Monday, April 12, 2010

टायटन मिसाईल म्युझिअम


सईबाई

फिनिक्सच्या दक्षिणेला १००-१२५ मैलावर टुसॉन नावाचे गाववजा शहर आहे. आकाराने मोठे परंतु तसे छोटे असे गावच. तिथे मागच्या वीकएण्डास्नी गेलो होतो. टुसॉनमध्ये फिनिक्सपेक्षा जास्त गोष्टी आहेत पाह्यला ... कॅचनर कॅव्हर्न्स, माऊंट लेमन, सबिनो कॅनिअन, सुहारो नॅशनल पार्क, ओल्ड टुसॉन स्टुडिओज (रिमेम्बर क्लिंट ईस्टवूड मूव्हिज!). आत्तापर्यंत टुसॉनला १० वेळा तरी गेलो असेन. यावेळी मात्र वेगळ्या गोष्टी पाहिल्या.

१. पीमा एअर ऍण्ड स्पेस म्युझिअम.
२. टायटन मिसाईल म्युझिअम.

पीमा म्युझिअम मध्ये पहिल्या महायुद्धापासुन ते १९८० च्या आसपास पर्यंतची निवृत्त विमाने ठेवली आहेत. यामध्ये जगातील सर्वात लहान विमान, केनेडी-जॉहन्सन यांचे ऐअर फ़ोर्स वन, बी-सेरिज बॉम्बर्स, इतकेच नाही तर एस आर ७१ ब्लॅकबर्ड्स हे अतिउंचावरुन टेहेळणी करणारे विमान देखील पाहिले.

एकंदरीत साहेबाने किती आधीपासुन सुरुवात करुन किती गोष्टी केल्या आहेत याची कल्पना येते. पहिल्या दुसऱ्या महायुद्धापासुनच या लोकांनी शेकडो विमाने, जहाजे बनवली आणि वापरली आहेत. किंबहुना, दुसऱ्या महायुद्दाच्या काळातच अमेरिकेतील उद्योगधंद्यांना चालना मिळाली कारण सर्वच युद्धसामग्री ही खाजगी कंपन्या तयार करणार. शासन कंपन्या चालवत नाही .... कुठल्याच. आपल्याकडे दारुगोळा बनवणे, आणि सैन्यसामग्री बनवणे हे सरकारने हातात घेतल्यामुळे
    १. ते अप्रगत राहिले आहे.
    २. ते खर्चाच्या तुलनेने महाग आहे.
    ३. सर्वात महत्वाचे तंत्रज्ञानाचे दुसऱ्या क्षेत्रात उपयोजन होऊ शकले नाही.

अर्थात इस्रो भाभा इत्यादि अपवाद आहेत. परंतु ही वस्तुस्थिती आहे की आपली अन्यत्र प्रगती पासंगालाही पुरणारी नाही. एकंदरीतच शासनाचा ढिसाळपणा आणि उदासीनता देखील कारणीभूत आहे. परंतु मला वाटते खाजगीकरण आणि स्पर्धा या गोष्टींशिवाय प्रगती होत नाही. चाणक्यानेदेखील म्हटले आहे ... शासनाने फक्त मात्स्य न्यायापासुन समाजाचे संरक्षण करावे आणि उद्योगांना चालना द्यावी. शासनाने प्रत्यक्ष उद्योगधंदे करु नयेत.

असो ... परंतु पूर्वीपासुनच अमेरिकेची तंत्रज्ञान आणि उत्पादनाची झेप लक्षात येते. हेही लक्षात येते की ही सर्व प्रगती टप्याटप्याने झाली आहे. विमानाचे इंजिन असो, वा पंख्यांचा आकार, अथवा इलेक्ट्रॉनिक्स अथवा वेग ... इत्यादि.


आज आपण ज्या गोष्टी गृहित धरतो त्या गोष्टी पूर्वी अस्तित्वात नव्हत्या हे चटकन लक्षात येत नाही. साधे उदाहरण द्यायचे तर विमानातील हवामान. विमाने जस जशी वर जातात तसतसा हवेचा दाब कमी होतो आणि तापमानही. आजकालच्या विमानांमध्ये तापमान आणि हवेचा दाब दोन्ही गोष्टी योग्य पातळीवर ठेवल्या असतात. परंतु ४०-५० वर्षांपूर्वी या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे ती दुसऱ्या महायुद्धातील विमाने मोठमोठे बॉम्ब्ज घेऊन जाणारी परंतु पूर्णपणे उघडी. हवा इकडुन तिकडे येते आहे अशी.... ३०-४० हजार फुटांवरुन उडणारी. एकेकाळी पॅरॅशुट्स देखील नव्हत्या. अद्ययावत दिशा दाखवणारी साधने नव्हती. पंख्याची विमाने ते जेट्स, दुहेरी पंख तसेच एकेरी, जमीनीवरची, पाण्यातली, टेहळणी करणारी - बॉम्बर्स - मालवाहतुक करणारी - लढाऊ - प्रवासी. सर्वच प्रकारांमध्ये अगदी जुन्या तंत्रज्ञानापासुन ते नवीन तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास अद्भुत होता.

मला वाटते खाजगी करणाचा तोदेखील एक फायदा आहे. ज्ञानाचे वितरण आणि प्रसरण होते. नविन नविन अधिक उपयोगाच्या गोष्टी अस्तित्वात येतात.

असो ...

या विमान संग्रहायलयापेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे आम्ही एक न्युक्लिअर सायलो पाहिला! न्युक्लिअर सायलो म्हणजे अशी जागा की जिथे अण्वस्त्रे तैनात केली असतात. अश्या जागा अण्वस्त्रांच्या हल्ल्यापासुन देखील सुरक्षीत असाव्या लागतात. दुसऱ्या महायुद्दानंतर रशिया आणि अमेरिकेत जगावर वर्चस्वासाठी अघोषित शीतयुद्ध घडले. यामध्ये अण्वस्त्रांची मोठी स्पर्धा निर्माण झाली. संपूर्ण पृथ्वीचा कोण अधिक विनाश करु शकतो अशी विकृत स्पर्धा लागली. आपल्या पौर्वात्य मनाला संपूर्ण विनाशाची संकल्पना कळत नाही. आशियाई देशांच्या इतिहासात अशी उदाहरणे मला तरी माहित नाहीत. याउलट पाश्चात्यांचा इतिहास अतिशय रक्तरंजित आहे. त्यांचे क्रौर्य अतुलनीय आहे. त्यांची लबाडी अविश्वसनीय आहे. अपवाद जरुर असतील .... परंतु इतिहासात डोकावले तर कोणाचाही असाच ग्रह व्हावा अशी एकामागोमाग एक उदाहरणे आहेत. पाश्चात्यांची आजची प्रगती, स्वातंत्र्य, आणि नियमबद्धता यांच्या मागे हिंसाचाराच्या अतिरेकातुन स्थैर्याला पारखे झाल्यामुळे आलेले शहाणपण कारणीभूत आहे. मी १९९९ साली कोस्टा रिकामध्ये असताना एक डॅनिश अमेरिकन माणुस माझ्याबरोबर काम करत असे. त्याच काळात अमेरिकेत कोलंबिअन हत्याकांड घडले. कोलंबिअन शाळेत कोलरॅडो राज्यात दोन शाळकरी मुलांनी त्यांच्या शाळेत अंदाधुंद गोळीबार करुन १२ मुलांना मारले. ही घटना सुन्न करणारी होती. त्यामुळे मी माझ्या सहकर्मचाऱ्याला विचारले की अमेरिकेत बंदुका अश्या सहजासहजी उपलब्ध का करुन देता? बंदी का घालत नाही? त्यावर तो म्हणाला, " जे घडले ते नक्कीच वाईट आहे. परंतु अमेरिकेत - वाईल्ड वाईल्ड वेस्ट - संस्कृती आहे. कुठलाही माणुस इतर कुणापेक्षा आपल्या बंदुकीवर जास्त विश्वास ठेवतो." !!!! विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथली नियमबद्धता, कायदेशीरपणा सर्व ठीक आहे. परंतु कायदे इतके कडक आहेत कारण लोकांचा परस्परांवर विश्वास नाही. चांगुलपणा ही कविकल्पना आहे. अपवाद असतील .... परंतु तुरळक.

असो... तर सांगण्याचा मुद्दा असा की, हिंसाचाराची ही पातळी आपल्यासारख्या पौर्वात्य लोकांना कळत नाही. परंतु संपूर्ण विनाशाचे सूत्र सर्वच युरोपिअन टोळ्यांनी पहिल्यापासूनच राबवले आहे.

त्यामुळे साहजिकच अण्वस्त्रे हातात पडल्यावर पहिल्यांदा त्यांनी त्यादिशेने पावले उचलली.

अमेरिकेत अशी ३६ ठिकाणे होती. ऍरिझोना मध्ये ८, कॅन्सास आणि अरकान्सामध्ये प्रत्येकी ८. प्रत्येक ठिकाणी एक अण्वस्त्र होते. त्याचे नाव टायटन. ही ठिकाणे अर्थातच गुप्त होती. जमीनीखाली २०० फुट खड्डा खणुन त्यामध्ये संपूर्ण इमारती बांधल्या होत्या. या इमारतींचे मजले स्प्रिंगने टांगल्यासारखे होते जेणेकरुन शत्रुच्या पहिल्या अण्वस्त्र हल्यानंतरही दुसरा हल्ला करुन शत्रुचा पूर्ण विनाश करता येईल. आकशातुन पाहिले तर कळणारही नाही इथे काय आहे. इथे सर्वच गोष्टींमध्ये दुप्पट तिप्पट रिडन्डन्सी अर्थात पर्यायी क्षमता उपलब्ध होती. अश्या सायलोज मध्ये २-४ पेक्षा जास्त लोक काम करत नसत. या लोकांना बाहेर काय चालले आहे हे कळत नसे आणि कळण्याची गरज ही नसे. त्यांचे एकच काम होते. आदेशाची वाट पाहणे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा आदेश येईल तेव्हा पुस्तकात लिहिल्यानुसार बटणे दाबणे हे त्याचे काम. आपण सोडलेले अण्वस्त्र कोणत्या शहरावर जाणार आहे हे देखील त्यांना माहीत नसे. अर्थात ही सर्व मंडळी असा प्रसंग येऊ नये अशी प्रार्थना करत असत आणि सुदैवाने एकही अण्वस्त्र वापरल्यावाचुनच शीतयुद्ध संपले.

१०-१५ वर्षांपूर्वी अमेरिकेने टायटन अण्वस्त्रे आणि हे सर्व सायलोज निकामी केली. परंतु हे ऐकल्याचा माझा आनंद क्षणभरच टिकला. त्यांनी हे निकामी केले कारण या गोष्टी खूप महाग आणि कालबाह्य झाल्या होत्या. सध्या अमेरिकेत अशी ५०० च्या वर क्षेपणास्त्रे आहेत. ती जास्त अचूक आहेत. जास्त विनाशकारी आहेत. आणि त्यांच्यावर नियंत्रण देखील दुरुन ठेवले जाते. मिसाईलची कळ दाबणाऱ्या माणसांनादेखील माहीत नसते की मिसाईल कुठे आहे.

ते सर्व ऐकुन पाहुन मी सुन्न झालो. माणसाचे मन जितके विशाल, उदार, सुंदर, उत्तुंग तितकेच ओंगळ, अतर्क्य आणि दरिद्री आहे. आपल्यातल्या चांगल्या प्रवृत्तींना कश्यामुळे चालना मिळेल आणि वाईटाचे कशाचे दमन होईल? सांगता येत नाही. कदाचित पूर्ण दमन शक्य नाही. परंतु सांकेतिक कर्मकांडाने का होईना परंतु भारतिय संस्कृतिने काही प्रमाणात नक्कीच अनिष्ट प्रवृत्तिंवर विजय नक्कीच मिळवला. आपला इतिहास इतका विकृत नक्कीच नाही. मला वाटते ... भारत जसजसा आर्थिक प्रगती करेल तस तसे भारतिय विचार - सहिष्णुता, अहिंसा, सत्याग्रह आणि सर्व सुखी व्हावेत ही भावना - नक्कीच जगाला मार्गदर्शक ठरतील. माझ्या एका शिक्षकांच्या भाषेत ..."फुटक्या भांड्यातुन मिळाले तर कोणी अमृतदेखील पिणार नाहीत" - तसे विचार चांगले असले तरीही भारत प्रगत झाल्याशिवाय जग त्यांना स्वीकारणार नाही.

3 comments:

आनंद पत्रे said...

सुंदर.. खुप महत्वाची आणि उत्तम माहिती...

बाल-सलोनी said...

aanand thanks. glad you liked it.

Here you can find something different said...

खूपच छान....