Friday, August 19, 2011

संभवामि युगे युगे

सध्या भारतामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध मोठे आंदोलन चालले आहे. अण्णा हजारे या कुठलेही सरकारी पद किंवा पैश्यांचे बळ मागे नसलेल्या सामान्य माणसाच्या मागे आज या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जनता मोठ्या प्रमाणात उभी आहे.

तब्बल २० एक वर्षांपूर्वी आमचे एक युवक शिबिर झाले होते राळेगणसिद्धीला - म्हणजे अण्णांच्या गावी. त्या काळी अण्णांचे नाव त्या गावाचा कायापालट करण्याबद्दल प्रसिद्ध होते. अगदी परदेशातुन आणि इस्राईलमधुन जलतज्ञ येऊन पाहुन जात की नगर जिल्ह्यासारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये हे एकच गाव इतके संपन्न आणि हिरवेगार कसे. अर्थातच त्यामागे अण्णांचे कष्ट होते. सैन्यातुन निवृत्ती घेतल्यानंतर अण्णांनी आपल्या गावी परतुन गांधीजींच्या ग्रामविकासाच्या कल्पनेची कास धरली. दारुबंदी केली. पाण्याचे नियोजन केले, सहकाराच्या माध्यमातुन शाळा, वीज अश्या सोयी आणल्या गावात. राळेगण सिद्धी हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर आदर्श गाव म्हणुन प्रसिद्ध झाले.

आमच्या शिबिराचा समारोप करताना अण्णांनी भ्रष्ट्राचार हाच विषय निवडला. आम्ही ५० एक तरुण असु तिथे. अण्णा म्हणाले, "भ्रष्टाचार संपवु म्हणुन संपणार नाही. त्यासाठी आक्रमकता पाहिजे. भाषणांनी साध्य होणार नाही. तुम्हा तरुणांना मी एक उपाय सांगतो. शंभर तरुण गोळा करा. मी तुम्हाला संपुर्ण महाराष्ट्रातील १०० सर्वात जास्त भ्रष्ट जिल्हाधिकारी आणि त्यांची पिल्लावळ यांची यादी देतो. तुम्ही अमुक एक दिवस निवडा. प्रत्येक तरुणाने एक अधिकारी निवडायचा आणि त्या दिवशी त्याची भेट ठरवायची बरोबर दहा वाजता. आणि बरोबर दहाच्या ठोक्याला भेट झाली की काहीही न बोलता त्याला एक ठेऊन द्यायची (भडकावुन द्यायची / श्रीमुखात द्यायची / कानाखाली जाळ काढायचा इत्यादि!)."

अणा पुढे म्हणाले - "कल्पना करा महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रांमध्ये बातमी येईल की कसे कुणास ठाऊन परंतु काल शंभर तरुणांनी शंभर कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवले."

मला त्यावेळी २० एक वर्षांचा असताना ती कल्पना जेवढी आवडली, आज जवळपास ४० च्या आसपास तेवढीच आवडते. आणि अमेरिकेत इथे येऊन तर माझे ठाम मत झाले आहे की राजकिय गोष्टी भीक मागुन मिळत नसतात तर त्यासाठी लढावे लागते, संघर्ष करावा लागतो. याचना करुन फार तर भीक मिळेल. परंतु हक्क आणि सन्मान मिळणार नाही.

पुढे अण्णांनी राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराविरुद्ध यशस्वी लढा दिला आणि दोन मंत्र्यांना बडतर्फ करायला लावले. परंतु मला वाटते अण्णांनी महाराष्ट्रात माहितीचा अधिकार यावा याचा जो यशस्वी लढा दिला ते आपल्या लोकशाहीच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. आणि महाराष्ट्राने संपूर्ण भारतामध्ये माहितीच्या अधिकाराची मुहुर्तमेढ रोवली.

आज अण्णांचा लढा हा भारताच्या पातळीवर पोहोचला आहे. लोकपाल विधेयक मांडण्यात यावे या मागणीचा सरकारने अंशत: स्वीकार करुन दोन महिन्यांपूर्वी असे विधेयक आणण्याचे नाटक केले. परंतु अण्णांचे समाधान झाले नाही. प्रत्येक राज्यात लोकायुक्त नेमावा आणि त्याने सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणे सहा महिन्यात निकालात काढावीत अशी मुख्य मागणी आहे. मी त्याचा काहीच अभ्यास केला नाही. परंतु सरकारपेक्षा अण्णांवर माझा शतपटीने जास्त विश्वास आहे.

आळशी, विघ्नसंतोषी, नकारात्मक लोक तसेच भ्रष्टाचारी किंवा हितसंबंधी मंडळी नाके मुरडत आहेत. या विधेयकाने काय होणार असे विचारत आहेत. परंतु पर्यायी उपाय सुचवत नाहीत.

तत्वज्ञान मांडायला खूप सोपे आहे. परंतु कृती अवघड असते. अण्णांच्या उपायात तृटी असणारच आहेत. लोकायुक्तावर अंकुश कोण ठेवणार. आहे त्याच गोष्टी नीट चालवता का नाही येत. न्यायव्यवस्था का नाही सुधारता येत. शंभर सुविचार आहेत. अगदी मलादेखील हे पटते की समांतर रचना निष्फळच ठरेल. जोपर्यंत सामान्य माणुस आपल्या हक्कांसाठी जाब विचारण्याचे धाडस करत नाही तोपर्यंत कुठलीच व्यवस्था नीट काम करत नाही. अगदी लोकायुक्त देखील नाही. लोकायुक्त हा थेट जनतेने निवडुन दिला पाहिजे. तरच ते पद चांगले काम करेल. मग न्यायाधिशांना निवडुन दिले तर? सर्व प्रश्नांचे मुळ ते नाही का? सडलेली न्यायव्यवस्था हे भ्रष्टाचाराचे मुळ कारण आहे. जर न्यायाधीश जनता निवडुन देत असेल तर भ्रष्टाचाराला शासन लवकर होईल आणि भ्रष्टाचार कमी होईल.

परंतु पुन्हा तेच... वाद चर्चा आणि तत्वज्ञान यांचा अतिरेक करुन संधी वाया घालवण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडुन घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध एक पाऊल पुढे उचलणे जास्त महत्वाचे आहे.

अण्णांच्या या लढ्यातुन नुसते भ्रष्टाचाराचे नव्हे तर समाजाच्या औदासिन्याचे निर्मुलन होवो. विष्णुचा दहावा अवतार येऊन आमची सुटका करेल अशी आशा बाळगणारी वृत्ती जाऊन स्वत: धडक देऊन काहीतरी करु अशी उर्मी आणि आत्मविश्वास समाजात येवो. आणि हे मराठ्यांनी नाही करायचे तर कोणी करायचे? ज्ञानेश्वर एकनाथ तुकारामांपासुन ते अगदी छत्रपती शिवाजी, संभाजीराजे, थोरले बाजीराव, माधवराव ते शाहु फुले आंबेडकर टिळक गोखले आगरकर आणि यशवंतराव अशी आपली परंपरा. वस्तुस्थिती ही आहे की केवळ महाराष्ट्रामध्येच हे स्फुल्लिंग आहे आणि ते शिवाजी महाराजांनी पेटवले आहे. तोच आपला वारसा आहे आणि आपणच तो पुढे न्यायचा आहे. अण्णा हे केवळ त्याच परंपरेतील एक धागा आहेत आणि हा लढा त्या परंपरेतील एक रत्न आहे.

Wednesday, August 17, 2011

पाणी टंचाई

सलोनीराणी, ही बातमी अशी हॉट ऑफ द प्रेस! ह्युस्टन शहरात उष्णतेमुळे दिवसाकाठी ७०० वेळा जलवाहिन्या फुटत आहेत सध्या! जलवाहिनी फुटते आणि अमेरिकेत?? !! मला अगदी नववधु पहिल्यांदा माहेरी गेल्यावर तिला कसे वाटेल तसे भरुन आले! अर्थात पाण्यामुळे "भरुन" आले हाच शब्द जास्त चांगला!

तर झाले असे आहे की सध्या अमेरिकाभर उष्णतेची लाटच आहे. इथे अ‍ॅरिझोनामध्ये बसुन आम्हाला काही कधी कळतच नाही की लाट आहे की काय? इथे उष्णतेची लाट नसणार तर कुठे असा विचार करुन आम्ही (एसी मध्ये) गप्प बसतो! परंतु जर युएसए टुडे चे शेवटचे पान पाहिले तर माझ्यासारख्या आळशी आणि जरा मंद लोकांसाठी एक अप्रतिम रंगीत नकाशा असतो अमेरिकेचा की ज्यावर सगळीकडची तापमाने रंगांनुसार दाखवली असतात. उष्ण म्हणजे लाल आणि जांभळा म्हणजे थंड. तर काल मी खरे तर तो नकाशा पाहिला एका दुकानात बसल्याबसल्या. सगळ्या अमेरिकाभर लाल आणि दस्तुरखुद्दांच्या राज्यामध्ये चक्रमी आणि विक्रमी तापमान होते. बकहेड मध्ये ११२ अंश फॅरेनहाईट! त्यामुळे ह्युस्टन किंवा न्युयॉर्कवासिंना ९७ किंवा १०० तपमान असेल तर त्याबद्दल फारशी काही सहानुभुती अर्थातच नव्हती माझ्याकडे. (हे अमेरिकेचे असे तपमानाचे देखील विचित्र. सगळे जग सेल्सिअस मोजते आणि इथे फॅरेनहाईट. परंतु मला असे वाटते की याद्वारे ते स्वत:च्या बाजारपेठेचे संरक्षण करतात. असो ... पण तो दुसरा विषय होईल.

तर ह्युस्टन मध्ये दिवसा ७०० जलवाहिन्या कश्या फुटताहेत. तर इथे पाण्याला खुपच दाब असतो. घरातल्या सगळ्या नळांना अगदी दाबुन पाणी येते. आणि २४ तास पाणी असते. आणि हे सगळीकडेच ... अगदी मागासातील मागास राज्यात देखील हीच परिस्थिती. ह्युस्टन मध्ये गेले १४-१५ दिवस रोज विक्रमी तपमान होते आहे. त्यामुळे जनता हैराण होऊन पाण्याचा जास्त वापर करते आहे अर्थातच. त्यामुळे नळावर जास्त दाब येऊन ते फुटु लागले आहेत. अर्थात काय तर इतके लोक इतके पाणी वापरु लागले तर त्या बिचाऱ्या नळांनादेखील काही आयुष्य आहे. तसेच सगळ्या अमेरिकाभरच नळ वगैरे असल्या गोष्टी यांनी कधी ४०-५०-७० वर्षांपुर्वी करुन ठेवल्या आहेत त्या आता जुन्या होत चालल्या आहेत. त्यामुळे देखील फुटणे स्वाभाविक आहे.

त्यामुळे आता ह्युस्टनमध्ये पाणीटंचाई आणि पाणीवाटप सुरु झाले आहे म्हणे. अर्थात इथली टंचाई म्हणजे काय तर दिवसातुन बागेला एकदाच पाणी द्या. दोन वेळा देऊ नका. खरेच. अ‍ॅरिझोनामध्ये देखील कधी कधी असे आवाहन करतात. तर यांची ही कमाल पाणीटंचाईची.

अ‍ॅरिझोनामध्ये बाकी वाळवंट असले तरीही उत्तरेला कोलोरॅडो पठार पसरले असल्यामुळे तिथल्या डोंगरांमध्ये चिकार बर्फ पडतो हिवाळ्यात. त्याचेच पाणी उन्हाळ्यात कोलोरॅडो आणि साल्ट रिव्हर अश्या दोन मुख्य नद्यांमार्फत अनुक्रमे नेवाडा-कॅलिफोर्निआ आणि अ‍ॅरिझोना राज्यांना पुरवले जाते. या नद्यांवरची धरणे अशी प्रचंड आहेत की मागील पंधरा वर्षे इथे दुष्काळ आहे आणि तरीही पाणीटंचाई अशी नाही. १९१०-२०-३० च्या दशकांमध्ये अमेरिकेच्या या नैऋत्य भागामध्ये असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले गेले आणि मोठे तंत्रज्ञानदेखील विकसीत झाले. गोलाकार भिंतीची धरणे, बर्फाचा वापर करुन सिमेंट लवकर पक्के करण्याची क्रिया, मोठमोठ्या क्रेन्स, टनेल्स तयार करण्याची यंत्रे एक ना अनेक. हे सगळे तंत्रज्ञान इथेच विकसीत झाले. त्याची फळे पुढच्या पिढ्या आजतागायत उपभोगताहेत. आणि आपल्याकडे भारतामध्ये नर्मदा बचाओ करत विकासकामांना खीळ घालत बसतात लोक वर्षानुवर्षे. आणि अमेरिका आणि इतर राष्ट्रे असल्या "निर्बुद्द" समाजसेवकांना शंभर पुरस्कार देऊन त्यांचा अहंकार जोपासतात आणि भारताला मागे ठेवतात. चीनने "थ्री गॉर्जेस" धरण जे काही बांधले आहे त्यावर अशीच टीका केली आहे अमेरिकेने. परंतु स्वत:कडे ३०-४० वर्षे दुष्काळ पडला तरीही पाणी कमी पडेल अशी धरणे बांधुन ठेवली आहेत. तिथे नाही लहान धरणांचे तत्वज्ञान लागु पडत. ते तत्वज्ञान फक्त विकसनशील देशांना. परंतु अमेरिकेला दोष देण्यात अर्थ नाही. आपला फायदा कश्यात आहे हे आपणच ओळखले पाहिजे. चीनी लोक भोळसट नाहीत. आपण भोळसट, आळशी आणि वैचारिकदृष्ट्या अजुनही गुलामगिरीतच आहोत. असो !

तर ह्युस्टन मध्ये तब्बल ४० माणसांची फौज काम करते आहे आणि दिवसाकाठी ७०० गळत्या थांबवत आहेत. खरे खोटे त्यांना माहित. कसे करतात देव जाणे. परंतु ४० म्हटल्यावर अगदी पुण्यातल्या वेटरने फक्त बटाटेवडा मागवल्यावर जसे तुच्छतादर्शक म्हणावे "बस? इतकेच?" त्याच तुच्छतेने परंतु थोड्याश्या कौतुकाने देखील मी मनात म्हणालो - "बस ४० च ?" साहेबाचा कामाचा आवाका बाकी आहे म्हणायचा!

Saturday, August 6, 2011

विंचुपुराण

सलोनीराणी, मागच्या शुक्रवारी मी ऑफिस मध्ये बसलो होतो. घरातलीच एक खोलीचे ऑफिस म्हणुन वापरतो. तर सिद्धु आणि तुझ्या आईने मला जोरजोरात बोलावले. एरवी मी बऱ्यापैकी बहिरा असतो. परंतु आकांत एवढा मोठा की काही विचारता सोय नाही. ऑफिसकडुन किचेन कडे जायला लागलो तर सिद्धु आणि तुझी आई गराजच्या दरवाजापाशी उभे राहुन मला सांगत होते की "विंचु" आहे. मी सगळीकडे पाहु लागलो. मला काही दिसेना. "अरे इकडे" आई. "बाबा इथे इथे .." सिद्धु. म्हणुन मी ते उभे होते तिकडे जायला लागलो. तर एकदम हलकल्लोळ केल्यासारखे दोघेही काहीतरी सांगु लागले. शेवटी त्यांचा आवाज टीपेला पोहोचला त्यावेळी मला कळले की मी उभा होतो तिथे माझ्या पासुन अर्ध्या फुटावर भिंतीवर विंचु होता. मग काय .. तुझ्या आईचीच एक चांगली चप्पल आणली आणि --- पच्याक!
 
आताशा इथे विंचवांची सवय झाली आहे. व्ह्यायला नको ... पण काय करणार?

पहिले ६ महिने या घरात चांगले गेले. घरात रहायाला आलो ते ९ महिन्यांपूर्वी. घर चांगलेच आहे. चौघांसाठी पुरेसे असे. सगळ्या गोष्टी जवळ असलेले - सिद्धुची शाळा, दुकाने आणि ओळखीचे लोक इत्यादि. अंगण एकदम चांगले. परंतु मे महिना आला आणि अचानक एके दिवशी कचऱ्याचा डबा (डबा कसला ड्रम!) बाहेर नेऊन ठेवत असताना तुझ्या आईला विंचु दिसला. त्यावेळी त्या विंचवाला गाठुन मारेपर्यंत तिचा आणि माझा देखील थरकाप उडालेला! नंतर पुढच्या दरवाज्यात ... त्यानंतर मागच्या दरवाज्यात. परत एकदा घरात दारात. हॉलमध्ये भिंतीवर ... पुन्हा बाहेर कचऱ्याच्या डब्यापाशी .... बापरे बाप .. अशी अनेक पिल्ले आढळुन आली. अर्थात त्या सगळ्यांना आकाशातल्या बापाकडे पाठवले हे सांगणे न लगे.
परंतु इतके विंचु सापडल्यामुळे आम्ही हैराण झालो. किंबहुना दुसरा विंचु घरात भिंतीवर दिसला त्याचवेळी आपण हादरलो. कारण जे न देखे रवी ... अश्या सर्व जागा तुला बरोबर दिसतात. आणि विंचवांना पण त्याच जागा दिसतात. त्यामुळे कधीतरी तुमची गाठ पडायला नको!
सिद्धु ५ वर्षांचा असताना आपण दुसरीकडे रहात होतो - इथुन एक मैलावर. तिथे त्याला विंचु चावला होता. तो किंचाळला म्हणुन आम्ही पळत लिव्हिंग रुम मध्ये आलो तर कुठे काही दिसेना. आम्हाला कळेना काय चावले. सिद्धुला विचारले तर त्याने नांगीसारखा बोटाचा आकार करुन दाखवला. मग काय आम्ही सगळी खोली पालथी घातली. तरी दिसेना. बाहेर गेला की काय? शेवटी मी कोच पालथा केला. तर स्वारी सोफ्याच्या खालच्या भागाला बिलगुन अशी बसली होती की काही केलेच नाही. त्याचा समाचार घेतल्यानंतर ९११ ला फोन केला आणि सांगीतले की मुलाला विंचु चावला आहे तर काय करायचे. तर त्यांनी विचारले "विंचवाचा रंग काय होता - पिवळसर की काळा?". म्हटले - "पिवळसर". "मग काळजीचे कारण नाही" - ९११. पिवळसर विंचु अ‍ॅरिझोनामध्ये चिक्कार. त्यांना बार्क विंचु म्हणतात. ते प्राणघातक नसतात. परंतु दंश केला तर दाह होतो. त्यामुळे फक्त साबणाने धुतले आणि बर्फाने चोळले तर थोडे बरे वाटते. सिद्धु तसा मुळचाच सोशिक असल्यामुळे तसा नाही रडला खुप.
असो तर त्या अनुभवामुळे आईने मला एका पेस्ट कंट्रोल वाल्याकडे पिटाळले. त्याने शंभर पद्धतीची औषधे आणि ती फवारण्याची यंत्रे दाखवली. मी सगळे एकदम ऑल क्लिअर आहे असे त्याला सांगीतले पण मला हे अमेरिकेतील डिआयवाय इथे करायला आवडले नसते. डिआयवाय म्हणजे "डू-इट-युवरसेल्फ". म्हणजे स्वावलंबन! मी त्याच्या दुकानातुन पळ काढायला लागलो तर तो म्हणाला, "मागच्या आठवड्यात एक बाई तिच्या भावाच्या घरी गेली. तिचे लहान मुल त्या घराच्या पुढ्यात खेळत असताना त्याला विंचु चावला. तर त्याला हेलिकॉप्टरने इथल्या हॉस्पिटलमध्ये आणले. १५ दिवस ते बाळ जायबंदी झाले होते. आता हळुहळु बरे होते आहे. परंतु आई वडिलांवर आता दीड लाख डॉलर्सचे कर्ज झाले आहे!". "तुमच्या बायकोला अजिबात सांगु नका" - हे सांगायला विसरला नाही.
परंतु विंचु-कन्ट्रोल ही माझी खासियत नसल्यामुळे त्याच्या विक्रीकौशल्याचा उपयोग झाला नाही आणि अखेर इको-फर्स्ट नावाच्या कंपनीला आपण वर्षभराचे पैसे देऊन आपल्या घरात आणि आवारात विंचुविरोधक औषधे मारुन घेतली.
अर्थात त्याच्या आधी एका दुकानातुन बरीचसे स्प्रेज, औषधे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ब्लॅकलाईट म्हणजे अतिनील किरणांचा (युव्ही रेज) टॉर्च आणला. अंधारात विंचवांवर ब्लॅकलाईट चा प्रकाश पडला तर अगदी किरणोत्सर्ग करत असल्यासारखे विंचु चमकु लागतात. "विंचु असेल तर दिसणार नाही असे होणारच नाही" इति लोज मधला विक्रेता! अर्थात त्याचा पडताळा घेण्यासाठी आम्हाला फार काळ जावा लागलाच नाही. दोन-चार दिवसातच अगदी हॉलमधल्या भिंतीवर विंचु दिसला. त्याला मारता मारता तो खाली पडला आणि सोफ्याच्या खाली जाऊन लपला. सिद्धोबाच्या अनुभवानंतर आम्ही सुपर स्मार्ट झालो असल्यामुळे विंचोबांना सोफ्याखाली हेरले आणि ठेचले. ब्लॅकलाईट झिंदाबाद.
एकंदरीतच अ‍ॅरिझोनामध्ये विंचु भरपुर आहेत. आणि उन्हाळ्यात ते थंड जागेच्या शोधात घरात येण्याचा प्रयत्न करतात. दरवाजे खिडक्या कुठेही थोडी जरी फट असेल तरीही त्यांना पुरते. १/१६ इंच फटीतुनदेखील ते आपले शरीर सपाट करुन आत प्रवेश करु शकतात. दुसरे म्हणजे कुठल्याही सांदीसपाटीत असे काही दुमडुन बसतात की वाटावे की पाला पाचोळा पडला आहे. तिसरे म्हणजे अगदी दिसले तरी कळत नाही की जिवंत आहे असे वाटतच नाही. माझ्या घरातल्या ऑफिसमध्ये बरेच विंचु सापडले. माझ्यापासुन दोन फुटावर मी तास दोन तास फोनवर बोलतोय आणि हे महाशय खाली जमीनीवर झोपा काढताहेत. शेवटी कधी तरी माझे लक्ष गेले.
असो.. परंतु असे तिसऱ्यांदा घडल्यावर आता मात्र इको-फर्स्ट च्या लोकांना घराच्या आतुन बाहेरुन रसायने आणि औषधे यांचा अगदी सडा टाकला आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो खरे .... परंतु ही निश्चंती काही तासच टिकली. आज सकाळीच छतावर एक इंचाचे विंचवाचे पिल्लु सापडले! तीच जागा राहिली होती म्हणा! तिथेदेखील आता विंचु सापडल्यामुळे आता झोप लागणे कठीण आहे!