Monday, May 30, 2011

कोलंबसहून ....

कोलंबसहून ....  (28 May, 2011)

 

हे अगदी खरे की विमानतळावर जो निवांतपणा मिळतो लिहायला तो वेगळाच! आता कोलंबसहून लिहितो आहे. पहिल्यांदाच इथे येतो आहे. ओहायोची राजधानी! बऱ्याचदा अमेरिकेत राजधान्या म्हणजे अगदी छोटुशी शहरे असतात. उ. मिशिगन ची लान्सिंग, कॅलिफोर्निआची सॅक्रॅमेंटो, न्यु यॉर्क ची अल्बेनी (व्हॉट? कुठे आहे अल्बेनी?). अ‍ॅरिझोना तसा अपवाद आणि ओहायो देखील. फिनिक्स आणि कोलम्बस तशी बरीच मोठी शहरे आहेत.

 

अमेरिकेकडुन शिकण्यासारखे बरेच आहे. कमी महत्वाची गावे राजधान्या असणे हे त्यापैकीच एक! मला वाटते आपल्याकडे राजधानी म्हणजे सम्पूर्ण राज्याचे आर्थिक शोषण करणारी जागा बनते. सगळे भ्रष्ट मंत्री, संत्री आणि त्यांची पिल्लावळ (उद्योगपती, सरकारी अधिकारी इ.) यांच्या सत्तेचा आणि तिच्या दुरूपयोगाचा दर्प तिथे पाऊल ठेवल्या ठेवल्या येतो. दिल्ली मध्ये तर लोक भयंकर उर्मट उद्धट आणि उन्मत्त आहेत. मला वाटते भारताने आपली राजधानी उज्जैन ला हलवावी. दिल्ली एक तर मध्यवर्ती नाही आणि दुसरे म्हणजे तिथल्या प्रस्थापितांना मोठा धक्का देण्याची गरज आहे. तुघलकाने म्हणुनच तर राजधानी हलवली नसेल? आपण त्याला वेडा म्हणतो खरे.. पण खरंच वेडा होता तो?

 

असो ... परंतु आमची सवारी इथे एका इंटर्व्ह्यु करता आली होती. इंटर्व्ह्यु चांगला झाला. नोकरी मिळेल. परंतु घ्यायची की नाही पाहू. आत्ता तरी मला असे खूप काही "एक्सायटेड" वाटत नाही आहे. एकंदरीतच नोकरीतलाच उत्साह गेला आहे असे म्हणायला हरकत नाही. किंवा इंग्रजीत ज्याला मिड-लाईफ क्रायसिस म्हणतात तो थोडा लवकर आला की काय अशी शंका येते आहे. लहानपणी मला खगोलशास्त्रज्ञ व्हायचे होते. त्यानंतर पायलट ... त्यानंतर प्रत्यक्षात संगणक अभियंता झालो. चार-सहा वर्षे चांगले काम केले. परंतु तिथेही मन रमले नाही. मग व्यवस्थापनाकडे वळलो. तेही आता ८-९ वर्षे करून आता इथेही कंटाळा आला आहे. अर्थात कंटाळा म्हणजे कामाचा नाही तर कामामध्ये एकसुरीपणा आल्याचा आणि आव्हान संपल्याच्या जाणिवेचा. २००० साली एमबीए झाल्यावर ६०,००० डॉलर्सच्या दोन चार नोकऱ्या सोडुन दिल्या आणि बेकार (!) राहिलो काही काळ तेव्हा काही जण म्हणाले पैश्याकडे का बघतोस? तेव्हा मी उत्स्फुर्त पणे दिलेले उत्तर कधीच विसरणार नाही आणि तुदेखील लक्षात ठेव! ६०,००० डॉलर्स ची नोकरी पैश्यासाठी नाही जाऊ दिली. तर त्यात कितपत चांगले काम असणार या विचाराने. पैश्यावरुन कामाची किंमत करु नये हा एक विचार झाला. परंतु कुठल्याही मोठ्या महत्वाच्या कामाला कोण कमी पैसे देईल? त्याऊलट साध्या कामाला कोण जास्त पैसे देईल? ६०,००० हा एक केवळ एक आकडा आहे. ज्याने त्याने ठरवावे आपल्यासाठी किती पगार/पैसे हे आयुष्यातील प्रगतीचा पुढचा टप्पा आहे. परंतु हे नक्की की पैसे हे आपण काय करतो आयुष्यात याचे केवळ एक बाय-प्रॉडक्ट जरी असले तरीही पैश्यावरुन कळते की काय करतो आहोत आणि काय करणार? अपवाद फक्त सृजनशील कामांचा! कोणी चित्र काढतो आणि भुकेला मरतो. कोणी एक मिनिमलिस्ट कलाकार होता... (नाव विसरतो आहे मी... कदाचित अल्बर्टो जॉकेमेटी). त्याने तयार केलेले धातुचे पुतळे अतिशय काडीसारखे असतात. मागच्या वर्षी तसा एक पुतळा १०० मिलिअन डॉलर्सला विकला गेला. परंतु तो शिल्पकार मरुन आता बरीच वर्षे झाली. जिवंत होता तेव्हा त्या पुतळ्यांना कोणी १ लाख सुद्धा दिले नसते. तर सांगण्याचा मुद्दा असा की वस्तुंची किंमत तिथे महत्वाची नाही जिथे सृजनशीलता आहे. कारण सृजन हीच सृजनशीलतेची किंमत किंवा मोबदला असतो. बाकी सर्व ठिकाणी आपण उत्पादन (कॉपी) किंवा अदलाबदल (ट्रेडिंग) करतो. तिथे किंमत ठरते!

 

असो परंतु काल रात्री शिकागो ते कोलंबस विमानप्रवासाच्या वेळी रात्र असताना टिपुर चांदणे पडले होते. दाट काळोखात तारे पाहताना आपलेच सहस्राक्ष आपल्याकडेच रोखुन बघतात असे वाटते. कॉलेजचे दिवस आठवले. राजगडवरुन ताऱ्यांचे असेच पुंजके दिसायचे. वासोटा ढाक रायगड कोरिगड ..... सगळे आठवले. काही सेकंद का होईना पण निरिच्छ आनंद काय असतो ते अनुभवले आणि भीती वाटली. भीती याची की आता अश्या निरिच्छ आनंदाशी मैत्री करायची ताकत आहे की नाही माहित नाही. आता सगळी धावपळ ही नाव पैसा आणि सुख यांसाठी चालली आहे. मीच नाही तर सर्वच जग ... अमेरिकन भांडवलवाद आणि वस्तुवाद यांसाठी वेडे होत चालले आहे. भारतात दक्षिण भारतात सर्व अय्यंगार ब्राह्मण स्वत:ला शर्मा म्हणवतात. संस्कृत मध्ये शर्म म्हणाजे आनंद. शर्मा म्हणजे आनंद घेणारा. आनंद कश्यात तर ज्ञानाचा ... ब्रह्माच्या/स्वत:च्या शोधाचा! क्षत्रिय स्वत:ला वर्मा म्हणत. कारण ते समाजाचे वर्म म्हणजे शक्तीस्थान होते. परंतु पहा आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञान श्रेयस आहे आणि पर्यायाने वस्तु गौण आहेत. पुढे कर्मकांड जातिव्यवस्था आली वगैरे सगळे ठिक आहे. काळाच्या ओघात सर्वच चांगल्या कल्पना विकृत होतात. परंतु अगदि काव्यात्मक वाटावे असा जीवनाचा आदर्श भारतियांनी घालण्याचा प्रयत्न केला.

 

आज आपण भांडवलवाद आणि वस्तुवादाने इतके पछाडलो गेलो आहोत की आपल्याला जीवनाचे उद्दिष्ट काय असावे किंवा समाजाने कश्याचा ध्यास धरावा भौतिक प्रगतिव्यतिरिक्त हे प्रश्न हास्यास्पद वाटतील. परंतु मला वाटते काय सांगावे १०० एक वर्षांनंतर मनुष्य जमात पुन्हा एकदा आपण कसे सोशल अ‍ॅनिमल आहोत किंवा "आय थिंक देअरफोर आय अ‍ॅम" या दोनपैकी एकाकडे वळेल. आय-आय-टी मधल्या थोडयाफार वास्तव्यात एक मित्र म्हणाला होता ... अमेरिकेने भारताच्या चार पुरुषार्थांचे दोनच करुन टाकले आहेत. अर्थोऽही धर्म: । कामोऽही मोक्ष: ॥ अर्थात ... अर्थ हाच धर्म आणि काम हाच मोक्ष.

 

आम्ही कॉलेजमध्ये असताना तसे गमतीने म्हणायचो खरे ... परंतु ते अगदी खरे आहे.

 

परंतु चर्चिल म्हणाला तसे .. "लोकशाही ही अगदी कुचकामी यंत्रणा आहे. परंतु इतर यंत्रणा त्याहुनही जास्त कुचकामी आहेत."  ... तसेच भांडवलवादही बऱ्यापैकी दोषबद्ध आहे. परंतु आजच्या घडीला आपल्याकडे तोच सर्वात चांगला पर्याय आहे कदाचित!

 

हा चर्चिल एक भयानक चावट आणि खवट माणुस होऊन गेला. अमेरिकन लोकांबद्दल तो म्हणाला होता - "अमेरिकन माणुस नेहेमी योग्य तीच गोष्ट करतो ... फक्त त्याआधी तो इतर सर्व (अर्थात चुकीच्या) गोष्टी करुन बघतो"! असो .. सहज आठवले म्हणुन लिहिले.

 

मागच्या २-४ आठवड्यात इकडे पावसाने मिडवेस्ट मध्ये धुमाकुळ घातला आहे. मिसिसिपी ला इतका पूर आला की लेव्हीज बांधलेल्या फुटल्या काही ठिकाणी. काही ठिकाणी मुद्दामहून बंधारे सोडुन देऊन पूर येऊ द्यावा लागला. त्यानंतर मागच्या चार-पाच दिवसात मिझुरीमध्ये इतके टोर्नेडोज आले की विचारायला नको. ४६ टोर्नेडोज कॅटेगरी ३-४-५ चे. ५ चा टोर्नेडो म्हणजे २०० मैला पेक्षा जास्त वेगाचे वारे असतात. टीव्ही वर दाखवले एक झाड अगदी तासुन निघाले होते... संपुर्ण खोड तासल्यामुळे पांढरे दिसत होते. जॉपलिन नावाच्या गावात अर्धा मैल रुन्द ते चार मैल लांब पट्टयातील घरे भुईसपाट झाली. अगदी घरांचा प्लिंथ / पाया च फक्त शिल्लक राहिला अशी परीस्थिती. या वादळात घरे वाहने.. गुरे ढोरे माणसे मुंग्यांसारखी उडुन जातात. भारतात आपल्याला असा निसर्ग माहितच नाही. त्यातल्यात्यात आंध्रमध्ये.. परंतु एकंदरीत भारतात निसर्ग बराच सौम्य आहे. त्याऊलट अमेरिकेत कुठे वादळ कुठे गारठा कुठे उन्हाळा कुठे भूकंप कुठे पूर असे निसर्गाचे प्रकोप पचवुन इथली माणसे निसर्गावर मात करत जगतात. त्यामुळे जॉपलिनमध्ये इतका विध्वंस होऊनदेखील बव्हंशी लोक हताश दिसत नाहीत. पुन्हा उभारण्याची तयारी आहे. आपल्या कडे किल्लारी भुकंपानंतर लोकांची उभारीच नव्हती. अगदी जपानमध्ये सुद्धा आत्ता सुनामी आली तर लोकांच्या वागण्यात खोल नैराश्य दिसले. परंतु अमेरिकन लोकांमध्ये एक दुर्दम्य आत्मविश्वास, चिकाटी आणि धडपड आहे

 

असो .... पुरे आता.. संगणकाची बॅटरी मान टाकायला लागली! त्यामुळे इथे थांबतो.

Wednesday, May 25, 2011

सिद्धोबाच्या सुटीतला संकल्प!

सलोनीराणी

 

सिद्धुच्या शाळेचा आज शेवटचा दिवस होता. आजपासुन ऑगस्टपर्यंत आता सुटी! आईने बरेच उन्हाळी वर्ग सिद्धुसाठी लावले आहेत. पोहण्याचा ... गाण्याचा ... रोबोटिक्सचा इत्यादि इत्यादि. एकंदरीत स्वारी बिझी असणार आहे तर! ..

 

तर मी साहेबांना सकाळी शाळेत जाता जाता त्याला म्हणालो.. "सिद्धु सुटीत काय करायचे आहे तुला?" तर सिद्धु म्हणतो - "बाबा मला व्हॉलन्टिअर करायचे". बापरे ... मला चांगलाच आनंदाचा धक्का बसला! मी म्हणालो त्याला की तु बघ कुठे संधी आहे आणि मी पण येईन तुझ्याबरोबर...

 

मला वाटते सिद्धोबाच्या डोक्यात बराच चांगला विचार आला आहे. प्रत्यक्ष करतो की नाही पाहु. परंतु किमान विचार आला हे काय कमी?

 

मी १९९७ साली ऑस्ट्रेलिआ मध्ये असताना तिथे मी ऐकले होते की तिथली माणसे सरासरी ९ तास महिन्याला स्वयंसेवी कामाला वाहुन घेतात. सर्व देशातील साधारण १/३ लोक दरवर्षी स्वयंसेवा करतात.

 

अमेरिकेत हे प्रमाण इतके जास्त नसेल. परंतु मला वाटते तरीही त्याच्या निम्याइतके तरी नक्कीच असेल. जर १०% लोकांनी जरी निरपेक्षपणे थोडे तास समाजोपयोगी काम केले तर देश मागे कसा राहिल?

 

असो ... जास्त भाषण नको.... आय जस्ट फेल्ट ग्लॅड सिद्धु सेड इट ऑन हिज ओन!

Sunday, May 22, 2011

इंग्लंडच्या राणीची आयर्लंडवारी

बाबाचा लिखाणातला उत्साह संपला की काय अशी दाट शंका यावी इतक्या अंतराने आज लिहितो आहे.

या आठवड्यात इंग्लंडची राणी आयर्लंडला गेली. आयर्लंड वर इंग्लंडचे मागील ४०० वर्षे या ना त्या स्वरुपात राज्य आहे. पैकी दक्षिण आयर्लंड म्हणजे अंदाजे ५/६ भूभाग स्वतंत्र आहे. तर १/६ उत्तर आयर्लंड यु के अर्थात युनायटेड किंगडमच्या अंतर्गत आहे. ही विभागणी बऱ्यापैकी धर्मावर आधारित आहे. उत्तर भाग मुख्यत: प्रोटेस्टंट ख्रिश्चन तर दक्षिण भाग मुख्यत: कॅथॉलिक. दक्षिण भाग आयरिश पणा जपणारा. तर उत्तर भागावर इंग्लंडचा प्रभाव.

असो .. तर इंग्लंडची राणी आयर्लंडला गेली तब्बल शंभर वर्षांनंतर! त्याआधी राणी व्हिक्टोरिआ किंवा राजा जॉर्ज गेले असतील तीच शेवटची भेट.

इकडे अमेरिकेत १०% लोक आयरिश वंशाचे आहेत. अगदी केनेडी मंडळी कट्टर आयरिश आहेत. त्यामुळे साहजिकच आयर्लंडला राणी गेली तेव्हा इथल्या बातम्यांमध्ये प्रसिद्धी मिळाली.

शंभर वर्षात बराच बदल झाला आहे. सर्वात पहिले म्हणजे राणीला अभिवादन काही मिळाले नाही. फक्त हस्तांदोलनावर समाधान मानावे लागले. राणी अगदी आयरिश लोकांचा हिरवा रंग परिधान करुन गेली. परंतु आयरिश लोक काही फार "इम्प्रेस" झाले नाहीत. रस्ते अगदी सुने सुने होते. त्यामानाने आपण भारतात अगदी दुतर्फा रांगा लावुन राणीचे स्वागत केले ५-१० वर्षांपूर्वी. अर्थात सर्वच लोक स्वागतार्ह आले नव्हते. हरयाणा आणि दिल्ली मध्ये काही लोक राणीची गाडी जात असताना रस्त्याच्या कडेला वेगळ्या कारणासाठी बसले होते तेव्हा राणी थोडी अनईझी झाली असे तिचा अटॅशे म्हणाला होता! पण असो तरीही एकंदरीत आयरिश लोक मात्र अक्षरश: बहिष्कार घालुन घरी थांबले. राणी थोडी नाराज झाली असेल. परंतु तरीही मोठेपणा दाखवत ती आयरिश वॉर मेमोरिअल ला भेट देऊन आली. ५०००० आयरिश सैनिक आणि नागरिक इंग्लंडविरुद्ध लढताना मरण पावले त्यांना राणीने अभिवादन केले. भारतात मात्र जालियनवाला बागेला राणीने ना भेट दिली ना खेद  व्यक्त केला. माफी तर खूप दूरची गोष्ट. असो ... परंतु तो वेगळा विषय होईल.

राणीचे आयर्लंडला जाणे, हिरवा रंग घालणे, फक्त हस्तांदोलन करण्यात समाधान मानणे आणि आयरिश बहिष्काराकडे दुर्लक्ष करुन आपल्याच देशाविरुद्ध लढलेल्या सैनिकांना मानवंदना देणे यात वरकरणी पाहता कोणाला तिचा दुबळेपणा दिसेल. परंतु  खरेतर यातच तिची आणि संपूर्ण "विन्डसर" घराण्याची ताकत दिसुन येते.

