Sunday, March 8, 2009

सोनालीची ग्लूकोज चाचणी २ आणि प्लेटलेट्स

मागच्या ग्लूकोज चाचणी नंतर असे दिसले की साखर चांगली विरघळली जात नाही आहे। म्हणुन परत तीच चाचणी केली। यावेळी मात्र १ तासाऐवजी ३ तासांची होती। प्रत्येक तासामध्ये एक कप सीरप प्यायला देऊन १ तासाने रक्त तपासायला घेतले। असे ३ वेळा केले। आणि या ३ नमून्यांची तपासणी वेगवेगळी केली। यावेळी साखर विघटन ठीक आले ... परन्तु रक्तामध्ये प्लेटलेट्स कमी आल्या। प्लेटलेट्स म्हणजे रक्तामध्ये असलेल्या काही विशिष्ट पेशी ज्या रक्त गोठायला मदत करतात। जन्म देताना - विशेषतः सी-सेक्शन करताना रक्तस्राव होतो। यावेळी शरीर नैसर्गिक रित्या रक्त गोठवते आणि प्लेटलेट्स एकमेकांमध्ये गुंतून रक्तप्रवाह अडवतात। प्लेटलेट्स कमीच असतील तर रक्त गोठायला त्रास पडतो। आणि अतिरक्तस्रावाने बाळंतीण स्त्रीचा मृत्यु होऊ शकतो।

परन्तु आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये या सर्व गोष्टींवर उपाय आहेत। त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही। आम्हाला ताबडतोब एका दुसऱ्या डॉक्टर कड़े जाण्यास सांगितले। ती डॉक्टर फक्त याच विषयामध्ये तज्ञ आहे। तिथे काही चाचण्या केल्या. त्यांनी सांगितले की प्लेटलेट्स कमी आहेत परन्तु आता काही करण्याची गरज नाही कारण १०० च्या आसपास आहेत। १५०-४०० हे निरोगिपणाचे लक्षण ... आणि ३५ हे अगदी गंभीर लक्षण। प्रसूतीच्या वेळी ती डॉक्टर ओपेराशन रूम मध्ये असणार आहे। त्याव्यतिरिक्त काहीही करण्याची गरज नाही।

मी विचार करू लागलो की भारतात खेडोपाड्यात अजूनही या सर्व गोष्टींचा किती विचार केला जात असेल। कधी कधी तर शहरातही अजूनही अज्ञान दिसते। केवल वैद्यकीय सुविधांचाही हां प्रश्न नाही। मुद्दा आपल्या समाजाच्या मोकळेपणाचाही आहे। आपल्या समाजात गर्भारपणा इत्यादि विषयांवर मोकळेपणाने बोलणे दिसत नाही। नैसर्गिक लज्जा हे मी समजू शकतो। परन्तु काही काही आरोग्यविषयक गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात त्यांच्याबद्दल प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे। गैरसमज दूर झाले पाहिजेत।

तसेच आपल्याकडे डोक्टरदेखिल आवश्यक ती माहिती रोग्यांना देत नाहित। यांना काय कळणार ही भावना योग्य नाही। अज्ञानात सुख नाही तर दुःखच आहे इथे। त्यामुले या विषयावर सामान्यांना कळेल अशी पुस्तके लिहावीत डोक्टरांनी। मी आणि सोनाली बर्याचदा इथे पुस्तकांच्या दुकानात जाऊन या विषयावरची पुस्तके वाचतो। त्यामध्ये बाळाची वाढ आणि स्त्री मध्ये होणारे प्रत्येक आठवड्यातिल बदल यावर अगदी सुंदर आणि अचूक माहिती दिली असते। मन थक्क होते की या पाश्चात्य लोकांनी एवढा अभ्यास कधी केला असेल!! आणि आता तर ही सर्व माहिती महाजालावर (internet) सुद्धा उपलब्ध आहे।
असो तर ... एकंदरीत उत्तम चालले आहे। इथे वैद्यकीय सोयीसुविधा चांगल्या (नव्हे जगात सर्वोत्तम) आहेत। त्यामुले काळजिचे कारण नाही। अजून ५ आठवडे झाले की सलोनिची वाढ पूर्ण होईल। त्यानंतर पुढचे ४ आठवडे फक्त वजन वाढत राहते ... ३६ ते ४० च्या आठवड्यात बाळाचा कधीही जन्म झाला तरी बाळाच्या आरोग्याला तसा धोका तितका नसतो। परन्तु आईच्या पोटापेक्षा अधिक माया अजून कुठेही मिळू शकत नाही बाळाला हेही तितकेच खरे।

No comments: