले की आपली सर्व संपत्ती दान करायची. सर्व म्हणजे स र व ... एकही पैसा शिल्लक ठेवायचा नाही. हा काही खूप अतिश्रीमंत नाही ... परंतु ३.७ मिलिअन पौंड चा धनी आहे. म्हणजे अंदाजे २७ कोटी रुपये. ३५०० चौरस फुटाचा अल्प्स पर्वतराजीमधील बंगला - त्यात जकुझी सोना अगदी टुमदार तळे देखील, काही हेक्टर्सची जमीन आणि सहा ग्लायडर्स तसेच इतर मौल्यवान वस्तु अशी पाश्चात्य देशांच्या मानाने उच्चमध्यमवर्गीय किंवा थोडेफार श्रीमंत वर्गातील हा माणुस. इतक्या पैश्यामध्ये निवृत्त होऊ शकतो.

 

परंतु हवाईने याच्या डोक्यामध्ये भलतेच वारे भरले.

 

झाले असे की तिथे त्याने पैसा अगदी मुबलक खर्च केला. परंतु त्याच्याच शब्दात सांगायचे तर त्याला असे वाटले की संपूर्ण सुटीमध्ये त्याला एकही खराखुरा माणुस अवतीभवती आढळला नाही. होटलमध्ये किंवा जिथेकुठे पैसे खर्चून राहिले तिथे सेवा पूरवणाऱ्यांच्या चेहेऱ्यावर कृत्रीम सौजन्य आणि सेवा घेणाऱ्यांच्या वागणुकीत मी मारे कोण अशी कृत्रीमता आढळली. अर्थात त्यात फार काही चूक आहे असे मी स्वत: म्हणणार नाही. कारण जगरहाटीच तशी आहे.

 

परंतु मुख्य मुद्दा असा की कार्लला त्यानिमित्ताने हे प्रकर्षाने जाणवले की तो त्याच्या जीवनचक्राचा गुलाम झाला होता. आणि जगणेच विसरला होता. पैश्याच्या मागे धावता धावता खऱ्या आत्मिक आनंदाला पारखा झाला होता. हे ओळखणे महत्वाचे ! कधी कुठे असे आपण चक्रात अडकले जातो कळत नाही. परंतु मला खरोखरीच असे वाटते की तु याचा जरुर विचार करावा आणि त्यानुसार आयुष्यातील निर्णय घ्यावेत.

 

कार्ल ने त्याची सर्व संपत्ती विकत आणली आहे. ग्लायडर्स विकली गेली आहेत. घर विकतो आहे ... ८७ पौंडाची २२००० तिकिटे विकुन त्यातुन एक लॉटरी पद्धतीचे तिकिट काढणार आहे आणि त्या माणसाला घर मिळेल. आणि मग आलेल्या त्या पैश्यातुन आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील गरिबांसाठी लहान स्वरुपातील कर्जे पुरवणारी धर्मादाय संस्था कार्ल चालवणार आहे.

 

पाश्च्यात्य जगातील कार्ल हे पहिले किंवा शेवटचे उदाहरण नव्हे. बिल गेट्स (२८ अब्ज), जॉर्ज सोरोस (७-८ अब्ज), वॉरेन बफेट (५-७ अब्ज) इतकेच नाही तर रॉकंफेलर, कार्नेगी अशी खूप मोठी परंपरा आहे दानशूर लोकांची.

 

आपण अमेरिकेचा भोगवादी म्हणुन हिणवुन उल्लेख करतो. तो काही प्रमाणात खरा आहे. परंतु हे भोगवादी लोक कमालीचे कर्मयोगी देखील आहेत. इतक्या सर्व सुखसोयी आहेत परंतु यांना भोग घ्यायला वेळच नाही आहे. सर्व सुखामागे धावता धावता सुख दूर पळुन जाते. नातेवाईक दुरावतात. खरी नाती खरे प्रेम पारखे होते. त्यामुळे ही मंडळी सर्व समाजाला देणगी देऊन टाकतात. उगाच कुठल्या करंट्या नातेवाईकांना अथवा मुलाबाळांना कशाला द्यायची असा विचार करुन. अर्थात सर्वच असे नसतात. केवळ समाजाचे भले व्हावे म्हणुन मदत करणारेही अनेक असतात. मला वाटते आपण त्यातली चांगली बाजु पहावी - की अशी दानशूरता इथे आहे. अशी कर्मशक्ती इथे आहे. आणि अशी विवेकी विचारशक्तीही इथे आहे. प्रमाण कमी जास्त असेल. लोक वाद घालतील. परंतु आपण चांगल्याला आयुष्यात पहावे आणि त्याचा ध्यास धरावा.