Tuesday, August 11, 2009

रॉबर्ट मॅक्नमारा

इतिहासाचा अभ्यास ही अगदी विलक्षण गोष्ट आहे. इतिहास कधी मनोरंजक असतो तर कधी दु:खद. कधी विसरू नये असा तर कधी आठवु नये असे वाटवे असा. अगदी शब्दश: अर्थ बघायचा झाला तर इतिहास म्हणजे -

"हे असे होते" - इति: + अस.

 

परंतु हा झाला आपला भाबडेपणा. वस्तुस्थिती अशी आहे की इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो. ज्ञात इतिहासाच्या मागे असत्याचे पडदे विणलेले असतात ज्यांच्यामागे जेत्यांची कृष्णकृत्ये अलगद दडवलेली असतात. त्या असत्याला भेदून सत्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करणारी राष्ट्रे जगात सन्मान्य ठरतात आणि आपला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ उज्ज्वल करतात.

 

६ जुलै या दिवशी जगाच्या इतिहासातिल एक कृरकर्मा काळाच्या पडद्याआड अगदी अलगद गेला. त्याचे नाव रॉबर्ट मॅक्नमारा. मॅक्नमारा हा १९६०-१९६८ या काळात अमेरिकेचा संरक्षणमंत्री होता. अतिशय बुद्धिमान असलेल्या मॅक्नमाराला जॉन एफ केनेडी या तेव्हाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या मंत्रीमंडळात स्थान दिले. तेव्हा मॅक्नमारा फोर्ड मोटर कंपनीमध्ये सर्वोच्च पदावर अध्यक्ष म्हणुन काम करत होता. तो अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार होता. परंतु व्यक्तिचे मोजमाप तेवढेच असले असते तर आपण हिटलरचे देखील कौतुकच केले असते.

 

दुर्दैवाने मॅक्नमारा याची कारकीर्द ४०-५० लाख निरपराधी व्हिएतनामी कंबोडिअन आणि लाओस लोकांच्या मृत्युस कारणीभूत ठरली. १९५० च्या पुढे अमेरिका आणि रशिया यांच्या शीत युद्धातील एक अतिशय काळे पर्व व्हिएतनामच्या भूमीवर उगवले. व्हिएतनामची समाजवादी वाटचाल अमेरिकेला पचली नाही. स्थानिक जनतेला स्वातंत्र देण्याच्या बहाण्याने अमेरिकन सरकारने स्थापन केलेले दक्षिण व्हिएतनाम मधील कळसुत्री सरकार लोकांच्या पसंतीस उतरत नव्हते. त्यामुळे अखेरिस गल्फ ऑफ टोंकीन मध्ये न घडलेल्या हल्ल्याबद्दल कांगावा करत अमेरिकेने उत्तर व्हिएतनामविरुद्ध युद्ध पुकारले.

 

या युद्धामध्ये एकुन ४०-५० लाख नागरिक आणि सैनिक मृत्युमुखी पडले. जगाच्या इतिहासातील सर्वात क्रुर आणि भीषण हल्ल्याला व्हिएतनामी जनतेला सामोरे जावे लागले. कुठल्याही नीतीची चाड न बाळगता अमेरिकेने प्रचंड बॉम्बहल्ले आणि रासायनीक अस्त्रे निर्लज्जपणे वापरून आपल्या पशुवृत्तीचे किळसवाणे दर्शन घडवले. या हल्ल्यांमध्ये मरण पावलेल्या नागरिकांच्या मृत्युची जबाबदारी अमेरिकेने नेहेमीच्या पद्धतीने झिडकारुन टाकली आहे. धरणे अन्नसाठा यांवर मुद्दाम हल्ले केले गेले. जंगलांमध्ये दडुन बसणार्या व्हिएतकॉंगच्या सैनिकांना नमवण्यासाठी जंगलेच्या जंगले एजंट ऑरेंज हे रसायन आणि बॉम्बींग्जमार्फत उद्ध्वस्त करण्यात आली. बंदी घातलेले ऍंण्टी पर्सोनेल माइन्स (सुरुंग) पेरले की ज्यामुळे पुढची ५० वर्षे (आणि अजुनही) निरपराध व्हिएतनामी नागरीक आपले हात पाय आणि प्राण गमावत आहेत.

 

हे सर्व करत असताना सर्व नैतिक मुल्यांना तिलांजली दिली गेली (तिलांजली द्यायला मुळात नैतिक मुल्ये होती का हा प्रश्न वेगळा!). या युद्धामध्ये एकच निकष होता आणि तो म्हणजे अमेरिकेचे नुकसान. उत्तर व्हिएतनाममध्ये विरोध अधिक प्रखर होता त्यामुळे तिथले हल्ले हे अधिक नियोजनबद्ध होते. त्याउलट दक्षिण व्हिएतनाममध्ये नगण्य विरोध असल्यामुळे तिथे कार्पेट बॉम्बींग्ज केले गेले. किंबहुना ज्या लोकांना वाचवण्याची भाषा केली गेली त्याच लोकावर बॉम्ब टाकुन त्यांना मारणे हे त्यांच्या कसे भल्याचे आहे असा अजब युक्तीवादही केला गेला. रॉबर्ट मॅक्नमारा हा त्या सर्वामागचा एक महत्वाचा सुत्रधार होता. इतर महत्वाचे सुत्रधार म्हणजे तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष लिंडन जॉहन्सन आणि परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर.

 

एकंदरीतच अमेरिकेचे हे फार मोठे वैगुण्य (नव्हे विकृती) म्हणावी लागेल की इथे सत्याचे अधिष्ठान नाही. नैतिकता आणि मानवी मुल्ये हे फक्त अमेरिकन जिवांनाच लागु आहे. बाकी सर्वांचे जगणे किड्यामुंग्यांपेक्षाही स्वस्त. न्याय हा फक्त सबळांचाच अधिकार आहे. दुर्बळांनी सबळांच्या मर्जीने जगावे अशीच सामाजीक आणि राजकीय जडणघडण. हे पाहिले की या देशाला सुसंस्कृत म्हणावे का असा प्रश्न पडतो.

 

आणि व्हिएतनामच नाही तर मागील ६० वर्षांमध्ये अमेरिकन सरकारांनी जगभर हुकुमशहांना हाताशी धरुन आपली पोळी भाजुन घेतली आहे. यादीच द्यायची झाली तर - पाकिस्तान (झिया), इन्डोनेशीया (सुहार्तो), फिलिपिन्स (मार्कोस), चिले (पिनोशे), पनामा (नोरिएगा), इराक (सद्दाम हुसेन), लायबेरिआ (चार्ल्स टेलर) ही काही ठळक उदाहरणे देता येतील.

 

व्हिएतनाम मध्ये जेव्हा स्वत:चे १०० एक सैनिक दिवसागणिक मरु लागले तेव्हा अमेरिकेने व्हिएतनाम मधुन माघार घेतली. परंतु असे करताना व्हिएतनाम हा देश नामशेष होईल असा पूर्ण आटापीटा केला.

 

मॅक्नमारा हा इतर कोणत्याही देशाचा नागरीक असता तर आतापर्यंत त्याला युद्ध गुन्हेगार म्हणुन जाहीर करुन पकडुन शिक्षा व्ह्यायला हवी होती. परंतु अमेरिकेची अशी धारणा आहे की ते करतील तेच योग्य. त्यामुळे या पाप्याला शांतपणे मरण आले. अगदी झोपेत अलगदपणे मृत्यु पावला.

 

यावर आपण विमनस्क व्ह्यायचे की विचारमग्न व्ह्यायचे हे आपण ठरवायचे. न्याय झाला पाहिजे आणि आज आणि आत्ता झाला पाहिजे ही आपली इच्छा रास्त आहे. परंतु दुर्दैवाने जगाचा न्याय वेगळा आहे. समस्त मानवजातीचा इतिहास जसा गौरवशाली आहे तसाच काळाकभिन्न देखिल आहे. सर्वच क्रुरकर्म्यांना त्यांच्या पापाची फळे मिळतातच असे नाही. परंतु त्यामुळे मानवी मुल्यांवरचा विश्वास डळमळीत होऊन चालणार नाही.

 

दुसरे असे की अनेकदा चांगल्या माणसांकडुन वाईट कृत्ये घडु शकतात. मॅक्नमाराच्या बाबतीत बोलायचे झाले तर तो एक अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार माणुस होता. परंतु त्याचे कौशल्य चुकीच्या ठिकाणी वापरले गेले आणि त्याला गंधही नव्हता की आपण काही चूक करतो आहोत. त्याच्या लेखी करोडो माणसांचे बळी हे केवल एक "स्टॅटिस्टिक" होते. ही असली बुद्धिमत्ता काय कामाची की जिला मानवी भावना आणि वेदनांची जाणिव नाही. इथे भांडवलवादाच्या मर्यादा जाणवु लागतात. नोअम चोम्स्की नावाच्या एका राजकिय विश्लेषकाच्या मते मॅक्नमारा या व्यक्तीपेक्षा एकुन पाश्चात्य समाजातील नैतिक मुल्यांबद्दल असलेला आंधळेपणा हा अधिक चिंतनाचा विषय आहे. सर्वच गोष्टी फायदा तोट्यात बसवण्यात मुल्यांचा बळी देणारी समाजव्यवस्था अजून बरीच सुधारायला हवी हे नक्की. चर्चिलने म्हटले आहे "लोकशाही सर्वात वाईट शासनप्रकार आहे. परंतु इतर सर्व प्रकार त्याहुनही वाईट आहेत." !!

 

भांडवलवादाचेही तसेच आहे. अमेरिकेच्या मागील ६० वर्षांमध्ये केलेल्या पापकृत्यांमागे भांडवलवादच आहे. अगदी इराक युद्धाचे कारण देखील दुसरे तिसरे काही नसुन ऑईल हेच आहे. परंतु भांडवलवादी लोकशाहीव्यतिरिक्त इतर सर्व मार्ग आत्तापर्यंत तितके यशस्वी ठरले नाही आहेत. तुलनेने अधिक सहिष्णु असलेली ही सध्याच्या काळातील व्यवस्था आहे इतकेच काय ते.

 

   

No comments: