Saturday, November 12, 2011

दोन घटना - समता आणि बंधुत्व

प्रिय सलोनी,

पुन्हा एकदा विमान प्रवास! पुन्हा एकदा लिखाण.

२ आठवड्यांपूर्वी नोकरी बदलली. आत मी अधिकृतरीत्या सल्लागार झालो. (सल्लागार म्हणजे सल्ला घेणारा गार!) मला वाटते माझ्यासाठी हे चांगले काम आहे. आमचा बोलायचा धंदा. प्रवास खूप जास्त आहे. अगदि दर आठवड्याला म्हणजे खूप जास्त होते. सिद्धु तर लगेच मला मिस करायला लागला. तूसुद्धा सकाळी म्हणालीस, "बाबा तू कामाला जाऊ नकोस." बघु एखादे वर्ष हे करून. हळू हळू अंगवळणी पडेल.

परन्तु एक गोष्ट मला लगेच खटकली ती अशी की माझा लॅपटॉप १४ इंचाचा दिला आहे. त्यावर विमानात काहीही काम करता येत नाही. पूर्वी माझा १२ इंच लॅपटॉप होता तो अगदी चांगला होता.

असो ... तर मागच्या आठवड्यात देखील विमान प्रवास घडला. आता सध्या न्युअर्क बंद. आणि नॅशव्हिल चालू. रविवारी गेलो होतो नॅशव्हिलला. गुरुवारी घरी परत आलो. विमान फिनिक्सपर्यंत पोहोचायला उशिर झाला. मला विमानातील सर्वात शेवटच्या रांगेतील सर्वात शेवटची सीट मिळाली. विमान गेट ला लागले. परंतु आमची स्वारी सर्वात शेवटी उतरणार यात काहीच शंका नव्हती. चिडचिड करुन उपयोग नव्हता. विमानात कधी कधी मला क्लॉस्ट्रोफोबिक व्ह्यायला होते ..नेहेमी नाही .. परंतु त्या दिवशी तसे काहीसे झाले होते.

हळु हळु लोक उतरायला लागले. काही मंडळी नेहेमी प्रवास करणारी .. त्यांच्या गतीने झटपट उतरत होती. परंतु काही "स्लो मोशन" मंडळी अगदी निवांत - आस्ते कदम - गायी म्हशी मंडईतुन जश्या धिम्या गतीने पुढे सरकतात - तशी जात होती. माझ्यापासुन ५ रांगा पुढे एक म्हातारबुवा बसले होते. ८५-९० तरी वय असावे. ते अगदी ९० अन्शात वाकलेले होते. त्यांच्या पुढची रांग रिकामी झाली तसे मला वाटले आता ते आजोबा सगले लोक जाईपर्यंत थांबतील. परन्तु आजोबांना काही थांबायचे नव्हते. ते उठायला लागले. मी मनात म्हटले आता काही खरे नाही.

आजोबांचे वय इतके की ते उठायचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना उठता येईना. पाय लटपट लट्पट करत होते. अर्धे उठायचे परत खाली बसायचे. असे ५-७ वेला झाले. माझी थोडीशी चिडचिड झाली. परन्तु इतर माणसे गप्प बसुन होती. मागच्या सर्व रांगा शांत्पणे आजोबांची उठायची वाट पहात होत्या. शेवटी एका बाईने आजोबांना दंडाला धरुन उठायला मदत केली.

त्यानंतर ते गृहस्थ हळु हळु दोन रांगांमधुन चालत चालत पुढे गेले. ५ मिनिटे तरी लागली असतील.

मला खरोखरीच कौतुक वाटले सर्व लोकांचे. कोणी चिडचिड दाखवली नाही. भले त्या आजोबांना उठता येत नव्हते, परन्तु त्यांचा जाण्याचा क्रम होता, आणि त्यांची उठण्याची इच्छा होती तर इतर कोणी त्यांना म्हणाले नाही की "थांबा. तुम्हाला वेळ लागेल. आम्हाला आधी जाऊ द्या." इथे अमेरीकेत मला खरोखरीच या गोष्टीचे खूप कौतुक वाटते. खरोखरीची समानता. सर्वांचा आदर. आणि सर्वांचा आत्मसन्मान जपण्याची वृत्ती.

आजोबांना कोणी लगेच मदत केली नाही कारण कधी कधी लोकांना दया आवडत नाही. विशेषत: अमेरिकेत. इथे सामर्थ्याला मान आहे. आणि दया दाखवणे म्हणजे दुर्बळ आहोत असे सूचीत केल्याचे समजतात लोक. म्हणुन त्याना दया आवडत नाही. तसेच कोणी अरेरावी देखील केली नाही. "अहो आजोबा ... कसली घाई आहे... कुठे जायचे... थांबा की..." अश्या कॉमेंट्स आल्या नाहीत कारण अमेरिकन माणसे दुसऱ्याच्या आणि स्वत:च्या दोघांच्या हक्काबद्दल जागरुक आहेत. आदर करतात दुसऱ्याच्या मताचा.

तुझ्या आईनेच दोन आठवड्यांपूर्वी सांगीतलेली गोष्ट: कुठेतरी अमेरीकेत एक बाई तिच्या बाळाला घेउन चालली होति बसमधुन. बाळ खूप जोरात रडत होते. त्यामुळे चिडुन बसचालकाने त्या बाईला सांगीतले की बाळाला शांत कर नाहीतर खाली उतर. तीला बाळाला शांत करणे जमले नाही. त्यामुळे ती खाली उतरली. ते पाहुन बसमधील इता प्रवाश्यांना इतका राग आला की ते सर्वच जण खाली उतरले. पुढे काय झाले ते इतके महत्वाचे नाही. बहुधा त्या बाईला पुन्हा बसमध्ये त्याने घेतले असणार आणि कदाचीत त्याला निलंबीत देखील केले गेले असावे. परंतु महत्वाची गोष्ट ही की सर्व लोकांनी त्या स्त्रीची असहायता ओळखली आणि बसचालकाची अरेरावी चालु दिली नाही.

या दोन्ही गोष्टी अमेरीकन लोकांबद्दल खूप काही चांगले सांगुन जातात. स्वत:चा आणि दुसऱ्याचा सन्मान जपणारे लोक आहेत इथे. दुर्बल असेल तर चालेल परन्तु जिद्द असलेल्या व्यक्तिला मनसोक्त पाठिंबा देणारे लोक आहेत इथे. स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची कदर करणारे लोक आहेत इथे. स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या हक्कांसाठी उभे राहणारे लोक आहेत इथे.

६० च्या दशकात समान संधी आणि समान प्रवेश या साठी कायदे केले गेले अमेरिकेत. त्यांद्वारे धर्म लिंग वय आनि शारिरीक सबलता यांच्या द्वारे भेदभावला पूर्ण बंदी घातली गेली. त्यामुळे आज अपंग सर्व सार्वजनिक ठिकाणांचा उपभोग घेऊ शकतात. कुठल्याही दुकानात त्यांना जाता येईल अशी सुविधा, बसेस मध्ये त्यांची गाडी चढवता येईल अशी लिफ्ट किंवा रॅम्प , सभागृहांमध्ये वेगळी आसनव्यवस्था ... एक ना दोन. गरोदर बायकादेखील त्यात आल्याच. सिद्धु पोटात असताना मिशिगनमध्ये आम्ही देखील अपंगाचे (आणि गरोदर स्रीयांचे) पार्किंग वापरायचो जेणेकरुन तुझ्या आईला जास्त चालावे लागु नये म्हणुन.

अमेरीकेत खरोखरीच अनेक दोष देखील आहेत. परंतु अमेरीकेवर टीका करताना अमेरीकेचा हा सुंदर मानवी चेहेरा देखील पहावा.

Monday, September 5, 2011

भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनाला पाठिंबादर्शक मेळावा - टेम्पी, अ‍ॅरिझोना

सलोनीराणी,

२७ ऑगस्टला इथे फिनिक्समध्ये भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनाला पाठिंबादर्शक मेळावा झाला. सुदैवाने मीदेखील त्याच्या आयोजकांपैकी एक होतो. हे आंदोलन कुठे जाईल माहित नाही. परंतु त्यानिमित्ताने भ्रष्टाचाराला सोकावलेले आणि निमुटपणे सहन करणारे दोन्ही वर्ग खडबडुन जागे झाले ... हेही नसे थोडके.

फिनिक्सच्या आमच्या सभेची काही क्षणचित्रे...

अर्थात या मेळाव्याचे यश अण्णांच्या आंदोलनाचे आहे. आम्ही फक्त निमित्तमात्र. दगडाला शेंदुर लावला तर त्यालादेखील लोक नमस्कार करतात तसे.

 अवघ्या तीन दिवसात मेळावा आयोजित केला होता. स्थळ - अ‍ॅरिझोना स्टेट विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे उद्यान - टेम्पी, अ‍ॅरिझोना. वेळ - सायं ५:३० ते ७:३०, २७ ऑगस्ट, २०११. ११६ अंश तपमान असताना, ३०० लोक या मेळाव्याला सहकुटुम्ब आले.

स्टेज म्हणजे काय तर एक टेबल, त्यामागे झेंडा आणि एक पडदा होता!
लहान मुले चित्रे रंगवण्यात गुंग झाली होती. 
 

एकंदरीतच मेळावा अगदी अनौपचारिक होता त्यामुळे २० एक लोकांनी त्यानंतर आपले कळकळीचे विचार मांडले. माझ्या ११ वर्षांच्या अनुभवात मी अमेरिकेत भारतियांची कुठल्याही विषयावर इतकी एकजुट पाहिली नव्हती आजपर्यंत.

 

२२० लोकांनी पंतप्रधानांना जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा व्यक्त करणाऱ्या निवेदनावर सह्या केल्या.
आणि सर्वात महत्वाचे माझ्या दृष्टीने ... सलोनीचे "मेरा भारत महान!"

Friday, August 19, 2011

संभवामि युगे युगे

सध्या भारतामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध मोठे आंदोलन चालले आहे. अण्णा हजारे या कुठलेही सरकारी पद किंवा पैश्यांचे बळ मागे नसलेल्या सामान्य माणसाच्या मागे आज या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जनता मोठ्या प्रमाणात उभी आहे.

तब्बल २० एक वर्षांपूर्वी आमचे एक युवक शिबिर झाले होते राळेगणसिद्धीला - म्हणजे अण्णांच्या गावी. त्या काळी अण्णांचे नाव त्या गावाचा कायापालट करण्याबद्दल प्रसिद्ध होते. अगदी परदेशातुन आणि इस्राईलमधुन जलतज्ञ येऊन पाहुन जात की नगर जिल्ह्यासारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये हे एकच गाव इतके संपन्न आणि हिरवेगार कसे. अर्थातच त्यामागे अण्णांचे कष्ट होते. सैन्यातुन निवृत्ती घेतल्यानंतर अण्णांनी आपल्या गावी परतुन गांधीजींच्या ग्रामविकासाच्या कल्पनेची कास धरली. दारुबंदी केली. पाण्याचे नियोजन केले, सहकाराच्या माध्यमातुन शाळा, वीज अश्या सोयी आणल्या गावात. राळेगण सिद्धी हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर आदर्श गाव म्हणुन प्रसिद्ध झाले.

आमच्या शिबिराचा समारोप करताना अण्णांनी भ्रष्ट्राचार हाच विषय निवडला. आम्ही ५० एक तरुण असु तिथे. अण्णा म्हणाले, "भ्रष्टाचार संपवु म्हणुन संपणार नाही. त्यासाठी आक्रमकता पाहिजे. भाषणांनी साध्य होणार नाही. तुम्हा तरुणांना मी एक उपाय सांगतो. शंभर तरुण गोळा करा. मी तुम्हाला संपुर्ण महाराष्ट्रातील १०० सर्वात जास्त भ्रष्ट जिल्हाधिकारी आणि त्यांची पिल्लावळ यांची यादी देतो. तुम्ही अमुक एक दिवस निवडा. प्रत्येक तरुणाने एक अधिकारी निवडायचा आणि त्या दिवशी त्याची भेट ठरवायची बरोबर दहा वाजता. आणि बरोबर दहाच्या ठोक्याला भेट झाली की काहीही न बोलता त्याला एक ठेऊन द्यायची (भडकावुन द्यायची / श्रीमुखात द्यायची / कानाखाली जाळ काढायचा इत्यादि!)."

अणा पुढे म्हणाले - "कल्पना करा महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रांमध्ये बातमी येईल की कसे कुणास ठाऊन परंतु काल शंभर तरुणांनी शंभर कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवले."

मला त्यावेळी २० एक वर्षांचा असताना ती कल्पना जेवढी आवडली, आज जवळपास ४० च्या आसपास तेवढीच आवडते. आणि अमेरिकेत इथे येऊन तर माझे ठाम मत झाले आहे की राजकिय गोष्टी भीक मागुन मिळत नसतात तर त्यासाठी लढावे लागते, संघर्ष करावा लागतो. याचना करुन फार तर भीक मिळेल. परंतु हक्क आणि सन्मान मिळणार नाही.

पुढे अण्णांनी राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराविरुद्ध यशस्वी लढा दिला आणि दोन मंत्र्यांना बडतर्फ करायला लावले. परंतु मला वाटते अण्णांनी महाराष्ट्रात माहितीचा अधिकार यावा याचा जो यशस्वी लढा दिला ते आपल्या लोकशाहीच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. आणि महाराष्ट्राने संपूर्ण भारतामध्ये माहितीच्या अधिकाराची मुहुर्तमेढ रोवली.

आज अण्णांचा लढा हा भारताच्या पातळीवर पोहोचला आहे. लोकपाल विधेयक मांडण्यात यावे या मागणीचा सरकारने अंशत: स्वीकार करुन दोन महिन्यांपूर्वी असे विधेयक आणण्याचे नाटक केले. परंतु अण्णांचे समाधान झाले नाही. प्रत्येक राज्यात लोकायुक्त नेमावा आणि त्याने सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणे सहा महिन्यात निकालात काढावीत अशी मुख्य मागणी आहे. मी त्याचा काहीच अभ्यास केला नाही. परंतु सरकारपेक्षा अण्णांवर माझा शतपटीने जास्त विश्वास आहे.

आळशी, विघ्नसंतोषी, नकारात्मक लोक तसेच भ्रष्टाचारी किंवा हितसंबंधी मंडळी नाके मुरडत आहेत. या विधेयकाने काय होणार असे विचारत आहेत. परंतु पर्यायी उपाय सुचवत नाहीत.

तत्वज्ञान मांडायला खूप सोपे आहे. परंतु कृती अवघड असते. अण्णांच्या उपायात तृटी असणारच आहेत. लोकायुक्तावर अंकुश कोण ठेवणार. आहे त्याच गोष्टी नीट चालवता का नाही येत. न्यायव्यवस्था का नाही सुधारता येत. शंभर सुविचार आहेत. अगदी मलादेखील हे पटते की समांतर रचना निष्फळच ठरेल. जोपर्यंत सामान्य माणुस आपल्या हक्कांसाठी जाब विचारण्याचे धाडस करत नाही तोपर्यंत कुठलीच व्यवस्था नीट काम करत नाही. अगदी लोकायुक्त देखील नाही. लोकायुक्त हा थेट जनतेने निवडुन दिला पाहिजे. तरच ते पद चांगले काम करेल. मग न्यायाधिशांना निवडुन दिले तर? सर्व प्रश्नांचे मुळ ते नाही का? सडलेली न्यायव्यवस्था हे भ्रष्टाचाराचे मुळ कारण आहे. जर न्यायाधीश जनता निवडुन देत असेल तर भ्रष्टाचाराला शासन लवकर होईल आणि भ्रष्टाचार कमी होईल.

परंतु पुन्हा तेच... वाद चर्चा आणि तत्वज्ञान यांचा अतिरेक करुन संधी वाया घालवण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडुन घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध एक पाऊल पुढे उचलणे जास्त महत्वाचे आहे.

अण्णांच्या या लढ्यातुन नुसते भ्रष्टाचाराचे नव्हे तर समाजाच्या औदासिन्याचे निर्मुलन होवो. विष्णुचा दहावा अवतार येऊन आमची सुटका करेल अशी आशा बाळगणारी वृत्ती जाऊन स्वत: धडक देऊन काहीतरी करु अशी उर्मी आणि आत्मविश्वास समाजात येवो. आणि हे मराठ्यांनी नाही करायचे तर कोणी करायचे? ज्ञानेश्वर एकनाथ तुकारामांपासुन ते अगदी छत्रपती शिवाजी, संभाजीराजे, थोरले बाजीराव, माधवराव ते शाहु फुले आंबेडकर टिळक गोखले आगरकर आणि यशवंतराव अशी आपली परंपरा. वस्तुस्थिती ही आहे की केवळ महाराष्ट्रामध्येच हे स्फुल्लिंग आहे आणि ते शिवाजी महाराजांनी पेटवले आहे. तोच आपला वारसा आहे आणि आपणच तो पुढे न्यायचा आहे. अण्णा हे केवळ त्याच परंपरेतील एक धागा आहेत आणि हा लढा त्या परंपरेतील एक रत्न आहे.

Wednesday, August 17, 2011

पाणी टंचाई

सलोनीराणी, ही बातमी अशी हॉट ऑफ द प्रेस! ह्युस्टन शहरात उष्णतेमुळे दिवसाकाठी ७०० वेळा जलवाहिन्या फुटत आहेत सध्या! जलवाहिनी फुटते आणि अमेरिकेत?? !! मला अगदी नववधु पहिल्यांदा माहेरी गेल्यावर तिला कसे वाटेल तसे भरुन आले! अर्थात पाण्यामुळे "भरुन" आले हाच शब्द जास्त चांगला!

तर झाले असे आहे की सध्या अमेरिकाभर उष्णतेची लाटच आहे. इथे अ‍ॅरिझोनामध्ये बसुन आम्हाला काही कधी कळतच नाही की लाट आहे की काय? इथे उष्णतेची लाट नसणार तर कुठे असा विचार करुन आम्ही (एसी मध्ये) गप्प बसतो! परंतु जर युएसए टुडे चे शेवटचे पान पाहिले तर माझ्यासारख्या आळशी आणि जरा मंद लोकांसाठी एक अप्रतिम रंगीत नकाशा असतो अमेरिकेचा की ज्यावर सगळीकडची तापमाने रंगांनुसार दाखवली असतात. उष्ण म्हणजे लाल आणि जांभळा म्हणजे थंड. तर काल मी खरे तर तो नकाशा पाहिला एका दुकानात बसल्याबसल्या. सगळ्या अमेरिकाभर लाल आणि दस्तुरखुद्दांच्या राज्यामध्ये चक्रमी आणि विक्रमी तापमान होते. बकहेड मध्ये ११२ अंश फॅरेनहाईट! त्यामुळे ह्युस्टन किंवा न्युयॉर्कवासिंना ९७ किंवा १०० तपमान असेल तर त्याबद्दल फारशी काही सहानुभुती अर्थातच नव्हती माझ्याकडे. (हे अमेरिकेचे असे तपमानाचे देखील विचित्र. सगळे जग सेल्सिअस मोजते आणि इथे फॅरेनहाईट. परंतु मला असे वाटते की याद्वारे ते स्वत:च्या बाजारपेठेचे संरक्षण करतात. असो ... पण तो दुसरा विषय होईल.

तर ह्युस्टन मध्ये दिवसा ७०० जलवाहिन्या कश्या फुटताहेत. तर इथे पाण्याला खुपच दाब असतो. घरातल्या सगळ्या नळांना अगदी दाबुन पाणी येते. आणि २४ तास पाणी असते. आणि हे सगळीकडेच ... अगदी मागासातील मागास राज्यात देखील हीच परिस्थिती. ह्युस्टन मध्ये गेले १४-१५ दिवस रोज विक्रमी तपमान होते आहे. त्यामुळे जनता हैराण होऊन पाण्याचा जास्त वापर करते आहे अर्थातच. त्यामुळे नळावर जास्त दाब येऊन ते फुटु लागले आहेत. अर्थात काय तर इतके लोक इतके पाणी वापरु लागले तर त्या बिचाऱ्या नळांनादेखील काही आयुष्य आहे. तसेच सगळ्या अमेरिकाभरच नळ वगैरे असल्या गोष्टी यांनी कधी ४०-५०-७० वर्षांपुर्वी करुन ठेवल्या आहेत त्या आता जुन्या होत चालल्या आहेत. त्यामुळे देखील फुटणे स्वाभाविक आहे.

त्यामुळे आता ह्युस्टनमध्ये पाणीटंचाई आणि पाणीवाटप सुरु झाले आहे म्हणे. अर्थात इथली टंचाई म्हणजे काय तर दिवसातुन बागेला एकदाच पाणी द्या. दोन वेळा देऊ नका. खरेच. अ‍ॅरिझोनामध्ये देखील कधी कधी असे आवाहन करतात. तर यांची ही कमाल पाणीटंचाईची.

अ‍ॅरिझोनामध्ये बाकी वाळवंट असले तरीही उत्तरेला कोलोरॅडो पठार पसरले असल्यामुळे तिथल्या डोंगरांमध्ये चिकार बर्फ पडतो हिवाळ्यात. त्याचेच पाणी उन्हाळ्यात कोलोरॅडो आणि साल्ट रिव्हर अश्या दोन मुख्य नद्यांमार्फत अनुक्रमे नेवाडा-कॅलिफोर्निआ आणि अ‍ॅरिझोना राज्यांना पुरवले जाते. या नद्यांवरची धरणे अशी प्रचंड आहेत की मागील पंधरा वर्षे इथे दुष्काळ आहे आणि तरीही पाणीटंचाई अशी नाही. १९१०-२०-३० च्या दशकांमध्ये अमेरिकेच्या या नैऋत्य भागामध्ये असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले गेले आणि मोठे तंत्रज्ञानदेखील विकसीत झाले. गोलाकार भिंतीची धरणे, बर्फाचा वापर करुन सिमेंट लवकर पक्के करण्याची क्रिया, मोठमोठ्या क्रेन्स, टनेल्स तयार करण्याची यंत्रे एक ना अनेक. हे सगळे तंत्रज्ञान इथेच विकसीत झाले. त्याची फळे पुढच्या पिढ्या आजतागायत उपभोगताहेत. आणि आपल्याकडे भारतामध्ये नर्मदा बचाओ करत विकासकामांना खीळ घालत बसतात लोक वर्षानुवर्षे. आणि अमेरिका आणि इतर राष्ट्रे असल्या "निर्बुद्द" समाजसेवकांना शंभर पुरस्कार देऊन त्यांचा अहंकार जोपासतात आणि भारताला मागे ठेवतात. चीनने "थ्री गॉर्जेस" धरण जे काही बांधले आहे त्यावर अशीच टीका केली आहे अमेरिकेने. परंतु स्वत:कडे ३०-४० वर्षे दुष्काळ पडला तरीही पाणी कमी पडेल अशी धरणे बांधुन ठेवली आहेत. तिथे नाही लहान धरणांचे तत्वज्ञान लागु पडत. ते तत्वज्ञान फक्त विकसनशील देशांना. परंतु अमेरिकेला दोष देण्यात अर्थ नाही. आपला फायदा कश्यात आहे हे आपणच ओळखले पाहिजे. चीनी लोक भोळसट नाहीत. आपण भोळसट, आळशी आणि वैचारिकदृष्ट्या अजुनही गुलामगिरीतच आहोत. असो !

तर ह्युस्टन मध्ये तब्बल ४० माणसांची फौज काम करते आहे आणि दिवसाकाठी ७०० गळत्या थांबवत आहेत. खरे खोटे त्यांना माहित. कसे करतात देव जाणे. परंतु ४० म्हटल्यावर अगदी पुण्यातल्या वेटरने फक्त बटाटेवडा मागवल्यावर जसे तुच्छतादर्शक म्हणावे "बस? इतकेच?" त्याच तुच्छतेने परंतु थोड्याश्या कौतुकाने देखील मी मनात म्हणालो - "बस ४० च ?" साहेबाचा कामाचा आवाका बाकी आहे म्हणायचा!

Saturday, August 6, 2011

विंचुपुराण

सलोनीराणी, मागच्या शुक्रवारी मी ऑफिस मध्ये बसलो होतो. घरातलीच एक खोलीचे ऑफिस म्हणुन वापरतो. तर सिद्धु आणि तुझ्या आईने मला जोरजोरात बोलावले. एरवी मी बऱ्यापैकी बहिरा असतो. परंतु आकांत एवढा मोठा की काही विचारता सोय नाही. ऑफिसकडुन किचेन कडे जायला लागलो तर सिद्धु आणि तुझी आई गराजच्या दरवाजापाशी उभे राहुन मला सांगत होते की "विंचु" आहे. मी सगळीकडे पाहु लागलो. मला काही दिसेना. "अरे इकडे" आई. "बाबा इथे इथे .." सिद्धु. म्हणुन मी ते उभे होते तिकडे जायला लागलो. तर एकदम हलकल्लोळ केल्यासारखे दोघेही काहीतरी सांगु लागले. शेवटी त्यांचा आवाज टीपेला पोहोचला त्यावेळी मला कळले की मी उभा होतो तिथे माझ्या पासुन अर्ध्या फुटावर भिंतीवर विंचु होता. मग काय .. तुझ्या आईचीच एक चांगली चप्पल आणली आणि --- पच्याक!
 
आताशा इथे विंचवांची सवय झाली आहे. व्ह्यायला नको ... पण काय करणार?

पहिले ६ महिने या घरात चांगले गेले. घरात रहायाला आलो ते ९ महिन्यांपूर्वी. घर चांगलेच आहे. चौघांसाठी पुरेसे असे. सगळ्या गोष्टी जवळ असलेले - सिद्धुची शाळा, दुकाने आणि ओळखीचे लोक इत्यादि. अंगण एकदम चांगले. परंतु मे महिना आला आणि अचानक एके दिवशी कचऱ्याचा डबा (डबा कसला ड्रम!) बाहेर नेऊन ठेवत असताना तुझ्या आईला विंचु दिसला. त्यावेळी त्या विंचवाला गाठुन मारेपर्यंत तिचा आणि माझा देखील थरकाप उडालेला! नंतर पुढच्या दरवाज्यात ... त्यानंतर मागच्या दरवाज्यात. परत एकदा घरात दारात. हॉलमध्ये भिंतीवर ... पुन्हा बाहेर कचऱ्याच्या डब्यापाशी .... बापरे बाप .. अशी अनेक पिल्ले आढळुन आली. अर्थात त्या सगळ्यांना आकाशातल्या बापाकडे पाठवले हे सांगणे न लगे.
परंतु इतके विंचु सापडल्यामुळे आम्ही हैराण झालो. किंबहुना दुसरा विंचु घरात भिंतीवर दिसला त्याचवेळी आपण हादरलो. कारण जे न देखे रवी ... अश्या सर्व जागा तुला बरोबर दिसतात. आणि विंचवांना पण त्याच जागा दिसतात. त्यामुळे कधीतरी तुमची गाठ पडायला नको!
सिद्धु ५ वर्षांचा असताना आपण दुसरीकडे रहात होतो - इथुन एक मैलावर. तिथे त्याला विंचु चावला होता. तो किंचाळला म्हणुन आम्ही पळत लिव्हिंग रुम मध्ये आलो तर कुठे काही दिसेना. आम्हाला कळेना काय चावले. सिद्धुला विचारले तर त्याने नांगीसारखा बोटाचा आकार करुन दाखवला. मग काय आम्ही सगळी खोली पालथी घातली. तरी दिसेना. बाहेर गेला की काय? शेवटी मी कोच पालथा केला. तर स्वारी सोफ्याच्या खालच्या भागाला बिलगुन अशी बसली होती की काही केलेच नाही. त्याचा समाचार घेतल्यानंतर ९११ ला फोन केला आणि सांगीतले की मुलाला विंचु चावला आहे तर काय करायचे. तर त्यांनी विचारले "विंचवाचा रंग काय होता - पिवळसर की काळा?". म्हटले - "पिवळसर". "मग काळजीचे कारण नाही" - ९११. पिवळसर विंचु अ‍ॅरिझोनामध्ये चिक्कार. त्यांना बार्क विंचु म्हणतात. ते प्राणघातक नसतात. परंतु दंश केला तर दाह होतो. त्यामुळे फक्त साबणाने धुतले आणि बर्फाने चोळले तर थोडे बरे वाटते. सिद्धु तसा मुळचाच सोशिक असल्यामुळे तसा नाही रडला खुप.
असो तर त्या अनुभवामुळे आईने मला एका पेस्ट कंट्रोल वाल्याकडे पिटाळले. त्याने शंभर पद्धतीची औषधे आणि ती फवारण्याची यंत्रे दाखवली. मी सगळे एकदम ऑल क्लिअर आहे असे त्याला सांगीतले पण मला हे अमेरिकेतील डिआयवाय इथे करायला आवडले नसते. डिआयवाय म्हणजे "डू-इट-युवरसेल्फ". म्हणजे स्वावलंबन! मी त्याच्या दुकानातुन पळ काढायला लागलो तर तो म्हणाला, "मागच्या आठवड्यात एक बाई तिच्या भावाच्या घरी गेली. तिचे लहान मुल त्या घराच्या पुढ्यात खेळत असताना त्याला विंचु चावला. तर त्याला हेलिकॉप्टरने इथल्या हॉस्पिटलमध्ये आणले. १५ दिवस ते बाळ जायबंदी झाले होते. आता हळुहळु बरे होते आहे. परंतु आई वडिलांवर आता दीड लाख डॉलर्सचे कर्ज झाले आहे!". "तुमच्या बायकोला अजिबात सांगु नका" - हे सांगायला विसरला नाही.
परंतु विंचु-कन्ट्रोल ही माझी खासियत नसल्यामुळे त्याच्या विक्रीकौशल्याचा उपयोग झाला नाही आणि अखेर इको-फर्स्ट नावाच्या कंपनीला आपण वर्षभराचे पैसे देऊन आपल्या घरात आणि आवारात विंचुविरोधक औषधे मारुन घेतली.
अर्थात त्याच्या आधी एका दुकानातुन बरीचसे स्प्रेज, औषधे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ब्लॅकलाईट म्हणजे अतिनील किरणांचा (युव्ही रेज) टॉर्च आणला. अंधारात विंचवांवर ब्लॅकलाईट चा प्रकाश पडला तर अगदी किरणोत्सर्ग करत असल्यासारखे विंचु चमकु लागतात. "विंचु असेल तर दिसणार नाही असे होणारच नाही" इति लोज मधला विक्रेता! अर्थात त्याचा पडताळा घेण्यासाठी आम्हाला फार काळ जावा लागलाच नाही. दोन-चार दिवसातच अगदी हॉलमधल्या भिंतीवर विंचु दिसला. त्याला मारता मारता तो खाली पडला आणि सोफ्याच्या खाली जाऊन लपला. सिद्धोबाच्या अनुभवानंतर आम्ही सुपर स्मार्ट झालो असल्यामुळे विंचोबांना सोफ्याखाली हेरले आणि ठेचले. ब्लॅकलाईट झिंदाबाद.
एकंदरीतच अ‍ॅरिझोनामध्ये विंचु भरपुर आहेत. आणि उन्हाळ्यात ते थंड जागेच्या शोधात घरात येण्याचा प्रयत्न करतात. दरवाजे खिडक्या कुठेही थोडी जरी फट असेल तरीही त्यांना पुरते. १/१६ इंच फटीतुनदेखील ते आपले शरीर सपाट करुन आत प्रवेश करु शकतात. दुसरे म्हणजे कुठल्याही सांदीसपाटीत असे काही दुमडुन बसतात की वाटावे की पाला पाचोळा पडला आहे. तिसरे म्हणजे अगदी दिसले तरी कळत नाही की जिवंत आहे असे वाटतच नाही. माझ्या घरातल्या ऑफिसमध्ये बरेच विंचु सापडले. माझ्यापासुन दोन फुटावर मी तास दोन तास फोनवर बोलतोय आणि हे महाशय खाली जमीनीवर झोपा काढताहेत. शेवटी कधी तरी माझे लक्ष गेले.
असो.. परंतु असे तिसऱ्यांदा घडल्यावर आता मात्र इको-फर्स्ट च्या लोकांना घराच्या आतुन बाहेरुन रसायने आणि औषधे यांचा अगदी सडा टाकला आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो खरे .... परंतु ही निश्चंती काही तासच टिकली. आज सकाळीच छतावर एक इंचाचे विंचवाचे पिल्लु सापडले! तीच जागा राहिली होती म्हणा! तिथेदेखील आता विंचु सापडल्यामुळे आता झोप लागणे कठीण आहे!

Monday, July 25, 2011

पुन्हा हवाई - भाग ३ (कवाईचे हिन्दु मंदिर)

आपण सुर्यास्त पाहताना पिअर वर भेटलेल्या "सिसिलिअन" बाईने आपल्याला हिन्दु टेम्पल ऑफ कवाईला जरुर भेट द्यावी असा सल्ला दिला. आपण तिथे जाणार होतोच. परंतु तिच्या सल्ल्यामुळे निश्चय अजुनच पक्का झाला. देवळानंतर बोटीने कवाई च्या बेटाला फेरा मारण्याचा बेत होता. आपण कवाईच्या बेटाला रस्त्याने पूर्ण वळसा घातला होता. परंतु मोठमोठ्या पर्वतांमुळे कवाई पाहताना जर संपुर्ण बेटाचे सौंदर्य न्याहाळायचे असेल तर रस्त्याने, आकाशातुन तसेच समुद्रातुन पाहणे आवश्यक आहे. त्याशिवाय कवाईचा अनुभव पूर्ण होत नाही.  बोटीची सफर आरक्षित करण्यासाठी फोन केला तर लक्षात आले की ना-पाली किनाऱ्याजवळचा समुद्र इतका उधाणलेला असतो की पाच वर्षाखालील मुलांना बोटीवर घेऊन जाण्यास मनाई आहे. मग विचार केला की आकाशातुन हेलिकॉप्टर ची सफर करायची तर कमीत कमी दर डोई २५० डॉलर्स मोजावे लागणार होते. शेवटी छोट्या विमानाचे दर योग्य म्हणजे १२५ डॉलर्स आणि दादाला शंभर आणि तुला चकटफु होते. विमानाची सफर आरक्षित केली. खरेतर कवाई हेलिकॉप्टरनेच बघायची इच्छा होती कारण हेलिकॉप्टर हे कमी उंचीवर आणि कड्याकपारींच्या अगदी जवळ जाऊन स्थिर राहु शकते. परंतु अगदिच काही न पाहण्यापेक्षा बरे असे समजुन विमानाने जाण्याचे ठरले.

त्या दिवशी अगदी लवकरच होटेल सोडले. देऊळ आणि विमानसफर ही दोन्ही आकर्षणे लिहुई विमानतळाजवळच होती. परंतु मध्ये कापा या गावामध्ये ट्रॅफिक जॅम मध्ये बराच वेळा जातो. देवळात जाण्याचा रस्ता खूपच मोहक होता. देऊळही खुपच सुंदर वातावरणात वसलेले आहे. देवळात प्रवेश करण्याआधी जर कोणीही आखुड कपडे घातले असतील तर प्रथम लुंगीसारखे "सरॉन्ग" नावाचे वस्त्र नेसावे लागते. हे देऊळ खरेतर नुसते देऊळ नाही तर एक मठ आहे. त्याचे नावच मुळी "कवाईज हिन्दु मोनॅस्टरी" असे आहे. एकनाथांनी जरिही मठांवर कडकडित टीका केली असली तरीही परदेशातील हा मठ बघुन बरे वाटले कारण कुठेतरी धर्माच्या रक्षणासाठी संरचना शिस्त आणि कर्मठपणा आवश्यकदेखील आहे (इति बाबा!).
कवाईचे हे देऊळ अगदि पारंपारिक दक्षिण भारतिय तमीळ शैव परंपरेतील आहे. या देवळाची स्थापना गुरुदेव (गुरुडेव - इति मठातिल अमेरिकन रहिवासी) शिवाय सुब्रह्मण्यस्वामी यांनी केली. गुरुदेव जन्माने आणि वर्णाने श्वेतवर्णीय असुनदेखील वयाच्या वीसाव्या वर्षी, १९४७ साली, श्री लंका आणि भारतामध्ये हिन्दु धर्माचा अभ्यास करण्यासाठी गेले. पुढे दोन वर्षांनी सिद्धयोगी आणि शिवभक्त ज्ञानगुरु योगस्वामी (श्री लंका) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संन्यास घेतला. पाश्चीमात्य देशांमध्ये हिंदु धर्माचा प्रसार करण्यासाठी गुरुदेव अमेरिकेला परतले.
मंदिर आणि मठासाठी शांत निसर्गरम्य जागेच्या शोधात गुरुदेव माऊईला पोहोचले. परंतु तिथे होटेल्समध्ये जागा नसल्यामुळे, ते कवाईला आले. इथे फिरत असताना सध्याची ४५८ एकर जागा त्यांच्या दृष्टीस पडली. शिष्याला सांगुन त्यांनी जागेच्या मालकाला जागाविक्रीसंदर्भात अपेक्षित मोबदला विचारले असता मालकाने जागा विकायला नसल्याचे स्पष्ट सांगीतले. गुरुदेवांना देवळासाठी हीच जागा योग्य वाटल्याने त्यांनी पुन्हा शिष्याकरवी एक ठरावीक रक्कम मोबदला म्हणुन देऊ करुन ही जागा विकत घेण्याची इच्छा प्रकट केली. शिष्य परत जागामालकाकडे जायला कचरला परंतु गुरुदेवांना नाही कसे म्हणायचे म्हणुन परत गेला. थोड्या दिवसांनी जागामालकाचे मन आपोआप वळले आणि योग्य मोबदल्यात त्याने ही जागा देवळासाठी दिली.
जागा घेतल्यावर, मग देवळाचे आणि मठाचे सर्व बांधकाम हे बंगळुर्मध्ये तिथला पांढरा ग्रेनाईट वापरुन केले. अजुनही काम चालु आहे. बंगळुर मध्ये तयार केलेले हे भाग समुद्रमार्गे कवाईत आणुन इथे भारतिय कारागिरांनी जोडले आहेत. मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीलाच एक उंच विजयस्तंभ दिसतो. भारतात फक्त जैनांच्या मंदिरांमध्ये आपण तो पाहिलेला. त्या स्तंभानंतर लगेचच एक भव्य नंदी पूर्ण पाषाणातुन घडवलेला. किमान ६ फुट तरी उंच मुर्ती ६ फुट उंचीच्या चौथऱ्यावर विराजमान आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सहा फुट उंचीची ब्रॉन्झची नटराज मुर्ती आणि शिवलिंग आहे. गुरुदेवांनी ५० वर्षांहुन अधिक काळ हिन्दु धर्माच्या सेवेला वाहुन घेतले. ते अतिशय शिस्तबद्ध आणि पारंपारिक गुरु म्हणुन प्रसिद्ध होते. २००१ साली त्यांचे देहावसान झाल्यावर मठाची सुत्रे सद्‍गुरु बोधिनाथ यांच्याकडे आली.

मंदिराचे आवार स्वच्छ, निसर्गरम्य आणि पक्षांच्या किलबिलाटाने गजबजलेले आहे. मठात बहुतेक गोरेच लोक पाहुन आम्हाला गंमत वाटली. ते अगदी मनोभावे या मंदिराची सेवा करताना दिसतात. त्यांचे राहणीमान सुद्धा अगदी साधे आहे. बहुतेक स्त्रीया रंगीबेरंगी साड्या तर पुरुष पांढरी लुंगी नेसुन वावरताना दिसतात. अश्याच एका पांढऱ्या रंगाची साडी नेसलेल्या, कपाळावर काळे गंध लावलेल्या आणि गळ्यात रुद्राक्ष घातलेल्या एका गोऱ्या शालिन तसेच मृदुभाषिक स्त्रीशी ओळख झाली. तिचे नाव चामंडी. अमेरिकन नाव विचारले नाही. वय वर्षे अवघे ८५ परंतु दिसायला ६५-७०ची दिसत होती. ती मुळची कॅलिफोर्निआ ची. भारतात २-३ वेळा नवऱ्यासोबत जाऊन हिन्दु धर्माचा अभ्यास करुन आलेली. तिच्याशी बोलता बोलता कळले की तिला २ मुले आणि ४-५ नातवंडे आहेत. नवरा गेल्यानंतर तिने स्वत:ला या मठासाठी वाहुन घेतले आहे.
मंदिराचा सर्व खर्च देणग्यांतुन किंवा मठात असलेल्या हिन्दु धर्माच्या माहितीप्रकाशनांच्या विक्रीतुनच होतात. मठाची संपूर्ण माहिती घ्यायची असेल आणि तेथील कामकाज पाहायचे असेल तर आरक्षण करावे लागते. अथवा फक्त दर्शनावर समाधान मानावे लागते.
मंदिराचा परिसर बघताना एक-दीड तास कसे गेले ते कळलेच नाही. सर्व मठाची आरक्षित सहल करायला हवी होती अशी हळहळ जरुर वाटली. परंतु बाहेर पडताना मन अगदी प्रसन्न झाले. या गोऱ्या माणसांचे हिन्दु धर्मावरील प्रेम (नव्हे भक्ती) बघुन आनंदही वाटला. तसे पाहिले तर इथे बऱ्याच माणसांचे योगसाधनेवरचे प्रेम पाहिले होते. परंतु मठ उभारणीपासुन ते तन्मयतेने तो चालवत हिन्दु धर्माच्या प्रसारासाठी झटणारे गोरे लोक पाहण्याची ही पहिलीच वेळ!
घड्याळाचा काटा भराभर पुढे सरकत होता. आपल्यालाही विमानाची नियोजित सहल करायची होती त्यामुळे वेळेत विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. आपली गाडी परत एकदा नागमोडी रस्त्याने विमानतळाकडे धावु लागली. मोठमोठे डोंगर व त्यातुन वाहणारे छोटे मोठे धबधबे बघत विमानतळ कधी आला ते समजलेच नाही.

Friday, July 22, 2011

सेव्हन अप, सिएरा मिस्ट आणि १५००० डॉलर्स

सलोनीराणी, तुझी आई सध्या हवाई बद्दल लेख लिहिते आहे. परंतु मध्यंतरी हा अजुन एक लेख .. अर्थात विमानातुनच!

 

परवा एक गंमतीशीर बातमी वाचण्यात आली. कॅनडामध्ये एका माणसाने एका विमान कंपनीवर खटला भरला की त्याने त्यांना सेव्हन अप प्यायला मागीतले आणि त्यांनी सिएरा मिस्ट दिले. न्यायालयाने या माणसाच्या बाजुने निकाल दिला आणि त्याला तब्बल पंधराएक हजार डॉलर्स नुकसान भरपाई दिली आणि वर ७५ सेन्ट्स - सेव्हन अपची किंमत म्हणुन!

 

बातमी वाचुनच मला कळले की हे दिसते तेव्हढे सरळ प्रकरण नाही. बातमी रंजित - अतिरंजित आणि रक्तरंजित करण्यामध्ये सर्वच वर्तमानपत्रे आघाडीवर असतात. भारत काय किंवा अमेरिका काय! परंतु एमबीए करताना न्याय हा एक विषय आम्हाला होता. त्या विषयाचा अभ्यास करताना शिकलो की वर्तमान पत्रात काय लिहिले या वरुन कोणी दोषी किंवा निर्दोषी आहे असे म्हणणे अगदी चुकीचे आहे.

 

त्या वर्गाच्या पहिल्याच तासाला अ‍ॅन लिव्ही या आमच्या शिक्षिकेने असा एक चांगला धडा दिला की तो कधी विसरणार नाही. तिने वर्गातल्यापडद्यावर वेगवेगळे मथळे असलेल्या वर्तमानपत्रातील बातम्या दाखवल्या. मथळे थोडेसे वेगवेगळे परंतु साधारण सारखेच होते. "बाईने आपल्या मांडीवर कॉफी सांडली आणि मॅक्डोनल्डवर खटला भरुन करोडो डॉलर्स उकळले". बातमी वाचुन ९०% माणसे म्हणतील अमेरिकेत कोण कोणावर कशाहीबद्दल खटला भरतात आणि न्यायालयांनी पण अक्कल गहाण टाकली आहे. काही निकाल लावतात. आमच्या शिक्षिकेने आम्हाला विचारले की किती लोकांना ही बातमी वाचुन असे वाटते आहे की त्या बाईला भरपाई मिळायला हवी? काही लोकांनी हात वर केले. तिने पुन्हा विचारले, "किती लोकांना वाटते की न्यायालयाची अक्कल चरायला गेली आहे!" - उरलेल्या लोकांनी हात वर केले. त्यावर ती म्हणाली "दोन्ही उत्तरे योग्य नाहीत. अशी वर्तमान पत्रातील बातमी वाचुन काहीच सांगता येणे कठीण आहे. त्यासाठीच न्यायालयाच्या पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने पुराव्याने दोष सिद्द केला गेला पाहिजे. तेव्हा खरी घडलेली गोष्ट अशी होती.

 

एक ७०-७५ वर्षाची वृद्ध स्त्री मॅक्डोनल्डच्या ड्राईव्हथ्रु मध्ये आली. तिने कॉफी मागीतली. मॅक्डोनल्डच्या कर्मचाऱ्याने कॉफी दिल्यावर तिने तो कप दोन पायांच्या मध्ये ठेवला आणि पैसे काढु लागली. वृद्ध असल्यामुळे शरीराला कंप होता आणि तो कप तिच्या दोन पायांच्या मध्ये लवंडला. कॉफीचे तपमान १६५ अंश फॅरेनहाईट होते. त्यामुळे त्या स्त्रीच्या कमरेपासुन मांडीपर्यंत थर्ड डिग्री बर्न्स झाले. थंडी असल्यामुळे आणि वृद्ध असल्यामुळे त्या स्त्रीने थर्मल्स घातले होते. त्या थर्मल्समध्ये ती सगळी कॉफी शोषली गेली आणि त्यामुळे कोणाला काही कळेपर्यंत आणि ते थर्मल्स काढेपर्यंत चांगलाच उशीर झाला. तोपर्यंत त्या उष्णतेने तिला अजुनच भाजत राहिले आणि पुढे ती वृद्धा उरलेल्या आयुष्यासाठी अपंग झाली.

 

मग यात मॅक्डोनल्डचा दोष कसा काय? तर मॅक्डोनल्डला कॉफी एका विशिष्ट तपमानाला विकण्याची अनुमती होती. परंतु सरकारी नियम धुडकावुन लाऊन मॅक्डोनल्ड कॉफी १५-२० अंश जास्त गरम विकत असे. असे करण्याचे कारण म्हणजे कॉफी जास्त काळ गरम राहते आणि ग्राहक तिचा जास्त काळ आस्वाद घेऊ शकतात. आणि अर्थातच म्हणुन लोक मॅक्डोनल्ड कॉफी विकत घेतील. न्यायालयाने नियम धुडकावल्याबद्दल आणि त्या वृद्धेला झालेल्या वेगनांबद्दल मॅक्डोनल्डला दोषी ठरवले. आणि त्या वृद्धेला शारीरीक आणि मानसीक आणि आर्थिक नुकसानभरपाईखातर मॅक्डोनल्डला मोठा दंड ठोठावला. इतकेच नाही तर शिक्षात्मक (प्युनिटिव्ह) दंड त्याच्या कित्येक पट ठोठावला.

 

हे सगळे ऐकुन आम्ही सर्व थक्कच झाले. माझे तर डोळेच उघडले. त्यामुळे मी आता कुठलीही बातमी वाचुन कधीच कोणाला दोषी किंवा निर्दोषी ठरवत नाही.

 

असो ... तर मग या कॅनडाच्या माणसाचे काय झाले? तर त्याचे असे झाले की तो माणुस होता फ्रेंच. कॅनडा हा देश इंग्रज आणि फ्रेंच लोकांचा देश आहे. दोन्ही भाषा आणि संस्कृतीचा प्रभाव आहे आणि मराठी कानडी लोकांपेक्षा जास्त कुरबुर चालते तिथे. केबेक नावाच्या प्रांतात फ्रेंच लोक जास्त आहेत. त्यांनी निवडणुक घेतली की कॅनडापासुन वेगळे व्ह्यायचे की नाही. अगदी अर्ध्या टक्क्याने की काय परंतु केबेक कॅनडापासुन वेगळे होता होता वाचले. परंतु तरीही फ्रेंच लोकांमध्ये अतिशय असंतोष आहे. तर या माणसाचे म्हणणे असे की त्याने फ्रेंच भाषेतुन त्या विमान सुंदरीला सेव्हन अप मागीतले. तिने कळलेन कळल्यासारखे करुन त्याला सिएरा मिस्ट दिले. इतकेच नाही तर संपुर्ण विमानप्रवासातच त्या विमान कंपनीशी फ्रेंच भाषेत त्याला व्यवहार करणे अगदी अवघड झाले होते. कोणत्याही सूचना, पाट्या फ्रेंच भाषेत नव्हत्या. त्याव्यतिरिक्त  त्याला टोरोंटो आणि अन्य शहरामध्ये देखील सगळीकडे वाईट अनुभव आले. इंग्लिश बोलल्याशिवाय त्याला कुठेही कामे करता आली नाहीत आणि वर उपेक्षेची वागणुक मिळाली. कॅनडामध्ये बरेच फ्रेंच लोक असल्यामुळे त्यांना फ्रेंच भाषेतुन सेवा उपलब्ध करुन द्यायला हव्यात असे त्याचे म्हणणे न्यायालला पटले. आणि त्याची मानसीक, सांस्कृतिक आणि भाषिक हानी केल्याबद्दल न्यायालयाने विमान कंपनीला १०-१५००० डॉलर्सचा दंड ठोठावला.

 

अर्थात त्यावर इंग्रज मंडळींनी अतिशय मार्मिक टीका केली हे सांगणे न लगे. साहेबामध्ये काही फार मोठे गुण आहेत. साहेबाची जात अतिशय संयमी आणि मार्मिक आहे. तोल ढळणे हे इंग्लिश माणसाचे लक्षण नाही. त्याउलट मराठी माणुस काही झाले की एकदम रस्त्यावर. त्यामुळे पाट्या मराठीत असाव्यात अशी साधी मागणी देखील मान्य होत नाही. आणि आपला आवेश हा आवेश कमी आणि अभिनिवेशच जास्त असतो. खरोखरीच माणुस आग्रही असेल कशाच्याबाबत तर तो आग्रह साध्या साध्या गोष्टींतुन दिसतो. अमेरिकेत मारे गणेशोत्सव आणि गौरी आणि काय काय साजरे करायचे आणि सकाळमध्ये त्याचे भारंभार लेख लिहायचे. आणि सगळ्यांचे मथळे अगदी ठरावीक - "पॅरिसमध्ये दिवाळी साजरी" "पीट्सबर्गमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष" - "सिडनीमध्ये .... ". आणि ९०% लोकांच्या पोरांना धड मराठी बोलता येत नाही. असो .. टीका करण्याची गरज नाही. परंतु सगळ्या समाजालाच एक जो पीळ असायला हवा तो कमी पड्तो आणि मग आपण रडत बसतो की आमच्या संस्कृतीवर आणि भाषेवर आक्रमण होते आहे. आम्हीच आमच्या भाषेचा आग्रह धरला नाही तर काय दुसऱ्यांनी धरायचा!

 

असो त्यावरुन आठवले. सिद्धोबा आजकाल मराठी अक्षरे गिरवतो आहे. मराठी बोलता चांगले असल्यामुळे स्वारी लिहायला पटकन शिकेल असे वाटते आहे. ... पुरे आता इथेच थांबतो.

 

 

Friday, July 15, 2011

पुन्हा हवाई - भाग २

दुसऱ्या दिवशी आपण सगळे जरा निवांतच उठलो. ब्रेकफास्ट झाल्यावर तू आणि दादा पोहायला गेलात. तोपर्यंत मी स्वैपाक करुन ठेवला. हो.... स्वैपाकच! कारण आपण १ बेडरुम आणि किचन असा स्वीट घेतला होता. कुठेही फिरायला जातानादेखील पोटाची काळजी घ्यावीच लागते. नाहीतर कितीही आव आणला तरीही निसर्ग बघुन मन भरेल पण पोट नाही. कवाईत अतिशय महागाई आहे. त्यातुन आपण जिथे राहिलो ते प्रिन्सव्हिल अगदि सुंदर, ना-पाली किनाऱ्याजवळचा सधन लोकवस्तीचा भाग होता. त्यामुळे महागाई भयंकर. दीड डॉलर्सला एक बटाटा, ६.५ डॉलर्स ला दुध. ४ डॉलर्सला एक ब्रेड इत्यादि इत्यादि ..... असो....

मी फिनिक्सवरुनच भाजी साठी लागणाऱ्या गोष्टी - नान आणि खिचडीचे सामान आणले होते. त्यामुळे आपल्याला एव्हढा त्रास झाला नाही. जेवण करुन थोडी विश्रांती घेऊन काय पाह्यचे याचे संयोजन केले. तसा आधी रिसर्च केला होताच परंतु मग वाटले की सरळ स्थानिक माणसांनाच विचारले तर? हॉटेलच्या कॉन्सिअर्ज मधुन माहिती घेऊन बाहेर पडेपर्यंत दिवस संपत आल्यामुळे जवळच "हाना-ले बे"वर सुर्यास्त बघायचे ठरले. दहा मिनिटात तिथे पोहोचलो. सुर्यास्ताची वेळ झाली होतीच. नुकतीच पावसाची एक सर येउन गेली होती. लगबगीने पिअर(पाण्याच्या आत १०० एक मीटर पर्यत बांधलेला लाकडी पूल आणि त्याच्या शेवटी असलेला चौथरा) कडे जायला लागलो. तर एक गोरी बाई म्हणाली, "मागे पाहिलेस का? दुहेरी इन्द्रधनुष्य दिसतंय!" आम्ही पहिल्यांदाच असे इन्द्रधनुष्य बघत असल्यामुळे मी त्याबद्दल तिला कुतुहलाने विचारले. त्यावर ती म्हणाली की इथे बऱ्याचदा असे  पूर्ण क्षितिजाला व्यापुन टाकणारे दुहेरी इंद्रधनुष्य दिसते. कधी कधी तर तिहेरीही दिसते! अश्याच गप्पा मारत असताना आम्ही फिनिक्स वरुन आलो आहोत हे कळल्यावर ती आम्हाला सांगु लागली,"मीही तिथुनच आले आहे." मग कळले की ही बाई अभियांत्रिकीची पदवी घेऊन इंटेल मध्ये काम करत होती. तरुणपणीच कवाईला २० व्यावर्षी फिरायला म्हणुन आली आणि कवाईच्या प्रेमातच पडली आणि इथेच स्थाईक झाली. आता एका शाळेमध्ये (हाय स्कुल) विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवते. गप्पा मारता मारता तिने विचारले आम्ही मुळचे कुठुन आलो. भारतीय म्हणल्यावर ती म्हणाली की मी कल्पना करु शकते की पालक म्हणुन तुम्हाला काय आव्हानांना  सामोरे जावे लागत असेल. माझे आईवडिलदेखील तुमच्यासारखेच मला घेऊन अमेरिकेला आले. त्यांना त्यांच्या सिसिलिअन संस्कृतीचा अतिशय अभिमान होता. त्यामुळे मी जसजसी मोठी होत गेले आणि अमेरिकन मुला मुलींसारखी वागु लागले तेव्हा माझे वडिल चिडुन मला म्हणत, "ओह.... यु अमेरिकन...." त्यांना वाटे की मी सिसिलिअन पद्धतीनेच वागावे. तिचे हे बोलणे ऐकुन आम्ही म्हणालो, "सिसिलि म्हणजे इटली ना?". त्यावर आपला सात्वीक संताप आवरत ती म्हणाली "नाही. सिसिली मागची फक्त १००-१५० वर्षे इटलीचा भाग आहे. परंतु खरेतर सिसिली वेगळा आहे." आम्ही कपाळावर हात मारला आणि मनात हसु फुटले. शेवटी माणसे इथुन तिथुन सारखीच!

अश्याच थोड्याफार गप्पा होई पर्यंत आता चांगलाच अंधार झाला होता. त्यामुळे आपण होटेल वर परतलो.

आत्तापर्यंत माऊई चेच सौंदर्य सरस वाटत होते. परंतु आज फिरल्यावर लक्षात आले की कवाई देखील तितकेच सुंदर आहे. तशी दोन्हीची तुलना करणे योग्य नाही कारण माऊई हे बऱ्यापैकी सपाट, सरळ रस्ते असलेले, उसाच्या शेतीने बहरलेले बेट आहे. तर कवाई म्हणजे मोठमोठे पर्वत, नागमोडी रस्त्यांचे, नारळाच्या बनांनी नटलेले बेट आहे. दोन्हींचे सौंदर्य तितकेच मोहक आहे.

तिसऱ्या दिवशी आपण पॅसिफिकमधील ग्रॅण्ड कॅनिअन म्हणुन प्रसिद्ध असणाऱ्या वायमेया कॅनिअन ला गेलो. आपण रहात असलेल्या ठिकाणापासुन ही कॅनिअन अतिशय जवळ आहे. परंतु उत्तरेला रस्ता थांबतो कारण ना-पाली किनाऱ्यावर २-४ ह्जार फुट उंचीचे डोंगर थेट अगदी समुद्रालाच भिडतात. कॅनिअन त्या डोंगरांच्या एका बाजुला आणि प्रिन्सव्हिल दुसऱ्या बाजुला असल्यामुळे संपुर्ण बेटाला वळसा घालुन जावे लागते. रस्ता अतिशय वळणावळणाचा असल्यामुळे कॅनिअन ला पोहोचेपर्यंत तुम्ही दोघे अगदी कंटाळुन गेला होता. कॅनिअनला पोहोचल्यावर तुम्ही दोघे कोंबड्यांच्या मागे पळण्यातच गुंग होता. अरे हो ... कवाईला रूस्टर कंट्री असे देखील म्हणतात. कारण जागोजागी कोंबडे सगळ्या कुटुंबासह फिरताना दिसतात. कधीतरी कुठल्यातरी वादळानंतर इथे कोंबड्या आल्या म्हणे आणि त्यानंतर त्यांची संख्या वाढतच गेली म्हणे!

कॅनिअन १६ किलोमीटर लांब आणि 3600 फुट खोल आहे. कॅनिअन सुंदरच आहे परंतु आपण ग्रॅण्ड कॅनिअन ३०-४० वेळा तरी पाहिल्यामुळे आपण काही वायमेया बघुन प्रभावित झालो नाही. ग्रॅण्ड कॅनिअन ४० मैल रुंद, १ मैल खोल आणि ३०० मैल लांब आहे!

वायमेया कॅनिअन मधे बरेचसे हायकिंग ट्रेल्स आहेत. कदाचित ते करता आले असते तर जास्त मजा आली असती. परंतु तुला घेऊन ते शक्य नव्हते म्हणुन मग फक्त १/२ - ३/४ मैल ना-पाली किनाऱ्याच्या कडेकडेने डोंगरपठारावरचा एक ट्रेल केला. परत कारकडे येता येता वाटेत माउण्ट वाई-आले-आले पर्वतावर फोटो काढला. ही जागा जगातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक म्हणुन प्रसिद्ध आहे. पॅसिफिक समुद्रातुन पाण्याची वाफ आणि त्याचे ढग होऊन या डोंगरांच्या फनेलसारख्या आकारामुळे इथे येउन बरोबर थंड होतात आणि रोज दुपारी पाऊस पडतो. स्थानिक पर्यटन विभाग जरीही जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणुन या जागेचा प्रचार करत असले तरीही गिनिज बुक मध्ये नोंद झालेली पहिली दोन ठिकाणे भारतात मेघालयात आहेत. माऊण्ट वाई-आले-आले हा कवाईतील  दुसऱ्या क्रमांकावरील उंच पर्वत असुन १९१२ पासुन इथे ६८३ इंच इतका सरासरी पाऊस झाला आहे. चेरापुंजी आणि इथल्या पावसातला फरक म्हणजे इथला पाऊस रोज पडतो परंतु चेरापुंजीचा पाऊस ऋतुकाळानुसारच पडतो.

कॅनिअन बघुन परत होटेल वर पोहोचेपर्यंत रात्र झाली. दुसऱ्या दिवशी काय बघायचे याचे नियोजन करुन उरलेला वेळ आपण होटेल वरच घालवला.


Saturday, July 2, 2011

पुन्हा हवाई - भाग १

सलोनीराणी,





दादाच्या स्प्रिंगब्रेक मध्ये १४ मार्च ते २१ मार्च आपण हवाईला जाऊन आलो. बाबा नुकताच भारतात कामानिमित्त जाऊन आल्यामुळे डिसेंबरमध्ये कुठेही जाता आले नव्हते. त्यामुळे एक चांगली सहल करण्याचे ठरले. अजुनही कित्येक वर्षे ठरवुन देखील "यलोस्टोन नॅशनल पार्क" किंवा माऊण्ट रशमोर चा योग जुळुन आला नाही आहे. या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी हिवाळा योग्य ऋतु नसल्यामुळे शेवटी परत एकदा हवाईलाच जाण्याचे ठरले. मागच्यावेळी हवाईला (माऊईला) गेलो तेव्हा वाटले की अजुन ३-५ दिवस तरी राहायला हवे होते. हवाईसारख्या निसर्गरम्य ठिकाणी कुठेही गेले तरीही निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्यासाठी निवांतपणा हवाच. याचा प्रत्यय कोलोरॅडो आणि अलास्का सहलींमध्ये आलाच होता. त्यामुळे यावेळी ७ दिवस तरी जायचे ठरले. पैकी कवाई बेटावर ५ दिवस आणि हनलुलु आणि आणि बिग आयलंड वर प्रत्येकी १ आणि २ दिवस रहायचे ठरले.

प्रथम फिनिक्स वरुन आपण कोना या बिग आयलंडवरच्या विमानतळावर पोहोचलो. सहा तासांचा प्रवास असला तरीही हवाई ३ तास मागे असल्यामुळे तो दिवस वाया जाणार नव्हता. बिग आयलंड हे हवाईचे सर्वात मोठे बेट आहे. साधारणत: ६०-७० मैल रुंद असे हे बेट आहे. विमानतळावर उतरताना आजुबाजुला लाव्हारसामुळे करपलेले डोंगर पाहुन क्षणभर निराशाच झाली. परंतु ब बिग आयलंडचे तेच आकर्षण आहे. इथे जिवंत ज्वालामुखी आहे. असो .. परंतु ते परतीच्या प्रवासात पहाणार होतो.

विमानतळही अगदीच लहान होता. पुढचे विमान माऊई आणि तेथुन थेट कवाईचे होते. तोपर्यंत दुसऱ्या विमानाची वाट पहात थांबलो. शेवटी थोडे उशीरा परंतु आयलंड एअर चे छोटेसे विमान आले. कोना ते कवाई (लिहुई - विमानतळ) हे अंतर विमानाने जेमतेम दीड तास होते ... तेदेखील माऊईचा स्टॉप धरुन. विमान इतके छोटे होते की आम्हाला विमानात सगळीकडे वजन सारखे व्हावे अश्या पद्धतिने बसवले. इंजिन्सदेखील पंख्याची होती. विमान हवेत गेल्यावर हवाईच्या हवाई सुंदरीने खास पेरुचा रस आणि खोबऱ्याची कॉफी देऊन आमचे स्वागत केले. त्यांचा आस्वाद घेता घेता ती हवाईची माहिती देऊ लागली ते आम्ही ऐकु लागलो.

पहिल्यांदा काहुलावे बेटाबद्दल ती म्हणाली "हे बेट निर्मनुष्य आहे कारण दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने सैन्याच्या दारुगोळा प्रशिक्षणासाठी याचा वापर केला. ताज्या पाण्याच्या कमतरतेमुळे या बेटावर तशीही कमीच लोकवस्ती होती इथे. त्यामुळे हे बेट तसेही क्षेपणास्त्र चाचणी साठी चांगले होते. १९९० पासुन अनेक निदर्शनांनंतर लाइव्ह फायर ट्रेनिंग वर बंदी आणण्यात आली. परंतु एव्हाना हे बेट मनुष्यवस्ती साठी उपयुक्त राहिले नाही."

असे म्हणत असतानाच उजवीकडे मोलोकिनी नावाचे समुद्र विवर दिसले. चंद्रकोरीसारखे हे विवर खरोखरीच सुंदर आहे. इथे समुद्र अतिशय शांत असल्यामुळे बरेच प्रवासी माऊईहुन बोटीने येऊन स्नोर्केलिंग स्कुबा डायव्हिंग करतात आणि समुद्री जीवन अगदी जवळुन पाहतात.

पाहता पाहता माऊई दिसु लागले. असे वाटले की कालच इथे येऊन गेलो आहोत. माऊईवर विमान क्षणभर उतरले ... आणि तिथल्या प्रवाश्यांना घेऊन अर्ध्या तासाच्या आत आम्ही कवाई कडे प्रयाण केले. वीस मिनिटांच्या अंतरावर डावीकडे प्रथम लनाई बेट दिसले. लनाई हे हवाईमधील अगदीच अनटच्ड बेट असल्यामुळे इथे खुपच महागडी रिसॉर्ट्स आहेत की जी अतिश्रीमंतांनाच परवडतात. इथली लोकसंख्या जेमतेम ७  हजार आहे आणि हवाईची मुळ संस्कृती इथे टिकुन आहे - इति हवाई सुंदरी! अरे हो ... आणि इथेच डोल कंपनीची अननसाची भलीमोठी शेती देखील आहे.

लनाईनंतर उजवीकडे लगेच मोलोकाई देखील होते परंतु दिसले नाही. मोलोकाईवर हवाईमधील एका वसाहतीमध्ये पूर्वी वेगळे केलेल्या कुष्ठरोग्यांना ठेवले जाई. अजुनही इथे सात कुष्ठरोगी आहेत. वर्षातुन फक्त एकदाच त्यांना वर्षभर पुरतील अश्या जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा केला जातो.

थोडे पुढे गेले तर परत उजवीकडे ओवाहु बेट दिसले. हनलुलु हे शहर ओवाहु बेटावरील मुख्य शहर आहे. हनलुलु ही अमेरिकेच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांचे जन्मगाव ही हवाईची राजधानी आहे. ९५% लोकसंख्या इथेच आहे. असो परंतु इथे आपली गाडी अजुन ६ दिवसांनी येणार आहेच. त्यामुळे त्याबद्दल नंतर...

अजुन वीस मिनिटात कवाईला पोहोचलो देखील. कवाईला उतरण्याआधी वायव्य दिशेला (उत्तर-पश्चिम) नि-हाऊ हे बेट दिसले. हे बेट पर्जन्यछायेत असल्यामुळे इथले लोक १८ व्या शतकात कवाईला स्थलांतरीत झाले. त्यानंतर सिनक्लेअर आणि आज रॉबिन्सन कुटुंबिय इथे रहातात.  ते आणि अमेरिकन सैनिकतळ मिळुन १३० लोक असावेत.

लिहुई विमानतळावर उतरल्यावर भाड्याची कार घेऊन होटेलवर जाऊ लागलो. आपण कवाईच्या उत्तर भागात प्रिन्सव्हिल मध्ये राह्यचे नक्की केले होते. लिहुई दक्षिणेला असुन तिथे रोज पाऊस पडतोच असे नाही. परंतु कवाईच्या उत्तर भागात रोजच पाऊस पडत असल्यामुळे इथे अगदी हिरवेगार असते. संपुर्ण बेटावर एकच मुख्य रस्ता असल्यामुळे चुकण्याचा प्रश्नच नव्हता. ४० मिनिटात होटेलवर पोहोचलो. एव्हाना सुर्यास्त झाला होता. आपण सगळे कंटाळलो असल्यामुळे जेवण करुन झोपी गेलो.


Sunday, June 12, 2011

आमचेही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग

दोन आठवड्यांपूर्वी ओडिसीचे ऑइल बदलले. दुकानाचे नाव मायडास! तर या मच्छराने गाडीला अगदी घरघर लागली आहे असे निदान केले. सगळे टायर्स बदला, व्हील अलाइनमेंट करा. टायमिंग बेल्ट बदला. पावरस्टिअरिंग आणि पावरट्रेन फ्लश करा आणि नवीन ऑइल टाका. हे म्हणजे घंटी सोडुन सायकलचे सगळे पार्ट्स वाजताहेत असे निदान होते. सगळे केले असते तर दोन हजार एक डॉलर्स चा खर्च. यापैकी वस्तु ५०० डॉलर्स आणि मजुरी १५०० असली असती. त्यामुळे एक घरगुती मेकॅनीक गाठला. डेव्हिड बाक्केन त्याचे नाव. म्हटले किती घेणार? तर एकंदरीत वाजवी दर सांगीतल्यामुळे मी हो म्हटले.

त्यानुसार आज सकाळी त्याच्या घरी गेलो. अमेरिकेत अर्थातच सगळ्यांकडे कार असल्यामुळे सगळ्यांकडे गराज (गॅरेज) असते. हे अमेरिकेत उच्चार थोडे वेगळे असतात. भारतात ब्रिटिश इंग्लिश वापरतात. त्याचे देखील आता भारतीयकरण झाले आहे. अमेरिकेचे असेच आहे. त्यांनी साहेबाला शहारा येईल असे बऱ्याच शब्दांचे केले आहे. आणि केवळ उच्चारच नाही तर आख्खे शब्दच नवीन शोधुन काढतात. उदाहरणार्थ ... मॉर्निंग च्या ऐवजी डे ब्रेक, फुटपाथ च्या ऐवजी साईडवॉक, सिग्नलच्या ऐवजी लाइट्स. इतकेच नाही तर इंग्रजांच्या अगदी उलटे करायचा कटाक्ष दिसतो. गाडी उजवीकडे चालवणे, व्होल्टेज ११०, प्लग पिन्स विचित्र काढणे, सैन्याच्या रॅन्क इंग्रजांपेक्षा उलट्या करणे, सैनिकी सल्युट देखिल उलटा. दरवाजे बाहेर उघडणारे. या सर्व गोष्टींमध्ये व्यावहारीक सोय आहे. परंतु ५०% इंग्रजद्वेष नक्कीच आहे. असो ....

तर अमेरिकेत सगळ्यांकडेच गराज असते आणि ते सुसज्ज असते. सहसा घरात बाहेर लागणारी सर्व आयुधे तिथे असतात. स्क्रु ड्रायव्हर पासुन रेंच आणि पावर ड्रिल पर्यंत आणि खुरप्यापासुन लॉन मोअर (गवत कापायचे मशिन) ... सगळे काही असते. अमेरिकन पुरुषमंडळी दर काही वर्षांनी घरात ल्या घरात काही तरी उन्हाळी कामे काढत असतात. नवीन रुम तयार करणे, रंग देणे, कुंपण करणे, फ्लोअरिंग करणे. बऱ्याचदा हे डिआयवाय म्हणजे डू इट योरसेल्फ असे असते कारण इकडे मजुरी खूप जास्त.

डेव्हिडच्या गराजमध्ये असेच ... पाय ठेवायला जागा नाही. परंतु एक कार मावेल एवढी जागा मात्र अर्थात रिकामी ठेवलेली. दुरुस्तीसाठी आलेल्या सर्व गाड्या रस्त्यावर लावलेल्या. गराजमध्ये का कुणास ठाऊक वॉशर सुद्धा होता. बहुधा गराजशी संबंधीत कपडे आणि वस्तु तिथे धुऊन काढल असेल.

त्याच्या घराबाहेरुनच त्याला फोन केला तर गराजचे दार उघडले. गाडीचा टायमिंग बेल्ट बदलणे आणि पावरट्रेन आणि स्टिअरिंग फ्युईड बदलणे असे ठरले होते. त्यानुसार तो तयार होता. किल्ली देऊन परत घरी जायचे कसे अश्या विचारात मी होतो. शेवटी डेव्हिडलाच विनंती केली की मला घरी सोड. तो लगेच तयार झाला. परंतु एका गिऱ्हाईकाची गाडी दुरुस्त झाली नव्हती तेव्हा त्या बाईची वाट पाहु आणि ती आली की तिला गाडी देऊ असे म्हणाला.

दुरुस्त होत नाही म्हणजे काय? - मी
ए सी बिघडला आहे. चालुच होत नाही.  आणि सर्किट बायपास केले तर चालु होतो परंतु १५ मिनिटात बंद होतो! - डेव्हिड.
अगदी वैतागलो आहे. सगळे करुन झाले. माझे डोकेच चालेनासे झाले आहे! - पुन्हा डेव्हिड.
 बायपास केल्यावर ए सी चालु होते हे तुला कसे कळते. - मी
आवाज येतो ना पंख्याचा. आणि त्याच्या आधी क्लिक सुद्धा होते. - डेव्हिड

बहुधा सगळ्या गाड्यांमध्ये दोन पंखे असतात. पहिला पंखा रेडिएटर ला थंड करतो आणि दुसरा पंखा ए सी च्या हीट एक्चेंजला. त्यामुळे तो पंखा चालु असेल तर ए सी चालु असायला हवा (सहसा). परंतु त्यापेक्षादेखील गाडी चालु केली तर ए सी चा एक क्लिक आवाज ऐकु येतो. सांगीतल्याशिवाय कळणार नाही. परंतु मेकॅनिक लोकांना माहित असते. मला सांगीतल्यावर ऐकु आला.

माझे सामान्य ज्ञान नक्कीच वाढले परंतु त्याला प्रश्न काही सुटला नव्हता!

तो आतुन एक पुस्तक घेऊन आला. कुठलेसे पान उघडले. त्यावर सगळे एलेक्ट्रीक च्या रेखाकृती होत्या. मला बीएस्सी फिजिक्स चे दिवस आठवले. तो मला सांगु लागला. ...

रीले चा संदेश जातो आणि सेकंडरी फॅन चालु होतो. हीट एक्सेंज आणि टेंपरेचर कंट्रोल आणि इतर संवेदक (सेन्सर्स) आणि त्यांचे एकमेकांशी असलेले नाते. बाबामहाराजांना तब्बल १८ वर्षांनंतर असले चित्र पाहुन स्फुरण चढले. मी त्याला प्रश्न विचारु लागलो.

या रेषेचा अर्थ काय? कोण कोणाला सिग्नल पाठवतो आहे? पीएमसी काय आहे? रिलेचे काम काय? एक ना दोन.... बीएस्सी (संस्कृत) च्या पहिल्या आणि शेवटच्या वर्षात असताना बापट गुरुजींना मी इतक्या शंका विचारायचो की त्याने माझे नाव शंकासुर ठेवले होते. असो ... परंतु अनेक प्रश्न विचारल्यानंतर माझी खात्री झाली की ए सी चांगला आहे आणि सेन्सर्स देखील त्यांचे काम करत आहेत. त्यामुळे तरीसुद्धा ए सी बंद होत असेल तर जे कोणी ए सी ला बंद व्हायचा संदेश पाठवते आहे तिथेच दोष आहे. आणि ते कोणी म्हणजे पीएमसी आहे. पीएमसी अर्थात पॉवरट्रेन कंट्रोल मॉड्युल (अर्थात एंजिन कंट्रोल मॉड्युल) हे जणु काही सर्व  गाडीच्या एलेक्ट्रीकल सिस्टिमचा मेंदुच म्हणायचा.

त्याच्या आत कसे शिरायचे? तुझे एरर फाईंडिंग मशिन त्याला लावता येते का? - मी.

हे मशिन मेकॅनिक गाडीला लावतात आणि गाडी आपले निदान त्या मशिनला सांगते. आजकालच्या सर्व गाड्यांमध्ये अशी सोय असते ... अगदी भारतातल्या सुद्धा गाड्यांमध्ये अशी गोष्ट असणारच.

नाही.. काहीही एरर कोड येत नाही आहे... - डेव्हिड
 तो कोड पीएमसी कडुनच येणार? - मी
बरोबर - डेव्हिड
 पीएमसी उघडुन बघता येते? - मी
नाही - डेव्हिड
 ओके ... मग पीएमसी च बिघडला आहे. - मी
कसे - डेव्हिड
कारण एसी कम्प्रेसर चांगला आहे. दुसरा पंखा चांगला आहे. सेन्सर्स त्यांचे काम करत आहेत. सर्किट ब्रेक केल्यावर एसी चालु होतो आणि पंधरा मिनिटानंतर कोणीतरी तो बंद करायला सांगतो याचा अर्थ केवळ संदेश चुकीचा आहे. संदेश कुठुन येतो आहे तर पीएमसी. पीएमसी च्या आत आपल्याला जाण्याची सोय नाही. आणि अजुन एक गोष्ट म्हणजे गाडीला एरर फाईंडर लावला तर त्याला पीएमसी सगळे आलबेल आहे असे सांगतो आहे. - मी
 अच्छा! - डेव्हिड
मीसुद्धा त्याच निष्कर्षाप्रत आलो आहे. - डेव्हिड
 गुड! - मी


त्याला पटले होते. पुढे त्याने त्या गाडीच्या मालकीणीला तेच सांगीतले.

त्यानंतर मला घरी सोडवायला येताना मला सांगु लागला की तो इंटेल मध्ये डिझाईन इंजिनिअर होता. मी दचकलोच ... अगदी त्यांच्या दोन धुळ खात पडलेल्या पाट्या/ट्रॉफिज देखील दाखवल्या! आज डेव्हिड एका दुकानात काम करतो. इंटेलमध्ये १२-१५ तास काम करुन करुन अगदी तरुणपणात हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ती नोकरी सोडली किंवा सोडावी लागली. मी विचारले नाही. परंतु अमेरिकेत हे नवीन नाही. लोक एक करीअर सोडुन देऊन पुन्हा आयुष्याची नवीन जुळणी करतात.

बोलता बोलता घरी पोहोचलो. मी डेव्हिड ला म्हणालो, "गरज असेल तरच टायमिंग बेल्ट बदल". "अर्थात" -डेव्हिड. दुपारी डेव्हिडचा फोन आला, "तुला बेल्ट ची गरज नाही. २०० डॉलर्स वाचले तुझे." "धन्यवाद" - मी.

कदाचीत डेव्हिड प्रामाणिक असेल .... कदाचित मी त्याला मदत केली म्हणुन असेल ... परंतु त्याने मला योग्य तो सल्ला दिला.

आणि मी गेली १० वर्षे व्यवस्थापन करुन करुन माझा मेंदु शिणलेला ... थोडा कुणाचा काही प्रश्न सोडवला तर अगदीच आनंदुन गेलो. तांत्रीक गोष्टींमध्ये इन्स्टंट समाधान असते. सॉल्व्ह प्रॉब्लेम्स बी हॅपी!