Saturday, March 28, 2009

गुढिपाडव्याच्या निमित्ताने ....

सलोनीबाई
काल गुढीपाडवा होता. आपले नवे वर्ष इथे सुरु होते. रावणावर विजय मिळवुन प्रभु श्री रामचंद्र आज अयोध्येला परतले. त्या विजयाचे प्रतिक म्हणुन गुढी उभारतात. याच दिवशी शालिवाहनाने शकांचा पराभव केला. पुराणांत म्हटले आहे की याच दिवशी सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवांनी.
आपल्या संस्कृतित बऱ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या स्वरुपात दिसतात. जणुकाही एखादी मोत्याची किंवा फुलांची माळ असावी आणि प्रत्येकाने एक एक फुल गुम्फत जावे .... तसे!
आम्ही (मी सोनाली आणि सिद्धु) इथे जवळच एक बालाजीचे मंदिर आहे तिथे गेलो होतो. बरेच लोक आले होते. २०० तरी असावेत. दर्शन घेतले, प्रसाद घेतला .... बरे वाटले. तिर्थ घेतले आणि डोक्याला हात लावुन डोळ्यावरुन फिरवला की काय वाटते ते शब्दात सांगणे कठिण आहे. अगदी घरी आल्यासारखे वाटते.
हे मंदिर खरेतर एका घरात वसले आहे. बव्हंशी कानडी लोकांनी स्थापन केले आहे असे दिसते. भाषा कळली नाही तरी भाव कळतो ... भावना कळतात. त्यामुळे अडचण येत नाही.
इथे अमेरिकेत चर्चचे असे नसते. जर तुम्ही ख्रिश्चन असाल आणि चर्च मध्ये जात असाल तर तुम्ही एका विशिष्ट चर्चमध्येच जाता. कॅथॉलिकांचे चर्च वेगळे, मेथोडिस्टांचे वेगळे, लॅटर डे सेंट्सचे वेगळे. इतकेच नाही तर काळ्यांचे वेगळे आणि गोर्यांचे वेगळे.
भारतात आपण असा विचारच कधी करत नाही. आपल्याला जिथे आवडेल तिथे जाउन दर्शन घेतो. अगदी चर्चमध्ये जायला पण काही हरकत नसते आपली. दलितांना मंदिरप्रवेश नव्हता ही मधल्या काही शतकांमधील विकृती होती. अजूनही कुठे कुठे तुरळक होत असेल परंतु तो अपवाद म्हणावा लागेल.
मला माहित नाही सगळ्याच ख्रिश्चन लोकांचे असे असते का.. परंतु इकडे तरी चर्च म्हणजे जणु काही संघटनाच असते एखाद्या राजकिय पक्षासारखी. कदाचित त्यामुळे जर तुम्ही एका चर्चचे सभासद असाल तर तुम्ही दुसऱ्या चर्चचे तत्व मान्य करणे अशक्य असावे. हिंदु (वेदिक) धर्माचा पायाच हा आहे की "तत त्वम असि। अहम ब्रह्मास्मि। एकम सत, विप्रा बहुधा वदन्ति।" एकच तत्व आहे सगळीकडे ... आणि आपण त्याचेच अंश आहोत. ज्याप्रमाणे नदी सागराला जाउन मिळते तसे आपणही कधितरी त्या तत्वात विलिन होणार. वेगवेगळे धर्म आणि देवता ही केवळ रूपे आहेत. आपण स्वत:च ब्रह्म आहोत. उपनिषदात की कुठे तरी ती गोष्ट सांगीतली आहे दोन पक्षांची. ज्ञान प्राप्त झाल्यावर कळते की खालचा पक्षी ही वरच्या पक्षाचीच प्रतिमा आहे. दोन्हीत फरक केवळ ज्ञानाचा. एक जण अज्ञानात आहे. आणि म्हणुन आपल्या धर्माचे लक्ष्य मोक्ष आहे ... ज्ञानप्राप्ति आहे. आनंद मिळवणे नाही. कारण आनंदातही अज्ञानच आहे.
असो ...
तर खरोखरच छान वाटले. तिथे प्रसाद म्हणुन दक्षिणात्य पद्दतीचा मसाले भात, ताक-पोहे, नैवेद्याचा शिरा असे दिले. ते घेउन घरी आलो.

No comments: