Sunday, December 27, 2009

हवाहवाई - भाग १ माऊई कडे प्रयाण


सलोनीबाई



माऊईहुन परत येऊन ७ दिवस झाले परंतु अजुनही मन तिथेच आहे. अजुनही असेच वाटते आहे की सकाळी उठले की पहिली गोष्ट दृष्टीस पडेल ती म्हणजे घनदाट झाडांमधुन आकाशाकडे झेपावणारे, गवताच्या पात्यांसारखे माड आणि त्यांच्या पाठीमागे ढगांनाही भेदुन आकाशाचे चुंबन घेऊ पाहणारा उत्तुंग हालेयाकाला पर्वत. अजुनही लाटांचे आवाज येत आहेत. अजूनही असेच वाटते की घराबाहेर गाडी काढली की वडांच्या रांगा समोर येतील. उसांची शेती दिसेल ... निळ्याशार पाण्याशेजारुन वळण घेत जाणारे रस्ते लागतील. माऊईचे सौंदर्य नुसते प्रेक्षणीय नाही तर भावनिक वाटले. कदाचित कुठेतरी भारताची आठवण झाली. रोजच्या दगदगीतुन विरंगुळा मिळाला, निर्भेळ आनंदाचा सहवास मिळाला, मातीचा वास मिळाला, मध्येच गोवा, मध्येच सह्याद्री, मध्येच घाटाचा सुगंध मिळाला !


तशी काही फार काही पूर्वनियोजित सहल नव्हती ही. मनात बर्याच दिवसांपासुन होते की हवाईला जायचे. दोन महिन्यांपूर्वी सहजच पाहिले तर सगळे काही जमुन आले. त्यातुन यावर्षी भारतभेटही नसल्यामुळे सुटीत काय करावे असा प्रश्न होताच. कॅलिफोर्निया, नेवाडा यापूर्वीच ५-१० वेळा फिरुन आलेलो. मेनलॅण्ड वर फ्लोरिडा आणि वायोमिंग वगळता मुख्य सर्व काही एव्हाना पाहुन झाले आहे. अगदी कोलोरॅडो राहिले होते ते ३ महिन्यांपूर्वी केले तुझ्याबरोबरच. कोलोरॅडोची मजा काही वेगळीच. १२००० फुटांच्या वर २०० शिखरे असलेले राज्य! ग्रॅण्ड कॅनियन तयार करणार्या कोलोरॅडो नदीचा उगम होतो त्या रॉकीज पर्वतांचे राज्य! निसर्गाचे मला नेहेमीच आकर्षण वाटले आहे. मग तो समुद्र किनारा असो किंवा ढाकबहिरीची पर्वत कपारी मधील गुहा. त्यामुळे कोलोरॅडो पहायला नक्कीच आवडले. तुझा पहिला विमान प्रवास. सहल तशी छानच झाली होती. परंतु कोलोरॅडोच्या प्रवासात कारचा खूपच प्रवास झाला. डेन्व्हर-रॉकिज माऊंटेन-डेन्व्हर-ऍस्पेन-ग्रॅण्ड जन्क्शन-डेन्व्हर-फोर्ट कॉलिन्स-डेन्व्हर-फोर्ट कॉलिन्स-डेन्व्हर असा १००० मैलांचा प्रवास ४ दिवसात केला (तुम्हा दोन नक्षत्रांना घेऊन) ! त्यामुळे निवांतपणा जरा कमी मिळाला. त्यामुळे त्याचवेळी ठरवले होते की पुढची सहल शांतपणे करायची. एकाच ठिकाणी जायचे आणि तंबु ठोकुन तिथेच रहायचे.


माऊई हे हवाई या राज्यातिल एक बेट. हवाई हे बेटांचेच राज्य आहे. चहुबाजुला ३००० मैलापर्यंत प्रशांत महासागर पसरलेला. मध्येच हे सृष्टीचे नंदनवन साकारलेले. एकाचवेळी समुद्र, पर्वत, बर्फ, वाळवंट, ज्वालामुखी अश्या अशक्य विरोधाभासांचा प्रत्यय देणारा प्रदेश. युगानुयुगे जपानी वर्चस्वाखाली राहिलेला पॉलिनेशियन्स लोकांचा प्रदेश. परंतु १८४८ पासुन अमेरिकेचा संबंध आला. तसा विचार केला तर भौगोलिक दृष्ट्या अमेरिकेची मालकी न्यु यॉर्क फ्लोरिडा पासुन कॅलिफोर्निआ वॉशिंग्टन पर्यंत तर पसरली आहेच परंतु त्याहीपलिकडे हवाई, अलास्का, गुआम आणि थेट हिंदी महासागरात दिएगो गार्सिआ पर्यंत पसरली आहे. पूर्वेला देखील फ्लोरिडाच्या पलिकडे प्युएर्तो रिको सुद्दा अमेरिकेचाच प्रदेश. खरे तर अमेरिका सुरुवातीला १३ राज्यांची (वसाहतींची) मिळुन बनली होती. मुख्यत: सध्याच्या न्युयॉर्क-वॉशिंग्टन भागात तिचे केंद्र होते. १८०३ मध्ये नेपोलियन कडुन त्याकाळातील लुईझियाना राज्य जेफरसनने अमेरिकेला जोडले. पुढे मन्रो या धोरणी राजनीतीज्ञाच्या शिकवणीकीनुसार अमेरिकेने प्रसरणाचे धोरण स्वीकारले. तेव्हापासुन एकापाठोपाठ टेक्सास, कॅलिफोर्निआ आणि मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला असलेला सर्वच भाग गिळंकृत केला किंवा जिंकला. पुढे रशिया कडुन अलास्का विकत घेतले. अतिशय दूरदृष्टी लाभलेले आणि विजीगिषु नेतृत्वाची देणगी अमेरिकेला कायमच मिळाली आहे. असो ... तर हवाईचा नेमका इतिहास वाचला नसला तरिही जपान आणि अमेरिकेच्या टक्करीची कल्पना येऊ शकते.


हवाईवर असलेला जपानी भाषा, वास्तुकला, संस्कृती यांचा प्रभाव ठायी ठायी जाणवतो. माऊई, हवाई, हालायेकला, लनाई, लहेना, हाना, कीहे, होकुलावे, माआलेआ अशी किती किती मुके घेऊ अशी नावे. जपानी पद्धतीची उभी आणि वळणदार छतांची घरे. वर्षभर २२-२५ अंश सेल्सिअस आणि आश्चर्यकारक म्हणजे आर्द्रता विशेष काही नसलेले हवामान. दुसरे आश्चर्य म्हणजे वडांची झाडे बेटावर पहिल्यांदाच पाहिले. इथले वड आपल्या मावळातल्या वडासारखे धिप्पाड वाटत नाहीत .... तर त्यांच्यामध्ये एक नक्षी, एक नृत्य एक गेयता जाणवते. जणुकाही समुद्राच्या लाटांसोबत आणि वाऱ्याच्या लहरींसोबत त्यांचेही हृदय द्रवल्यासारखे. समुद्र आणि वड हे दुसरे अद्भुत रसायन इथे पाहिले. आमच्या हॉटेलच्या बाहेरच एक अप्रतिम वड होता. त्याच्या खाली तासनतास घालवावेत. परंतु मोठा वड पाहिला तो लहेना गावामध्ये ३-४ एकरात पसरलेला. गावाच्या मुख्य चौकात या वडाचे चांगले संवर्धन केले आहे. मागच्या दोन एकशे वर्षात याच्या फांद्या सगळीकडे पसरल्या आहेत त्यांना ठिकठिकाणी आधार देऊन त्याचा परिसर वावरता येईल असा केला आहे. मला फर्ग्युसनमधील एक प्रसिद्ध १०० एक वर्षांचा वड आठवला. मैदानाच्या एका कडेला हनुमान टेकडीच्या खाली व्यायामशाळेला लागुन तो वड होता. आम्ही त्याच्या खाली बुद्दिबळ खेळत असू, अभ्यास आणि टवाळक्या केलेल्या ... त्याची मुळे जमिनीच्या वाहुन जाण्यामुळे उघडी पडलेली ... एका वादळात तो उन्मळुन पडला. ९२-९३ साल असावे. फर्ग्युसनचा कुठेतरी एक अंश गळुन पडला.


असो .... आज इथेच थांबतो .. दोन दिवसांनंतर पुन्हा लिहायला घेईन. परंतु हवाईची सहल अतिशय सुंदर झाली. ७ दिवसांनंतरही मन पुन्हा पुन्हा तिथेच धाव घेते आहे.

क्रमश:



Saturday, December 26, 2009

ख्रिसमसची दोन गाणी


सलोनी

काल ख्रिसमस बद्दल लिहिताना एक राहुन गेले लिहायचे. ख्रिसमसची गाणी खूपच छान असतात. मला विचारशील तर ख्रिसमस हा सण नसुन एक ऋतुच आहे. ख्रिश्चन विशेषत: कॅथॉलिक लोक धार्मिक दृष्टीने तो साजरा करतात. परंतु बव्हंशी अमेरिकन मंडळी केवळ वर्षभर काम करुन शेवटी हिवाळ्यात घरी सुटी साजरी करतात. आणि तसे करण्यात जो काही प्रेम जिव्हाळा आणि नाते आहे ते ख्रिसमसच्या गाण्यांमधुन खूप छान व्यक्त होते. तशी अनेक सुंदर गाणी आहेत. परंतु मला विशेष आवडणारी ही दोन आहेत. मला असे वाटते ख्रिसमसच्या काळातील आनंद, जवळीक, प्रेम, सुरक्षीतता या भावना या दोन गाण्यांमधुन अतिशय अचूक व्यक्त होतात. गाणी ऐकताना अर्थ समजुन ऐकली तर अजुनच ती हृदयाला भिडतात...


ता. क. - पैकी लेट इट स्नो गाणे तर लिहिले आहे ती माणसे ज्यू होती..



Let it snow
Oh the weather outside is frightful,
But the fire is so delightful,
And since we've no place to go,
Let It Snow! Let It Snow! Let It Snow!

It doesn't show signs of Pauseping,
And I've bought some corn for popping,
The lights are turned way down low,
Let It Snow! Let It Snow! Let It Snow!

When we finally kiss goodnight,
How I'll hate going out in the storm!
But if you'll really hold me tight,
All the way home I'll be warm.

The fire is slowly dying,
And, my dear, we're still good-bying,
But as long as you love me so,
Let It Snow! Let It Snow! Let It Snow!




It's the most wonderful time of the year
It's the most wonderful time of the year
With the kids jingle belling
And everyone telling you "Be of good cheer"
It's the most wonderful time of the year
It's the hap-happiest season of all
With those holiday greetings and gay happy meetings
When friends come to call
It's the hap- happiest season of all

There'll be parties for hosting
Marshmallows for toasting
And caroling out in the snow
There'll be scary ghost stories
And tales of the glories of
Christmases long, long ago

It's the most wonderful time of the year
There'll be much mistltoeing
And hearts will be glowing
When love ones are near
It's the most wonderful time of the year

There'll be parties for hosting
Marshmallows for toasting
And caroling out in the snow
There'll be scary ghost stories
And tales of the glories of
Christmases long, long ago

It's the most wonderful time of the year
There'll be much mistltoeing
And hearts will be glowing
When love ones are near
It's the most wonderful time
It's the most wonderful time
It's the most wonderful time
It's the most wonderful time of the year



Friday, December 25, 2009

सांताचे आगमन

सलोनी

काल खरेदी करण्यासाठी आम्ही बाहेर गेलेलो तर परत येताना फ़्रीवेवर ही गर्दी. "इतक्या रात्री ८ वाजता ही सर्व मंडळी कुठे चालली ... विशेषत: ख्रिसमस ईव्ह (सन्ध्याकाळी) ला?" माझा प्रश्न.

अमेरिकेत ख्रिसमस आणि थॅन्क्सगिव्हिंग या दोन दिवसांची पूर्वसन्ध्या असे दिवस आहेत की त्यादिवशी अमेरिकेतील सर्व कामे थांबतात. दूर दूर गेलेले लोक घरी परतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. ख्रिसमस ट्री सजवतात. घरातल्या फायरप्लेस (शेकोटी) समोर बसुन हॉट चॉकोलेटचा आस्वाद घेतात. गाणीही म्हणतात. शांत बसणे, काहीही न करण्याचा आस्वाद घेणे याइतके अन-अमेरिकेन दुसरे काहीही असू शकत नाही.... परंतु हे दोन सण असे आहेत की अमेरिकेतील सगळे कामकाज थंडावते. असो .. त्यामुळे मला प्रश्न पडला इतकी गर्दी कशी काय.


तेव्हा सोनबा अर्थात तुझी आई मला म्हणाली की ख्रिसमस च्या एकुण खरेदीपैकी ३९% खरेदी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला होते! अमेरिकेत खरेदीशिवाय काहीच साजरे होत नाही. ख्रिसमस तर विशेष सण. यादिवशी सांता या वयस्कर माणसाला की जो उत्तर ध्रृवावर राह्तो, सर्व अमेरिकेतील (आणि जगभरातील) लहान मुलांना खेळणी देण्याचे काम करावे लागते :-) सिद्धोबा इतकी वर्षे सांताच्या नादी लागला नव्हता. परंतु यावर्षी त्याच्या काही वर्गमित्रांचे पाहुन त्याने देखील त्याची एक यादी बनवली होती.


सिद्दोबाला नर्फ-फुटबॉल हवा होता कारण त्याच्या मित्राने क्विंटनने नर्फ-फुटबॉल मागीतला होता सांताकडे. परंतु त्या ट्रॅफिकला पाहुन हळुहळु माझ्या लक्षात आले की सिद्धोबाचा निरोप सांताकडे पोहोचला नाही अजून. एव्हाना तुझी आई मनातल्या मनात खुष झाली होती की बाबाचे उद्या काही खरे नाही कारण बाबाने सांताला सिद्धुची यादी पोहोचवली नाही आणि उद्या (ख्रिसमस) च्या दिवशी दुकाने बंद असतात.



"सिद्धु मी सांताला ई-मेल करतो आणि सांगतो."

"सांताकडे ईमेल आहे. आयफोन? ब्लॅकबेरी आहे?" - सिद्धु

"हो. कदाचित ब्लॅकबेरी"

"त्याचा ईमेल काय" - सिद्धु
"सान्ता ऍट नॉर्थपोल डॉट कॉम" - इति आई.
"ओके मग मी घरी गेल्यावर इमेल लिहितो" - सिद्धु
"नाही लहान मुलांना ईमेल पाठवायची परवानगी नाही" - आई
"सिद्धु मी लिहिन ईमेल ... परंतु आता तो जगभर फिरतोय त्यामुळे त्याला ईमेल वाचता येईल की नाही माहीत नाही.
सिद्धुचा चेहेरा रडवेला झाला...

"पण मे बी त्याचा ब्लॅकबेरी आहे त्यामुळे मिळेल त्याला. तु काळजी करु नको उद्या नाही तर परवा तुला नक्की तुझ्या वस्तु मिळतील."


घरी पोहोचल्यावर मला प्रश्न पडला की आता सांता कुठे भेटणार? मी इंटरनेटवर शोध घेतला तर असे लक्षात आले की कुठल्याही टॉयजरस (खेळण्यांचे दुकान) मध्ये तो ९ पर्यंत भेटेल ! मी माझ्या एका मित्राला भेटायचे म्हणुन बाहेर पडलो. तो अर्थातच टॉयजरस च्या शेजारी रहात होता. मग मी तसेच टॉयजरस मध्ये सांता सापडतो का पाहिले, परंतु सांता तिथुन निघुन गेला होता. मग पुढे वॉलमार्ट मध्ये पाहिले. तिथे तर चतु:शृंगीपेक्षा जास्त गर्दी ... आणि वर सांता भेटला नाही ते वेगळे. परंतु तिथे कळले की २५ मैलावर असलेल्या दुसऱ्या एका टॉयजरसमध्ये नक्की सांता भेटेल! शेवटी मी गाडी तिकडे वळवली. आणि अखेरीस तिथे मात्र सांता भेटला. त्याला मी सिद्धुच्या नर्फ-फुटबॉलचा निरोप दिला आणि घरी आलो.

एव्हाना सिद्धोबाने खोली आवरली होती. जेवण केले होते. त्याच फळा स्वैपाकघरामध्ये आणुन त्यावर खडुने नक्षी काढली आणि सांताला शुभेच्छा लिहिल्या. आईला दुध आणि कुकीज ठेवायला सांगीतल्या. आणि मग तो झोपायला गेला.

रात्री मी पाठ दुखते म्हणुन फॅमिली रूम मध्ये झोपलो. साधारण पहाटेचे पाच वाजले असतील आणि मला असा भास झाला की घरात पावले वाजत आहेत. मी किंचीत उठलो पण मिट्ट काळोख होता. त्यामुळे कंटाळा केला. त्यानंतर एकदम ६:३० लाच जाग आली. अजुनही अंधारच होता. मी सवयीने अंधारात चाचपडत किचन बार पर्यंत गेलो. ब्लॅकबेरी चा हिरवा दिवा लुकलुकत होता. तो उचलला आणि पासवर्ड टाईप करायला लागलो ... माझ्या चेहेऱ्यावर अंधारात प्रकाश पडलेला ... आणि एकदम माझा दंड हलु लागला. काही शब्दही ऐकु आले. पण अजुनही मी झोपेत होतो. भूत बित कळण्याइतपतही शुद्धीवर नव्हतो!! हळुहळु मला थोडे थोडे कळु लागले ... सिद्धोबा मला सांगत होता ... "बाबा, सांता येऊन गेला. त्याने मला नर्फ फुटबॉल आणि बेसबॉलचा फिल्डिंग ग्लोव्ह दिला आहे."

"अरे वा!!!!" मी ऑस्कर मिळवण्याच्या जिद्दीने त्याच्याइतकेच आश्चर्यमुग्ध होऊन विचारले.... "कधी आला होता"


"मला वाटते सिक्स हवर्स बॅक... मला त्याच्या पायांचा आवाज आला. मी रात्रभर झोपलोच नाही"

"झोपलाच नाही" - मी

"नाही ... मे बी थोडा वेळ झोपलो. पण मला झोपच लागत नव्हती. पण सांताला पहायला बाहेर आलो ...पण तो नाही दिसला ..म्हणुन मी त्याचा मिल्क ग्लास शोधला ... टेबलावर नाही. डिशवॉशर मध्ये नव्हता .. सिंक मध्ये पण नाही. ... "
"कदाचीत त्याने हाताने धुवुन परत ठेवला असेल" - मी
"हं .... "


सांताने सिद्धु ला एक पत्र देखील लिहिले होते. सिद्धुला मी ते दाखवले. तो भलताच खुष झाला. परंतु त्या पत्रामध्ये सिद्धोबाला शुद्धलेखनाच्या दोन चुका आढळल्या. परंतु सांताला घाई असते असे म्हणुन मी फेटाळुन लावल्या. सिद्धोबाने फ्रीजच्या बाजुला लावलेली त्याची आणि तुझी यादी काढली.

"अरे हे काय आहे"
"माझी आणि सलोनीची यादी" - सिद्धू

"सलोनीची पण यादी होती" - मी हैराण होऊन ...

"हो. मी तिला क्लोद्स आणि खेळणी मागीतली होती"

"अरे पण हा तिचा पहिलाच ख्रिसमस असल्यामुळे सांताला अजुन ती माहित नाही ना" - मी ...

"ओ के ... नेक्स्ट टाईम.." - सिद्धु

मी हुश्श केले ..

मला एव्हरेस्ट जिंकल्याचा आनंद झाला..

असा हा तुझा पहिला ख्रिसमस.. खरे तर आम्ही ख्रिसमस ट्री पण आणणार होतो. पण राहुन गेले. सगळीकडे इतके छान वातावरण आहे त्यामुळे म्हटले आपण किरिस्ताव नसलो तरीही ख्रिसमस साजरा करायला काय हरकत आहे. ३३ कोटींमध्ये येशु ख्रिस्त अजून एक देव. जैसा देस वैसा भेस. बाकी आपण अगदी अमेरिकन लोकांसारखे सरावलेलो नाही .... पण जमेल तसा ख्रिसमस साजरा केला. मुख्य म्हणजे सांताकडे ईमेल असल्यामुळे सगळे कसे सुरळीत पार पडले.

Wednesday, December 23, 2009

सत्तेचे संतुलन

सलोनी

हे मेडलिन अल्ब्राईटचे पुस्तक बरेच दिवस झाले वाचतो आहे. इंग्रजी मी तसे अगदी कामापुरते वापरतो त्यामुळे पुस्तक बिस्तक वाचायला वेळ लागतो. .... मराठी असले असते तर एका दिवसात वाचुन झाले असते. खरेच ... सोमवारात दर सुटीत आनंद वाचनालयात मी रोज एक पुस्तक वाचायचो तर तिथे काम करणारी बाई मला म्हणाली .."खरंच वाचतोस का नुस्तेच परत आणुन देतोस" !!! असो ... पण आज सकाळ मधील एक बातमी वाचली आणि खूप अस्वस्थ व्ह्यायला झाले. बातमी अशी की भारतामध्ये संसदेने चर्चेशिवाय मंत्रांना आणखी एक सवलत मान्य केली. सवलत अशी की आता मंत्री लोक त्यांच्याबरोबर कितीही लोकांना (आणि कोणालाही) भारतभर प्रवास करता येईल. पैसे अर्थात भारत सरकार म्हणजे आम जनता देणार.

भारत मोठा देश आहे. मंत्र्यांवर मोठी जबाबदारी असते. खरे आहे. अमेरिकेत सर्व मंत्र्यांना वापरायला सरकारी विमाने असतात.... खरे आहे. विमानप्रवास गरज आहे ... चैन नाही ... खरे आहे. परंतु चर्चेशिवाय मंत्र्यांचे पगार, भत्ते, सवलती, घरे, विमानप्रवास सगळेच कसे मंजुर होते? आणि काही सवलती जरिही समर्थनीय असतील तरीही त्याचे उत्तदायित्व कुठे दिसत नाही.

मेडलिन अल्ब्राईटच्या पुस्तकात आणि त्याआधीही अनेकदा वाचण्यात आले आहे की अमेरिकेत अश्या व्यक्तिगत सवलती तर सोडाच परंतु कुठल्याही भेटवस्तु किंवा जेवण देखील घ्यायला कायद्याने बंदी आहे. परराष्ट्रमंत्री म्हणुन काम करत असताना ज्या ज्या भेटी मिळाल्या त्या ४०-५० डॉलर्सपेक्षा जास्त महाग असलेल्या सर्व वस्तु सरकारजमा कराव्या लागल्या. इतकेच नाही तर ५० डॉलर्स पेक्षा जेवणाचे बिल जास्त झाले तर ते सुद्धा सरकारी खर्चानेच करावे लागते. आणि हे सर्व कशासाठी तर सरकारी मंत्र्याना लाच देऊन विकत घेण्याचा कुणी प्रयत्न करु नये म्हणुन. आणि हे नियम सर्वच सरकारी नोकरांना लागु आहेत ... अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा !

आणि हे केवळ इथेच थांबत नाही. सर्व मंत्र्यांची इथले सेनेटर्स आणि कॉंन्ग्रेस सदस्य नियमितपणे उलटतपासणी घेत असतात. म्हणायला कार्याचा आढावा असतो ... परंतु अक्षरश: धारेवर धरल्यासारखे प्रश्न विचारले जातात. सेनेट म्हणजे इथली लोकसभा आणि कॉन्ग्रेस म्हणजे इथली राज्यसभा. राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्ष सोडुन सर्व नियुक्त मंत्रांना तसेच सरकारी अधिकार्‍यांना कार्यवृत्त देण्यासाठी इथली संसद बांधील ठेवते.

पाश्चात्य देशांमध्ये भाबडेपणा दिसुन येत नाही. सत्तेमुळे येणाऱ्या उन्मत्तपणाला ते चांगले ओळखुन आहेत आणि सत्तेवर अंकुश ठेवुन व्यक्तिस्वातंत्र अबाधित ठेवण्याची त्यांची सतत धडपड असते. लॉर्ड ऍक्टन या इंग्लिश इतिहास तज्ञाने केलेले विधान यांच्या शासनाचा अगदी पाया बनले आहे - "सत्ता भ्रष्ट करते. आणि निरंकुश सत्ता पूर्णत: भ्रष्ट करते."

किती खरे आहे हे! हजारो वर्षांपासुन हेच तत्व चालु आहे. भारतातील सम्राट राजसूय यज्ञ करुन स्वत:ला राज्याभिषेक करुन घेत असत. त्यावेळेच्या विधिंमध्ये राजा म्हणत असे "अदण्ड्योऽस्मि । अदण्ड्योऽस्मि ।अदण्ड्योऽस्मि ।" त्यावेळी राजगुरु त्याच्या पाठीवर तीनवेळा दर्भाने स्पर्श करुन म्हणत असे "धर्मदण्ड्योऽसि।धर्मदण्ड्योऽसि।धर्मदण्ड्योऽसि।" .... अर्थात राजा म्हणे "मला कुणीही शासन करु शकत नाही". आणि राजगुरु त्याला आठवण करुन देई "तुझ्यावर धर्माचे शासन आहे". रोमन लोकांमध्ये देखील अशीच पद्धत होती. विजयी रोमन सम्राट जेव्हा रोममध्ये विजयपताका फडकवत असत त्यावेळी एक गुलाम त्यांच्यामागे उभा राहुन म्हणे "होमिनेम ते मेमेन्टो" - "तु केवळ एक (मर्त्त्य) मानव आहेस".

दोन्ही प्रथा अगदी सारख्या वाटतात ... परंतु नीट विचार केला तर भारतीय प्रथा ही धर्मावर अर्थात प्रत्येक माणसातल्या देवत्वाला आवाहन करणारी आहे. तर रोमनांची प्रथा ही जरब बसवणारी आहे की जर तु नीट राज्य केले नाहीत तर कुणीतरी तुला मारुन राजा बनेल. दोन्हीत फरक आहे.

आणि आजही हाच फरक आपल्या राज्यपद्धतींमध्ये आहे.

भारतात ५ वर्षांसाठी आपण आपल्या आमदार खासदारांना निवडुन देतो आणि विश्वास ठेवतो की ते चांगले वागतील. आजपर्यंत किती आमदार खासदार मंत्री तर सोडाच परंतु नगरसेवकांना त्यांच्या कामाचा जाब विचारला जातो? तशी आपल्याकडे पद्धतच नाही. किती राजकारण्यांवर गुन्हे दाखल करुन शिक्षा करण्यात आली आहे? अगदी नगण्य.

रणाविण जे मिळाले ते स्वातंत्र नव्हते हे कधी तरी आपल्याला कळेल. केवळ गोरा इंग्रज जाऊन आपला काळा इंग्रज आला इतकेच काय ते. दगडाहुन वीट मऊ इतकेच काय ते. स्वातंत्र्य हे भित्र्या आणि आळशी लोकांना मिळत नसते. त्यासाठी झगडावे लागते. पाश्चात्यांकडे सत्ता निरंकुश ठेवली जात नाही.

साध्या निवडणुका पहा अमेरिकेतील. संपूर्ण संसद एकदम निवडुन येत नाही. साधारणत: १/३ संसद दर दोन वर्षांनी बदलते. तीच गोष्ट कॉन्ग्रेसची. इतकेच नाही तर या वर्शी कॉन्ग्रेसच्या निवडणुका झाल्या तर पुढच्या वर्षी संसदेच्या. राष्ट्राध्यक्ष हा त्याहुन वेगळा. त्याची एक वेगळीच निवडणुक पण त्याला पण निरंकुश सत्ता बहाल नाही करत. सतत बदलणाऱ्या संसद आणि कॉन्ग्रेस ला धरुन धरुन तो मार्गक्रमण करतो. तो स्वत:ला आवडेल त्या व्यक्ती नियुक्त करतो परंतु त्या सर्व व्यक्तिंना संसदेची मंजुरी तर लागतेच परंतु त्या सर्वांचे नियमितपणे कार्याचे मूल्यमापन देखील करते.

सेनेट वेगवेगळ्या मंत्र्याचे मूल्यमापन करत असताना कॉन्ग्रेस एकच मुख्य काम करते .. तेम्हणजे कुठल्याही कामासाठी लागणारे पैसे मंजुर करणे.

हे सर्व होत असताना राज्यांच्या निवडणुकादेखील मध्येच होत असतात. त्याही अशा पद्धतीने की कोणत्याही एका पक्षाला लाटेवर स्वार होता येत नाही.

भारतात ७७-७९ साली आणीबाणी, ८४ साली इंदिरा गांधींचा मृत्यु, ८९ साली बोफोर्स, ९०-९२ साली राममंदिर अश्या अनेक लाटा दिसुन आल्या. त्या सर्वांचा परिणाम असा की केंद्रात किंवा राज्यात अशी सरकारे आली (वाजपेयीं अपवाद वगळता) की सर्वांनी सत्तेचा दुरुपयोगच केला. दोष राजकारण्याचा आहेच. परंतु दोष आपला सर्वांचासुद्धा आहे. आपण जर या लोकांना प्रश्न नाही विचारले. त्यांच्यावर अंकुश नाही ठेवला तर ते भ्रष्टाचारच करणार.

पूर्वी आपल्याकडे इंग्रजांनी तैनाती फौजा तयार केल्या आणि आपले बव्हंशी राजे त्यांचे मांडलिक झाले आणि अंतिमत: सत्ता राज्य आणि संपत्ति सर्वच गमावुन बसले. जी कथा राजांची तीच प्रजेची. आपला उत्कर्ष करायचा असेल तर दुसऱ्यावर पूर्ण विसंबुन राहण्यात अर्थ नाही. ज्यांच्याकडे सत्ता आहे ते त्यांचाच उत्कर्ष प्रथम करणार. तो मानवी स्वभाव आहे. त्याला मुरड तेव्हाच घातली जाईल जेव्हा सामान्य माणुस आपल्या हक्कांसाठी लढायला तयार होईल.

अमेरिकेत सत्तेवर कसा ठायी ठायी अंकुश आहे याचे अजुन एक उदाहरण म्हणजे कुठल्याही जिल्ह्यापातळीवरचा न्यायाधीश हा देखील लोकांनी निवडुन दिलेला असतो. त्यामुळे त्याच व्यक्ती न्यायाधीश होऊ शकतात ज्या लोकांच्या हिताचे काम करतात. आपल्याकडे न्यायव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे असे म्हणायला हरकत नाही. याचे कारणच हे आहे की न्यायाधीशांना जाब कोण विचारणार? अगदी राज्य सरकार देखील विचारु शकत नाही. थेट राष्ट्रपतीच नियुक्ती करतात जिल्हान्यायाधीशांची. जेव्हा न्याय होऊ शकत नाही तेव्हा नकळत एक नवा अन्याय लादला जातो.

असो ... परंतु आजच्या या मंत्राच्या खिरापतीच्या बातमीने हे सगळे विचार एकापाठोपाठ आले. भारतात अण्णा हजारे सोडले तर सर्व तथाकथित समाजनेते आपली स्वत:ची पोळी भाजुन घेताना दिसतात. मठ उभारतील नाहीतर राष्ट्रभक्तीची शिबिरे घेतील ... परंतु सामान्य माणसापेक्षा कुठलेतरी तत्वज्ञान मोठे. कळत नाही असे कुठवर चालणार. माझ्या एका मित्राच्या घरी (कसब्यातील जुने वाडे ते) तुळईवर खडूने लिहिले होते त्याच्या वडिलांनी "हे असेच चालयाचे". आम्ही विचारले हे का लिहिले तर कळले की आणीबाणी नंतर जनता सरकार आले आणि गेले तेव्हा उद्वेगाने त्यांनी राजकारणात रस घेणेच सोडले.

मला वाटते हीच भारतातील ९९% लोकांची अवस्था आहे. आपण संघर्षाला घाबरतो. आपला धीर लगेच जातो आणि आपण "ठेवीले अनंते तैसेची रहावे" म्हणत "असमाधानी" राहतो. जोपर्यंत सामान्य माणसात संघर्षाची वृत्ती येत नाही, आणि सत्तेला झुगारुन देण्याची त्याची तयारी होत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे. मराठी माणसे तशी भाग्यवान आहेत कारण त्यातल्या त्यात आपल्याकडेच ही वृत्ती आहे. आणि म्हणुनच आपल्याकडे तुलनेने अधिक समानता आणि सुबत्ता आहे. परंतु डोळे उघडे करुन जगात दुसरीकडे पाहिले तर आपल्याला अजुन बरेच काही शिकायचे आहे आणि करायचे आहे.