Tuesday, July 21, 2009

आघात

पुन:श्च मॉरिसटाऊनची वारी. हॉटेलमधुनच लिहितोय. इकडे आलो म्हणुन यावेळी प्रसादला फोन केला. प्रसाद आणि विभावरी (नावे मुद्दाम बदलली आहेत) हे आमचे खूप चांगले मित्र. मिशिगनहुन जेव्हा नोकरीसाठी पहिल्यांदा फिनिक्सला गेलो तेव्हा दोघांनी आम्हाला खूप मदत केली. अतिशय सरळमार्गी, उत्साही आणि बुद्धिमान जोडी! सिद्धुएवढाच एक छोटासा छोकरा - प्रणव. त्यामुळे आमची लगेच मैत्री जमली. भारतात कधीतरी परत जायचे आहे असे अमेरिकेत सर्वच मराठीजन म्हणत असतात. पुण्यामुंबईकडचे थोडे अधिक. परंतु काही काळानंतर सर्वांचा निश्चय डळमळु लागतो. प्रसाद आणि विभावरी जास्तच ठाम होते. १०-१५ वर्षे इकडे राहिले ... ग्रीन कार्ड मिळाले अगदी नागरीकत्वदेखील. परंतु त्यांनी इकडे घर काही घेतले नाही. २००५- ला परत जाणार असे ठरवले होते त्यांनी परंतु परत जाण्याचा निर्णय सोपा नाही. इकडे काही पाश (घर!) नसल्यामुळे कधीही एकदम मनात आले तर परत जाता येईल अशी आशा. नाही म्हणायला पुण्यात मात्र मध्यंतरी एक फ्लॅट घेतला त्याचा ताबा मे मध्ये मिळणार होता.

काल सहजच फोन केला तर प्रसाद म्हणतो ...."अरे तुला फोन करणारच होतो. मी महिनाअखेरिस भारतात कायमचा चाललो आहे. विभावरी आणि प्रणव भारतातच आहेत." मी थक्कच झालो. "अरे एकदम असे अचानक कसे ठरले सगळे? सामानाचे पॅकिंग ... गाडी विकणे .... नोकरी शोधणे ... सगळे कसे जमवणार आहेस? काय झाले तरी काय?" प्रसाद सांगु लागला, "वडिल आजारी आहेत म्हणुन तातडीने विभावरी प्रणवला घेऊन १५ जुन ला भारतात पोहोचली. आणि १६ जुनला तिचे वडिल वारले. नाही म्हणायला ओझरती भेट झाली." विभावरी आणि प्रसाद या धक्क्यामुळे एकदम भानावर आले. आयुष्यात खरेच काय महत्वाचे आहे? करियर ... पैसा ... की प्रियजनांचे सुख? विभावरीने निश्चय केला की आता अमेरिकेत परत जायचेच नाही. आता यापुढे इथेच भारतात आयुष्य आणि करिअर घडवायचे आणि आई आणि प्रसादच्या आईवडिलांबरोबर दिवस आनंदात घालवायचे. प्रणवला पुण्यात शाळेत घातले. विभावरी पुण्यातच नोकरी शोधते आहे कारण अमेरिकन कंपनीने ट्रान्सफर करायला नकार दिला. प्रसाद च्या कंपनीने मात्र पुण्यात बदली दिली.

काहींना हा निर्णय घाईचा वाटेल ... परंतु विभावरीची वेदना ही खूपच परिचयाची आहे अमेरिकेतील भारतियांना. काल कळते की आईला कॅन्सर झाला म्हणुन आजच्या फ्लाईटने भारतात धाव घेऊनसुद्धा आईचे अंतिम दर्शनसुद्धा मिळाले नाही असा मनीष, वडिल हृदयरोगाच्या झटक्याने गेले अशीच बातमी कळलेले राजेंद्र आणि राजा .. ही काही दूरची ऐकीव उदाहरणे नाही ... तर जवळच्या मित्रांच्या व्यथा आहेत. आणि आता विभावरी. त्यांच्या दु:खाच्या वेदना आपल्याही मनाला घायाळ करुन जातात.

प्रसाद विभावरी आणि प्रणव यांना भारतातील पुढील आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

No comments: