Wednesday, March 25, 2009

स्मृतिभ्रंश (अल्झायमर्स)

सलोनी
आज ऑफिसला जाताना रेडिओ ऐकत होतो. अमेरिकेत बरेच लोक कार चालवता चालवता रेडिओ ऐकतात. मला स्वत:ला इथला पब्लिक रेडिओ आवडतो. कारण पब्लिक रेडिओ व्यावसायिकरीत्या न चालवता समाजप्रबोधनासाठी चालवला जातो. त्यामुळे त्यावरच्या बातम्या आणि कार्यक्रम उद्बोधक असतात. असो ...
आज पब्लिक रेडिओवर अल्झायमर्स (स्मृतिभ्रंश) या रोगाबद्दल चर्चा चालली होती. त्यात असे कळले की अमेरिकेत ६५ वर्षांवरच्या १०% आणि ८५ वर्षांच्यावरच्या तब्बल ५०% लोकांना स्मृतिभ्रंश होतो. तसे अमेरिकेत स्मृतिभंशाबद्दल बर्याचदा ऐकायला येते. परंतु ही माहिती केवळ माहिती यासाठी नाही राहिली की .... सिद्धुची एक शिक्षिका मिस ब्लॅक म्हणुन आहे तिच्या बोलण्यातुन कळले की तिच्या आईला गेली कित्येक वर्षे स्मृतिभ्रंश आहे. एकदा एका लग्नसमारंभात व्हायोलिन वाजवता वाजवता ती एकदम थांबली. तिला पुढचे काही आठवेना. अश्या पद्धतीने मिस ब्लॅकच्या आईच्या स्मृतिभ्रंशाची अशुभ चाहुल लागली. यावर उपाय अजुनतरी नाही. स्मृतिभ्रंशाची वाढ थोडीफार रोखता येते परंतु इतकेच काय ते. मिस ब्लॅकची आई आज स्वत:च्याच नवर्याला कधीकधी म्हणत असते ... की त्याचे घर छान आहे किंवा त्याचा कुत्रा चांगला आहे. आपल्याच माणसांना आपली ओळख राहु नये यासारखे दु:ख नाही.
अमेरिकेत या रोगाचे प्रमाण विशेषत: जास्त आहे. मी काही तज्ञ नाही ... परंतु असे वाटते की इथे सुबत्ता आणि वरवरची शांति जरुर आहे परंतु त्यासाठी करावा लागणारा संघर्ष खुपच तीव्र आहे. इथे एक म्हण प्रसिद्ध आहे - देअर इज नो फ्री लंच! अर्थात - कोणालाही इथे फुकट काहीही मिळणार नाही. तसे बव्हंशी हे तत्वज्ञान मला स्वत:ला पटते. परंतु त्याचा इतका अतिरेक आहे की नोकरीची शाश्वती नाही, नात्यांची शाश्वती नाही, प्रत्येक गोष्टीचे मूल्य ठरवता ठरवता बर्याच गोष्टींचे महत्व विसरुन जायला होते. स्पर्धा हा भांडवलवादाचा अतिशय महत्वाचा घटक ... परंतु अतिस्पर्धेमुळे व्यक्तिचे महत्व कमी होऊन वस्तुंचे महत्व इतके वाढले आहे की काही माणसांना स्वत:चाच विसर नाही पडला तरच नवल! जीवन ही अनुभव धारा आहे. अनुभवांची शृंखला आहे. परंतु स्पर्धेत जर आपण हरल्याचीच भावना सतत घर करून राह्यला लागली तर त्या अनुभवांमध्ये कोणाला रस राहणार?
आधुनिक युगात आणि भांडवलवादाच्या रेट्यात स्पर्धेला पर्याय नाही. परंतु किती स्पर्धा आवश्यक आहे? किती वस्तु पुरेश्या आहेत? आणि आपण खरोखरच काय शोधतो आहोत? या सर्व गोष्टींचा विचारही व्हायला हवा. आज पाश्चात्यांच्या भौतिक प्रगतिमुळे सर्व जगच त्यांचे अंधानुकरण करते आहे. काही वेळा हे अनुकरण अस्तित्वाची लढाई म्हणुन करावे लागते. त्यांच्याकडे बर्याच चांगल्या गोष्टी आहेत यात वादच नाही. परंतु भारताकडेही अमुल्य ठेवा आहे. विचारधन आहे. तगमगलेल्या पाश्चात्य मनाला शांत करण्याची ताकद आहे. परंतु भारताच्या ताकदीचे प्रकटीकरण भारताच्या भौतिक प्रगतीशिवाय होणार नाही. मला वाटते पाश्चात्यांचा वस्तुवाद आणि पौर्वात्यांचे सहजीवन यांचे मिलन कधी तरी होईल. समस्त मानव जात बाह्य प्रगतीबरोबर आंतरीक शांति प्राप्त करेल . स्मृतिभ्रंशाचे प्रमाणही तेव्हाच कमी होईल.

No comments: