Sunday, December 27, 2009

हवाहवाई - भाग १ माऊई कडे प्रयाण


सलोनीबाई



माऊईहुन परत येऊन ७ दिवस झाले परंतु अजुनही मन तिथेच आहे. अजुनही असेच वाटते आहे की सकाळी उठले की पहिली गोष्ट दृष्टीस पडेल ती म्हणजे घनदाट झाडांमधुन आकाशाकडे झेपावणारे, गवताच्या पात्यांसारखे माड आणि त्यांच्या पाठीमागे ढगांनाही भेदुन आकाशाचे चुंबन घेऊ पाहणारा उत्तुंग हालेयाकाला पर्वत. अजुनही लाटांचे आवाज येत आहेत. अजूनही असेच वाटते की घराबाहेर गाडी काढली की वडांच्या रांगा समोर येतील. उसांची शेती दिसेल ... निळ्याशार पाण्याशेजारुन वळण घेत जाणारे रस्ते लागतील. माऊईचे सौंदर्य नुसते प्रेक्षणीय नाही तर भावनिक वाटले. कदाचित कुठेतरी भारताची आठवण झाली. रोजच्या दगदगीतुन विरंगुळा मिळाला, निर्भेळ आनंदाचा सहवास मिळाला, मातीचा वास मिळाला, मध्येच गोवा, मध्येच सह्याद्री, मध्येच घाटाचा सुगंध मिळाला !


तशी काही फार काही पूर्वनियोजित सहल नव्हती ही. मनात बर्याच दिवसांपासुन होते की हवाईला जायचे. दोन महिन्यांपूर्वी सहजच पाहिले तर सगळे काही जमुन आले. त्यातुन यावर्षी भारतभेटही नसल्यामुळे सुटीत काय करावे असा प्रश्न होताच. कॅलिफोर्निया, नेवाडा यापूर्वीच ५-१० वेळा फिरुन आलेलो. मेनलॅण्ड वर फ्लोरिडा आणि वायोमिंग वगळता मुख्य सर्व काही एव्हाना पाहुन झाले आहे. अगदी कोलोरॅडो राहिले होते ते ३ महिन्यांपूर्वी केले तुझ्याबरोबरच. कोलोरॅडोची मजा काही वेगळीच. १२००० फुटांच्या वर २०० शिखरे असलेले राज्य! ग्रॅण्ड कॅनियन तयार करणार्या कोलोरॅडो नदीचा उगम होतो त्या रॉकीज पर्वतांचे राज्य! निसर्गाचे मला नेहेमीच आकर्षण वाटले आहे. मग तो समुद्र किनारा असो किंवा ढाकबहिरीची पर्वत कपारी मधील गुहा. त्यामुळे कोलोरॅडो पहायला नक्कीच आवडले. तुझा पहिला विमान प्रवास. सहल तशी छानच झाली होती. परंतु कोलोरॅडोच्या प्रवासात कारचा खूपच प्रवास झाला. डेन्व्हर-रॉकिज माऊंटेन-डेन्व्हर-ऍस्पेन-ग्रॅण्ड जन्क्शन-डेन्व्हर-फोर्ट कॉलिन्स-डेन्व्हर-फोर्ट कॉलिन्स-डेन्व्हर असा १००० मैलांचा प्रवास ४ दिवसात केला (तुम्हा दोन नक्षत्रांना घेऊन) ! त्यामुळे निवांतपणा जरा कमी मिळाला. त्यामुळे त्याचवेळी ठरवले होते की पुढची सहल शांतपणे करायची. एकाच ठिकाणी जायचे आणि तंबु ठोकुन तिथेच रहायचे.


माऊई हे हवाई या राज्यातिल एक बेट. हवाई हे बेटांचेच राज्य आहे. चहुबाजुला ३००० मैलापर्यंत प्रशांत महासागर पसरलेला. मध्येच हे सृष्टीचे नंदनवन साकारलेले. एकाचवेळी समुद्र, पर्वत, बर्फ, वाळवंट, ज्वालामुखी अश्या अशक्य विरोधाभासांचा प्रत्यय देणारा प्रदेश. युगानुयुगे जपानी वर्चस्वाखाली राहिलेला पॉलिनेशियन्स लोकांचा प्रदेश. परंतु १८४८ पासुन अमेरिकेचा संबंध आला. तसा विचार केला तर भौगोलिक दृष्ट्या अमेरिकेची मालकी न्यु यॉर्क फ्लोरिडा पासुन कॅलिफोर्निआ वॉशिंग्टन पर्यंत तर पसरली आहेच परंतु त्याहीपलिकडे हवाई, अलास्का, गुआम आणि थेट हिंदी महासागरात दिएगो गार्सिआ पर्यंत पसरली आहे. पूर्वेला देखील फ्लोरिडाच्या पलिकडे प्युएर्तो रिको सुद्दा अमेरिकेचाच प्रदेश. खरे तर अमेरिका सुरुवातीला १३ राज्यांची (वसाहतींची) मिळुन बनली होती. मुख्यत: सध्याच्या न्युयॉर्क-वॉशिंग्टन भागात तिचे केंद्र होते. १८०३ मध्ये नेपोलियन कडुन त्याकाळातील लुईझियाना राज्य जेफरसनने अमेरिकेला जोडले. पुढे मन्रो या धोरणी राजनीतीज्ञाच्या शिकवणीकीनुसार अमेरिकेने प्रसरणाचे धोरण स्वीकारले. तेव्हापासुन एकापाठोपाठ टेक्सास, कॅलिफोर्निआ आणि मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला असलेला सर्वच भाग गिळंकृत केला किंवा जिंकला. पुढे रशिया कडुन अलास्का विकत घेतले. अतिशय दूरदृष्टी लाभलेले आणि विजीगिषु नेतृत्वाची देणगी अमेरिकेला कायमच मिळाली आहे. असो ... तर हवाईचा नेमका इतिहास वाचला नसला तरिही जपान आणि अमेरिकेच्या टक्करीची कल्पना येऊ शकते.


हवाईवर असलेला जपानी भाषा, वास्तुकला, संस्कृती यांचा प्रभाव ठायी ठायी जाणवतो. माऊई, हवाई, हालायेकला, लनाई, लहेना, हाना, कीहे, होकुलावे, माआलेआ अशी किती किती मुके घेऊ अशी नावे. जपानी पद्धतीची उभी आणि वळणदार छतांची घरे. वर्षभर २२-२५ अंश सेल्सिअस आणि आश्चर्यकारक म्हणजे आर्द्रता विशेष काही नसलेले हवामान. दुसरे आश्चर्य म्हणजे वडांची झाडे बेटावर पहिल्यांदाच पाहिले. इथले वड आपल्या मावळातल्या वडासारखे धिप्पाड वाटत नाहीत .... तर त्यांच्यामध्ये एक नक्षी, एक नृत्य एक गेयता जाणवते. जणुकाही समुद्राच्या लाटांसोबत आणि वाऱ्याच्या लहरींसोबत त्यांचेही हृदय द्रवल्यासारखे. समुद्र आणि वड हे दुसरे अद्भुत रसायन इथे पाहिले. आमच्या हॉटेलच्या बाहेरच एक अप्रतिम वड होता. त्याच्या खाली तासनतास घालवावेत. परंतु मोठा वड पाहिला तो लहेना गावामध्ये ३-४ एकरात पसरलेला. गावाच्या मुख्य चौकात या वडाचे चांगले संवर्धन केले आहे. मागच्या दोन एकशे वर्षात याच्या फांद्या सगळीकडे पसरल्या आहेत त्यांना ठिकठिकाणी आधार देऊन त्याचा परिसर वावरता येईल असा केला आहे. मला फर्ग्युसनमधील एक प्रसिद्ध १०० एक वर्षांचा वड आठवला. मैदानाच्या एका कडेला हनुमान टेकडीच्या खाली व्यायामशाळेला लागुन तो वड होता. आम्ही त्याच्या खाली बुद्दिबळ खेळत असू, अभ्यास आणि टवाळक्या केलेल्या ... त्याची मुळे जमिनीच्या वाहुन जाण्यामुळे उघडी पडलेली ... एका वादळात तो उन्मळुन पडला. ९२-९३ साल असावे. फर्ग्युसनचा कुठेतरी एक अंश गळुन पडला.


असो .... आज इथेच थांबतो .. दोन दिवसांनंतर पुन्हा लिहायला घेईन. परंतु हवाईची सहल अतिशय सुंदर झाली. ७ दिवसांनंतरही मन पुन्हा पुन्हा तिथेच धाव घेते आहे.

क्रमश:



Saturday, December 26, 2009

ख्रिसमसची दोन गाणी


सलोनी

काल ख्रिसमस बद्दल लिहिताना एक राहुन गेले लिहायचे. ख्रिसमसची गाणी खूपच छान असतात. मला विचारशील तर ख्रिसमस हा सण नसुन एक ऋतुच आहे. ख्रिश्चन विशेषत: कॅथॉलिक लोक धार्मिक दृष्टीने तो साजरा करतात. परंतु बव्हंशी अमेरिकन मंडळी केवळ वर्षभर काम करुन शेवटी हिवाळ्यात घरी सुटी साजरी करतात. आणि तसे करण्यात जो काही प्रेम जिव्हाळा आणि नाते आहे ते ख्रिसमसच्या गाण्यांमधुन खूप छान व्यक्त होते. तशी अनेक सुंदर गाणी आहेत. परंतु मला विशेष आवडणारी ही दोन आहेत. मला असे वाटते ख्रिसमसच्या काळातील आनंद, जवळीक, प्रेम, सुरक्षीतता या भावना या दोन गाण्यांमधुन अतिशय अचूक व्यक्त होतात. गाणी ऐकताना अर्थ समजुन ऐकली तर अजुनच ती हृदयाला भिडतात...


ता. क. - पैकी लेट इट स्नो गाणे तर लिहिले आहे ती माणसे ज्यू होती..



Let it snow
Oh the weather outside is frightful,
But the fire is so delightful,
And since we've no place to go,
Let It Snow! Let It Snow! Let It Snow!

It doesn't show signs of Pauseping,
And I've bought some corn for popping,
The lights are turned way down low,
Let It Snow! Let It Snow! Let It Snow!

When we finally kiss goodnight,
How I'll hate going out in the storm!
But if you'll really hold me tight,
All the way home I'll be warm.

The fire is slowly dying,
And, my dear, we're still good-bying,
But as long as you love me so,
Let It Snow! Let It Snow! Let It Snow!




It's the most wonderful time of the year
It's the most wonderful time of the year
With the kids jingle belling
And everyone telling you "Be of good cheer"
It's the most wonderful time of the year
It's the hap-happiest season of all
With those holiday greetings and gay happy meetings
When friends come to call
It's the hap- happiest season of all

There'll be parties for hosting
Marshmallows for toasting
And caroling out in the snow
There'll be scary ghost stories
And tales of the glories of
Christmases long, long ago

It's the most wonderful time of the year
There'll be much mistltoeing
And hearts will be glowing
When love ones are near
It's the most wonderful time of the year

There'll be parties for hosting
Marshmallows for toasting
And caroling out in the snow
There'll be scary ghost stories
And tales of the glories of
Christmases long, long ago

It's the most wonderful time of the year
There'll be much mistltoeing
And hearts will be glowing
When love ones are near
It's the most wonderful time
It's the most wonderful time
It's the most wonderful time
It's the most wonderful time of the year



Friday, December 25, 2009

सांताचे आगमन

सलोनी

काल खरेदी करण्यासाठी आम्ही बाहेर गेलेलो तर परत येताना फ़्रीवेवर ही गर्दी. "इतक्या रात्री ८ वाजता ही सर्व मंडळी कुठे चालली ... विशेषत: ख्रिसमस ईव्ह (सन्ध्याकाळी) ला?" माझा प्रश्न.

अमेरिकेत ख्रिसमस आणि थॅन्क्सगिव्हिंग या दोन दिवसांची पूर्वसन्ध्या असे दिवस आहेत की त्यादिवशी अमेरिकेतील सर्व कामे थांबतात. दूर दूर गेलेले लोक घरी परतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. ख्रिसमस ट्री सजवतात. घरातल्या फायरप्लेस (शेकोटी) समोर बसुन हॉट चॉकोलेटचा आस्वाद घेतात. गाणीही म्हणतात. शांत बसणे, काहीही न करण्याचा आस्वाद घेणे याइतके अन-अमेरिकेन दुसरे काहीही असू शकत नाही.... परंतु हे दोन सण असे आहेत की अमेरिकेतील सगळे कामकाज थंडावते. असो .. त्यामुळे मला प्रश्न पडला इतकी गर्दी कशी काय.


तेव्हा सोनबा अर्थात तुझी आई मला म्हणाली की ख्रिसमस च्या एकुण खरेदीपैकी ३९% खरेदी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला होते! अमेरिकेत खरेदीशिवाय काहीच साजरे होत नाही. ख्रिसमस तर विशेष सण. यादिवशी सांता या वयस्कर माणसाला की जो उत्तर ध्रृवावर राह्तो, सर्व अमेरिकेतील (आणि जगभरातील) लहान मुलांना खेळणी देण्याचे काम करावे लागते :-) सिद्धोबा इतकी वर्षे सांताच्या नादी लागला नव्हता. परंतु यावर्षी त्याच्या काही वर्गमित्रांचे पाहुन त्याने देखील त्याची एक यादी बनवली होती.


सिद्दोबाला नर्फ-फुटबॉल हवा होता कारण त्याच्या मित्राने क्विंटनने नर्फ-फुटबॉल मागीतला होता सांताकडे. परंतु त्या ट्रॅफिकला पाहुन हळुहळु माझ्या लक्षात आले की सिद्धोबाचा निरोप सांताकडे पोहोचला नाही अजून. एव्हाना तुझी आई मनातल्या मनात खुष झाली होती की बाबाचे उद्या काही खरे नाही कारण बाबाने सांताला सिद्धुची यादी पोहोचवली नाही आणि उद्या (ख्रिसमस) च्या दिवशी दुकाने बंद असतात.



"सिद्धु मी सांताला ई-मेल करतो आणि सांगतो."

"सांताकडे ईमेल आहे. आयफोन? ब्लॅकबेरी आहे?" - सिद्धु

"हो. कदाचित ब्लॅकबेरी"

"त्याचा ईमेल काय" - सिद्धु
"सान्ता ऍट नॉर्थपोल डॉट कॉम" - इति आई.
"ओके मग मी घरी गेल्यावर इमेल लिहितो" - सिद्धु
"नाही लहान मुलांना ईमेल पाठवायची परवानगी नाही" - आई
"सिद्धु मी लिहिन ईमेल ... परंतु आता तो जगभर फिरतोय त्यामुळे त्याला ईमेल वाचता येईल की नाही माहीत नाही.
सिद्धुचा चेहेरा रडवेला झाला...

"पण मे बी त्याचा ब्लॅकबेरी आहे त्यामुळे मिळेल त्याला. तु काळजी करु नको उद्या नाही तर परवा तुला नक्की तुझ्या वस्तु मिळतील."


घरी पोहोचल्यावर मला प्रश्न पडला की आता सांता कुठे भेटणार? मी इंटरनेटवर शोध घेतला तर असे लक्षात आले की कुठल्याही टॉयजरस (खेळण्यांचे दुकान) मध्ये तो ९ पर्यंत भेटेल ! मी माझ्या एका मित्राला भेटायचे म्हणुन बाहेर पडलो. तो अर्थातच टॉयजरस च्या शेजारी रहात होता. मग मी तसेच टॉयजरस मध्ये सांता सापडतो का पाहिले, परंतु सांता तिथुन निघुन गेला होता. मग पुढे वॉलमार्ट मध्ये पाहिले. तिथे तर चतु:शृंगीपेक्षा जास्त गर्दी ... आणि वर सांता भेटला नाही ते वेगळे. परंतु तिथे कळले की २५ मैलावर असलेल्या दुसऱ्या एका टॉयजरसमध्ये नक्की सांता भेटेल! शेवटी मी गाडी तिकडे वळवली. आणि अखेरीस तिथे मात्र सांता भेटला. त्याला मी सिद्धुच्या नर्फ-फुटबॉलचा निरोप दिला आणि घरी आलो.

एव्हाना सिद्धोबाने खोली आवरली होती. जेवण केले होते. त्याच फळा स्वैपाकघरामध्ये आणुन त्यावर खडुने नक्षी काढली आणि सांताला शुभेच्छा लिहिल्या. आईला दुध आणि कुकीज ठेवायला सांगीतल्या. आणि मग तो झोपायला गेला.

रात्री मी पाठ दुखते म्हणुन फॅमिली रूम मध्ये झोपलो. साधारण पहाटेचे पाच वाजले असतील आणि मला असा भास झाला की घरात पावले वाजत आहेत. मी किंचीत उठलो पण मिट्ट काळोख होता. त्यामुळे कंटाळा केला. त्यानंतर एकदम ६:३० लाच जाग आली. अजुनही अंधारच होता. मी सवयीने अंधारात चाचपडत किचन बार पर्यंत गेलो. ब्लॅकबेरी चा हिरवा दिवा लुकलुकत होता. तो उचलला आणि पासवर्ड टाईप करायला लागलो ... माझ्या चेहेऱ्यावर अंधारात प्रकाश पडलेला ... आणि एकदम माझा दंड हलु लागला. काही शब्दही ऐकु आले. पण अजुनही मी झोपेत होतो. भूत बित कळण्याइतपतही शुद्धीवर नव्हतो!! हळुहळु मला थोडे थोडे कळु लागले ... सिद्धोबा मला सांगत होता ... "बाबा, सांता येऊन गेला. त्याने मला नर्फ फुटबॉल आणि बेसबॉलचा फिल्डिंग ग्लोव्ह दिला आहे."

"अरे वा!!!!" मी ऑस्कर मिळवण्याच्या जिद्दीने त्याच्याइतकेच आश्चर्यमुग्ध होऊन विचारले.... "कधी आला होता"


"मला वाटते सिक्स हवर्स बॅक... मला त्याच्या पायांचा आवाज आला. मी रात्रभर झोपलोच नाही"

"झोपलाच नाही" - मी

"नाही ... मे बी थोडा वेळ झोपलो. पण मला झोपच लागत नव्हती. पण सांताला पहायला बाहेर आलो ...पण तो नाही दिसला ..म्हणुन मी त्याचा मिल्क ग्लास शोधला ... टेबलावर नाही. डिशवॉशर मध्ये नव्हता .. सिंक मध्ये पण नाही. ... "
"कदाचीत त्याने हाताने धुवुन परत ठेवला असेल" - मी
"हं .... "


सांताने सिद्धु ला एक पत्र देखील लिहिले होते. सिद्धुला मी ते दाखवले. तो भलताच खुष झाला. परंतु त्या पत्रामध्ये सिद्धोबाला शुद्धलेखनाच्या दोन चुका आढळल्या. परंतु सांताला घाई असते असे म्हणुन मी फेटाळुन लावल्या. सिद्धोबाने फ्रीजच्या बाजुला लावलेली त्याची आणि तुझी यादी काढली.

"अरे हे काय आहे"
"माझी आणि सलोनीची यादी" - सिद्धू

"सलोनीची पण यादी होती" - मी हैराण होऊन ...

"हो. मी तिला क्लोद्स आणि खेळणी मागीतली होती"

"अरे पण हा तिचा पहिलाच ख्रिसमस असल्यामुळे सांताला अजुन ती माहित नाही ना" - मी ...

"ओ के ... नेक्स्ट टाईम.." - सिद्धु

मी हुश्श केले ..

मला एव्हरेस्ट जिंकल्याचा आनंद झाला..

असा हा तुझा पहिला ख्रिसमस.. खरे तर आम्ही ख्रिसमस ट्री पण आणणार होतो. पण राहुन गेले. सगळीकडे इतके छान वातावरण आहे त्यामुळे म्हटले आपण किरिस्ताव नसलो तरीही ख्रिसमस साजरा करायला काय हरकत आहे. ३३ कोटींमध्ये येशु ख्रिस्त अजून एक देव. जैसा देस वैसा भेस. बाकी आपण अगदी अमेरिकन लोकांसारखे सरावलेलो नाही .... पण जमेल तसा ख्रिसमस साजरा केला. मुख्य म्हणजे सांताकडे ईमेल असल्यामुळे सगळे कसे सुरळीत पार पडले.

Wednesday, December 23, 2009

सत्तेचे संतुलन

सलोनी

हे मेडलिन अल्ब्राईटचे पुस्तक बरेच दिवस झाले वाचतो आहे. इंग्रजी मी तसे अगदी कामापुरते वापरतो त्यामुळे पुस्तक बिस्तक वाचायला वेळ लागतो. .... मराठी असले असते तर एका दिवसात वाचुन झाले असते. खरेच ... सोमवारात दर सुटीत आनंद वाचनालयात मी रोज एक पुस्तक वाचायचो तर तिथे काम करणारी बाई मला म्हणाली .."खरंच वाचतोस का नुस्तेच परत आणुन देतोस" !!! असो ... पण आज सकाळ मधील एक बातमी वाचली आणि खूप अस्वस्थ व्ह्यायला झाले. बातमी अशी की भारतामध्ये संसदेने चर्चेशिवाय मंत्रांना आणखी एक सवलत मान्य केली. सवलत अशी की आता मंत्री लोक त्यांच्याबरोबर कितीही लोकांना (आणि कोणालाही) भारतभर प्रवास करता येईल. पैसे अर्थात भारत सरकार म्हणजे आम जनता देणार.

भारत मोठा देश आहे. मंत्र्यांवर मोठी जबाबदारी असते. खरे आहे. अमेरिकेत सर्व मंत्र्यांना वापरायला सरकारी विमाने असतात.... खरे आहे. विमानप्रवास गरज आहे ... चैन नाही ... खरे आहे. परंतु चर्चेशिवाय मंत्र्यांचे पगार, भत्ते, सवलती, घरे, विमानप्रवास सगळेच कसे मंजुर होते? आणि काही सवलती जरिही समर्थनीय असतील तरीही त्याचे उत्तदायित्व कुठे दिसत नाही.

मेडलिन अल्ब्राईटच्या पुस्तकात आणि त्याआधीही अनेकदा वाचण्यात आले आहे की अमेरिकेत अश्या व्यक्तिगत सवलती तर सोडाच परंतु कुठल्याही भेटवस्तु किंवा जेवण देखील घ्यायला कायद्याने बंदी आहे. परराष्ट्रमंत्री म्हणुन काम करत असताना ज्या ज्या भेटी मिळाल्या त्या ४०-५० डॉलर्सपेक्षा जास्त महाग असलेल्या सर्व वस्तु सरकारजमा कराव्या लागल्या. इतकेच नाही तर ५० डॉलर्स पेक्षा जेवणाचे बिल जास्त झाले तर ते सुद्धा सरकारी खर्चानेच करावे लागते. आणि हे सर्व कशासाठी तर सरकारी मंत्र्याना लाच देऊन विकत घेण्याचा कुणी प्रयत्न करु नये म्हणुन. आणि हे नियम सर्वच सरकारी नोकरांना लागु आहेत ... अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा !

आणि हे केवळ इथेच थांबत नाही. सर्व मंत्र्यांची इथले सेनेटर्स आणि कॉंन्ग्रेस सदस्य नियमितपणे उलटतपासणी घेत असतात. म्हणायला कार्याचा आढावा असतो ... परंतु अक्षरश: धारेवर धरल्यासारखे प्रश्न विचारले जातात. सेनेट म्हणजे इथली लोकसभा आणि कॉन्ग्रेस म्हणजे इथली राज्यसभा. राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्ष सोडुन सर्व नियुक्त मंत्रांना तसेच सरकारी अधिकार्‍यांना कार्यवृत्त देण्यासाठी इथली संसद बांधील ठेवते.

पाश्चात्य देशांमध्ये भाबडेपणा दिसुन येत नाही. सत्तेमुळे येणाऱ्या उन्मत्तपणाला ते चांगले ओळखुन आहेत आणि सत्तेवर अंकुश ठेवुन व्यक्तिस्वातंत्र अबाधित ठेवण्याची त्यांची सतत धडपड असते. लॉर्ड ऍक्टन या इंग्लिश इतिहास तज्ञाने केलेले विधान यांच्या शासनाचा अगदी पाया बनले आहे - "सत्ता भ्रष्ट करते. आणि निरंकुश सत्ता पूर्णत: भ्रष्ट करते."

किती खरे आहे हे! हजारो वर्षांपासुन हेच तत्व चालु आहे. भारतातील सम्राट राजसूय यज्ञ करुन स्वत:ला राज्याभिषेक करुन घेत असत. त्यावेळेच्या विधिंमध्ये राजा म्हणत असे "अदण्ड्योऽस्मि । अदण्ड्योऽस्मि ।अदण्ड्योऽस्मि ।" त्यावेळी राजगुरु त्याच्या पाठीवर तीनवेळा दर्भाने स्पर्श करुन म्हणत असे "धर्मदण्ड्योऽसि।धर्मदण्ड्योऽसि।धर्मदण्ड्योऽसि।" .... अर्थात राजा म्हणे "मला कुणीही शासन करु शकत नाही". आणि राजगुरु त्याला आठवण करुन देई "तुझ्यावर धर्माचे शासन आहे". रोमन लोकांमध्ये देखील अशीच पद्धत होती. विजयी रोमन सम्राट जेव्हा रोममध्ये विजयपताका फडकवत असत त्यावेळी एक गुलाम त्यांच्यामागे उभा राहुन म्हणे "होमिनेम ते मेमेन्टो" - "तु केवळ एक (मर्त्त्य) मानव आहेस".

दोन्ही प्रथा अगदी सारख्या वाटतात ... परंतु नीट विचार केला तर भारतीय प्रथा ही धर्मावर अर्थात प्रत्येक माणसातल्या देवत्वाला आवाहन करणारी आहे. तर रोमनांची प्रथा ही जरब बसवणारी आहे की जर तु नीट राज्य केले नाहीत तर कुणीतरी तुला मारुन राजा बनेल. दोन्हीत फरक आहे.

आणि आजही हाच फरक आपल्या राज्यपद्धतींमध्ये आहे.

भारतात ५ वर्षांसाठी आपण आपल्या आमदार खासदारांना निवडुन देतो आणि विश्वास ठेवतो की ते चांगले वागतील. आजपर्यंत किती आमदार खासदार मंत्री तर सोडाच परंतु नगरसेवकांना त्यांच्या कामाचा जाब विचारला जातो? तशी आपल्याकडे पद्धतच नाही. किती राजकारण्यांवर गुन्हे दाखल करुन शिक्षा करण्यात आली आहे? अगदी नगण्य.

रणाविण जे मिळाले ते स्वातंत्र नव्हते हे कधी तरी आपल्याला कळेल. केवळ गोरा इंग्रज जाऊन आपला काळा इंग्रज आला इतकेच काय ते. दगडाहुन वीट मऊ इतकेच काय ते. स्वातंत्र्य हे भित्र्या आणि आळशी लोकांना मिळत नसते. त्यासाठी झगडावे लागते. पाश्चात्यांकडे सत्ता निरंकुश ठेवली जात नाही.

साध्या निवडणुका पहा अमेरिकेतील. संपूर्ण संसद एकदम निवडुन येत नाही. साधारणत: १/३ संसद दर दोन वर्षांनी बदलते. तीच गोष्ट कॉन्ग्रेसची. इतकेच नाही तर या वर्शी कॉन्ग्रेसच्या निवडणुका झाल्या तर पुढच्या वर्षी संसदेच्या. राष्ट्राध्यक्ष हा त्याहुन वेगळा. त्याची एक वेगळीच निवडणुक पण त्याला पण निरंकुश सत्ता बहाल नाही करत. सतत बदलणाऱ्या संसद आणि कॉन्ग्रेस ला धरुन धरुन तो मार्गक्रमण करतो. तो स्वत:ला आवडेल त्या व्यक्ती नियुक्त करतो परंतु त्या सर्व व्यक्तिंना संसदेची मंजुरी तर लागतेच परंतु त्या सर्वांचे नियमितपणे कार्याचे मूल्यमापन देखील करते.

सेनेट वेगवेगळ्या मंत्र्याचे मूल्यमापन करत असताना कॉन्ग्रेस एकच मुख्य काम करते .. तेम्हणजे कुठल्याही कामासाठी लागणारे पैसे मंजुर करणे.

हे सर्व होत असताना राज्यांच्या निवडणुकादेखील मध्येच होत असतात. त्याही अशा पद्धतीने की कोणत्याही एका पक्षाला लाटेवर स्वार होता येत नाही.

भारतात ७७-७९ साली आणीबाणी, ८४ साली इंदिरा गांधींचा मृत्यु, ८९ साली बोफोर्स, ९०-९२ साली राममंदिर अश्या अनेक लाटा दिसुन आल्या. त्या सर्वांचा परिणाम असा की केंद्रात किंवा राज्यात अशी सरकारे आली (वाजपेयीं अपवाद वगळता) की सर्वांनी सत्तेचा दुरुपयोगच केला. दोष राजकारण्याचा आहेच. परंतु दोष आपला सर्वांचासुद्धा आहे. आपण जर या लोकांना प्रश्न नाही विचारले. त्यांच्यावर अंकुश नाही ठेवला तर ते भ्रष्टाचारच करणार.

पूर्वी आपल्याकडे इंग्रजांनी तैनाती फौजा तयार केल्या आणि आपले बव्हंशी राजे त्यांचे मांडलिक झाले आणि अंतिमत: सत्ता राज्य आणि संपत्ति सर्वच गमावुन बसले. जी कथा राजांची तीच प्रजेची. आपला उत्कर्ष करायचा असेल तर दुसऱ्यावर पूर्ण विसंबुन राहण्यात अर्थ नाही. ज्यांच्याकडे सत्ता आहे ते त्यांचाच उत्कर्ष प्रथम करणार. तो मानवी स्वभाव आहे. त्याला मुरड तेव्हाच घातली जाईल जेव्हा सामान्य माणुस आपल्या हक्कांसाठी लढायला तयार होईल.

अमेरिकेत सत्तेवर कसा ठायी ठायी अंकुश आहे याचे अजुन एक उदाहरण म्हणजे कुठल्याही जिल्ह्यापातळीवरचा न्यायाधीश हा देखील लोकांनी निवडुन दिलेला असतो. त्यामुळे त्याच व्यक्ती न्यायाधीश होऊ शकतात ज्या लोकांच्या हिताचे काम करतात. आपल्याकडे न्यायव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे असे म्हणायला हरकत नाही. याचे कारणच हे आहे की न्यायाधीशांना जाब कोण विचारणार? अगदी राज्य सरकार देखील विचारु शकत नाही. थेट राष्ट्रपतीच नियुक्ती करतात जिल्हान्यायाधीशांची. जेव्हा न्याय होऊ शकत नाही तेव्हा नकळत एक नवा अन्याय लादला जातो.

असो ... परंतु आजच्या या मंत्राच्या खिरापतीच्या बातमीने हे सगळे विचार एकापाठोपाठ आले. भारतात अण्णा हजारे सोडले तर सर्व तथाकथित समाजनेते आपली स्वत:ची पोळी भाजुन घेताना दिसतात. मठ उभारतील नाहीतर राष्ट्रभक्तीची शिबिरे घेतील ... परंतु सामान्य माणसापेक्षा कुठलेतरी तत्वज्ञान मोठे. कळत नाही असे कुठवर चालणार. माझ्या एका मित्राच्या घरी (कसब्यातील जुने वाडे ते) तुळईवर खडूने लिहिले होते त्याच्या वडिलांनी "हे असेच चालयाचे". आम्ही विचारले हे का लिहिले तर कळले की आणीबाणी नंतर जनता सरकार आले आणि गेले तेव्हा उद्वेगाने त्यांनी राजकारणात रस घेणेच सोडले.

मला वाटते हीच भारतातील ९९% लोकांची अवस्था आहे. आपण संघर्षाला घाबरतो. आपला धीर लगेच जातो आणि आपण "ठेवीले अनंते तैसेची रहावे" म्हणत "असमाधानी" राहतो. जोपर्यंत सामान्य माणसात संघर्षाची वृत्ती येत नाही, आणि सत्तेला झुगारुन देण्याची त्याची तयारी होत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे. मराठी माणसे तशी भाग्यवान आहेत कारण त्यातल्या त्यात आपल्याकडेच ही वृत्ती आहे. आणि म्हणुनच आपल्याकडे तुलनेने अधिक समानता आणि सुबत्ता आहे. परंतु डोळे उघडे करुन जगात दुसरीकडे पाहिले तर आपल्याला अजुन बरेच काही शिकायचे आहे आणि करायचे आहे.

Thursday, November 19, 2009

सेर सिवराज

सलोनी

१९९३ साली पहिल्यांदा इ-मेल शी संबंध आला. त्यापूर्वी आपण कसे जगत होतो इ-मेलशिवाय याचा अचंबा वाटतो इतकी इ-मेल अंगवळणी पडली आहे. रोज सकाळी डोळे उघडायच्या आत संगणक चालु करतो! आणि मला वाटत नाही मी एकटाच आहे असे करणारा!

असो .. तर आज मी अनेक दिवस शोधत असलेली एक कविता कोणीतरी इ-मेलद्वारे पाठवली. कविता आहे कवि भूषण या सतराव्या शतकातील एका उत्तर भारतिय कवीची. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रित्यर्थ त्याने ही कविता स्तुतिसुमनपर लिहिली आहे.

मला असे वाटते या कवितेमध्ये शिवरायांचे अगदी यथार्थ स्तवन केले आहे. ते असे आहे...

इन्द्र जिमि जम्भ पर, बाडव सुअंब पर

रावण सदम्भ पर रघुकुलराज हैं

(अर्थ - इंद्राने जसा जंभासुराचा पराभव केला. जसा वडवानल समुद्रावर (येऊन आदळतो) जसा रावणाच्या रामाने दंभ उतरावा)

पौन बारिवाह पर, सम्भु रतिनाह पर,

ज्यों सहसबाह पर रामद्विजराज हैं

(अर्थ - जसा वारा ढगांना (पिटाळुन लावातो), शंन्कर जसा मदनावर (तिसरा डोळा उघडतो), जसा सहस्रार्जुनावर परशुराम (तुटुन पडला) )

दावा दृम दण्ड पर, चिता मृगझुंड पर,

भूषण वितुण्ड पर जैसे मृगराज हैं

(अर्थ - वीज जशी वृक्षाच्या बुंध्यावर (कोसळावी), चित्त्याने जशी हरणांच्या कळपावर झेप घ्यावी, आणि सिंहाने जसे हत्तिच्या (गंडस्थळी) विराजमान व्हावे)

तेज तम अन्स पर, कान्हा जिमि कंस पर

त्यों मलेंच्छ बंस पर सेर सिवराज हैं

(अर्थ - तेजाने जसा अंधाराचा (शेवटचा) कण देखील उजळून टाकावा, कृष्णाने जसा कंसावर (विजय मिळवावा

तसा म्लेंच्छाच्या छाताडावर शिवाजी (नामक) सिंह विराजमान आहे)

मी पुन्हा पुन्हा विचार करतो .... शिवाजी महाराज खर्या अर्थाने आपले राष्ट्रपुरुष आहेत. मराठी माणसाच्या रक्तारक्तात त्यांचे तेज भरुन राहिले आहे. त्यांचे जीवन हे आपले प्राण, आपल्या आकांक्षा आणि आपली मार्गदर्शक तत्त्वे बनून राहिली आहेत. आपण शतश: ऋणी असायला हवे की तो आपला वारसा आहे.

मेडलिन अल्ब्राईट - भाग १

सलोनी

 

सध्या एक पुस्तक वाचतो आहे. मेडलिन अल्ब्राईट या अमेरिकेच्या माजी "सेक्रेटरी ऑफ स्टेट" यांची स्वत: लिहिलेली स्मरणटीपणे (मेम्वार्स). काहीसे आत्मचरित्रासारखेच परंतु इथे भर एखाद्याने आयुष्यभर केलेल्या कामाविषयी जास्त असतो. सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे परराष्ट्रसचिव. फरक इतकाच की अमेरिकेत कुठल्याच मंत्र्याला निवडुन येण्याची गरज नसते. राष्ट्राध्यक्ष इथे कोणत्याही लायक माणसाला मंत्री नियुक्त करु शकतात. त्यासाठी सेनेट (अर्थात लोकसभा) यांची संमती घ्यावी लागते.

 

मेडलिन अल्ब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव. त्यांना बिल क्लिंटन यांनी नेमले. भारत आणि अमेरिका त्यांच्याच कारकिर्दीत जवळ यायला सुरुवात झाली. त्यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंतसिंह होते. असो त्यामुळे मला मेडलिन अल्ब्राईट बद्दल आकर्षण होतेच.

 

तश्या सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. परंतु आज मी दोन छोटाश्या गोष्टी सांगणार आहे.

 

परराष्ट्र सचिव होण्याआधी मेडलिन अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या दूत म्हणुन काम करत होत्या. त्यामुळे जगात घडणार्या उलथापालथींमध्ये अमेरिकेची काय भूमिका असावी याला आकार देण्याचे मोठे काम त्यांनी पार पाडले. सोमालिया, हैती, रवांडा आणि युगोस्लाविया इथे चाललेली यादवी, किंवा पूर्व युरोप मध्ये पोलंड, चेकोस्लाव्हाकिया सारख्या देशांमध्ये समाजवादाकडुन लोकशाहीकडे होणारे सत्तांतर त्यांच्याच काळात घडले. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हा अतिशय तीव्र टीकेचा विषय आहे. कारण अनेकदा अमेरिकेचे परराष्ट्र धोरण हे स्वत:ची पोळी भाजुन घेताना जगात अस्थिरता माजवणारे असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु आपण हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे की वास्तविक जीवन म्हणजे हिंदी चित्रपट नसतो की जिथे एक नायक आणि एक खलनायक असेल. अनेक भल्या बुर्या आर्थिक, सामाजिक, राजकिय आणि संरक्षणविषयक समाजघटकांचे आणि समाजकंटकांच्या स्व-वर्चस्वासाठी चाललेल्या प्रयत्नांचा एक परिपाक म्हणजे वास्तविक जीवन. त्यामुळे टीकेला पात्र असले तरीही अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये ही प्रकाशाचे अनेक किरण शोधले तर नक्की सापडतील.

 

तर युगोस्लाव्हिया या देशामध्ये समाजवादाकडुन लोकशाहीकडे ९०च्या दशकात सत्तांतर होत होते. हा देश प्रामुख्याने सर्ब, क्रोऍट्स, बोस्निअन आणि इतर काही लोकांचा बनलेला होता. हळुहळु सर्बिया, क्रोएशिया वेगळे झाले. बोस्निआची पण तीच वाटचाल चालली होती. बोस्निआ मुस्लिमबहुल होता. परंतु तिथे मुस्लिम, कॅथॉलिक आणि रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माचे लोक पिढयानुपिढ्या एकत्र नांदत होते. मात्र ९०च्या त्या धुमाकुळात हे सर्व बंध तुटु लागले. बोस्निआमध्ये राहणार्या सर्ब लोकांना सर्बियामधिल सर्ब लोकांनी फूस लावुन शस्त्रास्त्रे पुरवुन बोस्निअन मुस्लिमावर हल्ले सुरु केले. आणि बघता बघता हजारो निरपराध लोकांची हत्या होऊ लागली. युरोपमध्ये भारतासारखेच शेकडो वर्षांचे जुने प्रश्न, भांडणतंटे आहेत. मोठा इतिहास आहे. विभिन्न देशांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वास, मत्सर आणि सूडाची भावना आहे. (इतिहासात बघता आपण भारतिय भारताबाहेर आक्रमणे करायला कधी बाहेर पडलोच नाही. आमचा दसरा अंगणातच! त्यामुळे आपल्याला युरोपिअन्स म्हणजे सरसकट एकच लोक असे वाटते. असो.) त्यामुळे जर सर्ब लोक मुस्लिम बोस्निअन्स ला मारत असतील तर "मला काय त्याचे" असे म्हणुन बरीच युरोपिअन राष्ट्रे गप्प बसली सुरुवातिला.

 

परराष्ट्र संघात काम करताना मेडलिन अल्ब्राईट या घडामोडी अगदी जवळुन बघत होत्या. ही यादवी थांबवावी असे त्यांना तीव्रतेने वाटत होते. त्यांनी त्यांच्यापरिने अनेक प्रयत्नही केले. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी नाटो या युरोपिअन संरक्षण संघटनेमार्फत सर्ब लोकांच्या शस्त्रसाठ्यांवर हल्ले केले. त्यामुळे सर्बांना जरब बसली आणि पुठे ही यादवी शमली ..... परंतु लाखो लोकांचा बळी घेऊनच.

 

नाटोच्या हल्ल्यासाठी निर्णयाप्रत येण्यासाठी त्यांना बर्याच लोकांचा पाठिंबा मिळवावा लागला. अश्याच एका बैठकीत जनरल पॉवेल हे अमेरिकेत नावाजलेले एक अधिकारि अश्या हल्ल्याचे काय परिणाम होतील यावर विश्लेषण सादर करत होते. प्रत्येकवेळी जनरल पॉवेल म्हणायचे की आपण असा हल्ला करु आणि त्याचे अमुक अमुक परिणाम होतिल. त्यांनी जे जे पर्याय समोर मांडले त्या सगळ्यांमध्ये त्यांनी निराशायुक्त स्वर लावला होता. अल्ब्राईट या अस्वस्थ झाल्या. हजारो लोकांची कत्तल होते आहे आणि आपण काहीच करायचे नाही या विचाराने त्या अस्वस्थ झाल्या. परंतु पॉवेल ही फार मोठी व्यक्ती होती. राजदूत म्हणुन अल्ब्राईटकडे अधिकार होता परंतु विषयातले नैपुण्य वा अधिकार नव्हता. राजदूत होण्याआधी त्या एक साध्या प्राध्यापक होत्या. परंतु तरिही उद्वेगाने त्यांनी पॉवेलना विचारले, "जर या परिस्थितीत आपण काहीच करु शकत नाही तर आपण आपले सामर्थ्य कशासाठी राखुन ठेवतो आहोत?" त्यांच्या या प्रश्नामुळे असेल किंवा अन्य कशामुळे ... सुत्रे हलली आणि बचावात्मक हल्ल्यांना संमती मिळाली. या प्रसंगातुन मला मेडलिन अल्ब्राईट यांची बुद्धिमत्ता, धैर्य, नीती आणि तितकेच महत्वाचे म्हणजे कृतीशीलता दिसुन आली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

 

दुसरी गोष्ट बोस्निआतील दोन कुटुंबांची आहे - फेजिक आणि सोराक. फेजिल हे मुस्लिम कुंटुंब होते. सोराक सर्ब. तसे शेजारी परंतु फारशी ओळख नाही. यादवी सुरु झाली तरीही सोराक आपली जागा सोडुन गेले नाहीत. बोस्निअन पोलिसांनी केवळ सर्ब म्हणुन सोराकच्या मुलाला घेउन गेले. तो कधिच परत आला नाही. सोराकचा दुसरा मुलगा बोस्निअनविरुद्ध लढताना बळी पडला. सोराकची पहिली सून गर्भार होती. यथावकाश तिने एका बाळाला जन्म दिला. अवतिभोवती हल्ले चालुच होते. अन्न वस्त्र निवारा सर्वांचीच वानवा होती. कडाक्याची थंडी असल्यामुळे अन्नाचा अधिकच तुटवडा होता. त्यामुळे आईला दुध येत नव्हते. सोराक कुटुंबाने त्या बाळाला चहा द्यायचा प्रयत्न केला. परंतु दुधाअभावी ते बाळ जगु शकणार नाही हे निश्चित होते. फेजिक कुटुंबाकडे एक गाय होती. परंतु त्यांनी ती गावाबाहेर ठेवली होती कारण गावात सर्ब सैनिकांच्या हल्ले चालु होते. पाच दिवस झाले आणि बाळ अगदी मलुल होऊन गेले होते. आणि सोराक कुटुंबाच्या घराबाहेर पावले वाजली. दरवाजा उघडला तर फेजिक अर्धा लिटर दुध घेऊन उभे. सहाव्या दिवशी तेच घडले, आणि सातव्या आणि पुढचे ४४२ दिवस पुन्हा पुन्हा तेच जोपर्यंत सोराक कुटुंबीय बोस्निआ सोडुन सर्बियाला कायमचे जाईपर्यंत. बर्फ, थंडी आणि सर्बांच्या हल्ल्यांची पर्वा न करता निरपेक्ष भावनेने फेजिक दुध आणुन देत राहिले. युद्ध संपल्यावर टाईम्सच्या एका वार्ताहाराला फेजिक इतर निर्वासितांबरोबर छावणीत सापडले... घर उद्धवस्त झालेले आणि गाय तर कधीच मरुन गेलेली. वार्ताहाराने जेव्हा फेजिकना सांगीतले की तो सोराक दांपत्याला भेटला आहे तेव्हा फेजिक म्हणाले "बाळ काय म्हणतंय"?

 

 

 

Sunday, October 25, 2009

आमचेही (स्वाईन फ्लु) लसीकरण!

सलोनी

या आठवड्यात तुझी ६ महिन्यांची तपासणी झाली. त्यावेळी तुझ्या तपसणिव्यतिरिक्त सिद्धुला "स्वाईनफ्लु" ची लसदेखील दिली. त्यामुळे थोडे निश्चिंत वाटले. सध्या स्वाईनफ्लुने बराच हाहाकार झाला आहे जगभर. भारतात पुणे तर अगदी २-४ आठवडे बंद पडले इतकी परिस्थिती गंभीर झाली होती. त्यामुळे तुझ्या डॉक्टरांनी सिद्धुला लस द्यायची का म्हटले तर आम्ही ताबडतोब संमती दिली.

काल ऑफिसवरुन आलो तर टीव्हीवर बातम्यांमध्ये सांगीतले की या वीकएण्डला फिनिक्समध्ये ४० ठिकाणी स्वाईनफ्लुची लस देण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही आपल्या घराजवळचे एक ठिकाण शोधले. तिथे सकाळी ८ वाजल्यापासुन लस देण्यात येणार आहे असे गूगल वर वाचले. लसीचा तुटवडा असल्यामुळे दुसर्या दिवशी लवकर जाऊन तिथे लस मिळण्यासाठी "नंबर" लावायचा असे ठरले.

खरे तर शनिवारी सकाळी ८ वाजता घराबाहेर पडणे म्हणजे अगदी पहाटे उठल्यासारखे वाटते. परंतु स्वाईनफ्लुचा धसकाच असा काही आहे की मी ७ वाजताच उठलो. सर्वांना घेउन सिग्ना या आरोग्यविमा कंपनीच्या केंद्रात लस घेण्यासाठी आमची स्वारी रवाना झाली. तसे अमेरिकेत पहाटे पहाटे नंबर लावण्याचे प्रसंग तसे कमी एका हाताच्या एकाच बोटावर मोजण्याइतकेच (अर्थात एकच) असतात. ते म्हणजे थॅन्क्सगिव्हिंग या सणाच्या दिवशी प्रचंड सवलतीच्या दरात पहाटे ६ ते १० पर्यंत ज्या वस्तु मिळतात त्यांच्या खरेदी साठी लोक पहाटे उटुन किंवा १ दिवस आधीपासुन दुकानासमोर रांगा लावतात तेवठेच. बाकी अमेरिकन लोकांना रांगा लावायला आवडत नाहीत. जे असेल ते सगळ्यांना मुबलक आणि तात्काळ उपलबद्घ असावे ही बर्याचदा वृत्ती असते. रांगा लावणे हा रशिया आणि त्यांच्या नादाने आपणही जी काही समाजवादी वाटचाल केली त्याच्या कृपेने आपल्या सहनशक्तीला चालना आणि बळकटी आणणारा प्रकार तसा अस्सल समाजवादी आहे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन अर्थात तात्काळ मन:तृप्ती हा अगदी खास अमेरिकन प्रकार. काहींना बालिश वाटेल परंतु बरे वाटते लहान मुलांसारखे मनात आणले की गोष्टी हजर! त्यातुन पुन्हा क्रेडिट कार्ड चा वापर करुन तर परवडेत नसेल तरीही लोक खरेदी करतात. असो तर "तात्काळ मन:तृप्तीचे" तोटेदेखील आहेतच. परंतु दारिद्र्याने खंगुन मरण्यापेक्शा भोगवादाच्या धुंदीत गुरफटुन जाणे तुलनेने नक्कीच कमी वाईट!

असो .. तर सकाळी सकाळी सिग्नाच्या केंद्रात लस घ्यायला आम्ही चौघेही रवाना झालो. तिथे पोहोचलो तर आमच्या आधीच तिथे दोनएकशे लोक उभे होते. गाडी पार्क करायला जेमतेम कुठेतरी जागा मिळाली. अमेरिकन माणसांमध्ये शंभर दोष असतील परंतु आळस मात्र नाही आहे. आम्ही खरेतर १० मिनिटे आधीच पोहोचलो परंतु त्याआधीच पार्किंग लॉट भरुन गेला होता. रांगेत सर्वजण लेकुरवाळे होते. काही गरोदर बायकादेखील होत्या. आज फक्त त्यांनाच लस मिळणार होती ज्यांना जास्त गरज आहे. त्यात पाच वर्षांखालची मुले, किंवा कोणत्याही वयाची आजारी मुले/माणसे, गरोदर स्त्रिया आणि तान्ह्या मुलांचे पालक इत्यादिंचा समावेश होता. ही गोष्ट खरेच विचार करण्यासारखी आहे .... अमेरिकेत मागच्या आठवड्यात ९० लोक मेले स्वाईन फ्लु ने. अमेरिकेत स्वाईन फ्लुची तीव्रता भारतापेक्षा जास्त आहे. परंतु भारतात जसे पुणे बंद पडले तसे इथे घडले नाही. कारण कुठल्याही समस्येला धीराने आणि पद्धतशीरपणे सामोरे कसे जायचे याचे प्रशिक्षण इथे अनेकदा दिले जाते. अगदी ९११ घडले आणि तेव्हा त्या दोन इमारतींमधुन हजारो माणसे शांतपणे ७०-८० मजले उतरुन खाली आली आणि स्वत:चा जीव वाचवला. इथे शिस्त आणि समन्वय यांचे शिक्षण मुद्दामहुन दिले जाते. वर्षातुन किमान एकदा आग लागल्यावर इमारतीतुन कसे शांतपणे बाहेर पडायचे याचे शिक्षण दिले जाते. आपल्याकडे बर्याचदा जत्रा, मेळावे आणि यात्रा यामध्ये गर्दी आणि चेंगराचेंगरी होते. स्वाईन फ्लु मुळे कामे बंद पडणे हा काहीसा सामाजीक दक्षतेचा अभाव दर्शवतो. मुंबई वरच्या अतिरेकी हल्यांमध्ये या तयारीचा अभाव विशेष दिसुन आला. असो.. तो एक वेगळाच विषय अहे. परंतु मुख्य काय तर शांतपणे धीराने आणि तयारीने समस्येचा सामना करणे महत्वाचे.

थोड्यावेळाने एक गार्ड येउन सर्वांना काही माहितीपत्रके देउन गेला. अमेरिकेत काम तसे शिस्तीत असते. आंधळेपणाने कुठेही काहीही कुणी करत नाही. लस देणारा आणि घेणारा दोघांवर माहिती देण्याची आणि घेण्याचे कायदेशीर बंधन आहे. आणि इथेच नाही तर बहुतांशी सर्वच गोष्टींमध्ये. कुणीही कुणाची फसवणुक करु नये हा उद्देश आणि सर्वांनी जाणतेपणी निर्णय घ्यावेत यासाठी हा प्रपंच.

हळु हळु रांग पुढे सरकु लागली. थंडी होती. त्यामुळे सर्व मंडळी जॅकेट्स स्वेटर इत्यादि घालुन आलेली. आम्ही मात्र चौघेही साध्या कपड्यांमध्ये बाहेर पडलेलो. ऍरिझोना आहे म्हणुन चालतंय. मिशिगन ला हे करुन दाखवा. मिशिगनला घरातुन बाहेर २० पावलांवर पत्र पेटी उघडुन पत्रे घेउन परत येण्यासाठी जॅकेट आणि शुज घालण्याची गरज पडायची. ऍरिझोना मध्ये हाच प्रकार उन्हाळ्यात घडतो. रात्री ९ वाजता देखील गरम झळया येत असतात. पुण्याच्या सुंदर हवेला सोकावलेला जीव कुठेही गेला तरीही कुरकुर केल्याशिवाय रहात नाही. त्याला आम्ही पुणेकर चिकित्सकपणाचे नाव देऊन समोरच्याचे तोंड बंद करतो. असो ..

रांगेत समोर नवरा बायको मुले दोन असे एक आमच्या सारखेच चौकोनी कुटुंब उभे. बायकोने नवर्याला कारमधुन कॉफी आणुन दिली. त्यावर तो थॅंन्कयु म्हणाला. आपल्याच बायकोला! हे आपल्याला रुचत नाही आणि कळत आणि वळतही नाही. मी पहिल्यांदा परदेशात गेलो ते ऑस्ट्रेलियामध्ये. तिथे पहिल्यांदा आयुष्यात कळले की शिष्टाचार म्हणजे काय. तोपर्यंत शिष्टाचार म्हणजे फक्त "शिष्ट आचार" असे वाटायचे. आणि नुमवी आणि मुळात पुण्याचे पाणी असल्यामुळे "शिष्ट आचारात" कसुर कधीच झाली नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलियात ९७ साली दुकानात - आपल्याकडे जसे "काय पाहिजे" असे त्रासिक मुद्रेने विचारले जाते - तसे न विचारता - "आपण बरे आहात का" असे विचारल्यावर अतिशय दचकायला व्हायचे. आईशप्पथ हा विनोद नाही. मला खरोखरीच असे वाटायचे की मी बरा आहे पण तु का विचारतेस? त्यामुळे आमची स्वारी ऑस्ट्रेलियाहुन परतली त्यानंतर एका मित्राच्या घरी कसबा पेठेत जेवायला गेली आणि तिथे त्याच्या आईने वाढल्यावर तिला मी अगदी ऑस्ट्रेळल्या भाषेत थॅन्क्यु म्हणल्यावर डोक्यात लाटणे घालु का असा चेहेरा केला होता. अर्थात कसब्यात डोक्यात लाटणे काय दांडकेही बसु शकते कारणाशिवाय तो भाग वेगळा. परंतु तात्पर्य काय तर शिष्टाचार चांगला आहे ... परंतु नथिंग बीट्स प्रेम आणि आपुलकी. अमेरिकन/युरोपिअन लोकांमध्ये प्रेम आणि आपुलकी नाही असे नाही. परंतु दे हॅव अ लॉन्ग वे टु गो ऑन दॅट फ्रंट. तसेच भारतिय/पौर्वात्य देशांमध्ये व्यवहारातील शिष्टाचार वाढण्याची गरज आहे.

रांग हळु हळु पुढे सरकत होती. गाड्यांचा ओघ चालुच होता. आमच्या पुढचे कुटुंब बहुधा पूर्व युरोपियन (रोमेनिया इ.) होते. मागचे मेक्सिकन+अमेरिकन. त्यामागे भारत/पाक/बांगला मुस्लिम. आमच्या दोन घरे पुढे फिलिपिनो किंवा चीनी... अमेरिका ही अशी भेळ आहे. आमच्या मागच्यांचा दोन वर्षांचा मुलगा येऊन माझ्या पायाला धरुन खेळु लागला. मागे वळुन पाहिले तर खजील होऊन त्याची आई मला म्हणाली "ऊप्स! रॉन्ग डॅड!" आम्ही सगळे हसलो.

अखेरीस आम्ही आत मध्ये पोहोचलो. तेव्हा कळले की आम्हाला देखील स्वाईनफ्लु ची लस मिळेल कारण आम्ही एका सहा महिन्यांच्या बाळाची काळजी घेत आहोत. कुणाला तरी आणि विशेष करुन सरकारला आमच्या (बव्हंशी तुझ्या आईच्या) कष्टांची जाणीव आहे हे पाहुन मला गहिवरुन आले. दोन मिनिटात फॉर्म भरले, लस घेतली आणि बाहेर आलो.

लवकरात लवकर सर्वांना ही लस मिळावी आणि दहशतीचे वातावरण निवळावे अशी इच्छा!

Thursday, October 8, 2009

राणीचे हात स्वच्छ!

सलोनी

आज मी तुझ्याशी नोबेल सन्मानाविषयी बोलणार आहे ... आता तु म्हणशील, "मला तर अजुनही गादीमध्ये तोंड घातले म्हणुन श्वास गुदमरतो म्हणुन तोंड बाहेर काढावे हे सुद्धा कळत नाही .... तर नोबेल सन्मान कसला डोंबल्याचा सांगतोस". परंतु बाबामहाराज तुला तोंड फुटायच्या आत सगळी बडबड पूर्ण करुन घेणार आहेत ..कारण इतर मित्रांच्या मुलींची बडबड पाहता मला पुढे किती बोलायला मिळेल शंका आहे! असू देत .. परंतु विषय खरोखरच छान आहे. आणि तुला जेव्हा कळेल तेव्हा कळेल.

तर झाले असे ... की काल भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. खर्या अर्थाने सांगायचे तर नोबेल पारितोषिकाची खरी मजा भौतिकशास्त्राशी संबंधीत विषयांमध्ये कांकणभर अधिकच आहे. बाकी रसायन, वैद्यकीय, शांतता आणि अर्थशास्त्रामध्ये पण हे पारितोषिक दिले जाते ... परंतु भौतिकीमध्ये दिलेली पारितोषिके अधिक स्मरणिय ठरली आहेत.

२० वे शतक हे भौतिकशास्त्राचे सुवर्णयुग होते. अणुची संरचना, प्रकाशाचे गुणधर्म, सापेक्षतावाद इतकेच नाही तर मानवाच्या आकलनाच्या मर्यादा सिद्ध करणारा अनिश्चिततावाद अश्या अनेक क्रांतिकारक शोधांचे हे युग! फर्ग्युसनमध्ये भौतिकशास्त्राचा अभ्यास करताना अश्या अनेक सिद्धांताचा अभ्यास करताना भारवले गेलेलो आम्ही, अगदी परमानंदातच बुडालेलो. तेव्हा जाणवले की ज्ञानाचे उद्दिष्ट केवळ ज्ञान मिळवणे हेच आहे. त्याचा व्यावहारिक उपयोग होऊ शकतो, केला जातो आणि करावादेखील. परंतु केवळ ज्ञानसाधनेमध्येही अतिशय आनंद आहे. किंबहुना अस्सल संशोधक व्यवहारी उपयोगी संशोधनाला हलके समजतात. गणितात केवळ आकड्यांचा अभ्यास करणारी एक शाखा आहे - नंबर थिअरी. अगदी आत्ता आत्ता पर्यंत नंबर थिअरी ही केवळ बुद्धीचा कस लावणारी परंतु बर्यापैकी व्यवहारशून्य शाखा म्हणुन संबोधली जायची. त्यामुळे अस्सल गणितज्ञांच्या दृष्टीने ती अगदी सर्वोच्च शाखांपैकी एक होती. कार्ल गाउस या महान गणितज्ञाने असे विधान केले की, "नंबर थिअरी ही गणिताची राणी आहे. आणि राणीचे हात नेहेमीच स्वच्छ राहतात!" अर्थात ... व्यावहारीक उपयोगांमध्ये ज्ञानाचे उपयोजन केल्याने ज्ञान अपवित्र होते! कोणाला पटो ना पटो ... अस्सल संशोधक मात्र या विचारधारणेशी एकनिष्ठ राहतात. किंबहुना या विचारधारणेशी एकनिष्ठ राह्तो तो अस्सल संशोधक.

असो ... तर मागील २०-३० वर्षे त्यामानाने भौतिकशास्त्रामध्ये कोरडी गेली. अगदी मूलभूत वाटावे असे शोध लागले नाही आहेत. तथाकथीत मूलभूतकणांचा शोध घेता घेता असे आढळुन आले की त्यांची संख्यादेखील २-४-१० नाही तर शेकड्यांमध्ये आहे. सध्या शास्त्रज्ञांनी हे मान्य केले असावे की ते थकथीत मूलकण अजूनही लहान कणांद्वारे बनले असतात. यातील बरेचसे कण हे डोळ्याला तर सोडाच परंतु परिक्षागृहातदेखील दिसले नाही आहेत. केवळ तर्काच्या आधारे त्यांचे अस्तित्व सिद्ध केले आहे! कोणी म्हणेल मग त्याचा उपयोग काय? पण उपयोग असायलाच हवा का? उपयोग .... उपयोग म्हणजे या शरीराचे चोचले.... कोणी तर ग्रीक तत्वज्ञ म्हणाला आहे की, "आय थिंक देअरफोर आय ऍम". मी विचार करतो म्हणून मी आहे! तर ही जिज्ञासाच खरी! जॅकोबी नावाच्या गणितज्ञाला विचारले की तुम्ही गणिताचा अभ्यास का करता. त्यावर त्याने उत्तर दिले ...."टू ऑनर द ह्युमन स्पिरिट" - मनुष्यत्वाच्या सन्मानाप्रित्यर्थ! आपल्याकडेही मुक्तिचे चार मार्ग सांगितले आहेत - ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग आणि योगमार्ग. पैकी ज्ञानमार्ग हाच सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. पाश्चात्य संस्कृतिमध्ये जीवनाचे उद्दिष्ट आनंद मानले आहे. भारतिय संस्कृतिमध्ये ज्ञान हे उद्दिष्ट मानले गेले आहे. आपली पुरातन ज्ञानाधिष्ठित संस्कृति ज्ञान संकुचित ठेवल्यामुळे ज्ञानोपासनेपासुन दूर गेली हे मोठे दुर्दैव.

असो ... परंतु आज भौतिकशास्त्राचे पारितोषिक दोन वेगवेगळ्या शोधांसाठी दिले गेले. पहिला शोध होता संगणिकिकृत छायाचित्रकारितेसाठी आणि दुसरा प्रकाशसंदेश पोहोचवणारे काचतंतु (अर्थात ... फायबर ऑप्टिक ) शोधुन काढण्यासाठी दिला गेला.

दोन्ही शोध अतिशय महान आहेत त्यांनी मानवी जीवन सुखकर झाले आहे.... परंतु माझा जीव कुठेतरी हळहळला (उगाचच ! हो की नाही!). भौतिकशास्त्राची संगत सोडली ९३ साली.... परंतु प्रेम तिथेच आहे. अस्सल संशोधक होता नाही आले तरीही त्यांची वेदना कळु शकते.

दुसर्या टोकाने विचार करायचा झाला तर आपल्याकडे असेही राजे होऊन गेले आहेत (खरे खोटे पुराण जाणे) राजा रन्तिदेवांसारखे जे म्हणतात, "न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम कामये दु:खतप्तानाम प्राणिनां आर्तिनाशनम" - मला राज्य नको, स्वर्ग नको आणि मुक्तिही नको. फक्त दु:खितांचे दु:ख हरण करण्याची इच्छा आहे.

राजा रंतिदेव बरोबर की कार्ल गाऊस? मला वाटते दोघेही बरोबर आहेत. ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे "जो जे वांछिल तो ते लाहो". मी इतकेच म्हणेन की तुला दोन्हीची गोडी लागो, आणि एकाचा ध्यास लागो.

Monday, September 28, 2009

विंचवाचे बिह्राड


सलोनीबाई

 

एक आठवडा झाला नवीन घरात राह्यला येऊन. तुझ्या जन्मानंतर इतक्या वस्तु वाढल्या आहेत की घरात जागा कमी पडु लागली आहे. त्यामुळे घर बदलण्याची गरज पडली.

 

तसेही अमेरिकेत लोक सरासरी ८-९ वेळा आपली राहण्याची जागा बदलतात. आपल्याकडे पूर्वी पोटासाठी अनेक शहरे फिरणारी माणसे बव्हंशी सैन्याशी संबंधीतच असायचे. बाकी तुरळक इतर सरकारी नोकर अथवा अतिशय उच्चपदस्थ व्यावसायिक इत्यादि. परंतु बर्याचदा थोड्याशा विस्तारीत पंचकोश्रीच्या बाहेर सहसा माणसे जात नसत. आमचे आजोबा सासवड सोडुन पुण्यात नोकरी करायला आले म्हणजे परदेशात गेल्यासारखेच झाले असणार आहे सासवडकरांना !! आत्तासुद्धा संगणक अभियंते सोडले तर नोकरीनिमित्त दुसर्या राज्यात जाणारी माणसे खूपच कमी (एकुण लोकसंख्येच्या मानाने). हे बदलालया हवे. गुणवत्तेला आकर्षीत करण्यासाठी सगळीकडे समान प्रगती आणि समान संधी उपलब्ध असायला हवी.

 

असो ... तर अमेरिकेत हे आपले सातवे पुनर्वसन !! लान्सिंग -> न्युयॉर्क -> लान्सिंग -> फिनिक्स -> टेम्पी -> चॅण्डलर -> चॅण्डलर असे हे आपले विंचवाचे बिह्राड फिरते आहे. सुरुवातिला दोन सुटकेसेस घेऊन आलेला मी ... त्यानंतर तुझ्या आईच्या दोन सुटकेसेस ... पहिल्यांदा लान्सिंग ते न्युयॉर्क गेलो तेव्हा १९९३ सालची निस्सान अगदी खच्च भरुन गेली होती आणि वर उरलेले सामान लान्सिंगलाच स्टोरेज मध्ये ठेवलेले. त्यानंतर बघता बघता सिद्धोबाचे सामान आमच्या दोघांच्यापेक्षा जास्त झाले. आणि आत्ता हे घर हलवले तर दोन बेडरुमच्या अपार्टमेंटमध्ये ४ बेडरुम इतके सामान निघाले. अगदी भाड्याचा ट्रकदेखील खच्च भरुनही सगळे सामान पुरले नाही. शेवटी आपल्या व्हॅनने ७-८ चकरा माराव्या लागल्या. आणि यावर कडी म्हणजे पंचवीस एक पोती भरुन सामान फेकुन दिले कारण ते अनावश्यक आहे असे लक्षात आले.

 

पंचवीस पोती अनावश्यक सामान !!! अर्थात कचरा !!! आपण इतक्या कचर्यात रहात होतो ??? !!! बापरे !

 

बघ. कळतदेखील नाही की खरोखरीच कशाची गरज आहे. उगाच संचय करुन ठेवतो आपण. "ही माझी तिसरीतली अंडरवेअर!" आता त्याच्यात कशाला जीव गुंतवायचा? पण नाही ... मन विचित्र असते. ते भलत्या सलत्या गोष्टींमध्ये गुंतते. भूतकाळ नाहीतर भविष्यकाळ यांचा विचार करत करत आजचे जगणे विसरते. "लाईफ इज व्हॉट पासेस अस बाय व्हाईल वि आर प्लॅनिंग अबाऊट इट." किती खरे आहे.

 

असो ... त्यामुळे मला दर काही दिवसांनी अशी कचरामोहिम काढायला फार आवडते. आमच्या कंपनीमध्ये मी व्यवसाय परिवर्तन (अर्थात बिझनेस ट्रांस्फॉर्मेशन) चे काम करतो. त्याचे महत्वाचे सुत्र हेच आहे की काळाच्या ओघात अनेक इष्ट अनिष्ट गोष्टींचे गाठोडे निर्माण होते. त्यामधील इष्ट गोष्टी ठेवायच्या आणि अनिष्ट टाकुन द्यायच्या.

 

असो ..

 

तर आपले विंचवाचे बिह्राड नवीन ठिकाणी पोहोचवण्यासाठी यावेळी कामगार मदतीला लावले. १५ डॉलर्स एका तासाला या दराने... चार्ली नावाचा ५५-६० वर्षांचा माणुस आणि एरिक नावाचा त्याचा ३५ एक वर्षांचा मदतनीस. ऍरिझोनाच्या १०३ डिग्री फॅरेनहाईटमध्ये दोघांनी इतके मन मोडुन काम केले की मला आणि सोनालीलाच त्यांची दया आली. आम्ही वारंवार थोडावेळ विश्रांती घ्या असे म्हणुनदेखील ते काही थांबले नाहीत. मध्येच त्यांना कोक-पेप्सी इत्यादि थंड पेये आणुन दिली ती मात्र घेतली त्यांनी. अमेरिकन कामगाराइतका कष्टाळु कामगार जगात कुठेही नाही. यामागे आर्थिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. परंतु त्याचा उहापोह पुन्हा कधी.

 

चार्ली आणि एरिकने स्वत:हुन त्यांचा ट्रक आणला, तसेच सामान चठवण्यासाठी एक ट्रॉली आणि सामान बांधण्यासाठी पट्टे पण आणले. खरे तर त्यांना १५ डॉलर्स तासाच्या दराने आणलेले. त्यांना हे सगले करायची काहीच गरज नव्हती. परंतु तरीही त्यांनी आमच्या फायद्याचा विचार केला. काम करतानाही कुठेही वेळ घालवणे नाही. आणि ट्रकमध्ये सामान तर इतके अचूक रचले की एक फुट देखील जागा राहिली नाही कुठे. संगणकशास्त्र आणि गणितात एक कूटप्रश्न आहे याविषयावर ... त्याचे नाव "नॅपसॅक प्रॉब्लेम". यामध्ये एका ठराविक जागेत जास्तीत जास्त वस्तु भरायच्या असतात. संगणकालादेखील हा कूटप्रश्न सोडवायला सोपे नाही. मी चार्ली आणि एरिक ला ते सांगीतले तर ते खूष झाले.

 

परंतु खरेच ... आता तो एरिक दहावी सुद्धा पास नसेल. परंतु त्याने ट्रकमध्ये इतके सुंदर सामान लावले की संगणकाच्या - सदाशिवच्या भाषेत - तोंडात मारावे, आणि कसब्याच्या भाषेत - कानशील ..... वगैरे वगैरे. पण आहे की नाही गम्मत. माणसाचा मेंदु अचाट आहे. आपण अनेक अचाट गोष्टी अगदी लीलया करत असतो. साधे चालायला शिकवले त्या जपानी यंत्रमानवाला (नाव विसरलो !) तर काय शास्त्रज्ञांना आनंद! आणि आमची सईबाई पाचव्या महिन्यात आईच्या हातातला फोन हवा आणि तो खूप लांब आहे म्हणुन आईचा हात ओढते!!

 

असो...

 

सामान आता नवीन घरी येउन पडले आहे. आता हळुहळु लागेल. सिद्धोबा प्रचंड खूष झाला. त्याचा आनंद बघुन धन्य वाटले. याचसाठी केला होता अट्टाहास!

 

त्यानंतर भाड्याचा ट्रक परत केला. आणि त्यानंतर अपार्टमेंटची स्वच्छता मोहीम. इथे भाड्याचे घर अगदी चकाचक करुन परत द्यावे लागते. नाही तर दंड होतो. त्यामुळे आम्ही एका मेक्सिकन सेविकेला (म्हणजे मराठीत मेड!) पाचारण केले (आईशप्पथ गाढवाचे लग्न आठवले). त्या बाईने पण अफलातुन काम केले. १४५ डॉलर्स गेले... पण आपले कंबरडे वाचले. जाता जाता तिची पण तोंडभरुन स्तुती केली. तर ती घरी जाऊन तिची व्हिजिटिंग कार्ड्स घेऊन आली. त्यावर तिचा इमेल आयडी, फोन, सेल फोन, फॅक्स सगळे होते. मजा आहे. तंत्रज्ञान हे असे अगदी सफाईकामगारांपर्यंत पोचले असेल तर हा देश का पुढे नाही जाणार.

 

असो ... तर आता नवीन घरात नवीन सामान आणायची तयारी चालली आहे. दसर्यानिमित्त कालच ४६ इंची फ्लॅट स्क्रीन घेतला. भन्नाट टीव्ही आहे. आणि त्यावर आज ब्रेट फार्व्ह ने दोन सेकंद कमी असताना टचडाऊनचा जो झेल फेकला आणि सामना जिंकला ते एचडी मधुन पाहणे म्हणजे अगदी अफलातुन. अगदी स्वर्गच!

 

Sunday, September 27, 2009

झोयाचा गरबा

सलोनी

 

काल इथे मंदिरात अष्टमीनिमित्त गरबा होता. सिद्धुच्या ऍबॅकसच्या गणिताच्या शिकवणीनंतर आपण सर्व मंदिरात गेलो. अगदी अचानकच ठरले जायचे. तिथे पोहोचलो आणि एक एक मंडळी भेटत गेली. राजीव, गुंजन, प्रशांत, निलेश, प्रवीण आणि सर्वात आश्चर्य म्हणजे आसिफ आणि त्याची बायको झीनत आणि मुले झोया आणि अझीम.

 

सुरुवातीला मला कळेना आसिफ इकडे मंदिरात कसा? नंतर वाटले की गुंजनला भेटायला आला असेल. गुंजनशी ओळख असिफच्या घरी झालेली त्यामुळे माहित होते की ते दोघे एकत्रच अमेरिकेत आले ९८ साली तेव्हापासुनची मैत्री.

 

परंतु नंतर जेव्हा लहान मुलांचा गरबा चालु झाला मंदिरात तेव्हा कळले की असिफपेक्षा हा पटेलभाई गरबा खेळायला आला आहे :-) झोया एकदम झोकदार रक्तवर्णी चुडिदार घालुन आली होती. ४ वर्षाच्या मानाने पोरीचा नखरा - अवधुत गुप्तेच्या भाषेत - च्या मारी धुम फटॅक होता. मजा आली सर्व मुलांना गरबा नाचुन ... सिद्धु देखील नाचला. त्याला देखील मजा आली आणि त्याला पाहुन आम्हाला आनंद वाटला.

 

असिफचे मंदिरात सहकुटुंब गरबा खेळायला येणे मला खुप आवडले. त्याला गरबा आवडतो हे महत्वाचे ... मग ते हिंदुंच्या मंदिरात असले म्हणुन काय झाले. लान्सिंग (मिशिगनला) एमबीए नंतर २ वर्षांनी गेलो तेव्हा इरफानने माझ्या बरोबर तिथल्या मंदिरात येउन नमस्कार करुन प्रसाद वगैरे घेतला. त्यात भक्तिभाव असेलही किंवा नसेलही परंतु केवळ माझ्याबरोबर येण्यात त्याला आनंद होता हे त्याला माहित होते. आणि त्यासाठी तो बरोबर आला.

 

मला वाटते - आपल्याला काय आवडते हे महत्वाचे. आणि त्याचा शोध घेणे महत्वाचे. काय आवडत नाही आणि कशाचे आपल्याला वावडे आहे आणि कशाने आपल्याला राग येतो इत्यादि गोष्टींची यादी निरर्थक आहे. त्यापेक्षा नेमके काय आवडते आणि नेमके काय हवे आहे आपल्याला यावर लक्ष द्यावे.

 

बारावीत असताना मी दिवसाचे नियोजन केले होते आणि काही त्या नियोजनामध्ये काही "निर्धार" होते. त्यापैकी एक निर्धार म्हणजे "दुरदर्शन (टीव्ही)" पाह्यचा नाही. माझ्या एका मित्राला चेतनला जेव्हा ते कळले तेव्हा तो म्हणाला, "तुझ्या अभ्यासाचे नियोजन भारी आहे... हे करायचे नाही ते करायचे नाही ठरवतोस. त्यापेक्षा काय करायचे ते ठरव की!" त्याचे शब्द मला अजूनही स्पष्ट आठवतात. माझ्या डोळ्यात खरोखरीच अंजन घातले त्याने. पुढे जाऊन स्वारी बी.जे. मेडिकलमधुन डॉक्टर आणि पुढे कर्करोगतज्ञ झाली. मजा वाटते आठवुन की त्याच्या १-२ वाक्यांनी मला किती शिकायला मिळाले.

 

असो ... परंतु सांगायचा मुद्दा हा की आयुष्यात काय आवडते याचा शोध घेणे खूप महत्वाचे. काय आवडत नाही याचा विचारसुद्धा नको. आणि मग आवडीच्या गोष्टी करायला वेळ पुरणार नाही.

 

शनिवारी ऑलिव्ह गार्डनमध्ये जेवायला गेलो तेव्हा बाहेर पडल्यावर उजवीकडे एक बोगनवेल सारखी वेल दिसली. तिच्या फांदीच्या टोकावर छान फुलोरा फुलला होता. मी तुझ्या आईला दाखवला. इंग्लीशमध्ये फुलोर्याला इन्फ्लोरसन्स म्हणतात. फांदीच्या टोकाला येतो तो वेगळा, मध्ये येतो तो वेगला आणि देठापाशी येतो तो वेगळा. परंतु मला याचे नाव काही आठवेना. बहुधा अपेशियल म्हणत असावेत असे मी तिला म्हटले. बीएस्सीच्या पहिल्यावर्षापर्यंत वनस्पतीशास्त्र विषय घेतला होता. परंतु दुसर्या वर्शात एक विषय सोडावा लागतो. गणित भौतिकी आणि संख्याशास्त्रापुढे मला वनस्पतिशास्त्र नाइलाजाने सोडावा लागला. तसा अतिशय आवडीचा विषय होता माझ्या. परंतु अशी द्विधा मनस्थिती असणे चांगले (गधा मनस्थितीपेक्षा!). इंग्लिशमध्ये त्याला स्वीट डिलेमा म्हणतात तसे! मी ७-८ वर्षे जेव्हा ५-१० वी च्या मुलांना शिकवले तेव्हा मला हाच सर्वात मोठा प्रश्न पडायचा की बर्याचदा विद्यार्थ्यांना काहीही तीव्रतेने आवडते का असे पाह्यला जावे तर एका रिकाम्या हंड्यात बोलल्यासारखे आपलाच आवाज आपल्याला परत ऐकु यावा. शिक्षक म्हणुन त्याची वेदना जास्त जाणवली.

 

असो .. जास्त भाषण नको ... असिफला काल मंदिरात पाहुन हे असे एकामागोमाग विचार आले इतकेच काय.

Sunday, September 13, 2009

मिसेस पिअर्सन

सईबाई

 

बरेच दिवस झाले काही लिहिले नाही. तसे लिहिण्यासारख्या अनेक गोष्टी घडल्या .... विषय मनात घोळत होते. सेनेटर केनेडींचा मृत्यु, भारताने बनवलेली स्वदेशी अणुपाणबुडी, जसवंतसिंहांचे विधान आणि भाजपाची आत्मघातकी वाटचाल आणि बरेच काही.

 

परंतु आज एक फक्त छोटीशी गम्मत सांगतो ...

 

परवा तुझी आई सिद्धुला आणायला दुपारी शाळेत गेली. सिद्धोबा आता दुसरीत गेला आहे. मिसेस पिअर्सन त्याच्या वर्गशिक्षिका तुझ्या आईला म्हणाल्या, "काहो तुम्ही सिद्धार्थला रोज मारता का?" हा प्रश्न ऐकुन सोनालीचा चेहेरा अगदी पांढरा पडला. इथे लहान मुलांना पालकदेखील मारु शकत नाहीत. त्याबद्दल तुरुंगाची हवा खावी लागेल आणि मुलांवरचा पालकांचा हक्क संपुष्टात येउ शकतो. आपण भारतिय पालक तरीदेखील आपला परंपरागत "छडी लागे छम छम" हा न्याय मुलांना लावत असतो. त्यामुळे तुझ्या आईचा चेहेरा अगदी चोरी करताना पकडल्यासारखा झाला.

 

मिसेस पिअर्सन च्या लक्षात आले की तिचा विनोद सोनालीच्या लक्षात आला नाही.... मग तिने लगेच सांगीतले की सिद्धार्थ वर्गात इतका चांगला वागतो की विश्वास बसणार नाही. शिस्तबद्ध, शांत, हुशार, उत्साही इतर मुलांना मदत करणारा, भांडण मारामार्या न करणारा इत्यादी इत्यादी. मिसेस पिअर्सन च्या आधीच्या मागच्या ४ वर्षात सर्वच शिक्षिका असेच म्हणत आल्या आहेत. त्यामुळे मला त्याचे काहीच विशेष वाटले नाही.

 

मला विशेष वाटले ते आईने जेव्हा सिद्धुला विचारले की मिसेस पिअर्सन असे का म्हणाल्या तेव्हा सिद्धु म्हणाला ..."आज मला चांगल्या 'बिहेविअर' बद्दल 'प्राइझ' मिळाले. आणि ते देताना मिसेस पिअर्सनच्या डोळ्यात पाणी होते."

 

सिद्धुचे ते शब्द माझ्या अगदी काळजाला भिडले. मला माझ्या लहानपणापासुनच्या सर्व शिक्षिकांची आठवण झाली - सरदार लक्ष्मीबाई रास्ते प्रशालेतील आपटेबाई, तल्हारबाई, देवधरबाई, भोंडेबाई तसेच नुमवीतील ताथवडेकरबाई .... या सर्व शिक्षिका आणि त्यांनी आपण काही शिकावे म्हणुन केलेला जीवाचा केलेला आटापीटा आठवला. आज आपण जे काही आहोत त्यामागे आपल्या आईवडिलांनंतर आपल्या शिक्षक-शिक्षिकांचे मोठे ऋण आहे.

 

सिद्धुच्या मिसेस पिअर्सनच्या डोळ्यातले पाणी हे सिद्धुच्या पूर्वजन्मीचे संचीत आणि या जन्मीचे ॠण आहे.

Saturday, August 22, 2009

गोंधळ ... वंशाचा !

सलोनीबाई

मी विचित्र आहे की सर्वच बापमंडळींच्या डोक्यात हे येते हे मला माहित नाही. परंतु सिद्धुच्या जन्मानंतर आणि आता तुझ्या जन्मानंतर माझ्या मनात लगेच कुतुहलवजा प्रश्न आला की सिद्धु किंवा तु कुणाशी लग्न करणार आहात? तुमचा भावी जोडीदार कसा/कशी असेल? प्रश्न वेडगळ असेलही. परंतु अमेरिकेतील भारतिय सहसा इथे येउन अधिक पारंपारिक होतात. माझा एक भारतिय मित्र आहे - किशन. त्याची आई ब्रिटिश आणि वडिल भारतिय. लग्नानंतर त्याची आई पूर्णपणे भारतिय बनली. अगदी साडी वगैरे व्यवस्थीत घालुन सहजपणे भारतिय समाजात वावरते. सिद्धुचा एक वर्गमित्र असाच मिश्र आहे. आई इटॅलिअन आणि वडिल भारतिय. त्याची आईदेखील आपल्या भारतिय समाजात अगदी सहजपणे वावरते. परंतु तरिही भारतियांचा ओढा सहसा आपल्या भारतिय समाजाकडे असतो. माझा १/२ भारतिय + १/२ ब्रिटिश मित्र स्वत:ला भारतिय अमेरिकन समजतो. इतकेच नाही तर लग्न करताना मला म्हणाला की त्याला पूर्ण भारतिय मुलीशीच लग्न करायचे आहे (अर्थात - वडिल आणि आई भारतिय!). याचे कारण असे की तो स्वत: ५०% भारतिय वंशाचा आहे आणि त्याची मुले त्याला भारतिय वंशाचीच असावी असे वाटते. पुढे जाऊन त्याने खरोखरीच अश्याच मुलीशी लग्न केले. त्यावर तुझी आई म्हणते - "आता त्यांची मुले ७५% भारतिय होणार!"

किशनची विचारसरणी बरोबर की चूक हा मुद्दाच नाही आहे. मला वाटते की सर्वांना आपापला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. आणि आईवडिलांना त्यांचे मत असण्याचा अधिकार आहे. अंतिमत: ज्याला लग्न करायचे आहे त्यानेच ठरवायचे कुठे बळी जायचे !!

अमेरिकेत मागच्या ४०० वर्षांमध्ये जगभरातुन लोक येऊन अगदी चांगली खिचडी झाली आहे. नक्की कोण कुठले हे सांगणे अशक्य आहे. परवा माझ्या बरोबर काम करणारी ऍन मक्ग्वायर नावाच्या एका बाईबरोबर गप्पा मारता मारता कळले की तिची मुले आठ वंशांची आहेत!!! ऍनचा नवरा आयरीश+फ्रेंच+इटॅलिअन+ ग्रीक आहे. आणि ऍन स्वत: ब्रिटिश+जर्मन+चेरोकी (एक अमेरिकन इंडिअन जात)+स्पॅनिश आहे. सांगताना पण दम लागतोय! परंतु अमेरिका ही अशीच आहे. कुणाला विचारले की तुम्ही नक्की कुठले तर सर्वच जण गोंधळतात. कारण उत्तर कोणालाच नक्की माहित नसते. आपले मूळ शोधण्यासाठी लोक इथे हजारो डॉलर्स खर्च करून युरोप आणि जगभर जातात. आणि हा गोंधळ अमेरिकेला अतिशय उपयुक्त ठरतो कारण आपण मूळचे कुठले हे जरिही लोकांना माहित नसले तरिही आपण अमेरिकन आहोत हे सर्वांनाच कळते. अर्थात अमेरिकेला नावे ठेवत ठेवत इथे राहणारा ही अमेरिकनच असतो. हे म्हणजे अगदी हिंदु धर्मासारखे आहे ... आपण जसे नास्तिकांनादेखील हिंदुच मानतो तसे...

ऍनला मी सांगु लागलो की भारतात ८४ साली आमच्या घरी टिव्ही आला. त्यावेळी हम लोग आणि इतर मालिकांमधील उत्तर भारतिय नावे वाचुन आम्हाला कशी गंमत वाटायची. १९९० साली मी बंगळूरला (बेंगाळुरु!) हवाई दलाच्या मुलाखतीसाठी गेलो होतो तेव्हा हिंदीतुन बोलले तर किती तिरस्कार केला जायचा. आणि आता जाऊन बघा! इतकेच काय तर २००० साली पुणे सोडले आणि अमेरिकेत आलो आणि २००३ साली परत गेलो तेव्हा असे वाटले की पुण्याचे मराठीपण अगदी निघुन गेले आहे. आणि वाईटही वाटले. परंतु आता तितके वाईट वाटत नाही कारण हेच खरे आहे की वंश आणि संस्कृती यामध्ये शुद्धाशुद्धतेच्या कल्पना पोकळ आहेत. दोन्ही गोष्टी प्रवाही आहेत आणि असल्या पाहिजेत. इतर जे प्रवाह येतील त्यांना सामावुन घेतले पाहिजे. उगाच संकुचितपणा बाळगण्यात अर्थ नाही.

अर्थात याचा अर्थ असाही नाही की आपल्या संस्कृतीला तिलांजली द्यायची. किंबहुना उलट अनेक धाग्यांचा पिळ देत देत हे वस्त्र अधिक घट्ट करायचे.

भारतातील हे बदल ऐकुन ऍन मला म्हणाली की अमेरिकेत ज्या गोष्टीला ४०० वर्षे लागली तो बदल भारतात ४० वर्षात घडतो आहे असे वाटते आहे. मला वाटते तिचे म्हणणे खरे आहे.

आपण मराठा की ब्राह्मण की बंगाली की तमिळ यापेक्षा पुढची पिढी गोंधळलेली जन्माला येवो. त्यांना फक्त एकच समजो की आपण भारतिय आहोत. मला वाटते भारतासाठी ते अतिशय हितकारी होईल.

मला कुणी विचारले की सलोनीने कोणाशी लग्न करावे तर मी म्हणेन निर्व्यसनी, कर्तबगार आणि चांगले विचार आचार असणार्र्या शक्यतो भारतियाशी! शक्यतो भारतियाशी का? तर आमचा कंफर्ट झोन तो आहे. भारतिय परंपरा सहिष्णु आणि हजारो वर्षांची आहे. आणि इतर सर्व गोष्टी समान असतील तर तो धागा तुम्ही बळकट करावा. परंतु निर्णय तुमचा आहे आणि त्याला अजुन चिक्क्कार येळ हाये.

Friday, August 21, 2009

सिन्थॉल कॉन्फिडन्स!!

काल नेहेमीप्रमाणे भाज्या वगैरे आणायला आम्ही ली ली नावाच्या इथल्या एका एशियन सुपर मार्केट मध्ये गेलो. व्हिएतनामी मालक आहे. मूळचा चीनी असावा. भन्नाट दुकान चालते. सर्व पद्धतीचे आशियाई अन्नप्रकार मिळतात. आपले भारतिय देखील. अगदी चितळेंची बाकरवडी देखील २.२९ डॉलर्समध्ये मिळु लागली आहे!

 

सर्व खरेदी करुन परत येताना मागुन हाक आली. "बाबा इकडे ये ना." म्हटलं आता काय सिद्धोबाला सापडले इथे? तर तो मला भारतिय साबण दाखवत होता. नीम, लिरिल, चन्द्रिका, हमाम, गोदरेज सिन्थॉल, म्हैसूर सॅण्डल सोप ... मजा वाटते अलिकडे आपले हे साबण इथे मिळु लागल्यापासून. "अरे आत्तच तर डेटॉल घेतला होता ना मागच्या आठवड्यात. सारखा सारखा कश्याला इंडियन सोप पाहिजे." - इति मी. भारतिय साबण दीड दोन डॉलर्सला एक वडी असल्यामुले मजा म्हणुन कधीतरी ठिक आहे अशी माझी समजुत. परंतु सिद्धोबाचा निर्णय झाला होता की त्याला एक साबण घ्यायचा आहे. त्यामुळे मी त्याला मदत करू लागलो कुठला साबण घ्यायचा. "अरे हा घे... चंदनाचा असतो." - म्हैसूर सोप कडे बोट दाखवत मी म्हटले. "नाही तर हा पण चांगला आहे" - चंद्रिका. "नाही तर हा बघ तुला आवडेल" - लिरिल.

 

"बाबा आपण हा घेउ. याने कॉन्फिडन्स वाढतो!!"

 

मी उडालोच! गोदरेज सिंथॉल सिद्धुच्या हातात होता.

 

आम्ही मागच्या वर्षी भारतात आलो तेव्हा सिद्धुने ही जाहिरात पाहिली असणार आहे.

 

आज सकाळी उठल्यावर बाथरूममध्ये गेल्यावर पाहतो तर आधीचा साबण संपायच्या आत सिंथॉलचे उद्घाटन झाले होते. बाथरुममधुन बाहेर पडतो तो सिद्धु डोळे चोळत सिद्धु मला म्हणतो "बाबा कुठल्या साबणाने अंघोळ केली?" "वा! अरे झोप तरी पूर्ण झाली का? पहिला प्रश्न साबणाबद्दल". तोपर्यंत सिद्धोबाची स्वारी बाथरुममध्ये रवाना झाली होती.

 

नंतर शाळेत जाताना त्याला सनस्क्रिन लावायला लागली त्याची आई तर म्हणतो "अग अग थोडेच लाव. माझा कॉन्फिडन्स जाईल ना". सोनालीने हसु आवरले.

 

पण टिव्ही चा मुलांवर किति प्रचंड पगडा आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

 

काल याहू फायनान्स वर अश्याच विषयावर एक लेख आला होता. लॉरा क्रॉले नावाची एक वृत्तपत्रकार आहे. ती सहसा मनुष्य स्वभाव आणि आर्थिक विषय यांच्या संबंधांबद्दल लिहिते. कालचा लेख खूप सुंदर होता. विषय होता - स्व-नियंत्रण. तिच्या मते टिव्ही केबल इत्यादि साधनांच्या आहारी जाऊन मुलांचे स्वत:वरचे नियंत्रण कमी होते. पराधिनता वाढते. आणि आयुष्यात यशस्वी होणारी माणसे बुद्धिमत्ते पेक्षा स्वनियंत्रण अधिक वापरतात. मी विचार करु लागलो.

 

असो ... सिद्धोबाचे साबणाचे लहानसे निमित्त झाले. दोष त्याचा नाही. माझाच आहे कारण मीच स्वत: दिवसातला निम्मा अधिक फावला वेळ टीव्ही नाही तर इंटरनेट वर घालवतो.

 

संध्याकाळी सिंथॉल वापरुन बघतो. बर्याच वर्षांमध्ये नाही वापरला! कॉन्फिडन्स नाही पण नॉस्टॅल्जिया जरूर येईल.

Tuesday, August 11, 2009

रॉबर्ट मॅक्नमारा

इतिहासाचा अभ्यास ही अगदी विलक्षण गोष्ट आहे. इतिहास कधी मनोरंजक असतो तर कधी दु:खद. कधी विसरू नये असा तर कधी आठवु नये असे वाटवे असा. अगदी शब्दश: अर्थ बघायचा झाला तर इतिहास म्हणजे -

"हे असे होते" - इति: + अस.

 

परंतु हा झाला आपला भाबडेपणा. वस्तुस्थिती अशी आहे की इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो. ज्ञात इतिहासाच्या मागे असत्याचे पडदे विणलेले असतात ज्यांच्यामागे जेत्यांची कृष्णकृत्ये अलगद दडवलेली असतात. त्या असत्याला भेदून सत्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करणारी राष्ट्रे जगात सन्मान्य ठरतात आणि आपला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ उज्ज्वल करतात.

 

६ जुलै या दिवशी जगाच्या इतिहासातिल एक कृरकर्मा काळाच्या पडद्याआड अगदी अलगद गेला. त्याचे नाव रॉबर्ट मॅक्नमारा. मॅक्नमारा हा १९६०-१९६८ या काळात अमेरिकेचा संरक्षणमंत्री होता. अतिशय बुद्धिमान असलेल्या मॅक्नमाराला जॉन एफ केनेडी या तेव्हाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या मंत्रीमंडळात स्थान दिले. तेव्हा मॅक्नमारा फोर्ड मोटर कंपनीमध्ये सर्वोच्च पदावर अध्यक्ष म्हणुन काम करत होता. तो अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार होता. परंतु व्यक्तिचे मोजमाप तेवढेच असले असते तर आपण हिटलरचे देखील कौतुकच केले असते.

 

दुर्दैवाने मॅक्नमारा याची कारकीर्द ४०-५० लाख निरपराधी व्हिएतनामी कंबोडिअन आणि लाओस लोकांच्या मृत्युस कारणीभूत ठरली. १९५० च्या पुढे अमेरिका आणि रशिया यांच्या शीत युद्धातील एक अतिशय काळे पर्व व्हिएतनामच्या भूमीवर उगवले. व्हिएतनामची समाजवादी वाटचाल अमेरिकेला पचली नाही. स्थानिक जनतेला स्वातंत्र देण्याच्या बहाण्याने अमेरिकन सरकारने स्थापन केलेले दक्षिण व्हिएतनाम मधील कळसुत्री सरकार लोकांच्या पसंतीस उतरत नव्हते. त्यामुळे अखेरिस गल्फ ऑफ टोंकीन मध्ये न घडलेल्या हल्ल्याबद्दल कांगावा करत अमेरिकेने उत्तर व्हिएतनामविरुद्ध युद्ध पुकारले.

 

या युद्धामध्ये एकुन ४०-५० लाख नागरिक आणि सैनिक मृत्युमुखी पडले. जगाच्या इतिहासातील सर्वात क्रुर आणि भीषण हल्ल्याला व्हिएतनामी जनतेला सामोरे जावे लागले. कुठल्याही नीतीची चाड न बाळगता अमेरिकेने प्रचंड बॉम्बहल्ले आणि रासायनीक अस्त्रे निर्लज्जपणे वापरून आपल्या पशुवृत्तीचे किळसवाणे दर्शन घडवले. या हल्ल्यांमध्ये मरण पावलेल्या नागरिकांच्या मृत्युची जबाबदारी अमेरिकेने नेहेमीच्या पद्धतीने झिडकारुन टाकली आहे. धरणे अन्नसाठा यांवर मुद्दाम हल्ले केले गेले. जंगलांमध्ये दडुन बसणार्या व्हिएतकॉंगच्या सैनिकांना नमवण्यासाठी जंगलेच्या जंगले एजंट ऑरेंज हे रसायन आणि बॉम्बींग्जमार्फत उद्ध्वस्त करण्यात आली. बंदी घातलेले ऍंण्टी पर्सोनेल माइन्स (सुरुंग) पेरले की ज्यामुळे पुढची ५० वर्षे (आणि अजुनही) निरपराध व्हिएतनामी नागरीक आपले हात पाय आणि प्राण गमावत आहेत.

 

हे सर्व करत असताना सर्व नैतिक मुल्यांना तिलांजली दिली गेली (तिलांजली द्यायला मुळात नैतिक मुल्ये होती का हा प्रश्न वेगळा!). या युद्धामध्ये एकच निकष होता आणि तो म्हणजे अमेरिकेचे नुकसान. उत्तर व्हिएतनाममध्ये विरोध अधिक प्रखर होता त्यामुळे तिथले हल्ले हे अधिक नियोजनबद्ध होते. त्याउलट दक्षिण व्हिएतनाममध्ये नगण्य विरोध असल्यामुळे तिथे कार्पेट बॉम्बींग्ज केले गेले. किंबहुना ज्या लोकांना वाचवण्याची भाषा केली गेली त्याच लोकावर बॉम्ब टाकुन त्यांना मारणे हे त्यांच्या कसे भल्याचे आहे असा अजब युक्तीवादही केला गेला. रॉबर्ट मॅक्नमारा हा त्या सर्वामागचा एक महत्वाचा सुत्रधार होता. इतर महत्वाचे सुत्रधार म्हणजे तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष लिंडन जॉहन्सन आणि परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर.

 

एकंदरीतच अमेरिकेचे हे फार मोठे वैगुण्य (नव्हे विकृती) म्हणावी लागेल की इथे सत्याचे अधिष्ठान नाही. नैतिकता आणि मानवी मुल्ये हे फक्त अमेरिकन जिवांनाच लागु आहे. बाकी सर्वांचे जगणे किड्यामुंग्यांपेक्षाही स्वस्त. न्याय हा फक्त सबळांचाच अधिकार आहे. दुर्बळांनी सबळांच्या मर्जीने जगावे अशीच सामाजीक आणि राजकीय जडणघडण. हे पाहिले की या देशाला सुसंस्कृत म्हणावे का असा प्रश्न पडतो.

 

आणि व्हिएतनामच नाही तर मागील ६० वर्षांमध्ये अमेरिकन सरकारांनी जगभर हुकुमशहांना हाताशी धरुन आपली पोळी भाजुन घेतली आहे. यादीच द्यायची झाली तर - पाकिस्तान (झिया), इन्डोनेशीया (सुहार्तो), फिलिपिन्स (मार्कोस), चिले (पिनोशे), पनामा (नोरिएगा), इराक (सद्दाम हुसेन), लायबेरिआ (चार्ल्स टेलर) ही काही ठळक उदाहरणे देता येतील.

 

व्हिएतनाम मध्ये जेव्हा स्वत:चे १०० एक सैनिक दिवसागणिक मरु लागले तेव्हा अमेरिकेने व्हिएतनाम मधुन माघार घेतली. परंतु असे करताना व्हिएतनाम हा देश नामशेष होईल असा पूर्ण आटापीटा केला.

 

मॅक्नमारा हा इतर कोणत्याही देशाचा नागरीक असता तर आतापर्यंत त्याला युद्ध गुन्हेगार म्हणुन जाहीर करुन पकडुन शिक्षा व्ह्यायला हवी होती. परंतु अमेरिकेची अशी धारणा आहे की ते करतील तेच योग्य. त्यामुळे या पाप्याला शांतपणे मरण आले. अगदी झोपेत अलगदपणे मृत्यु पावला.

 

यावर आपण विमनस्क व्ह्यायचे की विचारमग्न व्ह्यायचे हे आपण ठरवायचे. न्याय झाला पाहिजे आणि आज आणि आत्ता झाला पाहिजे ही आपली इच्छा रास्त आहे. परंतु दुर्दैवाने जगाचा न्याय वेगळा आहे. समस्त मानवजातीचा इतिहास जसा गौरवशाली आहे तसाच काळाकभिन्न देखिल आहे. सर्वच क्रुरकर्म्यांना त्यांच्या पापाची फळे मिळतातच असे नाही. परंतु त्यामुळे मानवी मुल्यांवरचा विश्वास डळमळीत होऊन चालणार नाही.

 

दुसरे असे की अनेकदा चांगल्या माणसांकडुन वाईट कृत्ये घडु शकतात. मॅक्नमाराच्या बाबतीत बोलायचे झाले तर तो एक अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार माणुस होता. परंतु त्याचे कौशल्य चुकीच्या ठिकाणी वापरले गेले आणि त्याला गंधही नव्हता की आपण काही चूक करतो आहोत. त्याच्या लेखी करोडो माणसांचे बळी हे केवल एक "स्टॅटिस्टिक" होते. ही असली बुद्धिमत्ता काय कामाची की जिला मानवी भावना आणि वेदनांची जाणिव नाही. इथे भांडवलवादाच्या मर्यादा जाणवु लागतात. नोअम चोम्स्की नावाच्या एका राजकिय विश्लेषकाच्या मते मॅक्नमारा या व्यक्तीपेक्षा एकुन पाश्चात्य समाजातील नैतिक मुल्यांबद्दल असलेला आंधळेपणा हा अधिक चिंतनाचा विषय आहे. सर्वच गोष्टी फायदा तोट्यात बसवण्यात मुल्यांचा बळी देणारी समाजव्यवस्था अजून बरीच सुधारायला हवी हे नक्की. चर्चिलने म्हटले आहे "लोकशाही सर्वात वाईट शासनप्रकार आहे. परंतु इतर सर्व प्रकार त्याहुनही वाईट आहेत." !!

 

भांडवलवादाचेही तसेच आहे. अमेरिकेच्या मागील ६० वर्षांमध्ये केलेल्या पापकृत्यांमागे भांडवलवादच आहे. अगदी इराक युद्धाचे कारण देखील दुसरे तिसरे काही नसुन ऑईल हेच आहे. परंतु भांडवलवादी लोकशाहीव्यतिरिक्त इतर सर्व मार्ग आत्तापर्यंत तितके यशस्वी ठरले नाही आहेत. तुलनेने अधिक सहिष्णु असलेली ही सध्याच्या काळातील व्यवस्था आहे इतकेच काय ते.

 

   

Sunday, August 9, 2009

ब्लॅक ऍंण्ड व्हाईट

प्रिय सलोनी

 

आज आम्ही एक जुन्या हिन्दी चित्रपटातील गाण्यांचा एक सुंदर कार्यक्रम पाहिला. "ब्लॅक ऍंण्ड व्हाईट" त्याचे नाव.

 

तसे परदेशात असल्याचा हा एक मोठा फायदाच म्हणायचा की बरेचसे कलाकार - चित्रपट, नाट्य, संगीत, साहित्य इ. क्षेत्रांमधील - अगदी घरबसल्या जवळुन पाहण्याची ऐकण्याची संधी येते. भारतात सहसा हजारोंच्या संख्येने उपस्थिती असलेल्या कार्यक्रमांमध्ये तो "पर्सनल" टच ठेवणे कठीण असते. इथे कलेचा आस्वाद अगदी जवळुन घेता येतो. सर्वच कार्यक्रमांना जाणे जमतेच असे नसले तरिही आम्ही जमेल तसे अधुन मधुन याचा लाभ घेतो.

 

तर यावेळी ब्लॅक ऍंण्ड व्हाईट हा १९४५-१९६८ मधील अवीट गोडीच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. फिनिक्स मधील महाराष्ट्र मंडळाने इथल्या टेम्पी सेंटर ऑफ आर्ट्स मध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. कलाकार सर्वच चांगले होते ... परंतु मुख्य आकर्षण म्हणजे हृशिकेष रानडे आणि विभावरी आपटे या सध्या सारेगमपमध्ये गाजलेल्या कलाकारांचे होते. हृषिकेश हा सिद्धुचा विशेष आवडता गायक त्यामुळे सिद्धु सारखा हट्ट करत होता की आपण त्याला जाऊन भेटु. ते काही जमले नाही. परंतु बुधवारी कोणाच्या तरी घरी शांता शेळकेंच्या कवितांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे तिथे त्याला हृषिकेश शी दोन शब्द बोलायला मिळेल असे वाटते. बघु.

 

परंतु कार्यक्रम अगदी सुंदर. रानडेबुवा खरोखरीच उत्तम गातात. आणि राहुल सोलापुरकरचे निवेदन अप्रतीम! सिद्धोबाला राजीव नम्रता च्या घरी ठेवला होता त्याला मी इंटरव्हलमध्ये घेउन आलो इतका आवर्जुन पहावा असा कार्यक्रम. सलोनी, तु तर झोपली होतीस. परंतु तुझ्या आणि सिद्धोबाच्या कानावर आपले संगीत पडावे नव्हे नसानसात जावे अशी इच्छा!

 

कुठेतरी अश्या कार्यक्रमांद्वारे आपली नाळ परत जोडली जाते आणि आपल्याला आपल्या भाषा संस्कृतीचे पोषण मिळते. आणि ते मिळाल्यावर कळते की आपण किती भुकेले आहोत या गोष्टींसाठी. भारतात असताना आपल्या चोहोबाजुंना ही गंगा वहात असते त्यावेळी कौतुक नसते. शाळेत जाताना लहानपणी शनिवारी सकाळी किती चांगल्या गोष्टी आपोआप कानावर पडायच्या. संस्कृत बातम्या, मनाचा शोध, संताची वचने ... संस्कृत बातम्या विशेष आठवतात. "इयम आकाशवाणि. संस्कृत वार्ता: श्रुयंताम. प्रवाचक: बलदेवनंदसागर: / किंवा विजयश्री" अजुनही तश्याच बातम्या लागत असतील का? सर्वच घरांमधुन पुणे स्टेशन लावलेले आणि त्या संस्कृत बातम्या अगदी सोमवारातुन नुमवीत पोहोचेपर्यंत सगळ्या घरातुन ऐकत ऐकत शाळेत जायचो. त्याची टिंगल टवाळीदेखील करायचो. श्रीनंद बापट या माझ्या संस्कृतप्रेमी मित्राला मी एकदा टवाळखोरपणे म्हटले देखिल की "संस्क्रृत बातम्यांमध्ये -'युनायटेड स्टेट्सं प्रेसिडेंटं बीइइइइइल क्लिंटण महोदया' - असे आज मी ऐकले त्यात संस्कृत शब्द महोदय: सोडले तर किती आहेत." तर त्यावर बापट गुरुजी मोठ्यांदा हसले होते. (श्रीनंद माझा संस्कृत चा गुरु! त्याबद्दल पुन्हा कधीतरी!). परंतु ही टिंगल टिवाळी बाजुला ... भारतात असताना कळत नकळत खुप चांगल्या गोष्टी कानावर पडत असत. अगदी घरात सुद्धा अप्पा मागील तीस एक वर्षे गीतेचा रोज एक अध्याय वाचताहेत. त्यामुळे नकळत आम्हालाही गीता अगदी ओळखीची वाटते. कधीही कुठेही काही कानावर पडले तर श्लोकाचे पुढची ओळ संस्कृत मध्ये नाही तर निदान मराठीततरी आठवते.

 

इथे अमेरिकेत मात्र या गोष्टींची उपलब्धता मर्यादीत आहे. परंतु तरीही आपला समाज तो धागा बळकट करण्याचा प्रयत्न करत असतो. या कार्यक्रमाला आणि कलाकारांना धन्यवाद आणि शुभेच्छा.

Tuesday, July 28, 2009

अमेरिकेतील राहणीमान

इथे न्युअर्कच्या विमानतळावर हे नेहेमीचेच दृष्य.. पन्नास एक विमाने आज्ञाधारकपणे रांगेत वाट पहात उभी. दूरवरचा कंट्रोल टॉवर सांगेल ते निमूटपणे ऐकुन आपला उडण्याचा नंबर कधी येतोय याची वाट पहात थांबलेली. हे दृष्य पूर्वी पहाताना मला खूप मजा वाटली असती. परंतु दोन तास रांगेत उभे राहुन पुढच्या सहा तासांचा प्रवास अगदी नकोसा वाटत होता. पण "नाईलाजको क्या ईलाज" म्हणत मी विमाने पहात होतो. उडण्याची वेळ झाल्यावर एक एक विमान इंजिनांचा गडगडाट करून अर्ध्या मिनिटात आपल्या अजस्र पंखांचा पसारा घेउन आकाशात झेप घेत होते.

एकंदरीतच विमान हे प्रकरणच कोणाच्याही कल्पनाशक्तीला भुरळ घालेल असेच! लहानपणी पुण्यात सोमवारात रहाताना फक्त विमाने पाहण्यासाठी सायकलवरुन लोहगावच्या विमानतळावर आम्ही गेलेलो. त्यानंतर फर्ग्युसनमध्ये एनडीए ची स्वप्ने पाहिली आणि एसएसबीच्या इंटरव्हुला जाऊन त्यांचा चक्काचूर झालेला ही पाहिला. बरे झाले म्हणा ... माझा नेम तसा काही चांगला नाही. गोट्या कॅरम कधीच जमले नाही. क्रिकेट चा थ्रो तर ३०-४० अंश इकडे तिकडे होणार. उगाच सैन्यात जाऊन घोटाळा झाला असता!! जे होते चांगल्यासाठीच होते. पुन्हा डेहराडुनला जाऊनही धडकलो. परंतु एव्हाना माझा चेहेरा चांगलाच परिचयाचा झाला होता त्यामुळे मला पुण्याला परत पिटाळले. त्यानंतर आय ए एस च्या प्राथमिक परिक्षेतही उत्तिर्ण न होऊ शकल्यावर गुपचुप कंप्युटर मध्ये करियर करून आमची स्वारी अमेरिकेला आली. तात्पर्य काय तर ब्रेन ड्रेन वगैरी अगदी खरे नाही. अमेरिकेत अस्मादिकांसारखेही लोक आहेत जे काहीच जमले नाही म्हणुन इकडे आले!

असो... पण आता इथे आलोच आहे तर माझ्या मनात कायम असेच विचार चालू असतात की अमेरिकेत हे असेच का आणि तसेच का?

आज ती विमानांची रांग पाहून असेच विचार घुमु लागले मनात. जगात दोन चार अपवाद वगळले तर ५० विमाने रांगेत उभी आहेत उड्ण्यासाठी हे दृष्य दिसणे कठीण आहे. अमेरिकेत विमानप्रवास कारप्रवासापेक्षा स्वस्त आहे. हे खरोखरीच अद्भुत आहे की जिच्या निर्मितीसाठी अतिशय उच्च दर्जाचे तंत्रज्ञान, सामग्री, कच्चा माल आणि व्यवस्थापन वापरले जाते ती गोष्ट गहु तांदुळासारखी सामान्यांच्या आवाक्यात आणुन ठेवली आहे. प्रवासी विमान कंपन्या इथे फार पैसे कमवु शकत नाहीत कारण स्पर्धा अतिशय तीव्र आहे. आणि विमानेच नाही तर मोटारी, इलेक्ट्रॉनिक्स, अन्नपदार्थ, सेवा व्यवसाय सर्वच ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा अगदी मुबलक वापर होतो. (किंबहुना त्यामुळेच उत्पादकता वाढुन क्रयशक्ती आणि वस्तुंची मुबलकता निर्माण होते). आता तर विमानात क्रेडिट कार्ड वापरून चहा कॉफी विकत घेता येते .. जमीनीपासून ३०००० फुट उंचीवर!! कार वॉश करायला गेलो तर तिथे यंत्रे कार धुतात. चित्रपट पाह्यचा म्हटले तर त्याचीसुद्धा वेंडिंग मशिन्स आहेत. ६-८ लेन्स चे २०-२५ मैल रस्ते १० - १२ महिन्यात तयार करतात. आठवड्यांमध्ये घरे बांधली जातात.

यादी बरीच मोठी आहे. सांगण्याचा अर्थ इतकाच की तंत्रज्ञान सर्वदूर आणि स्वस्त करून राहणीमान उंचावले आहे. तंत्रज्ञानाची उपलब्धता बर्याच देशांमध्ये आहे. मग अमेरिकेतच इतकी समृद्धी कशी? मला असे वाटते की भांडवलाद आणि बहुजनमुख समाजधारणा यांमुळे तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वदूर आणि स्वस्त झाला आहे. भांडवलवादामुळे इथे व्यवसाय करणे अतिशय सोपे आहे. आणि एकंदरीतच वृत्तीच अशी की कुठलीही गोष्ट खूप मोठया प्रमाणावर सर्वांंकडे कशी पोहोचवता येइल असा स्पर्धेचा अट्टाहास असतो.

पुन्हा एकदा मला नॅनो गाडीचे कौतुक असे करावेसे वाटते की त्यांनी कल्पकता वापरुन मोटारीचे स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणले. अर्थात टाटा चे हे स्वप्न अगदीच निस्वार्थी नाही. आणि असूही नये. परंतु भारतात स्पर्धेचा अभाव असल्यामुळे किंवा आणि काही कारणांमुळे आपण किमान कष्टात कमाल पैसे कमावण्याचा प्रयत्न करतो. नॅनोचे स्वप्न इतर उद्योगधंदे नाही पाहु शकत कारण त्यामागे अफाट कष्ट आहेत. त्याउलट राजकारण्यांना लाच देऊन व्यापारातील मक्तेदारी टिकवुन ठेवली तर किती सोपे !!

असो ... तर भारतात जसजशी स्पर्धा वाढेल तसतसे सरासरी राहणीमान उंचावेल.

तंत्रज्ञान त्यामानाने तांत्रिक बाब आहे. मनुष्याच्या कल्पकतेला जर आवश्यक ते प्रलोभन (इंसेन्टिव्ह) असेल तर तंत्रज्ञानाचा शोध लावणे अजिबात कढीण नाही. आवश्यकता आहे स्पर्धेतुन त्या तंत्रज्ञानाचे सर्वदूर उपयोजन होण्याची.

Monday, July 27, 2009

सहभावना (एम्पथी)

सलोनी

 

आज मी ज्या विषयावर लिहिणार आहे तो विषय आतापर्यंत लिहिलेल्या विषयांच्या तुलनेत समजायला तुला जास्त काळ लागेल. परंतु जर मोठे होऊन कुठल्याही क्षेत्रात तुला नेतृत्व करायचे असेल तर आवश्यक अश्या काही गोष्टी आहेत इथे. मी त्यात पारंगत आहे असे काही नाही. परंतु आपण कुठे कमी पडतो हे कळणे सुद्धा महत्वाचे असते.

 

अमेरिकेत मागील काही आठवडे इथल्या सर्वाच्च न्यायालयाच्या एका रिकाम्या जागेसाठी योग्य व्यक्तीचा शोध चालु आहे. भारतामध्ये राष्ट्रपति न्यायाधिशांची थेट नियुक्ति करतात. अमेरिकेत मात्र राष्ट्राध्यक्ष कोणातरी सुयोग्य व्यक्तिचे नाव सुचवतात आणि इथली संसद (सेनेट) त्या व्यक्तिची शहानिशा करुन त्या निर्णयाला मंजुरी देतात. ही प्रक्रिया अतिशय अटीतटीची असते कारण देशाच्या समाजकारणावर दूरगामी होतील असे निर्णय हे न्यायाधीश देणार असतात. एकदा केलेली नियुक्ती आजन्म असते. अक्षरश: आजन्म. त्या न्यायाधीशांना कोणीही निवृत्त करू शकत नाही (अगदी राष्ट्राध्यक्ष सुद्धा). यामागची भूमिका अशी की न्यायाधीशांना कोणाचीही भीती न बाळगता न्यायदानाचे काम नि:पक्षपातीपणे करता यावे.

 

तर सध्या रिकाम्या असलेल्या जागेसाठी ओबामांनी एका लॅटिन अमेरिकन स्त्रीचे नाव सुचवले आहे. तिचे नाव जज सोनिया सोटोमायर. जज सोटोमायरकडे एका चांगल्या न्यायाधीशाकडे असावेत असे सर्व गुण आहेत आणि त्यांची नियुक्ती अगदी निश्चीत आहे. परंतु दोन गोष्टींबाबत मोठा वादंग झाला. खरे तर वादंग पेक्षा वादविवाद किंवा उहापोह झाला असे म्हणु आपण. कारण अमेरिकेत वाद असेल तरिही सभ्यतेची पातळी क्वचीतच सोडली जाते. वाटेल तसे आरोप प्रत्यारोप सहसा केले जात नाहीत. असो... तर ते दोन मुद्दे म्हणजे १) न्यायाधीशांमधील वंशाधारीत न्यायप्रदानक्षमता आणि २) न्यायदानामध्ये सहभावनेचे (एम्पथी) स्थान.

 

जज सोटोमायर यांनी पूर्वी कधीतरी न्यायाधीशांच्या एका संमेलनात असे म्हटले होते की "एखाद्या "विद्वान" श्वेतवर्णीय पुरुषापेक्षा एखादी "विद्वान" लॅटीन अमेरिकन स्त्री जज अधिक चांगले न्यायदान करु शकेल." अमेरिकेत समानतेचे तत्व हे दुहेरी आहे. कोणत्याही कृष्णवर्णीय अथवा अल्पसंख्याक व्यक्तीवर अन्याय होऊ नये याची काळजी जशी घेतली जाते त्याचवेळी बहुसंख्याक अथवा सबळ घटकांवर ही अन्याय होऊ नये अशी समाजाची रचना आणि धारणा बव्हंशी आहे. त्यामुळे सोटोमायर यांचे वरिल वक्तव्य वरकरणी पाहिले तर निषेध करण्यासारखेच आहे. त्यातुन असेच वाटेल की जज सोटोमायर वंश आणि लिंगानुसार भेदभाव मानणार्या आहेत. परंतु जज सोटोमायर यांनी त्यावर क्षमा मागीतली आणि आपला समानतेवर विश्वास आहे हे स्पष्ट केले. त्यांचे मूळ वक्तव्य हे पूर्वीच्या एका प्रसिद्ध न्यायाधीशाच्या वक्त्यव्याला दुजोरा देताना आणि त्या संमेलनाला आलेल्या लॅटिन अमेरिकन स्त्रीयांना स्फुर्ती देण्यासाठी केले होते. त्यामागच्या संदर्भाचा विपर्यास केला जातो आहे हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे स्पष्टीकरण सर्वसाधारणपणे सर्व संसदेला मान्य झाले.

 

परंतु त्या संदर्भावरुन पुढची चर्चा जास्त रंगली. संदर्भ होता - त्या मूळ वक्तव्याचा जिथे नुकत्याच निवृत्त झालेल्या सॅन्ड्रा डे ओकॉनर या एका न्यायाधीशांनी असे म्हटले होते की "न्याय देताना न्यायाधीशांचे आयुष्यविषयक अनुभव जितके जास्त तितके न्यायदान "विद्वत्तापूर्ण" सहभावनापूर्ण आणि म्हणुन अधिक चांगले होईल."

 

वाद या विषयावर होता की न्यायाधीशांनी न्यायदान करताना सहवेदना अथवा सहभावना ठेवावी का? ऍरिस्टॉटल या ग्रीक तत्वज्ञाने कायद्याची (किंवा नियमांची) व्याख्या अशी केली आहे की - लॉ इज रिझन विदाऊट पॅशन (अर्थात, कायदा म्हणजे अभिनीवेशशून्य कारणमीमांसा आहे.). इथे भावनेपेक्षा तर्क महत्वाचा. लोकशाहीमध्ये न्यायदान हे नियमानुसार व्हावे अशी अपेक्षा. अन्यथा सोयिस्कररीत्या व्याख्या बदलल्या तर अन्याय सहन न झाल्याने अनगोंदी माजेल. त्यामुळे न्यायाधीशांनी नियमानुसार त्यांचे काम करावे आणि भावनिकपणा टाळावा अशी अपेक्षा. परंतु आयुष्यातील सर्वच प्रसंग नियमबद्ध करता येत नाहीत. महाभारतात त्यालाच "धर्मस्य गति सूक्ष्म:" म्हटले आहे. त्यामुळे अनेकदा न्यायाधीशांना कायद्याचा अर्थ लावावा लागतो. आणि इथे जर न्यायाधीशांनी समाजातील दु:ख आणि वेदना पाहिल्याच नसतील तर अन्याय होऊ शकतो. न्याय आंधळा असावा याचा अर्थ सर्व जण कायद्यापुढे समान असावेत. परंतु न्याय बहिरा अथवा संवेदनाहीन असावा का असा प्रश्न आहे.

 

ऍरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार अभिनिवेशशून्य असला तरीही सहभावनाहीन असावा का? बहुधा नाही. सांगणे कठीण आहे. सर्वच प्रश्नांना निश्चीत उत्तरे नसतात. आणि अनेकदा उत्तरांपेक्षा प्रश्न विचारला जाणे हेच खूप महत्वाचे असते. जिवंतपणाचे लक्षण आहे.

 

एकंदरीतच अमेरिकेच्या प्रगतीमागचे सर्वात मूळ कारण हे इथली न्यायव्यवस्था हेच आहे. अमेरिकाच नव्हे तर जगातील सर्वच यशस्वी आणि संपन्न राज्ये / राष्ट्रे आणि साम्राज्ये ही तुलनेनी कमी अन्यायकारक होती. जो राजा जितका अन्यायकारक तितका त्याचा लवकर अस्त हा इतिहासातिल नियम आहे. रामराज्य या संकल्पनेमागील अर्थ नेमका काय आहे? त्याउलट रावणराज्य कसे असेल असे विचारले तर सहसा आपण सर्वच हेच म्हणु की जिथे जीवाशीवाची शाश्वती नाही ते रावणराज्य! मोगलाई "मोगलाई" असूनही इतर इस्लामी बादशहांपैकी जास्त टिकली कारण तुलनेने मोगल राज्यकर्ते अधिक सहिष्णु होते !! यात "तुलनेने" हे समजुन घेणे महत्वाचे. शिवाजी राजांना जनतेने आपले का मानले ... त्यांच्या मृत्युनंतरही हे राज्य टिकावे अशी धडपड इथल्या माणसांनीच नाही तर कड्या कपारींनीही का केली? तर हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आणि आपल्या धर्मानुसार श्री म्हणजे दुसरे तिसरे कोणिही नसुन आपणच आहोत. हे सर्वांचे राज्य आहे. इथे न्याय आहे म्हणुन ते चालवायचे आणि वाढवायचे. आज महाराष्ट्र पुढे का आणि अनेक नोबेल पदक विजेत्यांची जन्मभूमी बंगाल मागे का? कारण कम्युनिझमच्या नावाखाली अराजकताच आहे. कामगारांची सर्व समाजावर लोखंडी पकड आहे. मुक्त विचार मुक्त आचार यांना बंदी आहे.

 

अमेरिका म्हणजे काही धुतल्या तांदळासारखी नक्कीच नाही. परंतु इतर देशांपेक्षा बरी आहे. तीच गोष्ट महाराष्ट्राची. न्याय, समता (गुणांना वाव), आचार विचार आणि कृतिचे स्वातंत्र आणि मानवी मुल्यांचे अधिष्टान ही समाजाच्या प्रगतीची चाके आहेत. मानवी मन, त्याच्या क्षमता आणि आकांक्षा ही त्याची इंजिन्स आहेत. आणि कल्पकता हे इंधन आहे. पाश्चात्यांची प्रगती साध्य करणे हे तसे सोपे आहे ... कारण अनेक भारतिय अमेरिकेत येऊन मोठमोठे पराक्रम करतातच. परंतु भारत देशच जर अमेरिकेसारखा अथवा अधिक समृद्ध आणि बलशाली करायचा असेल तर न्याय, समान संधी, स्वातंत्र्य खर्या अर्थाने प्रस्थापित केले पाहिजेत. समृद्धि आणि भौतिक प्रगती केवळ एक परिपाक आहे.

 

"सहभावना हवी की नको?" !!! खरेच ... भारतामध्ये ही असे प्रश्न विचारणारे खासदार जन्माला येवोत.