जगाच्या इतिहासात ६००-७०० वर्षे टिकली अशी बहुधा दोनच राजघराणी असावीत. एक म्हणजे ओटोमन (तुर्कस्तान) आणि दुसरे म्हणजे ब्रिटिश राजघराणे. पैकी ओटोमन घराणे अगदीच घराणे म्हणता येइल. कारण अगदीच वडिलांनंतर मुलगा किंवा भाऊ गादीवर आले असे ३० पिढ्या घडले. परंतु ब्रिटिश हे थोडेसे व्यापक घराणे आहे. कधी मुलगा, कधी मुलगी, कधी पुतण्या कधी पुतणी असे लोक गादीवर येत गेले. परंतु सांगण्याचा मुद्दा असा की इतकी वर्षे सत्ता टिकवणे सोपे नाही. कटकारस्थाने, परकीय आक्रमणे, अंतर्गत लाथाळ्या, शिथिलता एक ना अनेक अडथळे येऊ शकतात. इतिहास तज्ञ सर्व साम्राज्यांना साधारण २०० वर्षांचा कालावधी देतात. त्यानंतर साधारण सर्व साम्राज्ये ढासळलेली दिसतात. भारतात खिलजी, मुघल, मराठे, शीख, किंवा भारताबाहेर रोमन, मंगोल या सर्वांचीच साम्राज्ये २-३ शतके फारतर टिकली. अलेक्झॅण्डर चे तर १०-२० वर्षेच टिकले.

मग प्रश्न असा आहे की इंग्लंडच्या राजघराण्यामध्ये असे काय आहे की ते ६-१० शतके टिकले आहे? अर्थात मध्ये १६५० च्या सुमारास क्रॉमवेलची क्रांती झाली आणि राजाला (चार्ल्स १) फासावर (की गॅलोजवर) चढवले गेले. परंतु १०-१२ वर्षात परागंदा झालेले वंशज राजनिष्ठांच्या मदतीने परत गादीवर आले. असो.. तर हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि असा प्रश्न पडायला हवा.

मला असे वाटते. की इंग्लंडच्या राजघराण्यामध्ये अतिशय लवचिकता. व्यावहारिक शहाणपण आणि धोरणीपणा आहे. शिस्त धैर्य आणि मुत्सद्दीपणा तर आहेच. शिस्त म्हणजे कायद्याचे आद्य स्वरूप. सर्वच साम्राज्ये शिस्तीशिवाय उभी रहात नाहीत. चंगीझ खान म्हणे कुठल्या मोहिमेवरुन परत आल्यावर त्याच्या मेव्हण्याने केलेला भ्रष्टाचार पाहुन खुप चिडला आणि त्याने त्याच्या मेव्हण्याला ज्याला तात्पुरती सुत्रे दिली होती राज्याची, त्याला त्याने मारुन टाकले. शिवाजी महाराजांनी स्वकीयांना शासन केले. मुसक्या बांधणे, हात पाय तोडणे किंवा चंद्रराव मोरेला मारला तसे ठार मारणे अघोरी वाटते. परंतु राज्य करायचे म्हणजे शाश्वती हवी, शिस्त हवी. ब्रिटिशांच्या देखील भारतातील कारभार हा शिस्तबद्ध होता. अन्याय होत होते. परंतु तरीही कायदा होता. किंबहुना भारतात राज्य चालवण्यासाठी जो कामगार वर्ग त्यांनी आणला त्यात आयरिश लोक बरेच होते. अ‍ॅलन ह्युम हा आयरीश होता ज्याने कॉन्ग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यामुळे आयरीश लोकांना भारताबद्दल एक प्रकारची सहानुभूती होती. त्यामुळे भारत भर सुधारणा देखील घडल्या. ब्रिटिश आले नसते तर भारताची किती प्रगती झाली असती? सांगणे कठीण आहे. परंतु एक मात्र नक्की. की भारतातील राजे कमी पडले. तैनाती फौजा आणि तनखा लावुन घेऊन त्यांनी आपले राजेपण घालवले. इतकेच नाही तर ब्रिटिशांनी भारताबाहेर जाताना देखील नवीन सरकारला कळ लावुन सर्व राज्ये बरखास्त करायला लावली आणि राजेशाही पूर्णपणे संपवली. त्यात दु:ख मानण्याचे काहीच कारण नाही. परंतु मला असे वाटते की कॉन्ग्रेस हा तसा पढतमुर्खांचा आणि पुढे भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष सत्तेवर आल्यामुळे भारतने आपले जगामधील योग्य स्थान अजुनही मिळवले नाही. नेहेरु आणि इतर मंडळी देशभक्त असतील ... परंतु ते समाजातील "एलिट" होते. बव्हंशी ब्राह्मण आणि शिकलेल्या वर्गातील लोक होते. परंतु राज्य चालवण्याचा त्यांना अनुभव नसल्यामुळे भारताचे राजकिय धोरंण कायमच गुळमुळीत राहिले तोपर्यंत जोपर्यंत जसवंतसिंहांसारखा माणुस परराष्ट्रमंत्री झाला नाही. असो .. परंतु सांगण्याचा मुद्दा असा की आपले राज्यकर्ते ब्रिटिशांच्या तुलनेत कमी पडले आणि त्यातुन पारतंत्र्य आले. आणि पुढे स्वातंत्र्यानंतरही आपल्याला राज्य चालवणे तितके चांगले जमले नाही आहे. मग तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असो, एकजुटीचा असो, संरक्षणाचा असो की आर्थिक प्रगतीचा असो.

ब्रिटिश राजांनी जनतेचा कल ओळखुन हळुहळु आपल्या सत्तेचे विकेंद्रिकरण केले. प्रथम मॅग्ना कार्टा, त्यानंतर चार्टर्ड राईट्स (अर्थात लुटण्याचा हक्क आणि विभागणी) जसे पेशव्यांनी शिंदे होळकरांना दिले तसे, पुढे अप्पर हाऊस आणि त्यानंतर लोअर हाउस. मला असे वाटते की ब्रिटिश राजांनी काळाची पावले ओळखुन सत्ता हातातुन जाऊ दिली. आणि आपली सत्ता दुसऱ्या स्वरुपात निर्माण केली. उदाहरणार्थ, पूर्वी सत्ता शस्रांमध्ये होती, पुढे ती राजकीय झाली, त्यापुढे ती आर्थिक आणि प्रसारमाध्यमांपर्यंत पसरली. आणि आज माहिती तंत्रज्ञानामध्ये ती ताकत आली आहे. आज ब्रिटिश राजघराण्याकडे १००-१२५ शिपाई असतील. तेदेखील नामधारी. परंतु अजुनही राणी हे एक सत्ता केंद्र आहे. अजूनही ती किताब देते लोकांना, हेड ऑफ स्टेट चा सन्मान मिळतो देशा परदेशात. हे कसे? तर त्यांच्या घराण्याची पाळेमुळे आता इतर सत्ता केंद्रामध्ये पसरली आहेत. आणि जसजसे जग अधिक लोकशाही मार्गाकडे जाते आहे तसतसे सत्तेचे विकेंद्रिकरण अटळ आहे.

दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट की जी ब्रिटिश राजांनी केली आणि इतरांनी केली नाही किंवा तेवढ्या यशस्वी रीत्या केली नाही ते म्हणजे धर्माला मुठीत ठेवणे. धर्म ही सुद्धा एक सत्ता असते. आणि हे लक्षात आल्यामुळे ब्रिटिश राजांनी चर्च ऑफ इंग्लंड काढले. ते प्रोटेस्टंट होते. त्यांना रोमवरुन आदेश नको होते. भारतात देखील अकबराने दीन-ए-इलाही धर्म का काढला? किंवा जैनांचे २४ तिर्थंकार कोण होते? शिखांचे १० गुरु कोण होते? किंवा गौतम बुद्ध कोण होते? तर ही सर्व उदाहरणे राजांनी धर्माची सत्ता झुगारण्यासाठी आपला स्वत:चा धर्म उभारण्याचे केलेले प्रयत्न आहेत. त्यात थोडाफार तत्वज्ञान बदल करायचा. परंतु मुख्य कारण सत्तासंघर्ष आहे. तत्वज्ञान नाही. परंतु आपण इतिहासाकडे असे पहातच नाही. असो ..

परंतु राणीच्या आयर्लंड भेटीवरुन असे काही विचार डोक्यात आले. राणी आणि श्रीमान फिलिप जगप्रसिद्ध गिनिज ब्रुअरीमध्ये गेले. राणीने गिनिजला तोंड मात्र लावले नाही.